24 December 2016

मनुस्मृति : समाजशास्त्रीय समालोचन

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर,  १९२७ रोजी "मनुस्मृति" या ग्रंथाचे जनसमुदयाच्या समक्ष जाहिररित्या दहन केले. दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये गुलामीच्या विरोधात संघर्षाची जिद्द निर्माण केली. त्यासाठी त्यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळयाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह चवदार तळ्यातील पाणी पिण्यासाठी नव्हता, ज्या तलावात कुत्री-मांजरी, जनावारे पाणी पित होती. त्यांना पाणी पिण्याची बंदी नव्हती, परंतु माणसाला पाणी पिण्याची बंदी होती. म्हणूनच मानवी हक्काची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. दलित समाजाला अशा अनेक धार्मिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. असे आंबेडारांचे मत झाले होते. त्यामुळेच आंबेडकरांनी मनुस्मृति ग्रंथ जाळण्याचे ठरवले तत्पुर्वी आधीच्या शतकात राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी "जाळून टाकावा  । मनुग्रंथ ॥ असे म्हंटले होते. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली (१९२७) त्याला पुढच्या वर्षी ९० वष्रे पूर्ण होतील,  त्यामुळे मनुस्मृति विषयी जाणुन घेणं महत्वाचे आहे. 
             भुतांत प्राणी श्रेष्ठ, प्राण्यात बुद्धीजीवी, बुद्धीवंतांत मनुष्य़ श्रेष्ठ आणि मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ, शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये, कोणताही धर्मोदेश देऊ नये, कोणतेही व्रत सांगु नये. जो धर्म सांगतो तो नरकात बुडतो. (मनुस्मृति अ.१०/१२३), असे अनेक (१०/२५, १/९१, १०/२६, ९/१८) श्लोक आहे ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी. लिहु, वाचू नये अन्यथा ते नरकात जातात. शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे, उपास-तपास करू नये, स्त्री-शुद्रांना धर्माधिकार नाहीत, शुद्रांनी विनातक्रार तीन्ही वर्णाची सेवा करावी. मनुस्मृतिमुळे ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व वाढले. स्त्री-शुद्रादी नगण्य झाले. या सर्व कारणामुळेच २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जनसमुदायासमोर भाषण करून त्यांच्या मते अस्पृष्यता आणि विषमतेचे समर्थन करणारा, ब्राह्मणवर्ग सांगेल तोच कायदा व नियम माननारा आणि शुद्र आणि स्त्रीयांचे सर्व अधिकार हिरावून घॆणारा ग्रंथ मनुस्मृति जाळून टाकला. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली ही जाती-वर्ण द्वेषातून नाही. ज्या ग्रंथामुळे माझ्या समाजाला जनावारा पेक्षा वाईट वागणूक मिळते, या वागणूकीला प्रेरणा मनुस्मृतितून मिळत आहे असा समज आंबेडकरांचा झाला होता. पण आज त्यांचे अनुयायी केवळ हिंदु तथा ब्राह्मण द्वेषातून मनुस्मृतिला विरोध करताना दिसत आहेत.
            सध्या मनुस्मृति जाळल्याचा दिवस "मनुस्मृति दहन दिन" म्हणून साजरा केला जातो यावेळी दलित-आंबेडकरवादी लोक मनुस्मृति जाळल्याचा आनंद व्यक्त करतात. पण या सर्वांमध्ये एक वास्तव मान्य करावंच लागेल की मनुस्मृति दहन दिन साजरा करणार्यांना (किंवा तसा उल्लेख करणार्याला) मनुस्मृति विषयी किती ज्ञान आहे हे सांगणे कठीन आहे हीच अवस्था मनुस्मृतिच्या समर्थकांची आहे. आपण हिंदु आहोत आणि म्हणून मनुस्मृति आपल्याला पुज्य आहे तसेच आपण दलित आहोत आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे नक्कीच ती वाईट आहे. असे दोन्ही पक्षाचे तर्क असतात. यावर समर्थक आणि विरोधक यांच्यापैकी किती लोकांनी मनुस्मृति वाचलेली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
मनुस्मृति तथा हिंदु धर्मग्रंथ आणि समाजमन
              आजच्या काळामध्ये हिंदु धर्मग्रंथावर टिका करणे हे पुरोगामीत्वाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. तुम्ही कितीही समता-बंधुतेचा जागर करा, तुम्ही कितीही निर्लपबुद्धी आणि निपक्षपाती जीवन जगा पण त्याला पुरोगामीत्वामध्ये कवडीची किंमत नाही जोपर्यंत तुम्ही किमान एका हिंदु धर्मग्रंथा विरोधात एकतरी शब्द उच्चारत नाही. या तथाकथित पुरोगामी लोकांना अशी संधीही हिंदु धर्मातील ठेकेदार आणि धर्मरक्षकांमुळेच मिळते. जगात कोणत्याही धर्माचे नाहीत एवढे ग्रंथ हिंदु धर्माचे आहेत. पण हिंदु धर्मरक्षकांनी धर्माचे तत्वज्ञान केवळ ग्रंथापुरतेच मर्यादित राहू दिले. कारण यांना जास्त रस टिकाकारांचे खंडण तथा ग्रंथांचा प्रसार करण्यापेक्षा त्यांना केवळ विरोध करण्यातच असतो. "वेदां"पासून ते "श्रीमद्भगवतगीता" आणि "ज्ञानेश्वरी" पासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या "ग्रामगीता" पर्यंत या सर्व ग्रंथाविषयी धर्मरक्षकांच्या काय भावना तथा आस्था आहेत हे अजुनही स्पष्ट झालेले नाही कारण धर्मग्रंथांपेक्षा केवळ धर्म (हा शब्दच) च परमपवित्र वाटतो. धर्माचा प्रसार हा धर्मातील वैश्विक आणि शास्वत तत्वाज्ञानामुळे होत असतो त्यामुळे धर्माबरोबरच धर्मग्रंथांचे तत्वज्ञान आणि विचार लोकांपर्यंत येणे अत्यावश्यक आहे.
        आज सर्व धर्मग्रंथापैकी समाजावर प्रभाव पाडणारे दोनच ग्रंथ अहेत, श्रीमद्भगवतगीता आणि मनुस्मृति. मनुस्मृति अप्रत्यक्षात का असेना पण जिवंत आहे. अजाणतेपणाने त्याचे पालन सर्वांकडूनच होते. हिंदुंच्या अनेक परंपरा तथा चालीरिती ह्यांचे मुळ मनुस्मृतित आहे. मनुने ब्रह्मचर्य, ग्रुहस्थाश्रम, संन्यासाश्रम, राजधर्म, चित्तशुद्धी करण्याबाबत विषय सुचविले आहेत. पण काही श्लोकांमध्ये गीतेत नसणारी विसंगति मनुच्या स्म्रुतीमध्ये दिसून येते. संपुर्ण मनुस्मृति वाचल्यानंतर समजुन येईल की मनुने काही आक्षेपार्ह (अनेक लेखकांच्या मते क्षेपक) श्लोक वगळले तर जिवनाचे किती व्यापक स्वरुप मांडले आहे. व्यक्तिगत चित्तशुद्धीपासून ते संपुर्ण समाज-व्यवस्थेपर्यंतचे बोध सुचिले आहेत.
        धर्मग्रंथामध्ये दोन प्रकार असतात सांप्रदायिक आणि वैश्विक. मनुस्मृति म्हणजे सांप्रदायिकच आहे. मनुस्मृतिची रचना इ.पू. २०० ते इ.पू. २०० या काळात झाली असे अभ्यासक मानतात तर डॉ.आंबेडकरांच्या मते इ.पू.१७० ते इ.पू.१५० या काळात मनुस्मृतिची रचना झाली. अर्थातच हे अंतिम सत्य नाही. मनुस्मृतिमध्ये घेण्यालायक आहे तसेच सोडण्यासारख्याही गोष्टीही आहेत. आज बहुतांशी हिंदुंनी त्यातील बहुतांश भाग सोडून दिलेला आहे. मनुस्मृतीमधील घेण्यासारखे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे वचणे दाखवणे हे बरोबर नाही. मनुने कसे चुकीचे वचणे लिहिली आहेत हे दाखवण्यात आपण जास्त वेळ घालवतो आणि चांगल्या विचारांना मुकतो. मनुचे सर्वच विचार मान्य करण्यासारखे नसतील किंवा जे मान्य करण्यासारखे असतील त्यातही विसंगती असेल. हिंदु धर्माचे (म्हणजे हिंदुंनी आपले मानलेले) पुष्कळ ग्रंथ आहेत त्या सर्वच ग्रंथामध्ये एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही भिन्न वचणे वाचायला मिळण्याची शक्यता असू शकते. आपल्याला इथे मनुस्मृती विषयीच्या एकंदरीत तर्क - वितर्काकडे बघायचे आहे. मनुस्मृति का चांगली किंवा का वाइट किंवा अमुक श्लोकात काय म्हंटले आणि तमूक  श्लोकात काय ? याचा अभ्यास तुम्ही वयक्तिकरित्या करू शकता.
मनुस्मृति आणि वर्णव्यवस्था
