23 December 2013

प्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग २]

शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा
फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ",तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं मै ही शिवाजी महाराज हूं".पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती.तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही.कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते.यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी  महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले,मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला,मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले,’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे  तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत.आता हाती लागणे शक्य नाही.छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत.जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.
सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू::::: त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल.यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही.त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही,तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ? 
माझा शिवाजी राजा :: त्यांची सर  तुझ्यासारख्याला यायची नाही.तू पोटार्थी हबशी:: तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे,पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला.थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला,वैसाही होगा......मरने को हो तैयार..तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला,त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं.स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो,कसंही येवो::मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते.त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.
शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला.तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले.खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी;रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.(दिनांक - १३ जुलै १६६०).
छत्रपती शिवाजी महाराज वेढ्यातून निसटले
छत्रपती शिवाजी महाराज निसटल्याचे समजल्याबरोबर जौहरने "दिलेर मसूद" याला राजांच्या पाठलागावर पाठविले.तोपर्यंत काही अवधी निघून गेला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी योजलेली रणनीती पाहून सिद्धी जौहर आणि त्याचे सैन्य कमालीचे संतापले होते.त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी मोठ्या त्वेषाने पाठलाग सुरु केला.विशाळगडापर्यंतचे अंतर खूप असल्याने मावळ्यांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत होती.परंतू जिद्द कायम होती.विशाळगडापासून आठ मैल अंतरावर असणार्या गजापूर जवळील घोडखिंडीत छत्रपती शिवाजी महाराज जेंव्हा आले,त्यावेळी त्या खिंडीतच शत्रुशी लढ्यासाठीची तयारी शिवरायांनी दाखवली.मात्र बाजीप्रभूंनी शिवाजी राजांना पुढे निघून जाण्यास सांगितले.आपण काही सैन्य घेऊन ही खिंड लढवतो.शरीरात प्राण असेपर्यंत एकाही गनिमास पुढे जाऊ देणार नाही.असे सांगितले.छत्रपती शिवाजी महाराजांना बाजीप्रभूंच्या हट्टापायी विशाळगडावर जावे लागले.तथापि शिवरायांनी विशाळगडावर गेल्यागेल्या ५ तोफ़ा उडविल्या जातील.अशी ग्वाही देऊन त्यानंतर ही लढाई थांबवून ताबडतोब विशाळगडाकडे बाजीप्रभूंना सर्व सैन्य घॆऊन कुच करण्यास सांगितले.
बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी प्राण त्यागले
बाजीप्रभूंना निवडक सैन्य घॆऊन घोडाखिंडीत मसुदला रोखन्यासाठी थांबविले.बाजीप्रभूंच्या शरीरावर असंख्य घाव होऊन देखील त्यांची तलवार शत्रूंची शिरे उडवित होती.बाजीप्रभू मसुदशी लढता लढता धारातिर्थी पडले.मात्र शिवाजी महाराज विशाळगडावर गेल्याच्या ५ तोफ़ा ऐकल्याबरोबर बाजीप्रभूंनी प्राण सोडला.(दिनांक - १३ जुलै १६६०).छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆणारे शिवाजी काशिद व घोडखिंड पावनखिंड बनविणारे बाजीप्रभू या शूरवीरांचे पुर्णाक्रुती पुतळे कोल्हापूरातील पन्हाळगडावर बसविण्यात आले आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणारे वीर बाजीप्रभू आणि वीर शिवाजी काशिद हे स्वराज्यनिष्ठ मावळे होते.शाहिस्तेखानावर हल्ला करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी तह करून पन्हाळा २२ सप्टेंबर १६६० रोजी सिद्धी जौहरला दिला.यानंतर सुमारे १३ वर्षानंतर पन्हाळगड पुन्हा ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फ़र्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नाने स्वराज्यात जिंकून घॆतला.छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचा कारभार महाप्रतापी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराजांवर सोपविला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नेबापूला आगमन
छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्यासाठी प्राणत्याग करणार्या प्रतिशिवाजी गुप्तहेर शिवाजी काशिद यांच्या घरी गेले.शिवाजी काशिद यांच्या पत्नी पारूबाई यांचे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांत्वन केले.शिवाजी काशिद यांचा मुलगा यशवंत यांना अधिकारी पदी नेमले.गुप्तहेर शिवाजी काशिद यांचे नेबापूरला स्मारक उभारले.सर्व कुटुंबाची व्यवस्था करून छत्रपती शिवाजी महाराज राजगडावर गेले.
प्रतिशिवराय गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद आणि वीर बाजीप्रभू या स्वराज्यनिष्ठ मावळ्यांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा....

20 December 2013

प्रतिशिवराय : नरवीर शिवाजी काशिद [भाग १]

        स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव म्हणजे नरवीर शिवाजी काशिद. छत्रपती शिवरायांच्या रयतेच्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लढवणारे गुप्तहेर नरवीर शिवाजी काशिद हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
छत्रपती शिवरायांनी दिनांक १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडावर अफ़जलखानास व अफ़जलखानाचा वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णीस कापल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जानेवारी १६६० मध्ये आदिलशाहाच्या ताब्यातील मिरजेला वेढा देण्यासाठी आले.आदिलशाहाने कुर्नलचा सिद्धी जौहर याला सलामतखान हा किताब देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढण्यासाठी पाठविले.मिरजेला छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा दिल्यानंतर आजच्या सांगली जिल्ह्यातील तासागांव तालुक्यातील धुळगांव या छोट्याशा गावांत छत्रपती शिवाजी महाराज आल्याची व येथील रहिवाश्यांना शिवाजी महाराजांनी जमिनी दिल्याची ऐतिहासिक नोंद आजही धुळगांवातील लोकांच्या घरी ताम्रपटाच्या स्वरुपात सापडते.आजही तेथील लोकांकडे छत्रपती शिवरायांनी दिलेले ताम्रपट उपलब्ध आहेत.
सिद्धी जौहरचा पन्हाळगडचा वेढा
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर राहून सिद्धी जौहरला तेथेच रोखून ठेवणार होते.जोवर शिवराय पन्हाळगडावर आहेत तोवर जौहर तेथेच थांबणार हे निश्चित होते आणि पुढील रणनीती छत्रपती शिवाजी महाराज आखणार होते.कधीकधी डावपेच यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची आखणी करावी लागते.अत्यंत मुत्सद्दीपणाने आखलेले डावपेच देखील एखाद्यावेळी यशस्वी होत नाहीत.त्याप्रमाणे पन्हाळगडाच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले आणि पन्हाळगडचा वेढा जौहरने घट्ट आवळला.
वेढ्यातून सुटण्यासाठी रणनीती
सिद्धी जौहर मुत्सद्दी सेनानी होता,मुत्सद्दी राजकारणी नव्हता,विचार न करता सरळ रेषेत धडक देणार्या रेड्यासारखे त्याचे वागणे होते.म्हणून तो छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखू शकला नाही.जौहरला छत्रपती शिवरायांची रणनीती ओळखणे जमले नाही.या पन्हाळगडाच्या वेढ्याचा चार महिन्याचा काळ ओलांडला होता.नेमके याच वेळेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जौहरला पत्र पाठविल्यामुळे जौहर सुखावला होता.छत्रपती शिवाजी महाराजांकडून जौहरला निरोप गेला.उद्या आम्ही भेट घेण्यासाठी तळावर येऊ.छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा निरोप गेल्याने जौहरचा वेढा ढिला पडल.सैनिक बेहोश झाले.अवघ्या एका रात्रीचा प्रश्न होता.
गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद
गडाबाहेर कसे पडायचे ? या योजनेची तयारी चालू झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज या विचारात असतानाच गुप्तहेर खात्यातील शूरवीर शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले.शिवाजी काशिद हे पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूर गावचे होते.ते दिसायला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारखेच होते.
पन्हाळगडावर बाहेरचा माणूस आत जाऊ शकत नव्हता व आतील माणूस बाहेर जाऊ शकत नव्हता.जौहरने छत्रपती शिवाजी महाराजांना वेढ्यामध्ये अडकून ठेवल्याने स्वत: जौहरला देखील येथून हालता येत नव्हते.छत्रपती शिवाजी महाराजांनी याठिकाणची अडचण लक्षात घॆऊन नेताजी पालकरांनी विजापूरला मुबलक सैन्यासह धडका देण्यास सुरुवार केली खरी पण त्यांना त्यात यश मिळाले नाही.
विशाळगडासही वेढा
सिद्धी जौहरने विशाळगडासही वेढा दिला.वेढा अत्यंत कडक होता.नेमक्या त्याच वेळी नेताजी पालकर विजापूरला धडक देऊन जिजाऊंच्या मार्गदर्शनासाठी राजगडावर आले होते.नेताजी पालकर समोर आलेले पाहून आई जिजाऊंना संताप आला व त्या म्हणाल्या तुमचा राजा तिकडे कैद होऊन पडला आहे आणि तुम्ही दुरवर जाऊन बसलात ? राजांची सुटका कोण करणार ? तेंव्हा राजमाता जिजामातांनी छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी हाती तलवार घेतली व राजगडावरून पन्हाळगडाकडे निघाल्या.हे पाहत असलेल्या नेताजी पालकरांनी जिजाऊंना विनंती केली व जिजाऊंकडील तलवार हातात घेत म्हंटले जौहरला हिसका दाखवितो आणि राजांना सोडवून आणतो आणि आई जिजाऊंचा आशिर्वाद घेऊन नेताजी पन्हाळगडाच्या मोहिमेकडे निघाले.विजापूरहून आलेले नेताजी पालकर क्षणाची देखील विश्रांती न घेता तातडीने पन्हाळगडाकडे निघाले.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दिसणार्या समकालीन दोन व्यक्ती होत्या, हिरोजी फ़र्जंद आणि शिवाजी काशिद
पन्हाळगडावर गुप्त बैठक
छत्रपती शिवाजी महाराजांची व गुप्तहेरांची बैठक झाली.यात छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीती आखली.पन्हाळगडावरून २४ मैल दूर असलेल्या विशाळगडाच्या दिशेने या योजनेची तयारी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती.जाण्याचा मार्ग निवडला होता,केंव्हा निघायचं ? कसे निघायचं ? सोबत कोण कोण असणार ? शत्रूने अडविले तर कसा प्रतिकार करायचा ? शत्रूच्या गोटात कसा गोंधळ निर्माण करायचा ? सगळा तपशील या अगोदरच ठरला होता.या अनुषंगाने शिवाजी काशिद छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले,राजे तुम्ही सिद्धी जौहरला तहासाठी निरोप द्या.जौहरच्या भेटीला मी जातो.तुम्ही गडाबाहेर पडा,यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले तुम्हाला दगा फ़टका झाला तर ? त्यावर शिवाजी काशिद म्हणाले होणार नाही आणि झालाच तर माझ्यासारखे अनेक शिवाजी काशिद निर्माण होतील पण तुमच्यासारखे शिवराय स्वराज्याला नितांत आवश्यक आहेत.शिवाजी काशिदांच्या या प्रामाणिक व निष्ठापूर्वक आवेशाच्या बोलण्याने छत्रपती शिवाजी महाराजांना गहिवरून आले.
प्रतिरुपाचे प्रात्यक्षिक
शिवाजी काशिद यांना कोण ओळखेल काय ? याची खात्री करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा पेहराव देऊन दुपारी गडावरील अधिकारी कर्मचारी यांचे सत्कार शिवाजी काशिद यांच्या हाती पार पाडले.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांना कोणीही ओळखले नाही.जिथे आपले कर्मचारी ओळखू शकले नाहीत तिथे शत्रू तर अजिबातच ओळखू नाही शकणार अशी खात्री पटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तहाच्या वाटाघाटीसाठी येत आहोत असा निरोप सिद्धी जौहरला पाठविला.
१२ जुलै १६६० चा दिवस उजाडला.छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन पालख्या तयार ठेवण्यास संगितल्या.गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा समान पेहराव,समान सैनिक रात्री १० वाजता किल्ल्यातून दोन पालख्या खाली उतरू लागल्या.शिवाजी महाराजांनी पन्हाळगड सोडला.वेढ्याच्या एका बाजूतून ते वेढ्याबाहेर पडले.सोबत वाट दाखविणारे वाटाडे होते.त्यांनी विशाळगडाचा रस्ता धरला,मार्गात राजांची माणसे अगोदर ठरल्यानुसार त्यांना येवून मिळत होती.वेढ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज ४ ते ५ मैल दूर पोहचले.विशाळगडावर पोहचण्यासाठी १९ ते २० मैल अंतर अद्याप बाकी होते.याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसोबत १००० मावळे होते.त्यातच शिवाजी काशिद होते.यावेळी त्यांच्या अंगावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पेहराव होता.जणू प्रतिशिवराय राजेच.
सिद्धी जौहरला चकवा दिला
शिवाजी काशिद यांना पालखीत बसविण्यात आले.पालखीसोबत १० ते १२ हत्यारबंद मावळे होते.राजांचा निरोप घेऊन शिवाजी काशिद यांची पालखी लगबगीने मलकापूरच्या दिशेने गेली व छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी विशाळगडाच्या दिशेने रस्त्याने निघाली.ते पन्हाळगडापासून आणखी दूर जात असताना जौहरच्या गस्ताच्या सैनिकांनी त्यांना पाहिले.आरडाओरडा करीत ते तंबूच्या दिशेने धावले.काही वेळातच सगळा तळ जागा झाला.जौहर रागाने लालेलाल झाला होता.छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला मुर्ख बनविल्याची भावना त्याला क्षणाक्षणाला झाली.
प्रतिरुपाला शत्रुने ओळखले
सिद्धी जौहरने घोडदळाच्या तुकड्या छत्रपती शिवरायांना शोधण्यासाठी पाठविल्या.एक तुकडी मलकापूरच्या दिशेने गेली होती.या तुकडीला मलकापूरच्या रस्त्यात शिवरायांची पालखी दिसली.या पालखीत बसलेले छत्रपती शिवाजी महाराज (प्रति शिवाजी राजे: गुप्तहेर शिवाजी काशिद) दिसले.या जौहरच्या हत्यारबंद सैनिकांच्या तुकडीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांना पकडले.त्यांची पालखी सिद्धी जौहरच्या तंबूकडे नेली.छत्रपती शिवाजी  महाराज आल्याची बातमी जौहरला समजताच तो राजांच्या स्वागताला आला.त्याने छत्रपतींच्या पेहराव्यातील गुप्तहेर शिवाजी काशिद यांची भेट घेतली.छत्रपती शिवाजी महाराज तहासाठी गडाखाली तंबूत आलेले आहेत ही बातमी वार्यासारखी पसरली व गडाभोवती डोळ्यात तेल घालून पहारा देणार्या सैनिकांना समजताच त्यांना आनंद झाला.पालखीत बसलेल्या शिवाजी महाराजांना(गुप्तहेर शिवाजी काशिद) जौहरच्या समोर नेण्यात आले.इकडे सिद्धी जौहरच्या तंबूत छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखणारा अफ़जलखानाचा मुलगा फ़ाजलखान होता.क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केला होता हे फ़ाजलखानास माहीती होते.म्हणुन फ़ाजलखान गुप्तहेर शिवाजी काशिद यांना म्हणाला ’क्या आप सचमुच शिवाजी महाराज है ? अगर आपको जान प्यारी है तो सच बत’,यावर शिवाजी काशिद म्हणाले, ’हॉं मै शिवाजी महाराज हू’ आणि फ़ाजलखानाने शिवरायांचा जिरेटोप मागे सारला आणि पाहतो तर काय कपाळावर क्रुष्णा भास्कर कुलकर्णीने दिलेल्या तलवारीचा वर्मी बसलेल्या घावाचा व्रण काही दिसला नाही.त्याने तात्काळ ही बाब सिद्धी जौहरच्या नजरेत आणून दिली.

