22 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]

संशोधनापुढे ध्येय
        तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय  ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ? 
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
                                                                                                                                 (क्रमश:)

18 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

संतश्रेष्ठ तुकोबाराया
           साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
            संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
           संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी  ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
             निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा  हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ?  ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.  
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते.  ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
           भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
                                     (क्रमश:)