             महर्षी मनु महाराज कोण होते ?, कोणत्या वर्णाचे होते ?, एकून मनु किती होते ?, किंवा मनुस्मृतिची रचना नेमकी कोणत्या काळी झाली ? हे थोडं बाजुला ठेऊ. मनुस्मृतिमध्ये साधारण २६८५ श्लोक आहेत. संपुर्ण मनुस्मृतिमध्ये ब्राह्मण आणि क्षुद्र या वर्णाविषयी जास्त लेखन मिळते. मनुस्मृति म्हणजे केवळ वर्णव्यवस्थावादी आहे. मनुस्मृति गुणकर्मावर आधारीत वर्णव्यवस्था मानते. त्यामुळे जन्माधिष्ठीत जातीव्यवस्थेला डोक्यावर घेऊन जातीचे फ़ायदे घेणार्या अर्धवटांनी गुणकर्मप्रमाणित वर्णव्यवस्थेविरोधात बोलताना विचार करणे आवश्यक आहे.
            मनुस्मृतिबद्दल अजुनही स्पष्टता नाही कारण अभ्यासकांचे म्हणणे आहे की १७९४ साली विल्यम जोन्स यांने मनुस्मृति अनुवादित केली त्यानंतर त्यामध्ये इतर वर्णाविषयी आक्षेपार्ह नोंदी केल्या. मनुस्मृतिबाबत बोलताना दोन मुख्य आरोप केले जातात. ते म्हणजे स्त्रीयांचा अपमान आणि अस्प्रुष्यतेचे समर्थन. प्रथमता स्त्रीयांबाबत मनुस्मृतिचे मत जाणुन घेऊ, कोणतेही प्रतिक्रिया देताना आजच्या काळाची आणि मनुच्या काळाची तुलना करणे गरजेचे आहे. आजच्या काळातही स्त्रीयांचे जीवन इतके स्वतंत्र नाही. आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे परिस्थिती काहीशी निवळली असली तरी फ़ारशी नाही. मग मनुचा काळ तर हजार वर्षापुर्वीचा त्यावेळी काय अवस्था असेल ? निश्चितच स्त्रीयांविषयी मनुस्मृतिमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेलेली आहेत ती निषेदार्ह आहेतच. पण सर्वच लेखन स्त्रीविरोधी आहे का ? तर नाही. तर स्त्रीयांची बाजु मांडलेले ही लिखान आपल्याला आढळेल. मुळात एक गोष्ट समजून घॆतली पाहिजे ती म्हणजे स्त्रीयांवर जे आरोप केले गेलेले आहेत ते म्हणजे स्त्रीया आजन्म अशा असतात असे नाही तर त्यांचा स्थायी गुणधर्म सांगितला आहे. आजच्या काळात त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण मनुने स्त्रीयांचा मुळ स्वभाव सांगितला आहे. चांगल्या कुळीन संस्काराने स्त्रीयांमध्ये सुधारणा होऊ शकते हेच त्यामागचे सत्य. त्याचवेळी स्त्रीयांच्या हक्काधिकाराविषयी सुद्धा मनुनी लिहिले आहे. आता विषेश म्हणजे सवर्ण समाजातील स्तीयांविषयी अश्लाघ्य टिका करणे, त्यांच्या स्त्रीयांविषयी पुस्तकातून घाणेरडे लिखान करणे असे भिमपराक्रम करनार्यांनी मनुने स्त्रीयांचा अपमान केला म्हनून मनुस्मृतिला विरोध करणे केवळ दुटप्पीपणाचे तथा मुर्खपणाचे आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये कुटुंब नियोजनाला विरोध आहे. मुस्लिम धर्मामध्ये आजही स्त्रीयांची काय परिस्थिती आहे हे तथाकथित पुरोगामी लोकांना माहीत आहे का ? नक्कीच माहीत आहे पण त्यांच्या विरोधात बोलाव तर मिळत तर काहीच नाही पण हातच्या पुरोगामित्वाच्या प्रमाणपत्राची वैधता संपण्याची भिती.
           अस्प्रुष्यता : मनुस्मृतिवरील आणखी एक आरोप म्हणजे अस्प्रुष्यतेचे समर्थन. मुळात आपण एक गॊष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुची व्यवस्था ही कर्मप्रमाणित व्यवस्था होती त्यामूळे अमुक जात बहिष्क्रुत करा असं कूठं आढळणार नाही. पण आज आपल्याला पुरोगामी बनायचं असेल तर मनुस्मृतितील अस्प्रुष्यतेवर घाणाघाती टिका करावीच लागते त्याशिवाय पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. वर्णव्यवस्था आणि अस्प्रुष्यता आजही आस्तित्वात आहे आणि राहील. कालांतराने अस्प्रुष्यता नाहीशी जरी झाली तरी वर्णव्यवस्था शाश्वत आहे आणि राहिल. फ़रक एवढाच की ती जातीनिधिष्ठ न राहता श्रीमद्भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे गुणकर्मावर आधारीत राहील हेच सत्य आहे. मी वयक्तिकरित्या अस्प्रुष्यतेला विरोध करत नाही जर ती जातीनिधिष्ठ नसेल तर. अशी अस्प्रुष्यता आजही अस्तित्वात आहे. आज पुरोगामित्वासाठी अस्प्रुष्यता विरोधात ढोल बडवावा लागत आहे, तसे नसते तर यांनी परिणामावर ओरडण्यापेक्षा कारण शोधले असते. अस्प्रुष्यतेला मुळ कारणीभुत होते ते संस्काराचा अभाव आणि घाणेरडे राहणीमान यामुळे त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का बसला कालांतराने हिच त्यांची ओळख बनून गेली आणि ती जातीवर लादली गेली,  यामध्ये अस्प्रुष्यांचा दोष नसेलही किंवा सर्व वर्णाना गुरुप्रमाणे संस्कार करणे ब्राह्मणांचे काम होते ते त्यांनी प्रामाणिकपणे केले नाही हे खरे असले तरी अस्प्रुष्यता मानणारे दोषी होतेच असे म्हणता येणार नाही कारण हे त्यांच्या अडाणीपणातून होत असे. आजच्या काळातसुद्धा दुर्गंधी - अस्वच्छ असनार्या लोकांना इतर लोक जवळ करत नाहीत ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत. मग हजार वर्षापुर्वी काय अवस्था असेल याची कल्पना केल्यास परिस्थिती उजेडात येईल.
         ज्या काळात माणुस जगत असतो तो त्याच प्रमाणे लिखान करत असतो हा नियमच आहे. सध्याच्या वातावरणानुसार माणुस जी कल्पना करू शकतो त्याच्यातूनच तो जग पाहत असतो.आजच्या काळात कोणीही काही लिहिल ते आजच्या काळात योग्य ठरेल पण इथून पुढे शेकडॊ - हजारो वर्षांनी कालबाह्य होईल हा परिवर्तनाचा नियम आहे. मनुस्मृतिच्या काळात जे काही लिहिलं गेलं ते सध्या सर्वच समर्थनीय आहे असं नाही. काही निश्चितच आक्षेपार्ह गोष्टी आहेत मनुस्मृतिमध्ये पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे अनुकरण का करू नये ? की केवळ चुका दाखवण्यातच धन्यता मानायची ?. कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यासाठी लिहिलेला ग्रंथ. राजाचं आचरण कसं असावं, प्रजेचं रक्षण कसं करावं, अत्यंत सुंदर माहीती त्यामध्ये दिलेली आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तो फ़क्त हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही. म्यानमार, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये मनुस्मृति हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो. फ़िलीफ़ाईन्स म्हणजे महर्षी मनूं पुतळा उभा केला गेला आहे. मग त्यांनी हे सगळं मनुस्मृति न वाचताच केलं का ? मग लक्षात घ्या जातीभेद आणि द्वेष नेमका कुठे आहे.
             वैदिक-हिंदु विचार-प्रणाली आणि मान्यता  ह्या काळानुसार बदलत राहतात. त्यामुळेच हजार वर्षापासून चालत आलेल्या रुढी-परंपरा आज बदललेल्या तर काही बंद झालेल्या दिसतील तसं इतर धर्मात होत नाही म्हणून धर्म अभ्यासक हिंदु हा धर्म मानण्यापेक्षा एक मान्यता-संस्क्रुती तथा विचार प्रणाली मानतात. मनुस्मृतिमध्ये ज्या श्लोकांवर आक्षेप आहे किंवा जी वचणे विषमतावादी आहेत ती काढून टाकली तरी मनुला फ़ारसा फ़रक पडणार नाही.कारण मनुस्मृति समाजशास्त्र आहे.ती निव्वळ अध्यात्मिक बोधच देत नाही तर सामान्य नितीबोध, सांसरीक कार्यासाठी मार्गदर्शन, राजा तसेच व्यापारी आदींची कार्य - कर्तव्ये याविषयी मनुने मार्गदर्शन केले आहे.यामुळे लक्षात येईल की मनुचा मुख्य उद्देश समाजाला मुख्य व्यवहारीक मार्गदर्शन देण्याचा आहे. म्हणून विनोबा म्हणतात "मनु समाजशास्त्रज्ञ आहे तो नेहमीच बदलत असतो. मनु जर आज असता तर त्याला आपली मनुस्मृति बाजुला सारून वेगळीच मनुस्मृति लिहावी लागली असती. याचा अर्थ पहिल्यामध्ये घेण्यासारखं काही नाही असे नाही. मनुस्मृति सारखे ग्रंथ समाज-व्यवस्था कायम रहावी या उद्देशाने लिहिली गेलेली आहेत".