30 November 2013

आतातरी पुढे हाची उपदेश

             जगतगुरु संतशिरोमणी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे ह्र्दयाला भिडणारे अभंग. अज्ञान, रुढी, परंपरा, ब्राह्मणवाद आणि कर्मकांडात अडकलेला समाज व त्याची दयनीय अवस्था पाहून महाराज कळवळून गेले.त्यांनी बहुजन समाजाची बारकाव्याने चौफ़ेर पाहणी केली. त्यातून समाजाची दयणीय अवस्था तुकोबारायांना पाहवली नाही.ते म्हणाले,
"न देखवे डोळा ऐसा हा आकांत । परपिडे चित्त दु:खी होते ॥"
त्यानंतर त्यांच्या जे काही लक्षात आले ते समाजाचे चित्र बदलण्यासाठी समाज परिवर्तनासाठी त्यांनी खुप कष्ट घेतले,तेंव्हा महाराज म्हणाले.
"भीत नाही आता आपुल्या मरणा । दु:खी होता जन न देखवे ॥"
यातून महाराजांनी निर्भीडपणे सत्य सांगण्यास सुरुवात केली.हे सत्य कितीही तिखट व झोंबणारे का असेना पण शेवटपर्यंत त्यांनी सत्य सांगायचे सोडले नाही.हे सत्य जरी बहुमतांच्या विरोधात का असेना पण बहुमतांपेक्षा आम्ही सत्यालाच मानतो.या बद्दल महाराज म्हणतात.
"सत्य असत्याशी मन केले ग्वाही । मानियेली नाही बहुमता ॥"
किंवा हे सत्य सांगत असताना कुणाला तनका येत असेल,राग येत असेल तरी देखील आम्ही सत्यच सांगण्याचं काम करणार आहोत असे महाराज एके ठिकाणी म्हणतात.
"तुका म्हणे सत्य सांगोत । येतील रागे तरी येवोत ॥"
यावरून महाराज अत्यंत परखड भूमिका घॆताना दिसून येतात.मग ते व्रत वैकल्यांवर आसूड ओढतात.बुवाबाजीवर प्रहार करतात तर कधी वैदिक पंडीतांच्या बाष्फ़ळ ज्ञानाची प्रौढी उघड करतात.अनेकेश्वर नाकारताना ते म्हणतात.
"सेंदरी ही देवी दैवसे । कोण ती पुजी भूते केते ॥
आपल्या पोटा जी रडते । मगती शिते अवदान ॥१॥"
त्याहीपेक्षा पुढे जाऊन महाराज म्हणतात सगळ्या देवांचा देव म्हणून आम्ही फ़क्त विठ्ठलच मानतो,स्वीकारतो.
"नव्हे जोखाई जोखाई । मायराणी मेसाबाई॥
बळीया माझा पंढरीराव । जो या देवांचाही देव ॥
रंडीचंडी शक्ती । मदयमांस भक्षिती॥
बहीराव खंडेराव । रोटी सोटीसाठी देव ॥
गणोबा विक्राळ । लाडू मोदकांचा काळ ॥
मुंज्या मैसासुरे । हे तो कोण लेखी पोरे॥
वेताळे फ़ेताळे । जळो त्यांचे तोंड काळे ॥
तुका म्हणे चित्ती । धरा रखुमाईचा पती ॥४॥"
नवस केल्यावर लेकरं-बाळं झाले असते तर नवरा करायची गरज काय ? हा जाहीर प्रश्न महाराज चुकलेल्या समाजाला करतात.
"नवसे कन्या-पुत्र होती । मग का करणे लागे पती ॥"
हे सगळे करीत असताना समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढत असताना,ज्ञानाचा नवा मार्ग दाखवत असताना त्यांना बर्याच संकटांना तोंड द्यावे लागतं.ब्राह्मणवर्ग त्यांना त्रास देतो,अमानुष छळ करतो तर त्यांची गाथा पाण्यात बुडवतो.
यातून महाराज खचून न जाता पुन्हा नव्याने उभे राहतात आणि पहिल्याहीपेक्षा खंबीर,धाडसी भूमिका ते पुढे घॆतात.
"तुका म्हणे ऐसा नरा । मोजुनी हाणाव्या पैजारा ॥"
किंवा
"तुका म्हणे गाढव लेखा । जेथे भेटेल तेथे ठोका ॥"
             अशा प्रकारे जगतगुरु तुकोबाराय समाजासाठी दिवसरात्र स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करायला लागतात.अज्ञान सोडा,भटमुक्त व्हा,भागवत धर्म स्विकारा असे वारंवार महाराज सांगतात.सर्व सांगुनही न ऐकणार्या वर्गाबद्दल त्यांना चीड येते.ह्या न ऐकणार्या वर्गाला एकदा महाराज उद्देशून म्हणतात.
"किती सांगू तरी न ऐकती बटकीचे।
पुढे शिंदळीचे रडतील ॥"
               आज शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या आणि वाटले महाराजांचे बोल खरे ठरले.त्यांनी सांगितलेले न ऐकल्यामुळे आमच्यावर रडायची वेळ आली.अजुन आम्हाला तुकोबाराय पुर्णपणे समजलेले नाहीत असेच म्हणावे लागेल.एवढेच काय तर बर्याच जनांच्या घरामध्ये तुकोबारायांची गाथा नाही.संत तुकोबाराय वाचून,समजून घेण्याऐवजी आम्ही वारकरी फ़क्त मंदिरात तुकाराम चालीवर गातो.तुकोबाराय फ़क्त गाण्यापुरतेच ठेवले आम्ही.यामुळे त्यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास,
"उठिते ते कुटिते टाळ । अवघा मांडिला कोल्हाळ ॥"
आम्ही एवढे शहाणे, महाराज करू नको म्हणाले ते आम्ही आधी करून बसलो.नव्हे आजही करत आहोत.
महाराज व्रत,वैकल्याच्या भानगडीत पडू नका म्हणाले होते.आम्ही अजुनही व्रतवैकल्य सोडायला तयार नाही.महाराज दगडाला देव मानू नका म्हणाले होते,ते रंजल्या गांजल्यांना आपुले म्हणणार्यांच्यात देव शोधा म्हणाले होते.आम्ही नेमकं याच्या उलट वर्तन करतो.ते नवस करू नका म्हणाले होते आम्ही करतो,ते बुवाबाजी,कर्मकांड करू नका म्हणाले होते.पण बुवाबाजी,बापूकापू आणि भामट्यांशिवाय आमचे पान हालत नाही.ते अनेक देवी-देवता मानू नका म्हणाले होते.आम्ही सगळ्यांना खेटून येतो.ते म्हणाले होते प्रत्येक गोष्ट श्रमाने,अभ्यास करून मिळवा पण आम्हाला हे जमत नाही.आपला कल दोन नंबरच्या मार्गावर असतो.
म्हणून आम्ही आतातरी अंतर्मुख होऊन तुकोबारायांना समजून घेतले पाहिजे.किमान त्या दिशेने एखादे पाऊल तरी टाकले पहिजे.असे म्हणतात साहित्याला काळाच्या मर्यादा असतात.पण आजही तुकोबारायांचं साहित्य प्रासंगिक ठरतं.समाजोपयोगी ठरतं.ही गोष्ट केवढी मोठी आणि अभिमानाची आहे.आपली प्रगती व्हावी,गुलामीतून आपण बहुजन समाजाने बाहेर पडावे म्हणून आयुष्य पणाला लावणारे संत तुकोबाराय आम्ही असेच विसरून जायचे का ?
ह्रुदयाला घाव झाल्यावर,असंख्य शारिरीक आणि मानसिक वेदना सहन करून अगदी आतून घायाळ झालेले संत तुकोबाराय अगदी  कळवळून शेवटचा उपदेश करतात.रात्रंदिवस तुमचा आमचा विचार करणारे तुकोबाराय शेवटीस काकुळतीस येवून म्हणतात...
"आतातरी पुढे हाची उपदेश।
नका करू नाश आयुष्याचा ॥
सकळ्यांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥"
बघा काही.....जमतं का पाळायला !!