8 December 2016

मराठा क्रांती मोर्चा : सामाजिक क्रांती.

          महाराष्ट्रामध्ये काही दिवसापासून प्रत्येक समुहाचे ओबीसी - बहुजन - दलित ऐक्य-संविधान संबंधीत नावाने भव्य मोर्चे सुरु आहेत, मोर्च्याला सुरुवात झाली ती "मराठा क्रांती मोर्चा" ने. कोपर्डी येथे एका लहान मुलीवर दलितांकडून पाशवी अत्याचाराची घटना घडल्यानंतर त्याची प्रतिक्रिया म्हणून महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाची मालिका सुरु झाली. मराठा क्रांती मोर्चे अतिभव्यपणे आणि तेवढ्याच शांततेने मूकपणे चालू झाले. क्रांती म्हंटले की प्रतिक्रांतीही आलीच त्यामुळे आम्हीही एकत्र येवू शकतो हे दाखवण्यासाठी मराठा मोर्चा विरोधातही "बहुजनांचे" प्रतिमोर्चे निघू लागले. सध्याचा काळ मोर्चेबांधनीचाच काळ आहे. सध्याही एकाच गोष्टीची चर्चा आहे मोर्चा आणि त्याच्या ठळक मागण्या. महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या "मराठा क्रांती मोर्चाचा" समाजाला किती फ़ायदा होईल त्यांच्या मागण्या मान्य होतील का ? झाल्याच तर किंवा नाही झाल्याच तर पुढे काय ? हा मुद्दा थॊडा बाजुला ठेऊ. माझ्या मते "मराठा क्रांती मोर्चाचे" चे मोठे फ़लीत म्हणजे सामाजिक पारदर्शकता. "मराठा क्रांती मोर्चा" मुळे समाजामध्ये पारदर्शकता आली. आम्ही एकच आहोत असे सर्वकाळ ओरडनार्या सर्वांचे मित्रत्व किंवा शत्रुत्व अगदी सुर्यासारखे स्पष्ट झाले. आज पर्यंत ब्राह्मणवादाच्या विरोधात लढताना स्वत:ला बहुजन म्हणनार्यांचे सुद्धा पितळ उघडे पडले. तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुत्व - बहुजनवाद - पक्ष यामध्ये विभागलेला मराठा "फ़क्त मराठा" म्हणून एक झाला आणि विश्वाला आपल्या मराठा शक्तीचे दर्शन करून एक नवा आदर्श दिला. अनेक वेळा मोर्चे निघतात त्यात अनेकदा मोर्चाला हिंसक वळण लागते, सरकारच्या अडचणीमध्ये वाढ होऊन सामान्य नागरीकांना हकनाक वेठीस धरले जाते पण अपवाद असेल तर तो अतिभव्य मराठा क्रांती मोर्चा. कारण क्रांतीची सुरुवात आणि शेवट हे सुधारणा आणि क्रुतीने होत असते.आपण जर इतिहासातील सर्व मोर्चे आणि आंदोलनाचा इतिहास पाहिला तर सहज लक्षात येईल , तोडफ़ोडी, जाळपोळी, लुटालुट, सरकारविरोधी नारेबाजी, सार्वजनिक मालमत्तेची नासधुस तसेच सामाजिक तनाव ही मोर्च्याची खास वैशिष्टे राहिलेली आहेत. अशा वेळी मराठ्यांनी शिस्त, शांतता आणि स्वच्छतेचे दर्शन घडवून इथुन पुढच्या मोर्च्यांसाठी एक आदर्श घालून दिलेला आहे ही बाब मराठ्यांसाठी निश्चितच कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे.
आरक्षण आणि सामाजिक मानसिकता
               सेनापती बापटांनी म्हंटलेले आहे "महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले, खरा वीर - वैरी पराधिनतेचा, महाराष्ट्र आधार भु-भारताचा". मराठा सेवा संघासोबत इ.स.१९९६ मध्ये मराठा आरक्षणासंबंधी एका बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी म्हंटले होते की, "आजपर्यंत केवळ देणेच माहीत असलेल्या मराठा समाजावर आज आरक्षण मागायची वेळ आली आहे ही महाराष्ट्रासाठी भुषणावह बाब नाही, परंतू मराठा समाज सर्वार्थाने सशक्त होण्यासाठी शासनाचे प्रयत्न राहतील". मराठा नेत्यांनी समाजाकडे दुर्लक्ष केल्याचे मतही त्यांनी मांडले. तेंव्हापासून आजतागात आरक्षणासाठी मराठ्यांचा संघर्ष चालूच आहे. मराठा समाज आरक्षण मागत असला तरी ते स्वतंत्र आरक्षण मागत आहेत कुणाचे कमी करून नाही. मराठा आरक्षणाचे काही समाजाने समर्थन केले आहे तर काहींनी अप्रत्यक्ष विरोध. आरक्षण म्हणजे गरीबी हटाव कार्यक्रम नाही असे म्हणणारे मराठा आरक्षणावर बोलताना मात्र मराठ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णन करतात हेच दुटप्पीपणाचे लक्षण आहे विशेष म्हणजे त्यांना आर्थिक सवलती घेताना अजिबात लाज वाटत नाही. मराठा समाज आज मागास परिस्थितीत जगत आहे पण भारतीय संविधान त्यांना मागास मानायला तयार नाही. भारतीय संविधानाचा आजही देशात "सवर्ण आणि दलित" जगत आहेत यावर ठाम विश्वास आहे मग ते कितीही समानतेची शिकवण देवो. मोजक्या लोकांच्या स्थितीवरून समाजाच्या परिस्थितीचे मोजमाप करणे हेच चुकीचे आहे. आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आणायचा असेल तर एकतर सर्वच जातीना लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे नाहीतर सर्वच आरक्षण रद्द करावे लागेल. आर्थिक निकषावर आरक्षण असाही एक पर्याय शक्य आहे. मी वयक्तिक मराठा आरक्षणाला जेवढं समर्थन करतो त्याच्या पेक्षा जास्त सर्वच आरक्षण रद्द करण्याला माझं समर्थन आहे.कारण आरक्षणानं देशाची आर्थिक स्थिती फ़ारच दयनीय झालेली आहे. असंच चालू राहिलं तर देश भिकेला लागायला वेळ लागणार नाही.आरक्षणाच्या शैक्षणिक - व्यवसायिक आर्थिक सवलती मध्ये कोट्यावधी रुपये विनाकारण वाया घालवले जात आहेत.त्यामुळे किमान अशा सवलती देण्या अगोदर आर्थिक निकष तपासणे अत्यंत आवश्यक आहे.
मराठा वि.दलित : मोर्चे आणि प्रतिमोर्चे.
                 मराठा मोर्चे जसे रेकॉर्डब्रेक गर्दी करायला लागले तसे आधी दुर्लक्ष करत असलेल्या माध्यमांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.इतर जातींमध्ये अस्वस्थता कशी पसरेल याची काळजी प्रसारमाध्यमांनी घेतली.मोर्चा - प्रतिमोर्चा मुळे सध्या सामाजिक संकेतस्थळावर जातीयवादाला हुरुप आला आहे. काही ठिकाणी दंगलीचे वातावरण पण झाले होते. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी मराठ्यांच्या मागण्या सरकारविरोधी आहेत आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे प्रयत्न आहेत त्यामुळे प्रतिमोर्चा काढू नये असे आवाहन केले होते.त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजेत. तरीही प्रसारमाध्यमांनी मराठा मोर्च्यातील अनेक मागण्या बाजुला सारून अ‍ॅट्रोसिटीच्या मागणीस सर्वाधिक चर्चेत ठेवून, आरक्षणावरून भयभीत करून दलितांना प्रतिमोर्चा काढण्यास भाग पाडले. दलितांनी यामागचा उद्देश लक्षात न घेता मराठ्यांच्या विरोधात मोर्चे काढले खरे पण त्याचा त्यांना कितपत फ़ायदा होईल दलितांनी याचा विचार करणे आवश्यक आहे.
               मराठा मोर्चा तथा प्रतिमोर्चाचे फ़लीत म्हणजे ब्राह्मणवादा विरोधात बहुजन सज्ञेमध्ये वावरणार्या मराठा आणि दलित लोकांचे पारदर्शक रुप समोर आले.मराठा - दलित हा वाद काही आजचा नाही. हे शत्रुत्व जुनेच आहे फ़क्त बहुजन एकीच्या नावाखाली दबलं गेलं होतं. सामाजिकतेचा विचार केला तर आज मराठा-दलित एकमेकांचे हाडवैरी बनले आहेत. दोन्ही समाजामध्ये दरी निर्माण झालेली आहे. किमान कोणत्याना-कोणत्या चळवळीत काम करत असलेल्यांची तर हिच भावना आहे. इथे संपुर्ण समाज असा उल्लेख अपवादात्मक सुद्धा करणे शक्य नाही. एकीसे कितीही डोस पाजले तरी सत्य परिस्थिती लपवणे किंवा अमान्य करणे सोप्पे नाही. वर - वर एकतेचे दर्शन देणार्यांची मानसिकता सामाजिक संकेतस्थळावर वेळो - वेळी बाहेर आली आहे. सामाजिक संकेतस्थळ म्हणजे समाज नव्हे असे आपण म्हंटले तरी आज तो एक समाजाचा भाग बनला आहे.मराठा आणि दलित समाज हे वैचारिक सामाजिक पातळीवर एकत्र येणे कदापी शक्य नाही.मराठा-दलित यांचे संबंध हे हिंदु-मुस्लिम धर्मासारखे आहेत वर-वर भाई-भाई म्हणायला ठिक आहे पण प्रश्न सामाजिकता-परंपरेचा येतो त्यावेळी दोन्ही परस्पर विरोधी आहेत. हिंदु-मुस्लिम भाई-भाई असं आपण कितीही म्हणालो तरी परंपरा - इतिहास - श्रद्धास्थानं - प्रेरणास्थानं - लग्नपद्धती ही भिन्न टोकाची आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये सामाजिक एकी होऊ शकत नाही तीच अवस्था इथे मराठा आणि दलितांमध्ये आहे. निव्वळ बुद्धीजीवींच्या विचारावर एकमत झाले तर सामाजिक समता येत नाही तसेच आंतरजातीय विवाहाने समता-समानता येईल असे मानने म्हणजे सदसदविवेकबुद्धीशी शत्रुत्व पत्कारण्यासारखे आहे. त्यामुळे दोन्ही समाजाने उघड - उघड भुमिका घेणे गरजेचे होते जे "मराठा क्रांती मोर्चा" आणी त्याच्या विरोधातील "बहुजन मोर्चा" च्या रुपाने का असेना साध्य झाले आहे मग कितीही "मराठा - दलित ऐक्य" च्या बाता मारल्या तरी त्याने फ़रक पडेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही ही बाब दोन्ही समाजाने मान्य केली पाहिजे. नाहीतर परिस्थिती बदलायची असेल तर निर्लपबुद्धीने आणि नि:पक्षपातीपणे एकत्र येवून विचार मंथन करणे गरजेचे आहे किंवा जे चालू आहे तेच चालू द्यावे हेच दोन्ही समाजाच्या हिताचं आहे.
ॲट्रोसिटी कायद्यातील बदल
         अनुसुचित जाती-जमातींच्या रक्षणासाठी त्यांच्यावरील अत्याचार रोखण्यासाठी ॲट्रोसिटी (अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक) कायद्या केला गेला.परंतु नंतर त्याचे रुपांतर रोजगार हमी योजना अंतर्गत कायद्यामध्ये झाले की काय अशी शंका येते. कारण कायद्याचा वापर संरक्षणासाठी होत असता आर्थिक उन्नतीसाठीपण होत असल्याच्या काही घटना काही दिवसात समोर आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही समाजामध्ये दुही पसरली आहे. दलितांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे केले पाहिजेत हे मान्य करून आणि त्या अत्याचाराचा आम्ही निषेद करतो पण खोट्या केसेस दाखल केल्या जात नाहीत असे म्हणणे म्हणजे दु:साहस तथा अज्ञानीपणाचे लक्षण आहे. मराठा मोर्चामध्ये ॲट्रोसिटी कायद्यामध्ये बदल करण्यासाठीची एक मागणी होती. त्या मागणीच्या विरोधातच दलितांनी प्रतिमोर्चा काढला होता. पण बदल म्हणजे नेमका काय बदल करायचा आहे याबद्दल ऐकुन घेण्याची मानसिकता कोणत्या दलितामध्ये किंवा त्यांच्या नेत्यांमध्ये नव्हती म्हणूनच ॲट्रोसीटी कायदा मुळे दोन्ही समाजात दरी निर्माण झाली आहे ती दरी आहे तोपर्यंत तरी एकीच्या गप्पा झाडणे म्हणजे विनाकारण वेळ घालवण्यातला प्रकार आहे. दुर्दैवाने देशामध्ये खोट्या केसेस करण्यार्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतुद आपल्याकडे नाहीये मग कायदा कोनताही असो.त्यामुळे अशा वेळी गुन्हा सिद्ध झाला नाही किंवा फ़िर्यादी फ़ितुर झाला तर कठोर शिक्षा देण्याची आणि त्याला मिळालेले पैसे परत शासनाला परत करण्याची तरतुद करणं अत्यंत गरजेचे आहे.असे केल्याने बर्याच प्रमाणात खोट्या केसेस ला तथा धमक्यांना आळा बसेल. यासाठी दोन्ही समाजातील तज्ञ लोकांनी एकत्र येवून याविषयी चर्चा करुन दोन्ही समाजाला अनुकूल, दलितांवरील अत्याचार थांबावेत आणि ॲट्रोसिटीचा गैरवापरही होऊ नये असा सुवर्णमध्य काढणं अत्यावश्यक आहे;(आरक्षण आणि ॲट्रोसिटी : क्रमश:).