* नार्याची मुंज आणि कूशीचे लग्न
* तुकोबारायांची गाथा

10 October 2013

विश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण

          कुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.
शिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा ? तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन "कुळवाडीभूषण" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा! शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या "शिवरायांची पत्रे" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून "हाल" म्हणजे हल्लीचे आणि "इस्तकबाल" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.
शिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.
शिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र  बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.
शिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर "त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.
शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.
अशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.

30 September 2013

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले

            काटेरी अंथरुणावर जन्माला येवून या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात.भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानाम्रुताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले या अशाच असामान्य व्यक्ती नव्हे तर ज्ञानाची देवता आहेत.त्यांच्यामुळेच आज,"अगं सोनू,अरे पिल्या,अरे बाळा लवकर उठ,शाळेला जायचं ना ! तयारी करावयाची आहे.लवकर उठ."अशाप्रकारचे संवाद आज भारतातील घराघरात ऐकायला मिळतात.
शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घराघरात पोहवविणार्या पहिल्या महिला जन्मदात्या म्हणून अजरामर असणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव येथे झाला.नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची एकुलती एक लाडकी, हुशार मुलगी होती.तत्कालीन परिस्थितीत भारतीय समाजात बालविवाहाची पद्धत असल्यामुळे सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फ़ुले यांच्याबरोबर झाले.त्यावेळी फ़ुलेंचे वय १३ वर्ष होते.१८४० मध्ये विवाह झाल्याबरोबर परंपरागत चातुर्वर्ण्याधिष्ठीत समाज व्यवस्थेरूपी हिरव्यागार विषव्रुक्षाला घनदाट जंगलातील एका-एका विषव्रुक्षाला मुळासकट उपटून फ़ेकून देण्याचे धाडस,बाणेदारपणा आणि जॊखिम आपल्या पतीबरोबर सावित्रीबाईंनी तना-मनाने स्विकारले होते.
सावित्रीबाईंनी त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र स्त्री म्हणून विचार केला.फ़क्त विचार करून थांबल्या नाहीत तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वाटचाल केली.ही वाटचाल सनातन काळात अत्यंत खडतर होती म्हणूनच त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीचे मोल अनमोल होते हे निश्चितपणे समाजाने स्वीकारले आहे.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव नेहमी म्हणत त्यामुळे "विद्या हेच बळ,ज्ञान हीच शक्ती" ही म.जोतिराव फ़ुलेंची मुलगामी क्रांतिकारी वचने सावित्रीबाईंनी आत्मसात केली होती.शिक्षणाशिवाय समता नाही आणि समतेशिवाय मानवता नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी "चुल आणि मुल" यात गुंतुन न पडता घराचा उंबरठा ओलांडून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला.महात्मा जोतिराव फ़ुलेंनी स्वत: सावित्रीबाईंनी शिकविण्यास सुरुवात केली.त्यासाठी शेतातील काळी जमीन सावित्रीबाईंची पाटी होती.त्या पाटीवर सावित्रीबाई एका छोट्याशा काडीने अक्षरे गिरवायला शिकल्या पुढे त्यांनी अहमदनगर येथे फ़रारबाईंच्या व पुण्यात मिचेलाबाईंच्या मॉर्मन स्कुलमध्ये अध्यापनाचे शिक्षण घॆऊन आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या हिच भारतीयांच्या इतिहासात अजरामर संस्मरणीय घटना घडली.
स्त्रियांच्या आणि शुद्रांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्याचा महात्मा जोतिराव फ़ुलेंचा मानस होता."जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी." या सत्याचा त्यांना प्रत्यय आल्यामुळे विचाराअंती त्यांनी मुलींच्यासाठी शाळा काढण्याचे ठरवून १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या.आपल्या या कार्याचा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकारी मंडळाची स्थापना केली.
१ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. ती भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल.जेव्हा ब्राह्मण समाजाला समजले की ही शाळा एका शुद्र जोडप्यांनी सुरु केली आहे.तेंव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे,चिखल फ़ेकणे,अचकट-विचकट भाषेचा वापर करणे,निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते.परंतू सावित्रीबाई फ़ुले या स्वभावाने बंडखोर स्वभावाच्या होत्या.अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही.कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्या निर्माण करणारे होते.त्यांनी अस्प्रुश्यांसाठी शाळा काढल्या.त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते.स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे.परंतू हे धाडसी काम फ़ुले दांपत्यांनी सुरु केले.
सावित्रीबाई प्रतिभावंत कवयत्री देखील होत्या.त्यांनी ५० वर्षे जोतिराव फ़ुलेंच्या ध्येय प्रणाली, चळवळीमध्ये झोकून दिले होते.सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशीत झाला.त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बहुजन बांधवांना काव्य अर्पण केले.उदा.तयास म्हणावे मानव काय,शिकण्यासाठी जागे व्हा,शुद्र शब्दाचा अर्थ श्रेष्ठ धन इत्यादी काव्य रचनेमधून त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.एका काव्यामध्ये सावित्रीबाई फ़ुले म्हणतात- नसानसात इर्षा खेळवू विद्या मी घेईन,शुद्रत्वाचा डाग हो माझा निपटून मी काढीन.सावित्रीबाई म्हणतात-तुमच्या रोमारोमात अशी इर्षा जाणवू द्या की,आम्ही शुद्र आहोत याचा डाग आम्ही पुसुन टाकणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे.अशा प्रकारे काव्य रचना करून बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरित,चैतन्यमय केले आहे.विद्येचे महत्व पटवून दिले.खालील ओळीमध्ये त्यांनी सांगितले आहे की "विद्याधन आहे रे श्रेष्ठ सार्या धनाहून,तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानवी जन".पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो परंतू स्त्री शिकली तर संपुर्ण कुटूंब शिक्षित होते.पर्यायाने समाज शिकतो आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागू शकतो.ही शिकवण सावित्रीबाईंनी समाजाला दिली.कारण त्या काळात अखंड भारतामध्ये स्त्री ही एका रानात चुकलेल्या पाडसासारखी वावरत होती.ती घाबरलेली,बावरलेली,मनाने दबलेली होती.कोणीतरी ब्रुचे धिंडवडे काढील या मनस्थितीत वावरत होती.तिला शिक्षणापासून वंचित केले जात होते.पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि स्त्रियांना दासी लेखणारी पुरुषी मानसिकतेने महिलांवर अनेक बंधने लादली होती.त्याठिकाणी सावित्रीबाईंनी अंधार्या कोठडीत चाचपडणार्या स्त्रीला तिच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.सनातनी लोकांचा रोष पत्करून तिला पुरुषांच्या बरोबरीत वागायला शिकवले.असे हे शिक्षण क्षेत्रातील महान कार्या बघून ब्रिटीश सरकारने त्यांचा पुणे येथील विश्रामवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ मध्ये तत्कालीन पुना संस्क्रुत कॉलेज चे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली फ़ुले दांपत्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला स्त्रीला कोणी मार्ग दाखविला असेल तर तो सावित्रीबाई फ़ुलेंनीच.त्यांनी जर हा रस्ता दाखवला नसता तर कोठेतरी सह्याद्रीच्या रांगामध्ये,कोणत्यातरी दाट जंगलात,कोणत्यातरी गुहेत काट्यांतून प्रवास करायला लागला असता.सह्याद्रीच्या शिखरावर पोहचण्याऐवजी सह्याद्रीच्या खोल दरीत व दु:खाच्या गर्तेत हिंडावे लागले असते.पण सावित्रीबाई फ़ुलेंनी राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्या बरोबरीने स्त्रियांसाठी जी नवीन दालने उभी केली त्याला तोड नाही.त्याकाळी मुठीमध्ये मापेल एवढ्या मनुवादी लोकांची शिक्षणावर मक्तेदारी होती.ही मक्तेदारी स्वत: अक्षर गिरवून या गिरवण्यातून पुर्ण भारतातील स्त्रियांना भवितव्याचा मार्ग दाखविला.
या प्रेमळ माऊलीचे १० मार्च १८९७ ला महानिर्वाण झाले.म्हणून म्हंटले जाते की,"युगायुगातून एखादीच अशी सावित्री जन्माला येते म्हणूनच ती युगसावित्री होते." राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुलेंसारख्या क्रांतीसुर्याबरोबर सहवास आणि मार्गक्रमण करीत असणारी ती एक क्रांतीज्योती होती.म्हणूनच अशा तपस्वी,न्यायमुर्ती,तेजस्विनी महामायेला कोटी कोटी विनम्र प्रणाम.