4 February 2016

स्त्री अस्मिता आणि विषमता

           भारत देश हा पुरुष प्रधान संस्क्रुतीवर आधारलेला आहे त्यामुळे इथे स्त्रीला कमी लेखणे म्हणजे सामान्य बाब आहे. याचा प्रत्यय रोज आपल्याला पहायला मिळतो. पहिल्यापासून स्त्री ही पुरुषी अहंकारामध्ये भरडली गेली आहे तीच परिस्थिती आजतागात आहे. त्यामुळे स्त्रीने कोणते निर्णय घ्यावेत आणि कोणते नाही हे पुरुषच ठरवणार. त्यांच्या आवडी कोणत्या असाव्यात आणि नसाव्यात हेही पुरुषच ठरवणार. एवढेच नाही तर त्यांनी मंदिरात प्रवेश करावा की नाही आणि करावा तर कधी करावा हेही पुरुष वर्गच ठरवणार याला काही स्त्रीयाही बळी पडल्या आहेत. स्त्रीयांची दुर्बलता यासाठी कारणीभुत आहे. आजपर्यंत स्त्रीयांनी धर्माची आज्ञा मानून अन्याय सहन केला. महिलांना या धर्माने शुद्र मानले, गुलामापेक्षाही हीन वागवले तरीही तो आपल्या वाड - वडीलांचा धर्म म्हणून येथील महिलांनी त्यांच्यावर होणारा अन्याय मुकाटपणे सहन केला. आजही तेच चालू आहे मग भारत महासत्ता होण्याच्या बाजारगप्पा मारनार्यां लोकांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट नाही का ?
        काही दिवसापुर्वी शनी शिंगणापुरच्या मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी सामान्य हिंदु स्त्रीयांनी आंदोलन सुरु केले. शनीचे दर्शन घ्यावे की नाही असे दोन मतप्रवाह पडले. त्यानंतर लगेच मुंबईच्या हाजी - अली दर्ग्यात आम्हाला प्रवेश मिळावा म्हणून मुस्लिम स्त्रीयायी पुढे आल्या. अशा पुरोगामी कार्यासाठी ही वाटचाल खरच स्वागतार्ह आहे.पण सनातनी हिंदु व्यवस्थेमध्ये ती वाटचाल कितपत यशस्वी होईल ते सांगणे कठीण आहे. कारण आजपर्यंतचा इतिहास बघता कोणतेही पुरोगामी पाऊल सहजासहजी पुढे पडलेले नाही आणि यापुढेही पडू नये अशी सनातनी मानसिकता हिंदुधर्माइतकिच इतर धर्मानेही पोसलेली आहे. हि सनातनी मानसिकता आपल्या जुन्या परंपरेला घट्ट धरून असल्यामुळे त्यापरंपरा पुरोगामींच्या प्रत्येक अव्हानाला थोपवणार्या आहेत. या आधी या सनातनी प्रव्रुत्तीविरोधात अनेक समाजसुधारक  दत्त म्हणून उभे ठाकले होते. आपल्या समाजातील स्त्रीयांना शैक्षणिक तसेच सामाजिक अधिकार मिळावेत यासाठी हमिद दलवाई यांनी आयुष्यभर लढा दिला आहे. सर्व धर्माची हीच परिस्थिती आहे.सर्वच धर्म परंपरानिष्ठ आणि जुन्या रुढींनी बांधलेले आहेत. स्त्री सती जाण्याची परंपरा मोडण्यासाठी राजा राममोहनराय यांनी खुप कष्ट घेतले.तसेच बालविवाह, दलितांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट घेतले.
          आज चाललेले आंदोलन शनिशिंगनापुरचे आव्हानही तसेच आहे मंदिर प्रवेश हा स्त्रीयांच्या अधिकारांशी संबंधित प्रगतशील विचार आहे. शनी मंदिरात प्रवेश करणार्या त्या स्त्रीया हिंदुच होत्या आणि प्रवेशाला विरोध करणार्या सर्व संघटना सनातनी हिंदुच होत्या.मुळात पुरुष प्रधान आणि जातीवर आधारीत असलेल्या समाजामध्ये महिलांसाठी प्रतिष्ठा नावाची गोष्टच नाही तिथे आहे फ़क्त तिला कमी लेखने एवढंच. तीला विचार स्वातंत्र्य आहे का ? ती सुरक्षित आहेत का ? एकिकडे स्त्रीयांनाच पुजायचे आणि दुसरीकडे स्त्रीयांना मंदिरात प्रवेश नाकारायचा हे फ़क्त आपल्याच संस्क्रुतीत होऊ शकते. शनि बाबत द्वारकापीठाच्या शंकराचार्याने काढलेला फ़तवाही विचार करण्यासारखाच आहे की, "शनी हा देव नाही तो ग्रह आहे स्त्रीयांना येथे प्रवेश देण्याऐवजी त्यालाच  पळवून लावा".
           आपल्या संस्क्रुतीचे पालन करतात देव - देश आणि धर्म याचा विचार केला जातो. पण सध्या सर्व निष्ठा देव आणि धर्मापुरतीच मर्यादित केली आहे. करं तर देव आणि धर्मापेक्षा "राष्ट्र" ही संकल्पना श्रेष्ठ आहे आणि माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आणि याविरोधात जाणारेच खरे समाजद्रोही, धर्मद्रोही आणि राष्ट्रद्रोही आहेत. या पार्श्वभुमीवर शनीशिंगनापुरच्या मंदिरातील प्रवेशाचे हिंदु तथा हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा म्हणुन आंदोलन केलेल्या मुस्लिम स्त्रीयांचे सर्व भारतीय समाजाने स्वागत केले पाहिजे. सनातनी लोकं इतिहासातुनच हटवादी असतात त्यांना परिवर्तन मान्य नसते, परिवर्तन निसर्गाचा नियम आहे जो माननार नाही तो नष्ट होईल. स्त्रीया मंदिरात आल्या तर शनी देवाचं पावित्र्य अडचणीत येते असे त्यांचे म्हणने आहे. पण चांगल्या परिवर्तनवादी पावलं थाबविणारा देव हा देव म्हणन्याच्या लायक असेल का हा विचार भक्तांनी नक्कीच केला पाहिजे. मग स्त्रीयांना प्रवेश नाकारणारा देव आहे की त्याच्या नावाने आपली हिंदुतील पुरोहित आणि मुस्लिमातील मौलवी असले उद्योग करत असतात ?. खरं तर आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे असं भासवणार्यांनी स्त्री-स्वातंत्र्याचे निव्वळ ग्रंथिक दाखले देऊ नयेत. प्रत्येक्षात पाऊल उचलन्याची वेळ आली आहे.
    आपल्या धार्मिक आणि सामाजिक आधिकारांसाठी आजपर्यंत बर्याच वेळा आंदोलन झाली आहेत. आजपर्यंतचा इतिहास बघता स्त्रीयांच्या सबलीकरणाच्या आणि हक्काधिकाराच्या प्रस्थापनेसाठी लढणार्या संघटना मुख्यत: हिंदु धर्मामध्येच आहेत. पण सध्या सुरु असलेले आंदोलन, आपल्या धार्मिक आणि सामाजिक आधिकारांसाठी मुस्लिम स्त्रीयांनी उचललेले पाऊल म्हणजे भारतीय समाजातील पहिलीच घटना आहे. हमिद दलवाईनी उभारलेल्या लढ्याला कमी प्रतिसाद मिळाला पण विरोधच जास्त झाला, धर्मगुरुंनी मोर्चे संघटित केले. हमिद दलवाईं विरोधात केलेले आंदोलन खुप मोठे होते त्यांना मुस्लिम कब्रस्थानात जागा मिळु न देण्याइतपत मोठे, याचाच स्वच्छ अर्थ असा की सनातनी मानसिकता कोणत्या एका धर्माची मक्तेदारी नव्हतीच कधी. जशी हमिद दलवाईंना इस्लिमी धर्मगुरुंच्या विरोधात संघर्ष करावा लागला तसेच हिंदु धर्मामध्ये सुद्धा संत तुकोबां पासून दोभॊळकर - पानसरे यांनाही सनातन्यां विरोधात संघर्ष करावा लागला. मात्र सर्वच धर्मातील सनातन्यांनी एक गोष्ट मात्र कायमस्वरुपी लक्षात ठेवली पाहिजे. त्यांचे विजय कायमच दिवास्वप्नासारखेच अल्पजीवी असतात.
         सध्या चाललेल्या शनीमंदिर प्रवेशबंदिच्या वादावर पडता टाकताना आपण कोणत्या प्रवाहात समिल व्हायचे ते ठरवावे लागेल.खरं तर मुख्य मुद्दा स्त्री स्वातंत्र्याचा राहिलेला नाही. हे मुद्दे राजकारणाचे केंद्रे बनलेले आहेत. म्हणजे निव्वळ विरोधाला विरोध म्हणून विरोध केला जातो.सनातनी व्यवस्थेला विरोध म्हणून या आंदोलनाला पाठिंबा बाकी आम्हाला त्यांच्या असलेल्या-नसलेल्या श्रद्धेशी देणंघेणं नाही त्याचप्रमाणे निव्वळ पुरोगामी चळवळीला विरोध म्हणून स्त्री-प्रवेश बंदीला समर्थन असे प्रवाह रुजु झालेले आहेत अशा घटना राष्ट्रीय ऐक्यास बाधकच अशाच आहेत.हे सर्व थांबवणे गरजेचे आहे श्रद्धेमध्ये राजकारणाने प्रवेश करता कामा नये. पुरुषप्रधान समाजामध्ये स्त्रियांचे स्वातंत्र्य फ़क्त मंदिरापुरतेच मर्यादितही असू नये. म्हणूनच आज या सर्व विषमतावादी सनातनी मानसिकतेतून बाहेर पडून स्त्रीयांना समाजात समतेचे आणि समानतेचे स्थान बहाल करून देणे आवश्यक आहे.

12 January 2016

दादोजी,छ.शिवाजी महाराज आणि सत्य

        "दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य" अशा मथळ्याचा राजा पिंपरखेडकर लिखीत लेख "लोकसत्ता" मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ रोजी प्रसिद्ध झाला. अर्थात तो लेख म्हणजे एक पुस्तक परीचय होता. श्यामसुंदर मुळे यांनी लिहिलेले "हिंदवी स्वराज्याचे कारभारी दादोजी कोंडदेव : खंडण आणि मंडण " याच पुस्तकाचा परीचय. या लेखामध्ये लेखकाने असे लिहिले आहे की, "दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांचं सुरुवातीचं शिक्षण झालं, त्यांची नेमणूक खुद्द शहाजीराजांनीच केली होती" तसेच "दादोजी यांचं शिवाजी महाराजांच्या जडणघडणीतलं स्थान नाकारण्यात काहीच अर्थ नाही." असही सुचवले आहे. आजच्या सामाजिक संघटना इतिहासाची मोडतोड करून आपल्याला सोईस्कर इतिहास लिहितात असा आरोप त्यांनी केला आहे पण आजपर्यंतच्या तथाकथित इतिहासकारांनी जे उपद्व्याप केले आहेत त्याविषयी लिहायचे मात्र ते विसरलेत. अर्थात या लेखकांनी "सत्य" हा शब्द मथळ्यापुरताच मर्यादित ठेवला आहे. त्यामुळे सत्य काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.
           शिवचरित्रामध्ये सर्वात जास्त चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे त्यांचे गुरुत्व. यामध्ये रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव ही नावे आघाडीवर होती. पण आजपर्यंत रामदास स्वामींना शिवरायांच्या गुरुपदी बसवणारे लेखक अक्कल आल्यावर रामदास स्वामी आणि शिवरायांनी भेटच झाली नसल्याचे बोलत आहेत तसेच शिवराय आणि रामदास भेटीचे अस्सल पुरावे नाहीत हे तर इतिहाससिद्ध आहेच. त्यामुळे अशा वेळी एकच नाव उरते ते म्हणजे दादोजी कोंडदेव.
            राजा पिंपरखेडकर यांच्या म्हणण्यानुसार "शहाजीराजांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणुक केली होती" हे खरे आहे पण नेमणुक केली होती ती सेवक म्हणून गुरु किंवा शिक्षक म्हणून नव्हे. शहाजी राजांनी शिवाजी महाराजांबरोबर काही नोकर दिले होते. शहाजी राजांच्या पुणे परीसरातील काही मुकाशांचा कारभार त्यांच्या वतीने दादोजी कोंडदेव पाहत असे. दादोजी कोंडदेव शहाजीराजांचा खाजगी नोकर होता. तो पुणे परगण्याच्या पाटस विभागातील मलठण गावचा कुलकर्णीही होता. काही इतिहासकार म्हणतात की दादोजी कोंढाण्याचा सुभेदार होता. परंतु कोंढाणा परीसरातील शहाजीराजांच्या मुलखाचा कारभार पाहण्यासाठी शहाजीराजांनी त्याची मुतालिक म्हणुन नेमणुक केली होती. अर्थात तो "अदिलशहाचा अधिकारी नव्हता तर शहाजीराजांचा नोकर होता. १६४१-४२ मध्ये शिवाजीराजे पुण्याला येण्यापुर्वी तो शहाजीराजांच्या आज्ञा पाळीत असे." शिवाजीराजे पुण्याला आल्यानंतर तो शिवाजीराजे आणि जिजाऊमाता यांच्या आज्ञा पाळीत असे.
          आत्तापर्यंतच्या बर्याच उत्तरकालीन बखरकारांनी व काही तथाकथित इतिहासकारांनी दादोजीला शिवाजी महाराजांचा बालपणीचा गुरु करून शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या प्राथमिक कार्याचे श्रेय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही इतिहासकारांनी शिवरायांना शस्त्रास्त्राचे शिक्षण दादोजी कोंडदेव याने दिल्याचे लिहिले आहे. यावरूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने उत्क्रुष्ट क्रिडा प्रशिक्षकासाठी "दादोजी कोंडदेव पुरस्कार" देखील सुरु केला होता व "दादोजी कोंडदेव स्टेडीयम" या नावाने मोठे स्टेडीयम ठाणे येथे तयार केले.
           दादोजी ने शिवरायांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिल्याचा किंवा स्वराज्य कार्यास प्रेरणा दिल्याचा अथवा मदत केल्याचा एकही उल्लेख समकालीन साधनांमध्ये नाही. शहाजी राजेंच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे लिखित राधामाधवविलासचंपु, कविंद्र परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली या सर्वात विश्वसनीय समजल्या जाणार्या समकालीन साधनांमध्ये दादोजी कोंडदेव चा उल्लेखच नाही. स्वराज्यकार्यात लहानमोठे योगदान दिलेल्या अनेक व्यक्तींचे उल्लेख या ग्रंथांमध्ये असताना दादोजी कोंडदेवचा उल्लेख नसणे ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या स्वराज्य कार्यातील व जीवनातील दादोजीचे गौण स्थान दर्शवते. विश्वसनीय साधनांमधील सभासदाच्या बखरीतदेखील दादोजीने शिवरायांना शिक्षण दिल्याचे उल्लेख नाहीत. सभासद लिहितो, "शाहजीराजे कर्नाटक प्रांती बेंगरुळ येथे होते. शाहजीराजे यांसी दौलतीमध्ये पुणे परगाणा होता. तेथे दादोजी कोंडदेव शहाणा चौकस ठेविला होता. तो बेंगरुळास महाराजांच्या भेटीस गेला त्याचबरोबर राजश्री शिवाजीराजे व जिजाबाईआऊ ऐशी गेली. त्यासमयी राजियास वर्षे बारा होती. बराबर शामराव निळकंठ म्हणून पेशवे करून दिले व बाळक्रुष्णपंत व नारोपंत दीक्षितांचे चुलतभाऊ मुजुमदार दिले.व सोनाजीपंत डबीर व रघुनाथ बल्लाळ सबनीस ऐसे देऊन दादोजीपंतास व राजे राजे यांसी पुण्यास रवाना केले. ते पुण्यास आले. येताच बारा मावळे काबीज केली. मावळे देशमुख बांधून, दस्त करून पुंड होते त्यास मारीले. त्यावर कालवशात दादोजी कोंडदेव म्रुत्यु पावले. पुढे शिवाजीराजे आपणच कारभार करीत चालले. "अर्थात इतर नोकर-चाकरांप्रमाणे दादोजी कोंडदेव हा नोकरच होता यात तीळमात्र शंका असण्याचे कारण नाही.
          पेशवेकालीन बखरीमध्ये दादोजी कोंडदेव चे उदात्तीकरण करण्यात आले आहे. पेशवाईच्या उत्तर काळात स्वराज्य स्थापनेचे श्रेय जातीनिशी लाटण्यासाठी दादु कोंडदेव ला शिवरायांच्या गुरुपदावर आरुढ करण्याचं कार्य सुरु झालं. याच काळात लिहिल्या गेलेल्या शिवदिग्विजय, चिटणीस बखर यांसारख्या बखरीमधुन दादु कोंडदेव हा शिवरायांचा गुरु असल्याचा खोटा इतिहास रचण्यात आला. या  बखरींबद्दल इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी म्हणतात - मराठा साधनांपैकी एक्क्याण्णव कलमी बखर काय किंवा चिटणीस बखर काय, उत्तर पेशवाईतील असल्यामुळे भारूडांनी भरल्या आहेत. अशा बखरींमध्ये आलेला इतिहास हा आजपर्यंत होऊन गेलेल्या इतिहासकारांनी नाकारलेला आहे. सभासद बखरीचे संपादक दत्ता भगत म्हणतात, "उत्तरकालीन बखरकारांनी शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत दादोजी कोंडदेवाचे गुरु म्हणून चित्रण करताना दादोजीला अवास्तव महत्व दिले आहे, ते या (सभासद) बखरीत नाही. शिवाजी महाराजांना दादोजीबद्दल आदर असणार पण यांचे संबंध मालक/सेवक (चाकर) आहेत हे सभासदाच्या लक्षात आहे. " प्रसिद्ध विचारवंत, प्राच्च्यविद्या संशोधक व संस्क्रुतचे गाढे अभ्यासक डॉ.आ.ह.साळूंखे  यांनी परमानंदाच्या शिवभारतावर आधारित "शिवराय : संस्कार आणि शिक्षण" नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे त्यात प्रुष्ठ क्र.३८ वर ते लिहितात "महाराष्ट्रात आढळणार्या दंतकथांमधील तथाकथित गुरुंचा उल्लेखही नाही. शहाजी राजे आणि जिजाऊ यांच्या स्वत:च्या क्षमता, त्यांनी शिवरायांवर केलेले संस्कार स्वत: आणि विविध शिक्षकांमार्फ़त त्यांची करून घेतलेली तयारी या सर्वांचे परमानंदाने जे अत्यंत सविस्तर वर्णन केलेले आहे यातुन एक गोष्ट लक्षात येते की दंतकथामधील कोणत्याही गुरुचा साधा उल्लेखही परमानंदाने संपुर्ण ग्रंथात कुठेही केलेला नाही."   इतिहास संशोधक वा.सी.बेंद्रे यांनीही असे म्हंटले आहे की, "शिवाजी-जिजाई यांना दादोजी कोंडदेवाबरोबर पाठविले ही एक काल्पनिक माहीती आहे. अर्थात ती चुकीची आहे."
             वा.सी.बेंद्रे यांनी इ.स.१६४४ मध्ये मुहम्मद अदिलशहाने दादोजी कोंडदेवाचा एक हात कापल्याचे नमुद केले आहे. रा.व्य.जोशी देखील यांनी देखील आपल्या "परकियांच्या द्रुष्टीतून शिवाजी" या पुस्तकात "मुघल दरबारच्या एका कागदामध्ये दादोजीचा एक हात अदिलशाहने तोडल्याची बातमी आहे." असे लिहिले आहे.यावरून इ.स.१६४४ पासून त्याच्या म्रुत्युपर्यंत म्हणजेच इ.स.१६४७ पर्यंत दादोजीला एकच हात आहे. दादोजी शस्त्रकौश्यल्यासाठी प्रसिद्ध असल्याची समकालीन साधनांमध्ये एकही नोंद नाही. त्यातही एक हात तुटलेल्या अवस्थेमध्ये दादोजीने शिवरायांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण देणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
              गो.ग.सरदेसाई यांच्यासारख्या बरेच इतिहासकार शिवरायांच्या सुरुवातीच्या काळातील किल्ले जिंकणे व स्वराज्य स्थापनेचे श्रेय दादोजी कोंडदेव ला देतात. सरदेसाईंचे असे मत होते की, "इ.स.१६४४ मध्ये कोंडाणा प्रांत व किल्ला दादोजीने हस्तगत केला तसेच दादोजीच्या मदतीने शिवाजीने तोरणा, रायगड, सिंहगड इत्यादी किल्ले घेतले. या गॊष्टीसाठी ते विजपुरहून सुटलेल्या फ़र्मानाचा दाखला देतात". पण ज्या फ़र्मानाचा ते उल्लेख करतात त्या फ़र्मानाचा आणि दादोजीने किल्ले घेतण्याचा संबंधच नाही. शाहजीवर अदिलशहाने बंडखोरीचा आरोप केला त्यासंदर्भात ते फ़र्मान आहे. फ़र्मान १ ऑगस्ट १६४४ चे असून कान्होजी जेधे याला उद्देशून आहे. सेतु माधवराव पगडी म्हणतात की, "सत्य हे आहे की, दादोजीच्या म्रुत्युनंतरच शिवाजीने किल्ले घेऊन स्वराज्यस्थापनेला सुरुवात केली". श्री ग.ह.खरे म्हणतात, "जेधे करीण्यात राजगडाविषयी माहीती आली आहे, ती कालप्रसंग अचुक असेल तर दादोजी चा म्रुत्यु झाल्यावरच शिवाजीने तोरणासह हा किल्ला जिर्णोद्धार करण्याचे काम चालविले होते असे ठरते". सभासद बखरीत देखील असाच उल्लेख आहे, "दादोजी कोंडदेवच्या म्रुत्युनंतरच शिवाजीराजांनी किल्ले जिंकण्यास सुरुवात केली". सेतु माधवराव पगडी म्हणतात, "महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उपक्रम काही इतिहासकार इ.स.१६४४ पर्यंत मागे नेतात. पण त्याला आधार नाही. स्वराज्यस्थापनेच्या उपक्रमाची सुरुवात दादोजी कोंडदेवाच्या म्रुत्युनंतरच झाली आहे". यामुळे शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या कार्यात दादोजीचा काडीमात्र संबंध नसल्याचे निदर्शनास येते.
          राष्ट्रपिता महात्मा फ़ुले  शिवाजीमहाराजांच्या पोवाड्यात दादोजी व शिवाजीराजे यांच्या संबंधाविषयी वर्णन करतात. मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा । पोवाडा गातो शिवाजीचा ॥. शिवछत्रपतींचे कर्तृत्व हे त्यांचे स्वतः चे होते, त्याचे श्रेय दादोजीला द्यायला ज्योतिबा तयार नव्हते. या पोवाड्यातून महात्मा फ़ुलेंनी दादोजी हा शिवरायांचे गुरु नसल्याचेच प्रतिपादन केले आहे. कोल्हापूरचे इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनीही "उपलब्ध ऐतिहासिक दस्ता-ऐवजांवरून असे दिसते की कुठलाही पुरावा नसतांना दादोजी कोडदेव ह्यांना काही इतिहासकारांनी गुरु असल्याचे जाणीव पूर्वक घुसविले आहे" असे म्हणुन वरील सर्व मतांना पुष्टी दिलेली आहे.
          सर्व प्रख्यात विचारवंत आणि इतिहास संशोधकांनी दादू कोंडदेवचे गुरुत्व नाकारणे तसेच शिवरायांच्या समकालीन साधनांमध्ये दादू कोंडदेवचा साधा उल्लेखही नसने या दाव्यावरून हेच लक्षात येते की दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु किंवा शिक्षक नव्हता. तसेच दादोजी कोंडदेव यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. समकालीन ग्रंथामध्ये दादोजी कोंडदेव चे नाव देखील नसताना, दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु असण्यासंबंधीचा एकही ऐतिहासिक पुरावा नसताना दादोजी कोंडदेव शिवरायांचा गुरु म्हणुन सांबोधणारे आधुनिक इतिहासकार दादोजी शाहजीराजांचा नोकर होता ही गोष्ट कसे काय विसरले हेही एक आश्चर्य आहे. तसेच जिजाऊमातांच्या देखरेखीखाली प्रशिक्षित होऊन शिवरायांनी स्वयंप्रयत्नाने आणि मात्रुप्रेरणेने स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्यासाठी शुर मावळ्यांनी स्वत:चे रक्त सांडले. अशा या शुर मावळ्यांनी रक्त सांडून स्थापन केलेल्या शिवरायांच्या स्वराज्यस्थापनेच्या अद्वितीय पराक्रमाचे श्रेय शाहजीराजांचा एका नोकर असलेल्या दादोजी कोंडदेवला देणे हे अनाकलनीय तथा चुकीचे आहे तसेच इतिहासाशी अप्रामाणिकता दर्शवणारे आहे.
जय शिवराय जयोस्तु स्वराज्य
संदर्भ :
छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचिकित्सक चरित्र,(पुर्वार्ध) प्रथमाव्रुत्ती १ मे १९७२. [वा.सी.बेंद्रे].
परकियांच्या द्रुष्टीतून शिवाजी [रा.व्य.जोशी].
शिवराय : संस्कार आणि शिक्षण (पृष्ट क्र. ३८) [डॉ.आ.ह.साळूंखे]
श्री राजा शिवछत्रपती,खंड १ भाग १,पूर्वोक्त (पृष्ट क्र.६०५ व ६०९ वरील तळटिप क्र ५४)[गजानन भास्कर मेहंदळे].
सभासद बखर (संपादक-दत्ता भगत).
स्वराज्यातील तीन दुर्ग [श्री ग.ह.खरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतु माधवराव पगडी].
शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही [चंद्रशेखर शिखरे].
महात्मा फ़ुलेंक्रुत शिवाजींचा पोवाडा [महात्मा फ़ुले समग्र वाङमय,महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुती मंडळ,आव्रुत्ती ५ वी].
मराठी व्रुत्तपत्रे ("लोकसत्ता" ,लेख : "दादोजी,शिवाजी महाराज आणि सत्य" राजा पिंपरखेडकर लिखीत  मध्ये ३१ ऑगस्ट २०१४ )

9 January 2016

छ.शिवरायांचा कालखंड हिंदू-मुस्लिम संघर्षाचा होता ?