24 September 2013

जिजाऊ चरित्रातून काय शिकावे

           अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे!. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.
राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे.आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते.जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
आजची श्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे.पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.
शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगेसोयरे आणि कौटूंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही.जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.त्यामुळे तानाजी,येसाजी,कान्होजी,शिवाजी,बाजी पालसकर,मुरारबाजी,बहिर्जी,कावजी,नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले.म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.
स्वराज्यावर अनेक संकट आली,अफ़जलखान,दिलेरखान,शाईस्तेखान,सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास  निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले.शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या,घोड्यावर बसा,गडकोट-किल्ले पायदळी घाला,शत्रुचा नि:पात करा,तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस,आपल्याला काय करायचेय, असे सांगते.आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे.जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.
राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,तप,शांती,उपवास करीत बसल्या नाहीत.यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत.आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी,निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जीवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी,म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी  स्त्री  स्वत:चे संरक्षण  करू  शकत नाही. इतका न्युनगंड स्त्रियांमध्ये  असणार्या  धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.
जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती,युद्धकलेचे शिक्षण दिले.पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी  उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला.सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं,विकासाचं,प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.
शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्जाराजा जयसिंगला जिंकता आली नाही.कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती.म्हणजे जिजाऊंमातांची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते.शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या.आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे.शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले.गावागावांईल तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेंव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला.या प्रसंगी जिजाऊंची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.जिजाऊ - शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता.जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात.असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल,निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी,हिच जिजाऊ चरणी प्रार्थना...
शिवश्री श्रीमंत कोकाटे,इतिहासतज्ञ 
संपर्क : ९४२३३३६४२८

22 September 2013

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी महापुरुषांचे कार्य विचार डोक्यात घ्या त्यानेच खरी प्रगती होईल.
                                         - शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब
                                                         (मराठा सेवा संघ संस्थापक)
            संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांना खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनीच समोर आणला.महात्मा फ़ुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती.त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फ़ुले यांनी लिहिले.शिवरायांचा पोवाडा लिहुन खरे शिवराय गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभुषण होते हे सत्य सर्वप्रथम मांडले.महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार.शिवरायांना ते कमी लेखत नव्हते.किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच.शिवराय हे निरक्षर नव्हते.आज याचे पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही.आज महात्मा फ़ुले हयात नाहीत.ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता.महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय ,छ.शिवाजी महाराजांचा विजय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना "क्रुष्णराव अर्जुन केळूस्कर" गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते.या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.केळूस्कर गुरुजी हे एक बहुजन विद्वान होते.छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बॅरिस्टर" झाल्यावर त्यांची कोल्हापूर शहारात रथातून मिरवणूक काढून फ़ुले उधळली होती.राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.सयाजीराव गायकवाड हे इ.स. १८७५ ते इ.स.१९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते.बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
मराठा स्वराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणार्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलुखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फ़डकत ठेवला;पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही.परंतू आपला इतिहास न समजलेला बहुजन आजही आपण कोण आहोत हे विसरत आहेत.त्यामुळे आता आपणच ठरवावे की,आपण कोण आहोत ? कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील ? हाच खरा प्रश्न आहे.

8 September 2013

मराठा स्वराज्याची निशाणी : भगवा

           इतिहासामध्ये रामदासांचे  महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत.एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे "महात्म्य" प्रसिद्ध केले जाते,त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत.गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत.त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत.या रामदासी कथांबद्दल लिहिताना "न.र.फ़ाटक" यांनी आपल्या "रामदास व शिवाजी" या लेखात लिहिले आहे की "रामदासी चमत्काराच्या ज्या दुसर्या कथा आहेत, त्या पुर्वीच्या व नंतरच्या साधु संतांच्या चमत्काराशी जुळणार्या आहेत, इतकेच नव्हे तर काही कथा इतर साधू संतांच्या चरित्रातून घेऊन रामदासाच्या चरित्रात भरल्या आहेत की काय असा संशय येतो.आपल्या गुरु च्या जीवनकथेत कसलीही उणीव राहू नये व दुसरा कोणताही संत कोणत्याही बाजूने आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ दिसू नये, असा संकल्प करून सांप्रदायिक लोक रामदासाची चरित्रे लिहावयास बसल्यानंतर चमत्काराचा तुटवडा कसा उत्पन्न होणार ? उदा.सरस्वती गंगाधरचे गुरुचरित्र आणि रामदासाचे चरित्र ही एकमेकांशी ताडून पाहिल्यास वरील विधानाची सत्यता अंतरंगात ठसेल.",न.र.फ़ाटक यांनी यापुढे अनेक उदाहरणे देऊन हे विधान स्पष्ट केले आहे.
 छत्रपती शिवाजी महाराजांनी विरक्त होऊन एकदा आपल्या तथाकथित गुरुच्या म्हणजे रामदासाच्या झोळीत आपले राज्य अर्पण केल्याचा  कागद टाकून दिला आणी रामदासाने तो कागद शिवरायांना परत देऊन मला गोसाव्याला राज्य काय करावयाचे आहे.तुज राज्य चालव फ़क्त माझ्या स्वामित्वाची खूण म्हणून आपल्या राज्याचे निशाण भगवे कर म्हणजे झाले असे सांगितले.अशी कथा जी सांगितली जाते ती वरील मसाल्याचीच आहे.या कथेलाही ऐतिहासिक आधार नाही.न.र. फ़ाटक लिहितात की,"शत्रुला जिंकून राज्य अर्पण करण्याची कल्पना अतिशय प्राचिन काळापासून हिंदू वाड्मयात प्रचलित आहे.युधिष्ठिरने कौरवांच्या पराभवानंतर राज्य ब्राह्मणाला समर्पिल्याचे वर्णन महाभारतात आहे.वसिष्ठ ला रामचंद्रांनी राज्य दिल्याची कथा आहे.रजपुतांच्या इतिहासात" अशी उदाहरणे सापडतात.गोपीचंदाचा राज्यत्याग हा या कथापरंपरेतीलच एक दुवा आहे." शिवाय थोडीशी मिळालेली जहागीर ज्याला सोडून देता आली नाही,त्याने मिळालेले राज्य परत केले असे म्हणजे हा निव्वळ ढोंग आहे.
छत्रपती शिवरायांचे भगवे निशाण पाहून रामदासाच्या झोळीत राज्यार्पण करण्याची इच्छा रामदासाच्या भक्तांना झालेली दिसते.रामदास साधूपुरुष होते तेंव्हा सन्याश्याच्या भगव्या वस्त्राची जोड शिवरायांच्या भगव्या निशाणाशी घालून दिली की ठिक जमेल असे समजून ही कथा रामदासाच्या चरित्रात घुसडलेली दिसते.पण या चरित्रकारांनी जात विचार केलेला दिसत नाही.कारण रामदास हे संन्याशी नसल्याने ते इतर सन्यांश्यांसारखे भगवे वस्त्र न वापरता विटकरी रंगाचे वस्त्र वापरत होते जिथे स्वत:चे वस्त्रच भगवे नव्हते तिथे शिवरायांच्या झेंड्याला भगवे वस्त्र कोठून देणार ?.
बर्याच इतिहासकारांनी भेगवा झेंडा या विषयावर प्रकाश टाकलेला आहे.भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून असून तो शहाजीराजांनी सुरु केलेला आहे.हे मत कोणत्याही भटोबाला किंवा रामदासी भक्ताला खोडता आलेले नाही."रामदास आणि शिवरायांची भेट झालीच नाही असे बर्याच इतिहासकारांचे म्हणने आहे.तरीही थोडा वेळ मानले की शिवराय आणि रामदासांची भेट झाली तर ती १६७६ मध्येच.त्यावेळी शिवराज्याभिषेक होऊन दोन वर्षे झाली होती व त्याआधीच भगवा सर्वत्र फ़डकत होता.यावरून भगव्या झेंड्याचा संबंध रामदास स्वामींशी लावण्यात अडचण येत आहे." बरे रामदासांच्या सांगण्यावरून भगवा झेंडा शिवरायांनी घेतला असे मानल्यास पुर्वी राज्य कमविताना निशाण कोणते होते याचाही उल्लेख कोठे आढळत नाही, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.
"छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे पराक्रमी होते.पाच पातशाहीत त्यांनी सन्मानामे नोकरी केली.मोठमोठ्या लढाया मारल्या.कर्नाटकात फ़ार मोठा मुलुख जिंकला व तंजावरचा पाया घातला.आपला अंमल जाहीर करण्याला व सैन्याच्या हालचालीला निशाणीची म्हणजे झेंड्याची गरज असते.त्यासाठी शहाजीराजांनी आपले निशाण भगवे केले."शेडगांवकरांच्या बखरीच्या छापिल पुस्तकात १३ व्या पानावर पुढील मजकूर आहे.दुसरी लढाई जाधवराव वजीर व राजे यांची जाहली नंतर शहाजीराजे हे कोथळा पर्वत चढोन शिखरावर फ़ौजेसुदा राजघाटाने चढून गेले,त्या दिवसापासून राजघाट असे अद्याप म्हणत आहेत.श्रीशंभु महादेव यांचे दर्शन करून शंभुचे भगवे वस्त्र प्रासादिक ते आम्हांस वंद्य हे जाणुन शहाजीराजे यांना त्याचक्षणी आपली लष्कराची ढाल भगवी व हत्तीवरील निशाण व घोड्यावरील डंका निशाण भगवे." त्याच दिवसापासुन तीच चाल आजपावेतो चालत आहे.परंतू पुर्वीचे मुळ ठिकाण उदेपुरास निशाण पाच रंगाचे तिकडे आहे हे सुर्यवंशी राणाजी म्हणोन तेच निशाण पुर्वीचे आहे.शहाजीराजे यांनी शंभुचे ठिकाणी तळीचे ठिकाणी तळ्याचे चिरेबंदी ताल बांधावयाचे काम सुरु केले.नंतर तेथुनच कुच दरकुच करून विजापुरास लढाई करीत करीत गेले.शके १५४८ क्षयनाम सवतसरे फ़सली सन १०३६ या साली तेथे जाऊन सुलतान महमदशहा पातशहा याची व शहाजीराजे या उभयतांचे भेटीचा समारंभ जाहला."
"शेडगांवकरांच्या बखरीतील काही गोष्टी चुकीच्या ठरतील.कालाची संगती त्यात कोठे कोठे बरोबर रहिलेली नाही.बखर लिहिणार्यास गोष्टी जशाजशा आठवल्या तसतशा त्याने त्या लिहिल्या आहेत.तथापि शेडगांवकरांचा राजघराण्याशी निकट संबंध होता. व निशाण बदलण्याची गोष्ट सर्व घराण्यांत घडून आल्याने तिची माहीती कर्णोपकर्णी सर्व भोसल्यांना असलीच पाहिजे.आपले निशाण पुर्वी कसले होते आणि ते पुढे काय कारणाने केंव्हा बदलले ही माहीती बापापासून मुलाला व आजापासून नातवाला मिळणे साहजीकच आहे.मुळचे निशाण उदेपुरचे पाचरंगी होते.पण शंभुप्रसादानंतर ते भगव्या रंगाचे शहाजीने केले असेही ही बखर सांगते."
शहाजी राजांना शंभु महादेवाची भक्ती विशेष होती असे दिसते.म्हणूनच त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव शंभु ठेविले.यापुर्वी या घराण्यात शंभु हे नाव आढळत नाही.दुसरा पुत्र शिवाजी यांचेही नाव शिव हे शंभुमहादेवाचेच आहे. नामदार भास्करराव जाधव यांनी शहाजीराजांनी हे भगवे निशाण स्वीकारले तो प्रसंग किती आणीबाणीचा होता ते वर्णन करून संकटकाली कुलस्वामीचा प्रसाद म्हणूनच भगव्या निशाणाची उत्पत्ती झाली असे लिहिले आहे.पुढे ते लिहितात की "विजापुरच्या अदिलशहाची भेट सन १६२६ मध्ये झाली असे का.स.प.या. पान.४१०  यावरून उघड होते. यापुर्वी थोडेच दिवस भगवे निशाण शहाजी राजांनी सुरु केले होते.म्हणून शहाजींच्या पुणे व सुपे जहागिरीत हे निशाण शिवजन्माच्या अगोदरच फ़डकू लागले होते.शिवाजी राजांस बालपणापासूनच भगव्याचा अभिमान वाटत होता व त्याच निशाणाखाली लढून त्यांनी व त्यांच्या सरदारांनी हिंदुपदपातशाही स्थापना केली."
"राज्याभिषेक करूण घेतांना छत्र,चामर,सुर्यपान,सिंहासन वगैरे राजचिन्हे धारण करावी लागली.त्यावेळी छत्रपतींच्या उच्च दर्जास साजेल असा जरीपटकाही स्वीकारला.पण भगवे निशाण हे आपल्या कुलस्वामींच्या स्मरणार्थ आहे व तय त्या कुलस्वामींच्या प्रसादाच्या दिवसापासून आपल्या घराण्याचा खरा उदय झाला ही गोष्ट स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाही चालू ठेवला.सध्या मोठया समारंभाच्या वेळी जरीपटका भगव्या झेंड्याबरोबरच मिरवण्यात येतो.कायम सतत फ़डकणारे निशाण भगवा झेंडाच आहे."
"तंजावरसही मुळापासून भगवा झेंडाच फ़डकतो ही गोष्ट विशेष विचार करण्यासारखीच आहे.भगवा रामदासांच्या आज्ञेने शिवछत्रपतींनी सुरु केला असता तर तो तंजावत मध्ये फ़डकणे संभवनीय नाही.तंजावर शिवरायांच्या अंमलात केंव्हाही नव्हते, व व्यंकोजीराजे हे आपल्या वडील भावाचा नेहमीच मत्सर करीत.म्हणून त्यांचे निशाण तंजावरास टिकणे शक्य नाही.यावरून भगवे निशाण शिवछत्रपतींनी सुरु केले नसले पाहिजे.बखरीत वर्णिल्याप्रमाणे शहाजी राजांनी आपले निशाण भगवे ठरविले.याच कारणाने त्यांच्या महाराष्ट्रातील व कर्नाटकातील मुलुखात तेच सर्वत्र प्रचारात आले.शिवाजी व व्यंकोजी या शहाजीराजांच्या मुलांनी त्याचा अभिमान धरून तेच पुढे चालविले.यासाठी हा भगवा झेंडा मराठेशाहीचे निशाण म्हणून शहाजीराजांच्या वेळेपासून सर्वत्र दिसून येत आहे."
यावरून शिवरायांच्या राज्यार्पणाची कथा आणि भगवा झेंडा यांच्या संबंधात रामदासांची किंमत काय आहे हे लगेच दिसून येते.
जय जिजाऊ || जय शिवराय

26 July 2013

॥ फ़ुले-शाहू-आंबेडकर ॥

सामाजिक क्रांतीचे वादळ महात्मा फ़ुले :-
राष्ट्रपिता महात्मा फ़ुले हे जसे अभ्यासक होते तसेच ते प्रबोधनकारही होते.ते भारतीय सामाजिक सुधारणेचे आंदोलन छेडणारे पहिले क्रांतीकारक होते.त्यांचे आंदोलन खर्या अर्थाने मानव मुक्तीचे आंदोलन होते. सामाजिक परीवर्तनासाठी प्रबोधनाची गरज ओळखून त्यांनी आपले लिखाण केले सामान्य जनास सहज समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत केले म्हणुन महात्मा फ़ुले सामाजिक क्रांतीचे जनक मानले जातात.
धर्मग्रंथातील रुढी,सामाजिम अन्याय,अंधश्रद्धा आणि उच्चनिचतेच्या भेदभावांनी शुद्रातिशुद्रांना व स्त्रियांना गुलाम बनविले म्हणून महात्मा फ़ुलेंनी लेखणीचा आसूड बनवून धर्मग्रंथ आणि चातुर्वण्य व्यवस्थेवर प्रखर प्रहार केले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
क्रांतीकारी राजपुरुषाचा उदय :-
जोतिराव फ़ुलेंच्या लेखणीच्या फ़टकार्यांनी निर्माण केलेलं वादळ अजुन शमले नाही.कारण दि.२१-११-१८९० रोजी क्रांतीसुर्य मावळल्यानंतर उदयास आलेले करवीर रियासतीचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फ़ुलेंनी सुरु केलेली "सत्य शोधक समाज" ही क्रांतीकारी चळवळ पुढे चालू ठेवली.राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचे वंशज होते.ते एक सुंदर  आणि वैभवशाली संस्थानाचे राजे होते.त्यांच्याजवळ सत्तासंपत्ती होती.त्यांना ऐशारामात जीवन जगता आले असते.तरीसुद्धा ते एक क्रांतीकारक कसे बनले ? हे जाणुन घेणे गरजेचे आहे.राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे समाजातील जातीव्यवस्था,अस्प्रुष्यता,उच्चनिचता,शुद्रादिशुद्र आणि स्त्रीयांवर लादलेली गुलामगिरी नाकारणारे क्रांतीकारी राज पुरुष होते.त्यांनी आपले सारे आयुष्य प्रजेच्या हितरक्षणासाठी व्यथीत केले.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सात्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे ,त्यांच्या हातचे पाणी पीत असत.शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले.ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले.
महारोग्यांची काळजी घेणारे शाहू :-
        महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे.म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते.
राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले,त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे,कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा,त्यांच्या वेदना जाणणारा,त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
शाहू-आंबेडकर प्रथम भेट :-
एके दिवशी मुंबईमध्ये शाहू महाराजांनी वर्तमान पत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वाचुन मन प्रसन्न झाले. महाराजांनी तात्काळ डॉ.बाबासाहेबांच्या निवास्थानी सौहार्दपुर्ण भेट दिली.करवीर संस्थानाचे राजे यांच्याशी अचानक भेट झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उर आनंदाने भरून आले.
शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घॆऊन सांगितले की मी आता काळजीमुक्त झालो.अश्प्रुश्यांना त्यांची काळजी घेणारा पुढारी मिळाला.या भेटीला आंबेडकर चळवळीमधील मैलाचा दगड संबोधले तरी वावगे ठरू नये.
फ़ुले-शाहूंचे वारसदार भिमराव :
महात्मा फ़ुले यांनी पेटविलेली सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवून दि.६/५/१९२२ रोजी छत्रपती शाहूंची प्राणज्योत मावळली.शाहू छत्रपतींच्या नंतर ती क्रांतीज्योत प्रज्वलित ठेवण्याची शक्ती केवळ बाबासाहेबांमध्येच होती आणि फ़ुलेंचा आणि शाहूंचा वारसा भिमरावांनी यशस्वीरित्या पुढे चालू ठेवला.
म्रुत पावलेल्या स्वाभिमानाला जाग्रुत केले:-
डॉ.बाबासाहेब हे एक असे क्रांतीकारक होऊन गेले की ज्यांनी गुलामीच्या विरुद्ध बंड करावे म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली.अस्प्रुश्य समाजातील म्रुत पावलेल्या स्वभिमानाला जग्रुत केले आणि वर्णवर्चस्ववादी लोकांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांच्याशी बोलण्याची शक्ती निर्माण करुन चातुर्वण्य व्यवस्थेच्या चिंढड्या चिंढड्या केल्या.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा :-
बहुजन समाजाला या देशाची शासनकर्ती जमात होण्यासाठी "शिका-संघटित व्हा-संघर्ष करा" बाबासाहेबांनी करून दिलेली ही शिकवण विसरून त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बहुजन समाज दिशाहिन झाला.अशा परिस्थितीत बहुजन चळवळीच्या क्रुतीशील नेत्रुत्वाची जबाबदारी मा.म. देशमुख ते आ.ह.साळूंखे व इतर बहुजन संघटनांनी संभाळली.
भारत हा अनेक जाती,धर्म,भाषा आणि रीतिरिवाजांचा देश आहे.संपुर्ण बहुजन समाज संघटित करणे अशक्य आहे असेच सर्वांना वाटत असे.परंतू संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी मात्र हा समज चुकीचा ठरविला.त्यांनी सर्व बहुजन समाजास संघटित करून आपल्या कामाची सुरुवात केली.बहुजन समाजासाठी त्यांनी अविश्रांत काम केले.अशा संघटनांची आज गरज आहे.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा !.

30 June 2013

वेदोक्त : एक धार्मिक युद्ध

          "प्रमाणबुद्धिवैदेषु साधनानामनेकता" या वेदवाक्याचा अर्थ सांगताना म्हंटले जातेे की "जो वेद प्रमाण मानतो तो हिंदु" या "हिंदू" शब्दाचा सरळ आणि सोपा अर्थ असताना बाह्मणांनी स्वार्थाप्रमाणे त्याचा अर्थ लावला व हिंदूंच्या माथ्यावर वेदोक्त आणि पुराणोक्त हे वेगवेगळे विधी लादून स्वत:चे श्रेष्ठ्त्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आजही भटजी धर्मकार्यातून "पुराणोक्त विधी करून इतरांना दुय्यम वागणूक देतात. धर्मकार्याला बसलेल्या व्यक्तीला चाललेली विधी पुराणोक्त आहे की वेदोक्त आहे याची मुळीच कल्पना नसते त्यामुळे भटजी सांगेल त्याप्रमाणे तो विधी करत असतो"
         वस्तुश: जातीभेद हे वर्ण वर्चस्ववादी लोकांनी समाजव्यवस्था व संरक्षण यासाठीच निर्माण केले. संरक्षणाचे काम करणार्याला "क्षत्रिय", व्यवसाय करणार्याला "वैश्य",सर्वांची सेवा करणार्याला "क्षुद्र" आणि संस्कार करणार्याला "ब्राह्मण" संबोधित असत. "चातुर्वण्य मया स्रुष्टं गुणकर्मविभागश:" अर्थात चार वर्णाची ही रचना गुणकर्मावर आधारीत होती. त्यावेळी एकाच परीवारात एक ब्राह्मण तर दुसरा क्षत्रिय ,तिसरा वैश्य तर चौथा क्षुद्र असे. कालांतराने आर्यांच्या मुळ हेतूला बगल देऊन जन्माधिष्टीत समाजव्यवस्था निर्माण करून ब्राह्मणांनी आपले श्रेष्ठ्त्व समाजावर लादले. "नंतर सामाजिक व्यवस्थेत मानाचा जो अनुक्रम लागला त्यात दुसर्या क्रमांकाचे स्थान ब्राह्मणांना मिळाले, त्यांना क्षत्रियांबद्द्ल आसुया निर्माण झाली." रावाला खेचल्याशिवाय पंताला वर चढता येणार नाही, हे त्यांनी जाणले. म्हणुनच वरील विचारांचे पालन करून राजर्षींना खेचण्याचे कार्य केले. पण राजर्षी शाहू महाराज शेरास सव्वा शेर होते. निश्चयाचे महामेरू होते.
         राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्याच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात आमुलाग्र क्रांती करणारे प्रकरण म्हणून या "वेदोक्त प्रकरणा" कडे पहावे लागेल. सनातनी ब्राह्मणांनी करवीर राज्यात आपल्या अहंकारी वर्णवर्चस्वाच्या प्रव्रुत्तीमुळे अक्षरश: हैदोस घातला होता."जरी ब्राह्मण झाला भ्रष्ट । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ ॥" ही त्यांची विचार व आचारधारा होती. अशा या ब्राह्मणांचे वर्णन महालिंगदासांनी मार्मिक शब्दात केले आहे.