          आजपर्यत शिवरायांची प्रतिमा मुस्लिम विरोधी आणि शिवरायांचा कालखंड हिंदू - मुस्लिम संघर्षाचा कालखंड म्हणुन सांगितला गेला. पण हा चुकीचा प्रचार आहे. छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू-मुस्लिम धार्मिक संघर्षाचा कालखंड नव्हता तर राजकीय सत्तासंघर्षाचा कालखंड होता. जर छत्रपती शिवरायांचा कालखंड हा हिंदू - मुस्लिम असा असता तर सर्व हिंदू एका बाजूला आणि सर्व मुस्लिम एका बाजूला दिसले असते मात्र तसे इतिहासात अजिबात दिसत नाही. बरेच मुस्लिम शिवरायांच्या सैन्यात होते तर बरेच हिंदू लोकं मुस्लिम राज्यकर्त्यांच्या सैन्यात होते. दुसरे असे की शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेपुर्वी महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही व बरीदशाही ही पाच मुस्लिम राज्ये एकमेकांविरुद्ध लढत होती. याचा सरळ अर्थ असा की शिवकाळातील संघर्ष हा सत्तासंघंर्ष होता.
छ.शिवरायांचे मुस्लिम सैन्य
      छ.शिवरायांच्या सैन्यामध्ये अनेक मुस्लिम सरदार, वतनदार व इतर चाकर होते आणि ते अगदी मोठमोठ्या हुद्द्यांवर जबाबदारीच्या जागांवर होते. शिवरायांच्या तोफ़खान्याचा प्रमुख इब्राहिमखान नावाचा एक मुस्लिम होता. तोफ़खाना म्हणजे लष्कराचे एक प्रमुख अंग. कदाचित सर्वात महत्वाचे. अशा महत्वाच्या तोफ़खान्याचा प्रमुख मुस्लिम होता.छत्रपती शिवरायांच्या दुरद्रुष्टीचं उदाहरण म्हणून सांगितल्या जाणार्या आरमार विभागाचा प्रमुखसुद्धा एक मुस्लिम सरदारच होता. त्याचे नाव दर्यासारंग दौलतखान. शिवरायांच्या खास अंगरक्षकांत व खाजगी नोकरांत अत्यंत विश्वासू म्हणून मदारी मेहतर यांचा समावेश होता. आग्र्याहुन सुटकेच्या प्रसंगात या विश्वासू मुस्लिम साथीदाराने काय म्हणून साथ दिली ? शिवराय मुस्लिमद्वेष्टे असते तर असे घडले असते का ?
       शिवरायांच्या पदरी अनेक मुसलमान चाकर होते. त्यात काजी हैदर हा एक होता. सालेरीच्या लढाईनंतर औरंगजेबाच्या दक्षिणेतील अधिकार्यांनी शिवाजीनं सख्य जोडावे म्हणून एक हिंदू ब्राह्मण वकील पाठवला. तेंव्हा शिवाजीनं उलट काजी हैदर यास मोघलांकडे पाठवलं. म्हणजे मुसलमानांचा वकील हिंदू आणि हिंदूंचा वकील मुस्लिम. त्या काळातील समाजाची फ़ाळणी हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी असती तर असे घडले नसते. सिद्धी हिलाल हा असाच आणखी एक मुस्लिम सरदार शिवरायांच्या पदरी होता. १६६० मध्ये रुस्तुमजमा व फ़ाजलखान यांचा शिवरायांनी रायबागेजवळ पराभव केला. त्या वेळी सिद्धी हिलाल शिवरायांच्या बाजुने लढला त्याप्रमाणेच १६६० मध्ये सिद्धी जौहरने पन्हाळगडास वेढा दिला होता तेंव्हा नेताजी पालकरनं त्यांच्या सैन्यावर छापा घालून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला त्या वेळीसुद्धा हिलाल व त्याचा पुत्र वाहवाह हे नेताजीबरोबर होते. या चकमकीत सिद्धी हिलालचा पुत्र वाहवाह जखमी व कैदी झाला होता. शिवरायांच्या बाजूने मुस्लिम सिद्धी हिलाल आपल्या पुत्रासह मुस्लिमांच्या विरोधात लढता.
          त्या लढ्यांचे स्वरुप निव्वळ हिंदू विरुद्ध मुस्लिम असे असते तर असे घडले असते का ? सभासद बखरीत प्रुष्ठ क्र. ७६ वर शिवरायांच्या अशा एका शामाखान नावाच्या मुस्लिम शिलेदाराचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथाच्या खंड १७ मधील प्रुष्ठ क्र.१७ वर नूरखान बेग याचा "शिवाजीचा सरनोबत" म्हणून उल्लेख आहे.हे सरदार एकटे नव्हते हे स्पष्टच आहे. त्यांच्या हाताखालील मुस्लिम शिपायांसह ते शिवरायांच्या चाकरीत होते.
           या सर्वांहून एक महत्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरून मुस्लिम धर्मिय शिपायांबद्दलचे शिवरायांचे धोरण स्पष्ट होते. सन १६४८ च्या सुमारास विजापुरच्या लष्करातले सातशे पठाण शिवरायांकडे नोकरीस आले.तेंव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्यांना सल्ला दिला, तो शिवरायांनी मान्य केला व तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाले," तुमचा लौकिक ऐकून हे लोक आले आहेत त्यांस विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदुंचाच संग्रह करू, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरीली तर राज्य प्राप्त होणार नाही, ज्यास राज्य कारणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे चालवून त्यांचा संग्रह करून ठेवावे." ग्रॅंट डफ़ने सुद्धा त्याच्या शिवरायांवरील चरित्र ग्रंथात प्रुष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्याचा उल्लेख करून म्हंटले आहे की, "यानंतर शिवाजीने आपल्या सैन्यात मुसलमानांनासुद्धा सामावून घेतले आणि त्यांच्या स्थापनेत याचा फ़ार मोठा उपयोग झाला."
शिवरायांचे सरदार व सैन्य हे फ़क्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिम धर्मियांचासुद्धा भरणा होता. हे यावरून स्पष्ट व्हावे. शिवराय हे मुस्लिम धर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असते तर हे मुस्लिम शिवरायांच्या पदरी राहिले नसते. शिवराय राज्यकर्त्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता, राज्याचा प्रश्न मुख्य़ होता. धर्म मुख्य़ नव्हता, राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती, राज्यनिष्ठा व स्वामिनिष्ठा मुख्य होती.
मुस्लिम राज्यकर्त्यांच्या पदरी हिंदू सैन्य
      ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिम सरदार व सैन्य होतं त्याचप्रमाणे मुस्लिम राजांच्या-शहनशहांच्या - पदरी अगणित हिंदू सरदार होते. त्यांची यादी खुपच मोठी आहे. खुद्द शिवरायांचे वडील विजापूरच्या मुस्लिम आदिलशहाच्या पदरी मोठे सरदार होते. शहाजी महाराजांचे सासरे लखुजी जाधव निजामशाहीचे महाराष्ट्रातील एक मनसबदार होते. जावळीचे मोरे, फ़लटणचे निंबाळकर, सावंतवाडीचे खेमसावंत, श्रुंगारपुरचे सुर्यराव श्रुंगारपुरे हे सर्वजण आदिलशाहीचे मनसबदार होते.
        ज्याच्या सैन्यसामर्थ्यापुढे शिवरायांना माघार घ्यावी लागली होती व नामुष्कीचा तह करून आग्र्यास जाऊन संभाजीराजेंसह कैद होऊन पडावं लागलं, तो उत्तरेचा मातब्बर सरदार मिर्झाराजे जयसिंग तर अस्सल रजपूत हिंदूच होता आणि मुस्लिम शहेनशहाच्या पदरी मानाची असेल पण चाकरीच करत होता. मिर्झाराजे जयसिंग शिवरायांवर चाल करून आला तेंव्हा त्याच्या सैन्यात अनेक हिंदू सरदार होते, जाट होते, मराठा होते, रजपूत होते. राजा रायसिंग सिसोदिया, सुजनसिंग बुंदेला, हरीभान गौर, उदयभान गौर, शेरसिंग राठोड, चतुर्भुज चौहान, मित्रसेन, इंद्रभान बुंदेला, बाजी चंद्रराव, गोविंदराव इत्यादि..
          कोंडाणा किल्ला हस्तगत करताना तानाजी मालुसरे वीरमरण पावले आणि कोंडाण्याचा सिंहगड झाला.त्या लढाईतील कोंडाण्याचा किल्लेदार उदयभानू हा एक हिंदू रजपूतच होता आणि तो मुसलमान राजाचा किल्लेदार होता. अकबराच्या पदरी पाचशेहून आधिक मनसब असणारे जेवढे सरदार होते त्यात हिंदू सरदारांचे प्रमाण २२.५ टक्के होते. शहाजहानच्या राज्यात हे प्रमाण २२.४ टक्के होते. अगदी सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांत अगदी कडवा म्हणून समजला जातो त्या औरंगजेबाच्या पदरी सुरुवातीला हिंदू मनसबदारांचे हे प्रमाण २१.६ टक्के होते. ते पुढे वाढले व ३१.६ टक्के झाले.
औरंगजेबानेच राजा जसवंतसिंग या हिंदू रजपूतला दक्षिणेचा सुभेदार नेमले होते. याच औरंगजेबाचा पहिला प्रधान रघुनाथदास नावाचा हिंदू होता. तो स्वत: रजपूत असून रजपुतांविरुद्ध लढला. पानिपतच्या लढाईत पेशव्यांच्या तोफ़खाण्याचा प्रमुख इब्राहिमखाण गारदी मुस्लिम होता. जे हिंदू मुस्लिम राज्याच्या पदरी चाकरी करत होते आणि इमान राखून प्रसंगी हिंदूविरुद्ध सुद्धा लढत होते त्यांना त्या काळी कुणी "धर्मबुडवे, किंवा धर्मद्वेष्टे किंवा मुस्लिमधार्जिणे" म्हणत नव्हते. धर्मनिष्ठेपेक्षा स्वामिनिष्ठेला जास्त मान्यता होती.
         भारतात धर्मामुळे व धर्मासाठी लढाया होत नव्हत्या, लढायांचे मुख्य कारण राज्य मिळवणे, राज्य बळकावणे वा टिकवणे हे होते. हे करायला उपयोगी ठरेल तेवढ्यापुरता धर्माचा वापर केला जाई पण ती मुख्य बाब नव्हती. शिवाजी महाराजांच्या पदरी मुस्लिम सरदार होते व मुस्लिम राजांच्या पदरी हिंदू सरदार हे जसे खरे आहे तसेच त्या काळात कोण कोणाविरुद्ध लढला ह्याची पाहणी केली तर त्या लढाया केवळ हिंदू विरुद्ध मुसलमान अशा झाल्या असे दिसत नाही. त्यामुळेच शिवकाळातील संघर्ष हा राजकीय संघर्ष होता धार्मिक संघर्ष नव्हे.
संदर्भ :
मराठ्यांच्या इतिहासाची साधने,खंड १७ प्रुष्ठ क्र.१७-[वि.का.राजवाडे].
शककर्ता शिवाजी (प्रुष्ठ क्र.४०-४१)-[गो.स.सरदेसाई].
शिवाजी कोण होता ? [कॉ.गोविंद पानसरे]
मराठ्यांचा इतिहास (खंड १,प्रुष्ठ क्र.१२९)-[ग्रॅंट डफ़] 
श्री.शिवछत्रपती [त्र्यं.शं.शेजवलकर].
शिवचरित्र - मिथक आणि वास्तव [श्यामसुंदर मिरजकर].

6 January 2016

शिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज ?

         विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच "शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी की तुकाराम महाराज" या वादाला परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक इतिहास बघता शिवरायांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून रामदासांचा किंवा तुकाराम महाराजांचा एकही उल्लेख सापडत नाही. पण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्याप्रमाणे म्हणतात "जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कागदोपत्री काही पुरावे उपलब्ध नसतात त्या वेळेस आपल्या  मेंदूचा तार्किक पद्धतीने वापर केला पाहिजे." त्याप्रमाणे चिकित्सा केली पाहिजे.
         क्षत्रियकुलावतंस श्री शिवाजी महाराज भोसले यांच्या पराक्रमास इ.स. १६४० चे सुमारास प्रारंभ झाला असे श्री वि.ल.भावे म्हणतात तर प्रत्यक्ष राज्य स्थापनेला सुरुवात इ.स. १६४५ साली झाली. त्यांची मुद्रा असणारे पहिले पत्र इ.स. १६४६ चे असे नरहर कुरुंदकर म्हणतात आणि ते सभासदाची बखर आणि शिवभारत इत्यादिंशी सुसंगत आहे. यावेळेपर्यंत रामदासस्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेही नव्हते. वर्णवर्चस्ववादी वि.का.राजवाडे यांनी "राष्ट्रगुरू रामदास" या लेखात छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच स्वराज्याच्या उभारणीत रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या नावाखाली उत्तरकालीन खोट्या रामदासी बखरींचा संसर्भ देण्यात आला होता. उत्तरकालीन बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. कारण त्या सर्व पेशवेकालीन आहेत.
       रामदास स्वामी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले ते इ.स. १६४४ मध्ये. यावेळी महाराष्ट्राच्या ज्या भागात रामदास स्वामींनी वास्तव्य केले तो भाग म्हणजे महाबळेश्वर. त्यावेळी महाबळेश्वर, जावळी वगैरे ठिकाणे ही शिवरायांच्या शत्रुकडे होती. त्यामुळे तिकडे शिवरायांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रामदासी संप्रदायाचा विश्वकोश "दासविश्रामधाम" या ग्रंथाप्रमाणे रामदास पिशाचलिला करत होते. यामुळे त्या काळात ते "पिसाट रामदास" म्हणूनच ते चहुकडे ओळखले जायचे. याच काळात त्यांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली. याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या. दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले. याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले. यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.
     अर्थात सत्य काय आहे, "शिवरायांच्या स्वराज्य ऊभारणीस ९ वर्षे झाली तोवर रामदासांचे पाऊल शिवरायांच्या प्रदेशातही नव्हते. ते होते शत्रुंच्या प्रदेशात". ज्यावेळी रामदास महाराष्ट्रात आले त्यांच्या आगमनापुर्वी पाच - सहा वर्षापासून तुकाराम महाराजांची किर्ती व वाणी  मात्र सर्वत्र दुमदुमत होती हे बहिनाबाईंचे आत्मचरित्र सांगते. तेंव्हा मावळखोर्यातील लोकांची मनोरचना स्वराज्य उभे करण्याची पुर्व तयारी रामदासांना करता येणे शक्य नसून ते कार्य तुकोबांनीच केले होते हेच निष्पन्न होते. शिवकालीन महाराष्ट्रात झालेल्या क्रांतीचा विचार करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही तर त्याकाळी लोकांचा आत्मा कोणत्या स्वरुपाचा होता याचा विचार करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रधर्मकार भा.वा.भट म्हणतात. महाराष्ट्रातील साधुसंत यांनी समतेची शिकवण दिली, भजनी मेळावे भरवले, त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना करण्यासाठी जाग्रुत जनतेची बैठक मिळाली. श्री. त्र्यं. शेजवलकर यांनी राज्याची सप्तांगे सांगुण म्हंटले आहे, "शिवाजीने प्रथम शेवटचे अंग जे मित्र ते जोडून घेतले ही गोष्ट कधी साध्य झाली याचा इतिहास अज्ञात आहे. पण त्याने हाती घेतलेल्या कार्यात वाटेल ते परिश्रम करणारे, प्रसंगी जीवावर उदक सोडणारे मित्र त्याला मिळाले हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. समाजाची उंची वाढवण्यास शिवाजीला राजकारणापुढे केंव्हाच उसंत मिळाली नाही" मग हे कार्य शिवरायांच्या उदयकाळी कोणी केले ?
       बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता, बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात. सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण, रसाळ, सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात, "श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत - अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला. श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते". तर ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, "धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ. उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली. त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ, सुसंघटित व कार्यक्षम मराठा समाज तयार झाला. त्यात मराठा मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".
    मावळ्यांना धर्मवाड:मय कोणतेही माहीत असेलच तर तुकोबांचे अभंगच होय. मावळ्यांना धर्मनीतीव्यवहाराचे मोठे शिक्षण तुकोबांच्या किर्तनातून मिळाले होते हे अमान्य करणे शक्य नाही. समाज हा विराट पुरुष आहे व विराट झालेल्या महात्म्यावाचून त्याला गदगद हालवायला कोणीही समर्थ होत नाही. असे पांगारकरांचे विचार सार्थच आहेत. म्हणूनच श्री ना.ग.जोशी म्हणतात, "महाराष्ट्राची उंची व गौरव वाढविण्याचे ,या राष्ट्रगत व्यक्तित्वाच्या आविष्काराचे कार्य संतश्रेष्ट तुकारामांनी जे केले ते अपुर्व आहे". "एखादा संत म्हणजे नुसता मऊ मेंगुळवाणा माणुस अशी जी समजुत वारकरी संतांबाबत रुढ झाली तिला संपुर्णपणे निरुत्तर करणारा जबाब या विभुतीने केला". कळीकाळालाही पायाशी नमवण्याची अमोघ शक्ती ज्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मनाची थोरवी केवढी असेल. अशा या विठठलाच्या गाढ्या विरांमध्ये तुकारामांचे स्थान अत्युच्यपदी आहे हे स्वाभाविकच आहे. तुकारामांची उन्नत व्यक्तिरेखा मोठी उठावदार दिसते आणि युगपुरुष त्याला मिळालेले महत्व सार्थ ठरते.
          तुकोबा खरे युगपुरुष होते.समकालीन संत बहिनाबाईंनी त्यांना सर्वद्रष्टा, सर्वांतरसाक्षी, विश्ववंद्य इत्यादी विशेषणे लावली असून रामेश्वरांनी विश्वसखा, सच्चिदानंदमुर्ति इत्यादी पदव्यांनी गौरवले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तुकोबांचा गौरव करताना म्हंटले आहे, "तुकाराम तुकाराम । नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला पुरुषार्थ ॥". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या  कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती ? आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी ? गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता ?
         एक विषेश बाब अशी की, "शिवाजी महाराज नेहमी फ़िरत असून वेळोवेळा तुकारामांचे किर्तन ऐकावयाची संधी साधीत असत. असा इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे मग अशा वेळी त्यांस दर्शन होत नसे का ?" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, "शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता." पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते ?. बाबा  याकुत सारख्या फ़किराकडे श्रद्धेने जाणारे शिवाजी पुण्यानिकटच्या देहूच्या महाराष्ट्रसिद्ध तुकोबांना विसरतील आणि दिल्लीपर्यंत ख्यात असणार्या शिवयुवकाचे नाव शेजारच्या तुकोबांना ठाऊक नसेल हा सामान्यज्ञानविरोधा कुतर्क कोण मानणार ?
देहू पुणे अन आसपासच्या गावागावात । अहा वसविली श्री तुकयाने भक्तीची पेठ ॥
कीर्ती सकळही शिवरायांच्या श्रवणावर आली । श्रद्धा या सत्पुरुषावर शिवरायाची जडली ॥
हे अगदी स्वाभाविकच आहे.
          आता रामदासांच्या कारकिर्दीकडे वळुया, पुर्वोक्त रामदास हे स्वराज्याचा यत्न केला तेंव्हा महाराष्ट्रातही आले नव्हते. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "शिवाजीच्या स्वराज्य उद्योगाला सुरुवात इ.स.१६४५ ला आणि मुद्रा असणारे पत्र इ.स.१६४६ चे व रामदासी पंथाची स्थापना इ.स.१६४९ ची हा कालानुक्रम समजून घ्यावा. रामदासी पंथ हा आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रु आहेत. स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हाच याचा अर्थ." ह.वी राजमाने म्हणतात, "शिवाजीमहाराजांच्या यश-किर्तीचा प्रताप महिमा मध्यान्हीच्या सुर्यापासून तळपत असताना समर्थ पाहत होते. पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही. रामदास ज्या भागात वावरत होते,तो भाग महाराजांच्या शत्रुच्या ताब्यात होता. त्यामुळे शहाणा माणुस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचे टाळणारच"
रामदास स्वामी आणि शिवरायांची पहिली भेट राज्याभिषेकापुर्वी झाली नव्हती यावर सर्वांचेच एकमत आहे. पण त्यानंतर केंव्हा झाली याबाबतही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. दि.२२ जुलै १६७२ रोजी दत्ताजी पंत व गणेश गोजदाऊ यांना जी आज्ञा दिली आहे त्यावरून असे दिसते की तोपर्यंत तरी महाराजांचे रामदासांशी जवळकीचे नाते प्रस्थापित झाले नव्हते. शिवसमर्थांच्या जीवनकालातली व नंतरची कागदपत्रे तर शके १५९४ (इ.स.१६७२) नंतर केंव्हातरी भेट झाली असली पाहिजे असे दर्शवणारी आहेत असे प्रा. फ़ाटक म्हणतात. ती भेट झालीच असेल तर पुढे केंव्हाही होवो पण इ.स.१६७२ पर्यंत मात्र झालेली नव्हती हेच इतिहास सांगतो. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "रामदास-शिवाजी भेट झालीच असेल तर ती इ.स. १६७२  साली झाली, हे एक साधे सत्य आहे. पण समजा ही भेट इ.स.१६४५ साली झाली असती तरी त्यामुळे रामदास हा शिवाजीचा राजकीय गुरु व प्रेरक ठरत नाही.
शेवटी येथे चंद्रशेखर शिखरे यांच्या "शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही" या पुस्तकातील उतारा देत आहे.
       "शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची व्रुत्ती, त्यांनी मोघलांना दिलेला एक हाती लढा यापासुनच शिवरायांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांची राजमुद्रा व ध्वज ही शहाजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषन, संगोपण, त्यांना उत्क्रुष्ठ शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवरायांवर अत्युच्च प्रतिचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे बीजारोपन केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखन केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजाच्या प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषत: संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजाग्रुती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी किंवा रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वत:ही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायींनी ओढूनतानून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास आणि दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत."
   यामुळे या तथाकथित इतिहासचार्यांसाठी रामदासांचा एक सल्ला खुप महत्वाचा आहे किमान रामदासभक्तांनीतर मानलाच पाहिजे.
"अक्षरे गाळून वाची । कां ते घाली पदरची ॥
निगा न करी पुस्तकांची । तो येक मुर्ख ॥"
संदर्भ :
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी (पृष्ट क्र.११) [श्री बाळशास्त्री हरदास],प्राचिन मराठी वाड:मयाचे स्वरुप (पृष्ट क्र.११५) [श्री शेणोलीकर],श्री तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.४१६) [श्री पांगारकर],शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही.(पृष्ट क्र.४४) [चंद्रशेखर शिखरे],श्री दासबोध (२-२-७०) [समर्थ रामदास स्वामी],श्रीमान योगी, प्रस्तावना [श्री नरहर कुरुंदकर],समर्थांचे गुरु छत्रपती,प्रथमाव्रुत्ती(पृष्ट क्र.४५,४६) [ह.वि.राजमाने],छत्रपती शिवरायांची पत्रे (पहिली आव्रुत्ती,पृष्ट क्र.१४९) [श्री प्र.न.देशपांडे],वारसा (पृष्ट क्र.९२) [वि.ल.भावे],श्री समर्थावतार (पृष्ट क्र. १९५) [श्री देव],समर्थ चरित्र (पृष्ट क्र. २९,पृष्ट क्र.१७०) [ज.स.करंदीकर,प्रा.न.र.फ़ाटक],श्री सांप्रदायिक विविध विषय (पृष्ट क्र. ५८)[श्री देव,राजवाडे],श्री सांप्रदायिक वृत्त व चर्चा (पृष्ट क्र. १६)[श्री भा.वा.भट],अस्मिता महाराष्ट्राची (पृष्ट क्र. ६४) [श्री पा.वा.गाडगीळ],श्री शिवछत्रपती (पृष्ट क्र. ८८,९५) [श्री त्र्यं.श.शेजवलकर], श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा (पृष्ट क्र.११) [श्री नित्यानंद मोहिते],छ.शिवाजी महाराज (पृष्ट क्र.५३५) [श्री क्रुष्णाराव अर्जुन केळुसकर],सांप्रदायिक विवेचन (पृष्ट क्र.१२१ ते १२३) [श्री ना.ग.जोशी],शिवायन महाकाव्य (पृष्ट क्र.१०७) [श्री ना.रा.मोरे],तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.९६) [श्री रा.ग.हर्षे].