"ऐसा तो ब्राह्मण । म्लेंच्छ होय चौगुण । ऐसा पापिष्ट तेणे । जन पीडीले ॥
तया षटकर्माचा विसर । कारकोनी पडिभर । गायत्री मंत्रांचा अधिकार । थोडा तयासी ॥
दग्धचि बोलणे तेणे । सखा सोईरा मित्र नेणे । लाभावरी तेणे । ठेविले चित्त ॥"

अशा या सनातनी ब्राह्मणांनी उठविलेल्या "वेदोक्त प्रकरण" या वादळात राजर्षी शाहू महाराज जिंकले आणि विरोधकांचा फ़ज्जा उडाला याचा आढावा घेवू.
             नोव्हेंबर १८९९ मध्ये पंचगंगेवर  नेमाने स्नान करण्यास जात असताना एके दिवशी स्नानाच्या वेळेस मंत्र म्हणणार्या नारायण भटाच्या तोंडून जे मंत्र बाहेर पडत होते ते पुराणोक्त होते, नारायण भट स्वत: आंघोळ करूण आले नाहीत व पुराणोक्त मंत्र उच्चारत आहेत. ही गोष्ठ राजारामशात्री भागवत यांनी महाराजांच्या नजरेस आणली. शाहू महाराजांनी त्या नारायण भटास वेदोक्त मंत्र म्हणण्यास सुनवले. नारायण भटाने "महाराज शुद्र आहेत" असे स्पष्ठ उत्तर दिले. उत्तर प्रत्युत्तरे झाल्यानंतर नारायण भटाने, "धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्व शक्तिमान ब्राह्मण समाज तुम्ही क्षत्रिय आहात हे जाहीर करेपर्यंत तुम्ही आमच्या साठी शुद्रच" असे सांगितले. येथुनच वेदोक्त वादास प्रारंभ झाला.
             महाराजांचा संयम दांडगा होता. विषारी फ़ुत्कार काढणार्या नारायण भटाला त्याच क्षणी चाबकाचे फ़टके लगावले असते तर कोणीही, का ? म्हणुन देखील विचारले नसते. तरीदेखील राजे शांत होते. पण त्यांच्या सोबत असणार्यांची मने क्रोधांनी पेटून उठून, हात शिवशिवत होते. "प्रत्यक्ष राजांचा अपमान, आमच्या देवाचा अपमान ? आम्ही या भटाला जिवंत ठेवणार नाही. हा नारायण भट काही सज्जन पुरुष होता असे नाही. अशा या लबाड भटाने एका चारित्र्यसंपन्न, संयमी व सर्व प्रजेला प्रिय असलेल्या राजांचा घोर अपमान करावा, यापेक्षा अन्य घोर पाप तरी हा भट कोणते करणार ? महाराजांची वृत्ती संतांची होती. संत तुकोबारायांच्या शब्दात शाहू महाराजांचे थोरपण उमगते"
"दया,क्षमा,शांती । तेथे देवाची वसति ।
भूतांची दया । हेचि भांडवल संता ॥"
          महाराजांच्या अपमानामुळे संपुर्ण "बहुजन समाज" एक झाला  व त्यांच्या मनात ब्राह्मणाविषयी रोष खदखदू लागला. त्यावेळी कोल्हापुर नगरपालिका ब्राह्मणमय होती. पंचगंगेवर ब्राह्मणांसाठी वेगळा घाट राखीव ठेवला होता नगरपालिकेने. महाराजांच्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आली. ऑगस्ट १९०० मध्ये बहुजन समाजाने हातात बंडाचा झेंडा घेतला, हा सारा समाज भल्या पहाटे "छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज की जय, ब्राह्मणांचा धिक्कार असो" अशा आकाशगामी घोषणा देत पंचगंगेवर चालून आला. सनातनी ब्राह्मणांना-भटांना धडा शिकवला पाहिजे, या विचाराने पेटून उठलेला समस्त बहुजन समाज पंचगंगेच्या घाटावर जमा होऊ लागला. ब्राह्मणांसाठी राखीव ठेवलेल्या घाटावरील बोर्ड काढून तोडून टाकू लागला. त्या ब्राह्मणी घाटावर जमलेल्या शाहू प्रेमींना बघून घाबरून पळ काढू लागला. नाहीतर यापलीकडे ते करणार तरी काय ?

वेदोक्त मध्ये लो. बाळ गंगाधर टिळक
        या वेदोक्त वादात सनातन्यांचा पक्ष घॆऊन टिळक मैदानात उतरले. टिळकांचा "केसरी" शाहू राजांच्या विरोधार विष ओकू लागला. २२ आणि २९ ऑक्टोंबर १९०१ च्या केसरीत टिळकांनी "वेदोक्ताचे खुळ"  या नावाने दोन अग्रलेख लिहून शाहू राजांवर जहरी टीका केली व सनातनी ब्राह्मणांना जोरदार पाठींबा दिला. टिळकांनी लिहिले "धर्मशास्त्रातील जे प्रसिद्ध आणि सर्वमान्य ग्रंथकार आहेत त्यांच्या मते क्षत्रिय आणि वैश्य हे वर्ण पुर्ण नष्ट झाले आहेत व फ़क्त ब्राह्मण आणि शुद्रच अस्तित्वात आहेत. टिळकांनी शाहू राजांना सरळ सांगितले की "तुम्ही खुशाल स्वत:ला उच्चवर्णीय समजा, परंतू तुम्ही शुद्रच आहात". टिळकांच्या या म्हणण्यामागे परशुरामाने २१ वेळा प्रुथ्वी निक्षत्रिय केली त्यामुळे प्रुथ्वीवर क्षत्रिय शिल्लकच उरले नाहीत हे ब्राह्मणांचे आवडते तत्वज्ञान होते. तसेच एका पुराणार म्हंटले आहे की, 
"ब्राह्मणा: क्षत्रिया वैश्या:शूद्रा वर्णास्त्रयो द्विजा:।
युगे युगे स्थिता: सर्वे कलावाद्यंतयो: स्थितीरिति: ॥"
अर्थात : ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य़ आणि शूद्र हे चार वर्ण आणि यातील तीन आर्य वर्ण सर्व प्रत्येक युगात असतात, पण कलीमध्ये पहिला आणि अखेरचा असे दोनच वर्ण राहतात.
         बाळ टिळकांनी वेदोक्ताची मागणी करणार्या मंडळींची हवी तशी टिंगल आणि उपहास करण्यासाठी आपली लेखणी झिजवली."अलिकडे इंग्रजी विद्येने व पाश्चात्य शिक्षणाने सुसंस्क्रुत झालेल्या मराठा मंडळींच्या मनात जी काही खूळे शिरली आहेत,त्यापैकी वेदोक्त कर्माचे खूळ हे होय." बाळ टिळकांनी आणखी एक युक्तिवाद पुढे केला. "वेदोक्त मंत्र म्हंटल्याने कोणत्याही जातीस आधिक श्रेष्ठपणा येतो अशी जर कोणाची समजूत असेल तर ती चुकीची आहे. वैदिक मंत्रांनी संस्कार झाले म्हणजे मराठे आणि ब्राह्मण एक जातीचे होतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर तिही निरर्थक आहे. वेदोक्त मंत्र म्हंटले तरी मराठे हे मराठेच राहतील, हे लक्षात ठेवले पाहिजे." असे म्हणुन बाळ गंगाधर टिळकांनी मराठ्यांना क्षत्रिय मानण्यास विरोध केला.

कमिशनची नियुक्ती
          टिळकांनी ब्राह्मणांची बाजू उचलून धरल्यामुळे या "वेदोक्त" प्रकरणाला उलटी कलाटणी मिळण्याचा संभाव्य धोका ऒळखून महाराजांनी या वेदोक्त प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका हुकुमान्वये न्यायमुर्ती पंडीतराव गोखले, न्यायमुर्ती विश्वनाथराव गोखले व खुद्द आप्पासाहेब राजोपाध्ये या तिघांचे एक कमिशन नेमून त्यांना अहवाल सादर करण्याची आज्ञा दिली. तसेच हे तिघेही ब्राह्मण होते तरी त्यातील पंडितराव गोखले हे निस्प्रुह, विद्वान व नि:पक्षपाती होते.
        १६ एप्रिल १९०२ रोजी कमिशनने आपला अहवाल महाराजांना सादर केला. त्या अवहालात नमुद करण्यात आले होते की, "रुद्राभिषेक होत असे याचा अर्थ ज्यांची ही देवस्थाने होती ते द्विज वर्गातील आहेत. म्हणजे छत्रपती हे क्षत्रियच आहेत. "या अहवालावर अखेरपर्यंत राजोपध्ये यांनी सही केली नाही. हा राजोपाध्येदेखील नारायण भट्टाचा दुसरा अवतार होऊन त्याने आपला थयथयाट चालू ठेवला. पण त्याकडे दुर्लक्ष करून द्विज वर्गातील म्हणजेच वेदोक्ताचा अधिकार असलेले शाहू छत्रपती हे क्षत्रिय आहेत असा निर्वाळा कमिशनने दिला. 
        या वेदोक्त प्रकरणाची एकूण फ़लश्रुती शोधताना एका महत्वाच्या गोष्टीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले आहे. तिची स्पष्ट नोंद इथे करणे योग्य ठरेल. वेदोक्त प्रकरणात एकूण न्याय शाहूराजांच्या बाजूने होता. त्यांनी हा न्यायाचा लढा मोठ्या जिद्दीने लढविला. अखेर न्याय आणि आपला वेदोक्ताचा अधिकार त्यांनी प्रस्थापित करून घेतला.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांसारखा एक थोर माणूस समाजाला जाग आणावी,म्हणुन धडपडत होता. वेदोक्त आणि पुराणोक्तच्या फ़ाटक्यात पाय अडकलेला ब्राह्मण वर्ग तर त्यांना विरोधक म्हणुन उभा राहिलाच. पण त्या द्रुष्टीने वेदोक्त प्रकरणात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा संपुर्ण विजय झाला. ब्राह्मण वर्चस्वाचा (अगदी टिळक आणि टिळककंपुंसकट) संपुर्ण पराभव झाला.