4 January 2016

मुस्लिम राज्यकर्ते आणि देवळांची लुट,मोडतोड

           आज समाजामध्ये अनेक संघटना उदयास आलेल्या आहेत. प्रत्येक संघटनेचा लोकांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी एक युक्तिवाद असतो. त्यामध्ये हिंदूत्ववादी संघटनेंचा सगळ्यात जुना युक्तिवाद म्हणजे मुसलमानांनी आपल्या धर्मावर अन्याय केला, देवळांची लुट केली म्हणून (निव्वळ) मुसलमांनांना विरोध करण्यासाठी हिंदुंनो एक व्हा !. (इथे यांना सामान्य हिंदूंशी काही देणंघेणं नसतं). यामध्ये हिंदू धर्मावर अन्याय करण्यापेक्षा देवळांची लुट केली यावर यांचा जास्त रोष असतो (कारण देशात कितीही मोठा दुष्काळ येवो पण भट-बामनांच्या पोटापाण्याच्या प्रश्नाला देवळामुळे कसलाच चिमटा बसत नाही). पण सामान्य जनतेने या लुटालूट प्रकरणापासून दुरच रहावे (कारण सामान्य जनतेला लुटण्यात देवळांचा पहिला नंबर लागतो) आणि आजही परिस्थिती काही वेगळी नाही. आज जिवंत माणसाला एक वेळचे जेवण मिळो ना मिळो पण देवांना मात्र सकाळ - दुपार - संध्याकाळ पंचपक्वान्नांची न्याहारी आहेच, शिवाय काकडआरत्या, माकडआरत्या आहेतच की. कोट्यावधी गरीब (हिंदू) जनतेला थंडीच्या कडाक्यात साधे अंग झाकण्याइतके कपडे मिळो ना मिळो पण देवांना मात्र छपरीपलंग, मच्छरदाणी, गाद्यागिरद्यांची कमी नाही.
               आज हिंदुत्व, हिंदुराष्ट्र अशा घोषणा आणि भुमिकांच्या आधारावरचे राजकारण गेल्या काही वर्षात वाढू लागले आहे. हिंदुत्ववादी संघटनेंचा एक (त्यांचा) आवडता युक्तिवाद असतो व आहे, मुसलमान क्रुर होते,त्यांनी देवळे पाडली, देवळे भ्रष्ट केली,हिंदू धर्मावर अन्याय-अत्याचार केला, धर्म बुडाला म्हणून सर्व मुसलमान हिंदूविरुद्ध व हिंदू धर्माविरुद्ध असतातच  व आहेत आणि ज्या अर्थी ते हिंदूविरुद्ध आहेत त्याअर्थी सर्व हिंदूंनी त्यांच्याविरुद्ध असले पाहिजे.धर्माधारे हिंदुंना संघटित करणार्या संघटनांचा जसा युक्तिवाद असतो तसाच काहीसा मुसलमान संघटनेंचा असतो.
           आक्रमक मुस्लीम सैन्यानं सत्ता काबीज करताना व राज्यविस्तार करताना हिंदुंची देवळे फ़ोडली व लुटली हा हिंदुत्ववाद्यांच्या युक्तिवादाचा महत्वाचा भाग असतो. हे सत्य असले तरी पण हे पुर्ण सत्य नाही,अर्ध्य सत्य आहे. अरब, तुर्क, अफ़गाण इत्यादी आक्रमकांच्या टोळीवजा सैन्यांना नियमीत पगार दिला जात नसे, त्यांनी लुट करावी आणि लुटीतल्या हिश्श्यातून त्यांचा पगार घ्यावा अशी रीत असे. हिंदूंच्या मंदिरात खुप संपत्ती असे. आक्रमक सैन्य ही संपत्ती लुटत असे. लुटताना देवळे पाडत व संपत्ती वाटून घेत.
            आज दर्याकपारीत आणि डोंगरमाथ्यावरच्या ज्या देवळात संपत्ती नसे पण देव असत त्या देवळांच्या वाटेला हे आक्रमक सैन्य जात नसे. कारण काय ? देवळे पाडणे हे मुख्य नसून संपत्ती लुटणे हा मुख्य हेतु असे. जर हिंदू धर्मद्वेषातून देवळं पाडली म्हणायचे तर मग छोटी छोटी मंदिरे सहीसलामत कशी ? याचाच अर्थ की लुटीची संपत्ती मुख्य असत, तिथे धर्म दुय्यम होता. मुख्य हेतू साध्य करायला आवश्यक म्हणून देवळे पाडत. याच लुटीतील मोठा हिस्सा राजाकडे जाई. राजाचे उत्पन्नाचे ते एक साधन असे. देवळाभोवतील लोकांचे खच्चीकरण करणे, त्यांच्यात भय निर्माण करणे हा सुद्धा एक हेतू असे देवळे पाडण्यामागे. लोक श्रद्धाळू असतात, त्यांनी देव लुटला मग आम्हाला लुटायला काय वेळ लागणार आहे असे भय असे. त्यामुळे मुलुख जिंकणे सोपे जाई. त्याकाळातील देवळे केवळ धर्मकेंद्रे नव्हती तर संपत्तीची केंद्रे होती, मानाची केंद्रे होती आणि सत्तेचीही केंद्रे होती. हीच मुख्य कारणे ठरली देवळांच्या नाशाला.
            आजच्या हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार मुस्लिमांनी धर्मद्वेषातून हिंदूंची देवळे पाडली. त्यामध्ये ते पंढरपूर, तुळजापूर या देवस्थानांची उदाहरणे देतात जी अफ़जलखानाने उध्वस्त केली असेही हिंदुत्ववाद्यांचं म्हणनं आहे. पण हेही विसरून चालणार नाही की, अफ़जलखान मराठा स्वराज्यावर चालून येत होता आणि हिंदुत्ववाद्यांच्या म्हणण्यानुसार वाटेतील देवळांची लुट व मोडतोड करत होता तर त्याच्याबरोबर अनेक हिंदू धर्मिय सरदार होते त्यांच्या भावना दुखावल्या नाहीत का ? तसेच तुळजाभवानीचे मंदिर अफ़जलखानाने तोडलं म्हणून हिंदुत्ववादी सांगतात, त्यावेळी अफ़जलखानाबरोबर पिलाजी मोहिते, शंकररावजी मोहिते, कल्याणराव यादव, नाईकजी सराटे, नागोजी पांढरे, प्रतापराव मोरे, झुंझारराव घाटगे, काटे, बाजी घोरपडे (रामदास स्वामींचा प्रिय शिष्य) आणि संभाजीराव भोसले हे उपस्थित होते हेही विचरून चालणार नाही. १७९१ मध्ये हिंदूंकडून लुटीत पतझड झालेलं देवी सारदेचं श्रुगेरीचं मंदिर मुसलमान टिपू सुलतानाने दुरुस्त केलं हे तर सर्वांना माहीत आहेच.
            अफ़जलखान तुळजापूर व पंढरपूर येथील हिंदूंची देवस्थाने फ़ोडत होता, त्यावेळी अफ़जलखानाचा ब्राह्मण वकील क्रुष्णा भास्कर कुलकर्णी हिंदू असून काय करत होता ? त्याला माहीत नव्हतं का ? की देवळावर आपलेच जातबंधू जगत आहेत, आणि मंदिरे फ़ोडली तर आमच्या जातीची रोजगार हमी योजना बंद होईल, म्हणुन मंदिरे पाडू नका. असे सांगून तरी किमान अफ़जलखानाचे मन परिवर्तन का केले नाही ? तीच गत सोमनाथ मंदिराची, गजनीच्या महंमदने थानेश्वरचा राजा आनंदपाल याच्याशी समझोता करून मग सोमनाथवर हल्ला केला, खरे तर आनंदपालने याची सुचना मंदिरामध्ये का दिली नाही ? महंमदाचे अनेक सेनाधिकारी व सैनिक हिंदू होते. मग तरीही त्या पापाचा वाटेकरी फ़क्त मुसलमान महंमद कसा ?
                शिवाय फ़क्त मुसलमानच देवळे पाडायचे असे म्हणने म्हणजे सुद्धा अडाणीपणाचे लक्षण आहे कारण फ़क्त मुसलमान राजेच देवळे लुटत होते हे सत्य नाही. हिंदू राजे सुद्धा संपत्तीसाठी हिंदूंची देवळे लुटीत असत.काश्मिरचा हिंदू राजा हर्षदेव याने बाराव्या शतकात हिंदूंचीसुद्धा मंदिरे लुटली आहेत. धातूसाठी मुर्ती वितळवी, वितळण्यापुर्वी त्यांच्यावर विष्ठा व मुत्र शिंपडून त्यांचा पवित्रभंग करी इत्यादिचे तपशीलवार वर्णन कल्हणाच्या "राजतरंगिणी" या ग्रंथात आहे. देवाच्या मुर्तीची विटंबना केली म्हणून त्या काळी दंगे झाल्याची नोंद मात्र नाही. मंदिरे तोडून ती लुटण्यासाठी राजा हर्षदेव ने खास देवोत्पतक नायक नावाने अधिकारी नेमला.(११९३ ते १२१०) कॅबी आणि दाभाई येथील जैन मंदिरे उध्वस्त केली. मंदिरातील उत्पनाची जी खाती होती त्यात त्याने "देवोत्पादन" हे खातेच उघडले होते. मंदिरातील लुटलेली संपत्ती या खात्यात जमा होत असत.म्हणजे देव-देवळे पाडण्यामध्ये हिंदू राजे पण काही मागे नव्हते तरीही देवंळाच्या लुटीचा इतिहास सांगताना केवळ मुस्लिमांचाच उल्लेख का केला जातो हे कोणता हिंदुत्वाचा ठेकेदार सांगेल का ?
              मुस्लिम राज्याला त्रासदायक ठरू लागले तर मुस्लिम राज्यकर्ते मुस्लिम धर्मगुरुंची, मुल्ला-मौलवींची सुद्धा पर्वा न करता त्यांनाही छळत. महंमद तुघलक याने मुल्ला व सय्यद यांच्या कत्तली केल्याचा आरोप बखरकारांनी नोंदवून ठेवलेला आहे. काही इतिहासकारांनी तर असे लिहिले आहे की, जहांगीर बादशहाला मुल्ला मंडळी एवढी घाबरत की तो आला की ते लपून बसत.म्हणजे देवळे पाडली व लुटली त्याला कारण राज्यच आणि देवळांना इनामे दिली किंवा देवळे दुरुस्त केली त्यालाही कारण राज्यच इथे धर्माचा काडीमात्र संबंध नाही. म्हणुनच मुस्लिमांनी जशी देवळे लुटली तशी हिंदू राजांनी सुद्धा हिंदूंची देवळे लुटल्याचे दाखले आहेत.
तात्पर्य काय ? त्या काळातल्या राज्यकर्त्यांच्या द्रुष्टीने राज्य महत्वाचे होते. धर्म महत्वाचा नव्हता. स्वत:चे राज्य स्थापायला आणि स्थिर करायला धर्माचा आधार घेतला पण धर्म मुख्य नव्हता, राज्य मुख्य होते आणि पूर्ण सत्य हे असे आहे.
संदर्भ :
देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे [प्रबोधनकार ठाकरे].
शिवाजी कोण होता ? [गोविंदराव पानसरे].
शिवचरित्र एक अभ्यास [सेतू माधव पगडी].
राजतरंगिणी [कल्हन पंडीत (अनुवाद डॉ.माधव व्यंकटेश लेले)].
छ.शिवाजी महाराज यांचे चरित्र [क्रुष्णराव अर्जुन केळूसकर].