संदर्भ ग्रंथ : 
राजर्षी शाहू गौरव ग्रंथ
शाहुंच्या आठवणी (प्रा. नानासाहेब सांळुंखे,मराठा भुषण)
राजर्षी शाहू चरित्र (श्री. ग. क्रु. कुर्हाडे)

26 June 2013

स्वराज्याचे पहिले सरसेनापती : हंबीरराव मोहिते

           शिवशाहीच्या उदयापुर्वी अनेक कर्तबगार घराणी उदयास आली होती त्यामध्ये मोहिते, घाटगे, महाडिक, सुर्वे, जाधव, सावंत या विविध घराण्यांनी पराक्रमी पुरुषांनी मुस्लिम शाह्यामध्ये लष्करी सेवा करून नावलौकिक मिळवला होता.त्यांच्या भोसले घराण्याशी संबंध आला त्यावेळी नावलौकीकात आणखीनच भर पडली.काही घराण्यांनी छत्रपती घराण्यांशी नातेसंबंध निर्माण केला.त्यापैकी मोहिते घराणे जवळचे घराणे होते.या घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले.याच घराण्यातील हंबीरराव मोहिते यांना शिवरायांनी अष्ठ्प्रधान मंडळामध्ये सरसेनापती म्हणुन स्थान दिले.खर्या अर्थाने हंबीरराव हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते.हंबीररावांच्या अगोदर शिवरायांचे पराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर व नेताजी पालकर यांचे स्वराज्यस्थापनेत मोठे योगदान आहे.परंतू त्यांच्याबाबतीत शोकांतिका झाली आणि साहजिकच हंबीरराव सरसेनापती झाले.
           सरसेनापती हंबीररावांच्या गराण्याचा इतिहास पाहिला तर तो गौरवशाली आहे.हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता.त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता.हे घराणे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते.तुकोजी मोहिते हे पराक्रमी पुरुष तळबीड येथे आला व तेथील पाटीलकी सांभाळत सेवा करू लागला या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्याशी सोयरीक जुळवून आणली.याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येवून शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले व मोठे शौर्य गाजवले.संभाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते.त्यांच्या शौर्याची गाथा अदिलशाही फ़र्मानामध्ये पहावयास मिळतात.यातील संभाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंबीरराव मोहिते हा मर्दमराठा शिवरायांच्या सानिध्यात आले.स्वराज्याच्या स्थापनेवेळी संभाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते.संभाजी मोहिते पुढे कर्नाटकला गेले मात्र आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह शिवरायांसोबत लावून दिला व छत्रपती घराण्यांशी पुन्हा नाते निर्माण केले.पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा शिवपुत्र राजाराम महाराजांशी विवाह लावून दिला.मोहिते घराणे हे छत्रपतीचे अगदी जवळचे घराणे आहे.याच घराण्यातील उदयास आलेला मर्द मराठा म्हणजेच हंबीरराव मोहिते.
            शिवरायांच्या राज्याभिषेकापुर्वी महापराक्रमी सेनापती प्रतापराव गुजर बहलोल खानाशी झालेल्या संघर्षात मारले गेले.त्यांच्या शोकांतिकेनंतर ते सेनापती पद रिकामे झाले व ते पद हंबीरराव मोहितेंना दिले आणि अष्टप्रधान मंडळातील सरसेनापती पद म्हणुन मान मिळाला.हंबीरराव हा प्रतापरावांच्या सैन्यात सेनानी होता.ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेंव्हा हंबीररावांनी अदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रुला विजापुरपर्यंत पिटाळून लवण्यात हंबिररावांचे मोठे योगदान आहे.सरसेनापती हा केवळ पराक्रमीच असून चालत नाही.तर तो प्रसंगाचा जाणकार व ह्रुदयाठायी शहाणपण आणि सबुरी असावी लागते.हे सर्व गुण हंबीररावांकडे होते.छत्रपती शिवरायांनी त्याच्या पराक्रमाचा गौरव म्हणुनच अष्ठ्प्रधान मंडळात स्थान दिले.हंबीररावांचे मुळ नाव हंसाजी मोहिते होते.महाराजांनी हंसाजी चा "हंबीरराव" हा किताबाने सन्मान केला.सरनौबत दिली.राज्याभिषेकानंतर मोघली सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश शिवरायांनी हंबीररावांना दिला.ही स्वारी यशस्वी करून खानदेशातील मोघलांची खानदेश,बागलाल,गुजरात,बर्हाणपूर,वर्हाड,माहूड, वरकड प्रर्यंत प्रदेशात धुमाकूळ घातला होता.यानंतर (सन १६७६) सरसेनापती हंबिररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील अदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणच्या  येलबुर्गा येथे मोठा पाडाव करूण त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली.सरसेनापती हंबीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे.हुसेनखान केंद्र करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हंबीरराव मोहिते शिवरायांस येवून मिळाले त्यावेळी शिवराय गोवळकोंड्यात भागानगर येथे होते. यानंतर महाराजांना आपले बंधू व्यंकोजीराजेंबरोबर सामोपचाराने चांगले संबंध निर्माण करावयाचे होते.मात्र व्यंकोजींची भेट यशस्वी झाली नाही.पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहिम आटोपती घेतली आणि महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.नंतर हंबिरराव सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात (स्वराज्यात) आले.दरम्यान युवराज छत्रपती संभाजी राजेंचे मोघालांना जाऊन मिळणे पुन्हा स्वराज्यात येणे यानंतर छत्रपती शिवराय व संभाजी राजेंची पन्हाळा गडावर भेट या घटना घडल्या.त्यानंतर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला.त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवरायांचे निधन झाले.यावेळी हंबीरराव कर्हाड परिसरात छावणी टाकून होते.
           थोड्याच दिवसांत काही ब्राह्मण प्रधानांनी संभाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता त्यांचा हक्क डावलून राजाराम महाराजांचे मंचकारोहन केले ही बाब संभाजी राजांना कळली तेंव्हा त्यांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजु होण्याचे आदेश सोडले.हे आज्ञापत्र सरसेनापती हंबीररावांनाही मिळाले होते.हंबीररावांनी संभाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.ज्यावेळी राजाराम महाराजांच्या बाजुने असणारे प्रधान हंबीररावांना भेटण्यास आले तेंव्हा त्यांची तिव्र शब्दात निर्भलना केली.याठिकाणी स्वामीनिष्ठा दिसून येते कारण स्वराज्याचा वारसदार म्हणुन संभाजी राजांचा खरा हक्क होता.हंबीररावांळेच बंडखोर प्रधानांचे  मनोरथ विरून गेले व संभाजी राजे छत्रपती झाले.यावेळीचा हंबीररावांचा न्यायीपणा इतिहासात प्रसिद्ध आहे.संभाजी राजेंच्या राज्याभिषेकानंतर संभाजी राजेंच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हंबीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बुर्हाणपुरचा विजय, त्यांनी मिळवलेली प्रचंड लुट महत्वाची आहे.या विजयाने मोघलांची नाचक्की झाली.त्यानंतर मोघली सरदार शहाबुदीनखान उर्फ़ गाजीउदीनखान बाहदूर याच्यावरील हंबीररावांची स्वारी महत्वाची आहे.खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता त्यावेळी हंबीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला.यावेढ्यात हंबीरराव जखमी झाले होते.यानंतर पुढे संभाजी राजांच्या आदेशानुसार भिमानदीच्या परीसरातून मोघली सरदार कुलीचखान व पन्हाळा परीसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हंबीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्न केला.त्यानंतर कल्याण जवळ रहुल्लाखान व बाहदुरखानाचा पराभव केला.सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हंबिररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले.यानंतरच्या कालखंडात खुद्द संभाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हंबीररावांचा मोठा सहभाग होता.सरसेनापती हंबीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ या युद्धात मोघली सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परंतू हंबीररावांना तोफ़ेचा गोळा लागून धारातिर्थी पडले.नेमकी ही लढाई कोठे झाली याची नोंद नाही.मात्र वाईजवळील युद्धात हा मर्द मराठा सरसेनापती धारातिर्थी पडला.डिसेंबर १६८७ मध्ये हंबीररावांच्या म्रुत्युने मोठी पोकळी निर्माण केली.संभाजीराजांपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली.
             एकंदरीत सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे मराठा स्वराज्यप्रेम व स्मामीनिष्ठा दिसून येत असताना छत्रपती शिवरायांची शिकवण ही महत्वाची होती हे ही दिसून येते. हंबीररावांच्या ठायी शत्रुशी लढण्याची जिद्द व जबर आत्मविश्वास या सर्व गोष्टी छत्रपती शिवरायांच्या तालमीतुनच हंबीररावांना मिळाल्या होत्या. इतिहासानेही दाखवून दिले आहे की विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांची सरसेनापतीची निवड अगदी योग्य होती.अशा या मर्दमराठ्यास मानाचा मुजरा.

3 June 2013

महानायक : राष्ट्रपिता जोतिराव फ़ुले

           १८५१ साली घडलेली एक घटना ! एक जोडपे आपापसात चर्चा करत होते, अहो आपल्याला स्व:चे मुलबाळ नाही, मेल्यावर आपल्या समाधीवर फ़ुले वाहण्यासाठी आपल्या रक्ताचा वारस असावा ! असे पत्निने विचारताच पती म्हणाला,अग ! भले आज आपल्या रक्ताचा वारसदार नाही, परंतू आपण जे समाजोद्धाराचे काम करीत आहोत यातून आपण पेरलेल्या क्रांतीकारी विचारांचे हजारो,लाखो वारस तयार होतील आणि आपल्या समाधीवर फ़ुले वाहतील. विचारांचे वारस निर्माण होतील असे म्हणणारे ते ग्रुहस्त कोण ? ते होते महात्मा फ़ुले.१६० वर्षापुर्वीची भविष्यवाणी जोतिरावांनी केली होती त्याप्रमाणे त्यांच्या विचारांचे किती वारस निर्माण झाले ? याची समीक्षा आम्ही केली तर लोककल्याणकारी राजर्षी छ.शाहू महाराज आणि युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर या दोन नावाच्या पलीकडे नावे आम्हाला सापडत नाहीत.
मग यांच्या शिवाय फ़ुलेंच्या विचारांचे वारसदार आम्हाला का सापडत नाहीत ? तरीही त्यांची जयंती आपण उत्साहाने साजरी करतो.वारसदार नसताना जयंती का साजरी होते ? कारण जयंती साजरी करणे एवढंच वारसदारांचे काम आहे, असे महापुरुषांचे भक्त समजतात परंतू महापुरुषांना त्यांच्या कार्याला,विचारांना भक्तांची नसूण अनुयायांची गरज आहे.
जयंती कोणाची व कशासाठी साजरी करतो ?
                जे ध्येयासाठी जगतात,ध्येयपुर्तीसाठी जीवन समर्पित करतात त्यांना आपल्या स्म्रुती जपतो.हे जे महापुरुष आहेत त्यांनी जीवन काळात एक निश्चित असा मोठा संघर्ष चालवला त्यामुळे ते आज समाजाचे आदर्श बनले आहेत आज त्यांना जपन्याचे,पुजा करण्याचे अभियान जोरात चालू आहे.त्यांनी ज्या व्यवस्थेच्या विरोधात काम केले ती व्यवस्था आजही समाजाचे शोषण करीत आहे.ज्या समाजाचे आंदोलन चालवले त्या समाजाच्या समस्या आजुनही कायम आहेत.मग ज्या महात्मा फ़ुलेंनी शेतकर्यांच्या हातात आसूड देऊन त्याला बैलाप्रमाणे माजलेल्या ब्राह्मणी व्यवस्थेला वटणीवर आणायला शिकवले तोच शेतकरी आज आत्महत्या का करीत आहे ?
ज्या हातात छत्रपती शिवरायांनी तलवार देऊन त्यांच्या करवी बहुजनांचे छत्र निर्माण केले,टिपरीची तलवार करून ज्यांनी पराक्रम घडविला ती मनगडे आज इतकी लाचार का झाली,की पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी दुसर्यापुढे हात पसरू लागली ?ज्याचे हात देण्यासाठीच निर्माण झाले होते तो बळीराजा आज स्वत:च मागणार्याच्या दारात उभा आहे.ज्या जमातीला  राज्यकर्ती जमात व्हा म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या पंखात गरूडाचे बळ देऊन त्यांना भरारी घ्यायला शिकवली तीच जमात ते गरूडाची उंची गाठणारे आज इतके लाचार का झाले ? 
असे एक ना अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.क्रुषीप्रधान देशामध्ये शेतकर्यालाच आत्महत्या करावी लागते याचे नेमके कारण काय ? हे पहिला शोधावे लागेल. मग आपल्याला आठवेल की जे ध्येय जो मार्ग अपल्याला आपल्या महापुरुषांनी दिला ते ध्येय ,तो मार्ग आपण सोडून दिला ? आज आपला समाज प्रचंड भ्रमित झालेला आहे, गोंधळात आहे.हजारो समस्या डोळ्यावासून उभ्या आहेत.पण समाधानाचा रस्ता आपल्या समोर नाही.उलट ज्यांनी या समस्या निर्माण केल्या  त्यांच्यावरच त्याने समाधानाची जबाबदारी सोपविली म्हणून ही अशी अवस्था !
ह्या अशा अवस्थेत पुन्हा आपल्याला गरज पडेल ती आपल्या महापुरुषांच्या विचारांची त्यांच्या सत्यवादी मार्गाची.ती समजून घेतली तरच समाधान होईल अन्यथा नाही.बळीराजाने आपल्या पदरात भरभरून माप दिलं होतं, अगदी सोन्याचा धुर निघावा अशी आमची परिस्थिती होती त्या बळीराजावर ही परिस्थिती का आली ? आधुनिक भारताच्या इतिहासापासून जरी पाहिले तरी स्पष्ट पणे या बाबी आपल्यासमोर येतात की, आज या शेतकर्याची,बहुजन समाजाची काय अवस्था झाली आहे ?महात्मा फ़ुलेंच्या काळापासून परिस्थिती जर डोळ्यासमोर घेतली तर काय दिसते.
तो काळ एका संक्रमन अवस्थेचा होता.पेशवाई नुकतीच संपली होती.जरी पेशवाई संपली होती तरी पेशवाई ज्यांच्या अंगात रुजली होती त्यांची धुंदी, मस्ती उतरली नव्हती जे राज्य क्षेत्र निर्माण करण्यासाठी मावळ्यांनी रक्त सांडले त्या मराठा स्वराज्याचे पेशव्यांनी पेशवाईत रुपांतर केले होते.परीणामी नंगानाच पेशवाईत सुरु झाला.पेशवाई म्हंटले की एकच आठवते ते म्हणजे गळ्यात गाडगे आणि कमरेला खराटा !शिक्षणावर केलेली बंदी म्हणजे धर्म बुडतो जेंव्हा क्षुद्र शिक्षण घेतो.
विद्या नाकारणे हा काय धर्म असू शकतो का ? असे प्रश्न उभे करून त्यांनी ठरवले ही व्यवस्था आमच्या शेतकर्याला न्याय देऊ शकत नाही.त्यासाठी ही व्यवस्था बदलावी लागेल.शेतकर्यांना या अवस्थेतून मुक्त करावे लागेल.त्यासाठी सर्वात प्रथम शेतकर्याला मुक्त करायचे असेल तर वामनाने गाडलेल्या बळीराजाला पाताळातून बाहेर काढावे लागेल.त्याशिवाय आमच्या समस्यांचे समाधान होणार नाही.त्यासाठी ब्राह्मणांनी केलेल्या आपमतलबी धर्मग्रंथातील लांडी-लबाडी महात्मा फ़ुलेंनी आपल्या गुलामगिरीतून जगासमोर मांडली.या ग्रंथामध्ये शेतकर्याला आपल्या सांस्क्रुतीक संघर्षाचा इतिहास समजावून दिला.महात्मा फ़ुले जाणीवपुर्वक या देशाला बळीस्थान मानतात.बळीराजाची क्रुषीप्रधान संस्क्रुती नष्ट करून ब्राह्मणी धर्माने निर्माण केलेली  संस्क्रुती अशी बनावटी,ढोंगी,आपमतलबी आहे हे जगाला समजावून दिले.एवढ्यावरच थांबले नाहीत तर शिक्षणाची बंदी उठवली,मनुस्म्रुतीचे उल्लंघन केले.ज्ञानाच्या किल्ल्या ब्राह्मणांच्या कमरेला होत्या त्या काढून आपल्या ज्ञानाची कवाडे खुली केली.
जे काम छत्रपती शिवरायांच्या तलवारीने केले तेच काम महात्मा फ़ुले यांच्या लेखणीने केले.त्यांची धार तेवढीच होती.आज मात्र ती धार बोथट झाली आहे.ब्राह्मणांनी सांगितले उत्त्तम शेती,मध्यम व्यापार आणि कनिष्ट नोकरी.महात्मा फ़ुलेंनी सांगितले की उत्तम शिक्षण, याच शिक्षणामुळे फ़ुलेंचा अनुयायी ब्राह्मणांना आव्हान देऊ शकेल.यातूनच सत्यशोधक समाजाची स्थापना झाली.ज्या दिवशी शिवरायांनी दुसरा राज्याभिषेक करवून घेतला त्याच दिवशी २४ सप्टेंबर १८७३ ला महात्मा फ़ुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
सत्याला प्रमाण मानणारा ,असत्याला जुगारून देऊन सत्याची कास धरणारा समाज,प्रामाण्यवादी समाज.याच समाजाची चळवळ एवढी मोठी होती की यातूनच शाहू महाराजांसारखे नेत्रुत्व तयार झाले.त्या आधारावरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले.सत्यशोधक चळवळीची धुरा मराठा बांधवांनी दिनकरराव जवळकर, केशवराव जेधे, जाधवांसारखी मंडळी यांनी सांभाळली.
महात्मा फ़ुले यांनी आपल्या शेतकर्याचा आसुड मध्ये १८८३ मध्ये जी शेतकर्याची दयनीय परिस्थिती वर्णन केली आहे तीच आजही लागू आहे.शेतकर्यांचे परिस्थितीचे वर्णन करताना महात्मा फ़ुले म्हणतात की शेतकरी हा भ्रष्ट नोकरशाही आणि सावकारशाही यांनी पिळला जात आहे.आज शेतकरी कर्जबाजारी होत आहे.आत्महत्या करत आहे.पण हे कर्ज काही त्यांनी शेतीच्या कामासाठी काढलेले नाही.९०% कर्ज हे धार्मिक कारणासाठी काढलेले आहे.हे सर्व कशामुळे होते ? कारण महात्मा फ़ुलेंनी शिकवलेला शेतकर्याचा आसूड शिकवला गेला नाही.जोतिरावांनी समाजाला तयार करण्यासाठी २५ वर्षे मेहनत घेतली,शेवटी त्यांचा समाज रस्त्यावर आला. त्यांच्या या सार्वजनिक आंदोलनाचे प्रमुख पाच टप्पे होते.१.शिक्षण, २.साहित्य, ३. महिलांचे प्रबोधन, ४.शिवजयंती, ५.सत्यशोधक समाज.
पहिला टप्पा शिक्षण : शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फ़ुलेंनी एक मंत्र दिला होता.
विद्येविना मती गेली । मती विना नीती गेली ॥
नीती विना गती गेली । गती विन वित्त गेले ॥
वित्ताविना शूद्र खचले । एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले ॥
           विद्येच्या या मंत्रात महात्मा फ़ुलेंनी जो मार्ग सांगितला आहे तो विद्या,मती-नीती-गती-वित्त असा होता.परंतू आजच्या शिकलेल्या लोकांनी विद्येवरून जी उडी मारली ती थेट वित्तावर.विद्येचा जो संबंध मतीशी, तर्काशी होता तो थेट वित्ताशी जोडला.शिक्षणाची फ़ार सोपी व्याख्या महात्मा फ़ुलेंनी केली होती.आमच्या लोकांना इतकं शिकवा इतकं शिकवा की त्यांना खरं काय नि खोटं काय हे समजेल.ते खर्याचं समर्थन करतील.परंतू आज परिस्थिती काय आहे.
या शिक्षण- साहित्य- महिला प्रबोधन-शिवजयंती- सत्यशोधक समाज या टप्प्यामध्ये शेवटचा टप्पा म्हणजे सत्यशोधक समाज.या समाजातून याच्या आंदोलनातून शाहू महाराजांनी प्रेरणा घेतली.सत्यशोधक चळवळ चालविण्याचे काम मराठा बांधवांनी केले.यामधुनच बाबासाहेबांनी राष्ट्रव्यापी आंदोलन उभे केले.परंतू महात्मा फ़ुले-शाहू महाराज-बाबासाहेब यांच्यामधील ही नाळ सुसंगत सुत्रबद्धता आमच्या लोकांपर्यंत पोहचली नाही.म्हणूनच त्यांना मानणारे आपापसात भांडतात.आज जे सत्यशोधक आहेत त्यांनी सत्यशोधकाचा अर्थ सत्ताशोधन असा घेतला आणि सत्ताशोधनाच्या नादाने स्वत:चा व समाजाचा सत्यानाश कधी झाला हे त्यांना कळलेच नाही.हा सत्यानाश जर थांबवायचा असेल तर महापुरुषांचा जयजयकार करण्याने तो थांबनार नाही त्यासाठी आम्हाला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची गरज आहे.ते विचार आचरणात आणण्याची गरज आहे आणि महापुरुषांनी दाखवलेल्या मार्गाने जर आम्ही चाललो तरच आज आम्ही आमच्या समस्यांचे समाधान करू शकतो.म्हणूनच आजपासून स्वत:ला फ़ुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचे वारसदार मानून त्यांचे कार्य आणि विचार जगभर पसरविणे हीच खरी फ़ुले-शाहू-आंबेडकर यांना आदरांजली ठरेल.हेच खरे विनम्र अभिवादन ठरेल. 
शिका !                                                संघटित व्हा !                                      संघर्ष करा !

30 May 2013

स्वराज्याचे शिलेदार - सेनापती संताजी घोरपडे

           संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे त्यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेबचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा ....... 
           शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा. त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली, दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.
        रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला. जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती.
रणझुंझार सेनापती संताजी घोरपडे यांना मानाचा सलाम........!!!
“ जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे