9 April 2014

आपल्या सर्वांचे शिवराय !!

          आमचं शिवरायांवरचे प्रेम वयाच्या नवव्या वर्षी, चौथीच्या पुस्तकातील अफ़झल खानाच्या चित्रावर पेनाने गिचमिड कालवा करून सुरु झालं. त्याचवेळी चौथीत पहिल्यांदाच कळलं कि वर्गातला नौशाद् शेख आपल्यातला नाही. हे म्हणजे अफाटच होतं, आजपर्यंत आमच्या घोळक्यात तुमच्या-आमच्यासारखाच­ असणारा, मिसळणारा आणि आरेला कारे करणारा नौशाद एकदमच परका झाला होता. आम्ही काही गोष्टी फक्त तो नसतानाच बोलायला लागलो. त्याच्या समोर शिवाजी महाराजा विषयी प्रेम व्यक्त करायला कचरू लागलो. हे त्याने पण लगेच समजून घेतले असावे. कारण त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप बदल झाला होता. जरा मोठे झालो कि कळते कि आपला धर्म आणि जात आपल्या रक्तातच आहे, लहानपणी ते रक्त वेगळे असते का कुणास ठावूक ? पण मोठेपणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या रक्ताचा, रक्तात भिनलेल्या संस्कृतीचा, आपल्या रक्ताशी मिळतेजुळते रक्त असणाऱ्या (जातभाई ) नेत्यालाच आदर्श मानायला चालू करतो. आणि ह्याच वेळी चालू होते दुसर्या जाती - धर्माच्या नेत्यांचा त्या-त्या लोकांच्या समोर अतोनात आदर करणे. मग अश्या तर्हेने परतफेड चालू होते, कुणी आंबेडकरांचे गोडवे गातो, कुणी शिवाजी महाराजांचे, कुणी मौलाना आझाद, टिपू सुलतान किंवा भगवानबाबा. दहावी पर्यंत येस्तोवर कळले कि आपण समाजात असताना सर्वधर्म समभाव असतो आणि सजातीय लोकामध्ये असताना आपली जात आणि धर्म संकटात आलेला असतो. बहुतेक लोक हे अश्या तर्हेचे सोंग घेवून समाजात वावरत असतात आणि वरून मी जातीभेद धर्मभेद मानत नाही असे सांगताना "त्या" लोकानी एवढे माजल्यावणी करायला नाही पाहिजे असे सल्ले पण देत असतो.
हळू हळू दहावी पर्यंत नौशादचा ग्रुप वेगळा झाला व आमचा वेगळा. तरी पण क्रिकेट खेळायला, गणपतीची वर्गणी मागायला तो आमच्यात असायचाच. पण आमच्या लक्ष्यात येवू लागले कि प्रत्येक वेळी याला आपण देशाशी कसे इमानदार आहोत, हिंदू धर्माचे शत्रू नाही आहोत हे सिद्ध करावे लागत आहे किंवा तोच स्वता:हून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सईद अन्वरला आमच्या पेक्ष्या एक शिवी तो जास्तच द्यायचा. डोक्याला नेमाटी वोढून शिवजयंतीची वर्गणी मागताना शिवाजी महाराजा बद्दलचा त्याचा आदर आम्हाला नेहमी जास्तच वाटायचा. चुकून आम्ही कधी "शिवाजी" बोललो तरी तो फक्त "महाराजाच" म्हणायचा. अर्थात त्याच्या आदराविषयी अजिबात शंका नाही पण आमच्या इतर मित्रापेक्षा त्याचे योगदान नेहमीच जास्त असायला पाहिजे असा त्याचाच दंडक होता. असा दंडक त्याने का करून घेतला असेल याचे उत्तर आजच्या अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक ह्या दोन सज्ञे मध्ये आढळेल. त्यांनी इथे राहावे पण आम्ही सांगेन तसेच दुय्यम नागरिकत्व पत्करून राहावे हि आपली सुप्त पण कधी कधी उतू येणारी भावना. एकुणातच हे राज्य आमचे आहे हि भावना जणतेमध्ये निर्माण करणे हे म्हणजे धोरणात्मक रित्या शिवाजी महाराजांच्या विचारणा मूठमाती देण्यासारखे आहे.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे बघताना सर्वसामान्य मराठी माणूस हा अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह, आणि भवानी तलवार ह्या पुढे जाताना दिसत नाही तर अमराठी माणूस हा मराठ्यांचे राज्य, लुटारूंचे राज्य अश्या कुत्सित नजरेनेच बघताना दिसतो. ह्याला मूळता आपली शिक्षण पद्धती आणि राजकारणच कारणीभूत असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे स्वतंत्ररित्या पाहता येवू शकणार नाही. हिंदुस्थानमध्ये दक्षिण उत्तर आणि पशिच्म पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारा, हे राज्य राजाचे नाही तर रयतेचे आहे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा तो एकमेव राजा होवून गेला. शिवाजी महाराजांनी स्वता:साठी फक्त कार्यकर्ते नाहीत तर आपल्या पाठीमागे राज्य सांभाळतील असे नेते तयार करून एक स्वराज्याचा विचार दिला होता म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीत तयार झालेले ह्या छोट्याश्या स्वराज्याने पुढे जावून आपली सीमा उत्तरेकडे अफघानिस्तान पर्यंत तर दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत पोहचवली.
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीनंतर नंतर जवळ जवळ पावणे चारशे वर्षांनी जर आजच्या समाजाकडे आणि राज्यव्यवस्थेकडे पाहिले तर ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो कि आपण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या, समानतेच्या, न्यायाच्या, कायद्याच्या राज्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेला तिलांजली दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागणारे महाराजांचा नेमका कोणता विचार रुजवू पाहत आहेत हेच कळत नाही. आजचा काळ मला शिवपूर्व काळाची आठवण करुण देत आहे. मुघलांनी आणि इतर दक्षिणेतल्या शाह्यांनी जसे सरंजामशाहीला प्रोत्साहन देवून हिन्दुस्थानवरचि आपली पकड मजबूत केली होती तशीच पकड लोकशाही मार्गाने दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी खानदानी सरंजाम निर्माण करून आपले राज्य चिरायू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वतणासाठी झालेल्या लढाया आपण कधी कधी पाहतो पण त्यामुळे वरच्या सल्तनतीला काहीच फरक पडत नाही.
प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजी महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचे माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.
आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगलीसाठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील आणि नौशाद पुढे त्याच्या मित्रांना महाराजा विषयी बोलताना अडखळण्याची गरज पडणार नाही किंवा किंवा नौशादाला त्याची इमानदारी सिद्ध करण्यासाठी सईद अन्वरला एक शिवी मुद्दामहून जास्त द्यावी लागणार नाही.

संदर्भ- http://vikasgodage.blogspot.in.
लेखक - विकास गोडगे सर.

28 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]

तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा.
आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता. त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी  लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते. परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
           इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी). मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’ (तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
              अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
         त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला. तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर. तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली. (सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती. (सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नाही शंका नाही.
मंबाजी उवाच
      नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तुकोबांचे घातपाती निर्वाण झाले. त्यावेळी जिजाईंच्या उदरी असणारे नारायणबुवा हे वीस-एकवीस वर्षाच्या वयात जेंव्हा देहूस आले, त्यावेळचा एक प्रसंग तुकोबांचे पणतू गोपाळबुवा यांनी "नारायणबाबाचे चरित्राख्यान" यात दिलेला आहे.
एके दिवशी नारायण । इंद्रायणीचे करूनी स्नान ।
करावया श्रीमुर्तीचे पुजन । मार्गे आपण जात असता ॥
तव भेटला ब्राह्मण । तुकयाचा द्वेष्टा पुर्ण ।
मंबाजी ज्याचे नामाभिमान । तो दुष्टवचन बोलिला ॥
म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ? नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासि जाऊन मेला । घटस्पोट केला नसता पै ।...
            यावेळी पित्याची उत्तरर्क्रिया न केल्या कारणाने मंबाजीने नारायणाला मुर्तीला स्पर्ष सुद्धा करू दिला नाही. अखेर मंबाजीच्या उर्मटपणामुळे त्याला तिघा भावांनी ठोकून ’दिल्हा ग्रामांतरी लावुनिया ॥’ असे म्हंटलेले आहे. वरील प्रसंग हा गोपाळबुवांना अधिक्रुत परंपरेद्वारे अवगत होणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच "विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांनी (३१६०)" अशा मंबाजीने हा डंख मारणे देखील नैसर्गिक आहे, यात शंकेला जागा नाही. तुकोबासंबंधी मंबाजीने हा केलेला विषारी उपहास पाषाणह्रुदयी मंबाजीच्या स्वभावाची यथातथ्य कल्पना आणून देतो. सदेह वैकुंठगमनाचे ताशे कोणी कितीही बडवले असले तरी आतली खरी बात मंबाजीलाच माहीत असल्यामुळे तो वीस एकवीस वर्षनंतर सुद्धा दुष्टवचन बोलून नारायणाला सुतकी समजून मुर्तीस हातही लावून देत नाही.हे खचितच विचार करण्याजोगे नव्हे का ? 
हत्येला जात जबाबदार ?
           तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे. गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत. ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?. जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे. मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक, केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे. शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला. त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन. श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल". हा माणुस सामाजिक विषमता, वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!. तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७  श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]

22 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग दोन]

संशोधनापुढे ध्येय
        तुकोबारायांची "ब्रह्मरुप काया" ऐन उमेदीत नाहिशी झाल्याने त्यांच्या परीवाराचे,देशाचे आणि धर्माचे देखील अपरिमित नुकसान झाले. हे खरे असले तरी ती काया नाहीशी कशी झाली याचे गुढ आता उकलून काही खास लाभ होण्याचा संभव आहे का ? अजिबात नाही आणि या संशोधनाचा उद्देश तो असूच नये.पण त्यांच्या देहाबरोबर त्यांचे श्रेष्ठ तत्वज्ञानच लोपवून टाकण्याचा जो प्रयत्न ’सदेह वैकुंठगमना’ची कल्पना पसरवणार्यांनी कळत-नकळत केला.तो हाणून पाडणे हेच काय ते प्रयोजन असले पाहिजे. "पावलो पंढरी वैकुंठभवन"(३८९९) म्हणणार्या तुकोबांना कुठल्या दुरस्थ वैकुंठी जायचे होते की हे विश्वच वैकुंठरुप करायचे होते ? हे जरी स्पष्ट झाले तर मानव समाजाला ते हितावह ठरणार हे सांगायलाच नको.तुकोबांना वैकुंठातून भुमीवर आणणे हे लोकाद्धारासाठीच उपयुक्त आहे.नाहीतर कुठले तरी वैकुंठ हेच भाविकांचे ध्येय ठरून, आकाशाकडे पाहत त्यांची भुमीवर अस्ताव्यस्त पावले पडणे व "परलोका"च्या ठेकेदारांना त्याची मनसोक्त लुट करता येणे चालूच राहणार हे लक्षात घेता, हे संशोधन म्हणजे गडे मुर्दे उकरणे नव्हे तर "खरे नानवट निक्षेपीचे जुने । काढले ठेवणे समर्थांचे" (८८३) याची जाणीव ज्ञात्यांना झाल्याखेरीज राहणार नाही.
संतशिरोमणी तुकोबा आणि इतर संत महात्म्य..
आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन व तुकोबारायांचे सदेह वैकुंठगमन असे या महापुरुषांचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो. याबाबत खरा विचार करायला हवा की खरेच का असली बाब हीच त्या महापुरुषांचे सर्वश्रेष्ठत्व दर्शवणारी आहे ? त्यांच्या संतत्वाची गमक काय ? आद्यशंकराचार्यापासून तर समर्थ रामदासांपर्यंत एकालाही- श्री ज्ञानराजाला सुद्धा-सदेह वैकुंठी सुयोग लाभला नाही, म्हणून त्या सर्वांच्याच संतत्वाचा दर्जा तुकोबारायांपेक्षा कमी असे लेखण्याचे मनोधैर्य आपल्यात आहे काय ? समाधीजीवन, पुनर्जीवन किंवा सदेहवैकुंठगमन हेच आपले खरे पुर्णत्व किंवा हेच मानवजीवणाचे परमलक्ष्य होय. असे तरी त्या महात्म्यांनी स्वत: कोठे सांगून ठेवले आहे काय  ? तसे जर नाही तर या गोष्टीला इकडे पराकोटीचे महत्व देण्याला तरी काय अर्थ आहे ? 
वैकुंठगमनालाच खराखुरा अर्थ आहे असे जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर त्याचा पुरेपूर छडा लावणे हे तरी प्रत्येक जाणत्या भक्ताला अत्यावश्यक का वाटू नये ? निव्वळ ’पीछेसे आयी आगे धकाय” अशी मुर्दांड श्रद्धा जपून ठेवण्याला काही किम्मत आहे का ? "वंदिले वंदावे निंदिले निंदावे" अशी "न धरावी चाली करावा विचार" हीच तुकोबांरायांची शिकवण आहे आणि याच शिकवणीनुसार त्यांच्या "सदेह वैकुंठगमना" च्या अथाशक्य सर्व पैलूंवर त्यांच्याच वाणीचा विवेकपुर्ण प्रकाश पाडताना अनेक प्रश्न-शंका उभे ठाकतात, "ज्या महापुरुषाचा इहलोकी अभंगरचना करण्याचा देखील अधिकार तीव्रपणे नाकारण्यात आला, त्या महापुरुषाला एकट्यालाच सदेह वैकुंठगमनाचा सर्वाच्च अधिकार मात्र खुशाल बहाल केला जातो यातील मख्खी काय कळत नाही. शिवाय, ज्या कुटुंबातील प्रमुख देवपुरुष ’सकळा पुसून’ देवासह सदेह वैकुंठी जाण्याचे अभूतपुर्व कार्य करून दाखवितो, त्या कुटुंबाला त्या भाग्यशाली घटानेनंतर महिन्याभरातच सर्वस्व टाकून त्या पावन पित्रुभुमीतून पळून जावे लागते याचा अर्थ काय ? इत्यादी शंकांच्या संदर्भातही अथाशक्य समग्र विचार करणे प्रत्येक तुकोबांच्या सदभक्तांचे कर्तव्य आहे."
तुकोबांच्या हत्येची शक्यता ?
यापुर्वीचे बरेच विचारवंत आणि आजच्या सामाजिक संघटनांच्या मते तुकोबांची हत्या झाली असावी. याचे मुख्य कारण त्यांचे क्रांतिकारक तत्वज्ञान. कर्मकांडांच्या बडिवारापेक्षा भक्तीचे श्रेष्ठत्व ते सांगत होते. वर्णश्रेष्ठत्वापेक्षा सदचाराचा महिमा ते गात होते."वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा" असे गर्जत "भेदाभेद अमंगळ" म्हणून इंद्रायणीच्या वाळवंटात तुकोबांनी समतेचा झेंडा रोवला होता. त्यामुळे प्रतिष्ठितांच्या प्रतिष्ठेवर आघात होत होते. त्यांच्या प्रस्थापित वर्णवर्चस्वाला होणार्या खंद्या विरोधामुळे मंबाजी सारखे अहंकारी भट मत्सराने जळू लागले होते. याचा पहिला प्रत्यय तुकोबांना आला तो त्यांना आपल्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडवायला सांगण्यात आले तेंव्हा.वर्णवर्चस्वाच्या स्वार्थापलीकडे कुठलाही शास्त्रार्थ यामागे नव्हता.
या प्रसंगानंतर कालांतराने तुकोबांना आपल्यावरील प्राणांतिक संकटाची कल्पना आली."लावुनी कोलीत माझा करतील घात" ह्या अशा अनेक उद्गारावरून हे स्पष्ट होईल.त्याप्रमाणेच शेवटी झाले. सालो-मालो, मंबाजी यासारखे दुर्जन भट तुकोबांच्या विरोधात जळफ़ळत होते.त्यांनीच तुकोबांच्या खुनाचा डाव रचला आणि सिद्धिसही नेला. तुकोबांच्या त्या अंत्यकालीन संकटाची जाणीव संत बहिनाबाईंच्या अभंगाद्वारे होते. संत बहिनाबाईंनी पाहिलेला मंबाजी "मारु पाहे घात चिंतुनीया" असे स्पष्ट वर्णन केले आहे.
तुकोबांचा खुन झाला असावा असे आत्तापर्यंत अनेकांनी म्हंटलेले आहे. श्री दयानंद पोतदार यांच्या "संत तुकाराम आणि त्यांच्यावरील आक्षेप" या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी म्हंटले आहे की तेंव्हा तुकोबांचा कोणीतरी गुप्तपणे वध केला असावा आणि खर्या गोष्टीच तपास लावण्याकडे कोणाची मती वळू नये म्हणुन प्रारंबी यात्रेची, नंतर जलसमाधीची व त्यानंतर सदेह वैकुंठगमनाची अशा एकेक कंड्या वातावरणात सोडून दिल्या असाव्यात असा तर्क संभवणीय वाटतो."
दुसरा पुरावा असा की तुकोबांचा नैसर्गिक म्रुत्यू आला असता किंवा ते खरोखरच सदेह वैकुंठाला गेले असते तर त्यांचे बंधू कान्होबा यांना "दु:खे दुभागले ह्रुदयसंपुष्ट" इतका शोक करण्याचे काय कारण होते ? वस्तुस्थिती अशी दिसते की तुकोबांच्या अंतानंतर त्यांचे सगळे कुटुंबच देशोधडीला लागले.पुढे अनेक वर्षापर्यंत तुकोबांचा एकही वंशज देहूला नव्हता.याचे कारण काय असावे ? ह्या सर्व गोष्टी विचारवंतांनी प्रतिपादन केलेल्या प्रमेयाला पुष्टीच देतात.
                                                                                                                                 (क्रमश:)

18 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग एक]

संतश्रेष्ठ तुकोबाराया
           साने गुरुजींनी त्यांच्या स्वप्न आणि सत्य ग्रंथामध्ये प्रुष्ट क्र.११२ वर म्हंटले आहे "ग्यानबातुकाराम हे महाराष्ट्राचे ह्रुदयसम्राट आहेत. त्यांचे साहित्य हे खरे राष्ट्रीय साहित्य आहे,कारण ते सर्व थराथरात गेले." संत तुकोबांच्या गाथेमध्ये अखिल विश्वाच्या कल्याणाचे तत्वज्ञान एकवटलेले आहे. प्रा.न.र.फ़ाटक म्हणतात "तुकोबांच्या वाणीत जे तेज व सत्व आहे त्याची घट्ट ओळख असणार्यांनी ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांची ओळख करून नाही घेतली तरी चालेल. तुकोबांच्या लिखानात या सर्वांच्या शिकवणुकीचे रहस्य सापडेल; अशा योग्य उद्देशाने भागवतधर्ममंदिराचा कळस म्हणण्याची प्रथा पडली." अशा या परमोज्ज्वल कळसा बाबत जनाजनाच्या मनामनात प्रगाढ श्रद्धा आहे.पण त्यातही वारकर्यांच्या आवडीचे स्वरूप काही निराळे आहे.
जीव जीती जीवनासंगे । मत्स्या मरण त्या वियोगे ॥
सकळा पढीये भानु । परि त्या कमळाचे जीवनु ॥
या प्रमाणे इतरांच्या द्रुष्टीने महान असणारे तुकोबाराय वारकर्यांचे तर जीवनच आहेत.
            संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या निर्वाणासंबंधी आजपर्यंत अनेकांनी चर्चा केली आहे."महाराष्ट्र सारस्वत"कार भावे यांच्या पासून ते आत्तापर्यंतचे साहित्यिक यात आहेत. श्री वा.सी.बेंद्रे यांसारखे संशोधकही यामध्ये आहेत. यांच्या मालिकेत आजच्या सामाजिक संघटनांचा देखील समावेश करावा लागेल. संत तुकारामांचा खुनच केला असावा असे स्पष्टपणे प्रतिपादन करणारेही बरेच होऊन गेले. इतकेच काय पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही "मेला की मारला कळेना । म्हणती वैकुंठाला गेला ।" या आपल्या उद्गारात याच प्रमेयाकडे संकेत केला आहे.
निर्वाण अभंग आणि अभंगपत्रे
           संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वानाचा प्रश्न त्यांच्याच अभंगाच्या द्वारे सर्वांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.मग त्यात मत-मतांतरे का निर्माण व्हावीत ? यातील एक महत्वाची गोष्ट अशी की, संतांच्या आज ज्या गाथा आढळतात त्यात त्यांनी हे लिहिलेले अभंग कालानुक्रमाने दिलेले असतात असे मुळीच नाही. संत तुकारामांच्या अभंगातही असेच झालेले आहे. आपल्या आयुष्यात अभंगरचना करताना कदाचित स्वत: तुकाराम महाराजांनी किंवा त्यांच्या लेखनिकांनी  ते क्रमश: लिहुन ठेवलेलेही असतील. पण आज कालानुक्रमाने लिहिलेल्या अशा अभंगाचा अस्सल गाथा उपलब्ध नाही. आहे त्या अभंगाची विषयावार विभागणी करून ते छापलेले आहेत. उपलब्ध गाथ्यात सर्वत्र ही विषयविभागणी आणि त्यात अंतर्भूत केलेल्या अभंगाची संख्या ही सारखी आढळते अशी नाही. अशा विषयविभागणीच्या प्रयत्नातूनच तुकाराम महाराजांच्या अंत्यकाळा विषयीच्या अभंगाचे प्रकरण निर्माण झाले आहे.
             निरनिराळ्या गाथ्यात आढळणार्या अशा निर्वाण प्रकरणातील अभंगाची तर्ककठोर बुद्धीने छाननी केली तर समजुन येईल की हे निर्वाणाचे अभंग केवळ संकलनात्मक आहेत. प्रत्येक संपादकाने वेगवेगळ्या अभंगसंचातून आपल्याला सोईचे वाटतील असे किंवा ओढून ताणून उपयोगी आणता येतील असे असंबद्ध विषयींचे अभंग आपापल्या संपादणीतील निर्वाण प्रकरणात संकलीत केले आहेत. इतकेच नाही तर तुकोबांच्या निर्वाणासंबंधी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ काही प्रक्षिप्त अभंगही त्यात घातले गेले आहेत. या संकलनाबाबत एक दोन उदाहरणे पुरेशी आहेत.
१] "क्र.१५९६ या अभंगात गरुडावर बसून चतुर्भुज हरी वैकुंठाहुन तुकोबांच्या घरी येतात. क्र.१६०६ मध्ये श्रीरंगाशेजारी गरुडावर बसण्याऐवजी तुकोबा एकदम कुडीसहीत गुप्त होतात...गुप्त झाल्यानंतरही अभंग सुरुच असतात. क्र.१६०७ मध्ये तर आत्तापर्यंतच गरूड विमानात परिवर्तीत होतो आणी तुका बैसला विमानी हे द्रुष्य़ संत लोचनी पाहू शकतात. याच अभंगाच्या शेवटी तुका वैकुंठासी नेला तरी देखील १६०८ हा अभंग जन्मास येतोच.त्यात तर तुकोबा ’क्षीरसागर शयनी’ पोहचून सिंहासनी बसले आहेत.तो अभंग इहलोकी कसा म्हंटला गेला ? आणि क्षीरसागरी पोहचल्यानंतर वाराणसीपर्यंत असो सुखरूप (क्र.१६०९) असा काशीला पोहचल्याचा निरोप कसा काय आला ? या शेवटच्या अभंगात आपण येथून निजधामास जाणार असे तुकोबा म्हणतात. येथे तुकोबांबरोबर देव नाही पण गरूड मात्र आहे ! अशी ही सारी विसंगतीची चमत्क्रुती !"
२] "चार कोसांवर विमान थांबवून जर हे अभंग लिहिले तर ’सकळही माझी बोळवण करा’ हे म्हणजे भुमीवरचे की आकाशातले ? ’उठा एक ऐका सांगतो तुम्हासी’..अशी सहा ओळीत तीनदा सांगण्याची पुनुराव्रुत्ती व्हावी,हे तुकोबांना सर्वथा अमान्य असणार्या रचनाशैथिल्याची कल्पना आणुन देण्यास पुरेसे नाही का ? स्वपत्नीसाठी येतो काकुलती मनी धरा म्हणून ’पदर पसरून दाढी ओठी’ धरून केविलवाणीने लोकांची मनधरणी करावी. देवासह वैकुंठी जाण्याचे अपुर्व भाग्य लाभले असताही ’अहो देवा ! कैसी घरबुडवण केली’ म्हणून आकांत करावा आणि ’देवांचे ते मुळ शोधू नये कोणी’ असा भलताच उपदेश करावा  हे सारे तुकोबांच्या व्यक्तित्वाशी सुसंगत असेच आहे का ?  ’म्हणे मज आता निरोप द्यावा- ऐसे बोलो निया गुप्त झाले’ ही सारी रचना तुकोबांचीच आहे असे म्हणता येईल का ?..."
श्री तुकोबा महाराज विमानात बसुन सदेह वैकुंठाला गेले असे मानणार्या प्राचीनांनीच त्यांची ’विमानातून लिहिलेई अभंगरुप पत्रे’ निर्माण केली आहेत. असे का म्हणू नये ? ’चौकोशावरी थांबवली विमाने । पत्र हे तेथून तुम्हा लिहिले’ व ’स्वर्गलोकीहुनि आले हे अभंग’ या वचनांमधील ’तेथून’ व ’आले’ हे शब्द स्पष्टच सुचवितात की ते शब्द प्रुथ्वीवरील व्यक्तीच उच्चारू शकते. शिवाय ’चौकशा’वर ’स्वर्गलोक’ असू शकत नाही. ’सप्त अभंगी पत्र’ व ’बारा अभंगी पत्र’ या दोन्ही बरोबर ’टाळगोधडी’ चा उल्लेख आहेच. तेंव्हा, तुकोबांबरोबर ’टाळगोधड्या तरी किती कल्पाव्या ? "तुकोबांचे निर्वाण झाले द्वितीयेस तर टाळगोधडी मिळाली पंचमीस ! हे साहित्य नेमके देहुलाच पडले" हे वास्तवतेच्या पलिकडचे नव्हे काय ? अशा भाकडकथा सांगणारे अभंग प्रक्षिप्त नव्हे तर काय म्हणावे ?.  
शुद्ध संशोधनासाठी
देवधर्म आणि अंधश्रद्धा यांमध्ये बुडालेले कोणी भक्त म्हणतील की लोकमाणसात वैकुंठगमनाची दिव्य कल्पना शेकडो वर्ष द्रुढमुल झाली असता आता हे नव्याने मांडून कोणते कल्याण होणार आहे ? "जाले तेंव्हा जाले मागील ते मागे । आता वर्म लागे ठावी झाली ॥" हे सत्य असले तरी गडे मुर्दे उकरून लाभ काय ? हा प्रश्न बराच महत्वाचा आहे..खरे तर कोणत्याही बाबतीतले सत्यदर्शन हे निरपेक्षपणे स्वत:च अत्यंत मुल्यवान असते हे खरे. असत्यावर आधारलेली कल्पना दिव्य असली तरी ती कांचनम्रुगाप्रमाणे फ़सवी असते.  ’जगरुढीसाठी घातले दुका असे ’पोटदंभाचे पसार’ मांडणारे धर्माचे घाऊक व्यापारी ’चालीचाचि वाहो’ कायम ठेऊन आपल्या ग्राहकांच्या भ्रांत भावनांची खुशाल जपणूक करोत, पण संत मात्र तो मुलामा उडवून लावणेच हितावह समजतात. कारण भ्रामक कल्पनांनी कोणाचा कधीच उद्धार होत नसतो. उलट असत्याभिमान व डोळे बांधलेली श्रद्धा यांच्या पोटी शेकडॊ पापेच जन्मास येतात.
"तुका म्हणे लोपे । सत्याचिया घडती पापे " हे कसे विसरता येईल ? म्हणूनच तुकोबाराया निक्षून सांगतात-
"अहो श्रोतेवक्ते । सकळही जन ! बरे पारखून बांधा गाठी ॥
तुके तरी तुकी खर्याचे उत्तम । मुलामांचा भ्रम कोठवरी ?"
           भक्तांच्या भावना दुखावतील एवढ्यासाठी सत्य दडपून टाकायचे हा धर्म आहे का ? "लटिके ते रुचे । सत्य कोणाही ना पचे ॥" म्हणून असत्यच घोपटायचे की काय ? "धर्म आहे वर्माअंगी" याची वारंवार जाणीव करून देणार्या तुकोबांनी स्वष्ट केले आहे की कोणाच्या भिडेसाठी अथवा भावनेसाठी सत्य डावलता कामा नये.’नये भिडा सांगो आन’ व ’काकुळतीसाठी सत्याचा विसर । पडले अंतर न पाहिजे॥. ’त्यामुळे इथे कोरड्या कल्पना जुगारून यथार्तवादच स्विकारायला हवा.
                                     (क्रमश:)

10 March 2014

अमर जाहले शंभुराजे !

शिवशाहीर जगदीशचंद्र पाटील
बुलढाणा
|| जय शिवराय | जय शंभुराजे | जयोस्तु मराठा | जयोस्तु महाराष्ट्र ||
              मराठा स्वराज्याचे दुसरे छत्रपती शंभुराजे म्हणजे जगातील इतिहासकारांचं न सुटलेलं कोडंच आहे. शंभुराजे या महानायकाने हिंदुस्तानातील हजारो साहित्यिकांना, कादंबरीकारांना, कथाकारांना, नाटककारांना, चित्रपट निर्मात्यांना वेगवेगळ्या प्रकारे खाद्य पुरविले. बुद्धीच्या अनेक ठेकेदारांनी आपापल्या पद्धतीने शंभुराजांचे चरित्र लोकांसमोर मांडले.ते सुद्धा बर्याच प्रमाणात विक्रुत चरित्र. शंभुराजांच्या विषयी उणीउरी दोनशे वर्षे गैरसमजांचे जे पिक आले, त्याला कारणीभूत होती ती मल्हार रामराव चिटणीसची बखर; परंतू कै.वा.सी.बेंद्रे यांनी चाळीस वर्षे कष्ट घेऊन शंभुचरित्राचा खरा इतिहास उभा केला आणि जाज्वल्य इतिहासातून अनेक लेखकांना दिव्य द्रुष्टी दिली. त्यामध्ये शिवाजी सावंत, डॉ.जयसिंगराव पवार, विश्वास पाटील, डॉ.कमल गोखले, विजय देशमुख यांसारख्या विद्वानांनी खरे आणि भव्य दिव्य असे  शंभुराजांचे चरित्र जनमानसांसमोर आणले. शंभुराजांनी वयाच्या नवव्या वर्षापासून राजकारणाचे धडे घेतले. हिंदी व संस्क्रुतमध्ये कमी वयात चार ग्रंथ लिहिणारे शंभुराजे एकमेव साहित्यिक होते. मोअज्जमच्या छावणीत शिवरायांनी त्यांना दोन वर्ष पाठविले होते. वयाच्या चौदाव्या वर्षी ते राजकारभारात लक्ष घालू लागले आणि वयाच्या सतराव्या वर्षी रायगडावर युवराज म्हणून घोषित झाले.एकोणीसाव्या वर्षी पन्हाळा, श्रुंगारपूर आणि प्रभावलीचे सरसुभेदार म्हणून नेमले गेले.
        छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार ते दिलेरखानाच्या गोटात गेले आणि स्वराज्यावर होणारे मोघली आक्रमण काही काळ थोपवून धरले. या वेळेस छत्रपती शिवराय दक्षिण मोहिमेवर गेलेले होते. शंभुराजे जालन्याकडील लढाईवर गेले असता, थोरले महाराज निधन पावले. महाराजांच्या निधनाचे व्रुत्त आणि राजाराम महाराजांना गादीवर बसविण्याचे कारस्थान त्यांना पन्हाळ्यावर कळले. त्यानंतर त्यांनी पन्हाळ्यावरूनच कारभार पाहिला. या ठिकाणी शेकडो मराठे त्यांना येऊन मिळाले. रायगडावरील कट करणार्यां प्रधानमंत्र्यांनी शंभुराजांना अटक करण्याचा प्रयत्न केला; परंतू तो त्यांनी हाणून पाडला व स्वत: रायगडावर दाखल झाले. शिवरायांच्या काही मंत्र्यांनी विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार समजताच सर्वांना त्यांनी देहान्त शासन केले. या शिक्षेमध्ये बाळाजी आवजी चिटणीसचा समावेश होता. बाळाजी हा मल्हार रामराव चिटणीसचा खापरपणजोबा होता. आपल्या खापर पणजोबाला शंभूराजांनी हत्तीच्या पायाखाली दिले होते. म्हणून त्यांचा सूड घेण्यासाठी तब्बल १२२ वर्षांनी मल्हार रामरावाने शंभूराजांच्या चरित्राची बखर लिहून त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान केले. पण असल्या गोष्टी इतिहासाला मानवत नसतात. शंभुराजे हे साधुसंतांचा आदर करणारे होते. छत्रपती शिवरायांच्या अलौकिक व्यक्तिमत्वातून हे शंभुतेज प्रकटले होते. आपल्या अचाट पराक्रमाने शंभुराजांनी मराठा स्वराज्याच्या सीमारेषा वर्धिष्णू करीत या तेजाची दाहकता सिद्ध केली होती. शिवरायांच्या निधनानंतर अवघं मराठा स्वराज्य नेस्तनाबूत करण्याच्या प्रचंड महत्वकांक्षेने सात लाखांच्या अफ़ाट फ़ौजेसह दक्षिणेत उतरलेल्या औरंगजेबाला नामोहरण करून सोडणं ही काही समान्य बाब नव्हती. या बलाढ्य मोगली सल्तनतीशिवाय जंजिरेकर सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रजांसारखे शत्रूदेखील स्वराज्याचे लचके तोडायला एकवटून उभे झालेले होते. हे कमी पडावेत म्हणुन की काय आमच्यातलेही हिंदू विरोधकही तलवार उपसून सज्ज उभे होतेच. या सर्व आघाड्यांवर मराठा स्वराज्याच्या संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी सांडलेली संभाजी राजांची एकाकी झुंज, ही निर्विवादपणे त्यांच्या महानतेची आणि पराक्रमाची यथार्थ सक्ष देऊन जाते.उण्यापुर्या नऊ वर्षाच्या अखंड संघार्षात सुमारे सव्वाशे लढाया जिंकणारे आणि एकही तह न करणारे संभाजीराजे अलौकिक आणि असामान्य होते. अशा कडव्या धेयवादासाठी आणि अस्मितेसाठी काळीज आणि मनगट संभाजीराजांचेच हवे.येर्यागबाळ्याचे ते काम नव्हे.
           वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षीच संभाजीराजांनी स्वराज्यकार्यी हौतात्म्य पत्करले. अटकेत असताना संभाजीराजांच्या दीर्घाकाळ यमयातना सुरु होत्या.तोज एक एक अवयव तोडल्या जाऊन त्यांच्या संपुर्ण अंगाची साल सोलून काढण्याच आली.डोळे काढून जीभ कापल्या गेली. पायापासून ते मस्तकापर्यंत अवघ्या देहाची खांडॊळी करून संभाजीराजांचे मस्तक भाल्याच्या टोकावर रोवण्यात आले. देह खंडित झाला तरीही शंभुराजांचा स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठा अभेदच राहिली. कारण शिवशाहीची हीच उदात्त शिकवण होती. छत्रपती शिवरायांच्या आदर्श पावलांवर पाऊल टाकीत या सिंहपुत्राने बलिदानाची, त्यागाची एक नवी परंपरा राष्ट्राला समर्पित केली. जिला देशातच काय पण जगाच्या इतिहासात तोड नाही. 
रणधुरंदर महापराक्रमी शंभुराजांना मानाच मुजरा... जय शंभुराजे

9 March 2014

शाहूछत्रपती आणि तथाकथित अनुयायी

सातशे संस्थानी अशी शक्ती । एक कोल्हापूरी शाहूमुर्ती ।
अलौकीक विलायतेत किर्ती ॥
जो निद्रिस्त महाराष्ट्राला । जागे करण्याला ज्ञानरवी झाला ।
शाहू छत्रपती सत्य आधार । मानवी जाणविले अधिकार ।
म्हणुन शाहू प्रभू शिव अवतार ॥
राजर्षी शाहू महाराजांनी सत्ता आणि संपत्ती ही एक सामाजिक द्रुष्ट्या नैतिक जबाबदारी आणि ठेव समजून आपले आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या स्वभावातील मानवतेचे दर्शन त्यांच्या जीवनकार्यातून प्रेतीत होते. एकवेळ राज्य गेले तरी चालेल पण बहुजन उद्धाराचे कार्य मी कदापि सोडणार नाही. असे म्हणणार्या शाहू छत्रपतींची जयंती एखाद्या सण-उत्सवासारखी साजरी केली पाहिजे असा आर्त संदेश देऊन युगप्रवर्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी शाहू महाराजांचं स्थान स्पष्ट केलं. परंतू आज बहुजन समाजामध्ये आणि बहुजन चळवळ-संघटनेत सुद्धा मनुवादी निर्माण होत आहेत. याच तथाकथित बहुजनवादी संघटनांनी तर शाहू महाराजांचे नावच घेणं सोडून दिले आहे. काही तथाकथित पुरोगामी मंडळी तर फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळीला फ़क्त फ़ुले-आंबेडकर चळवळ संबोधून छत्रपती शाहू महाराजांना संपविण्याचा विडा उचलत आहेत. यांचे शाहूकार्य संपले आहे आता यांना शाहू महाराजांची गरज नाही असे यांचा समज आहे. याच बहुजनवादी संघटनांना छत्रपती शाहू राजांच्या बहुजनवादी कार्याचा विसर पडलेला आहे. गादी सोडेन पण बहुजन उद्धारांचे कार्य सोडणार नाही असे म्हणनार्या शाहू छत्रपतींचा समाजाला पडलेला विसर, त्यांचे कार्य घरोघरी न पोहचण्याचे कारण व त्यांचे बहुजनवादी कार्य याचा विचार करणं गरजेचं आहे.
आरक्षणाचे जनक
२६ जुलै १९०२ रोजी युरोप दौर्यावर असताना कोल्हापूरात छत्रपती शाहू महाराजांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा म्हणजे बहुजन समाजासाठी आजवर कोणीही न केलेले उपकार होय. तो असा की सरकारी जागांमध्ये रिकाम्या झालेल्या जागांपैकी शेकडा ५० जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या कार्यालयामध्ये मागासलेल्या वर्गाचे प्रमाण शेकडा ५० पेक्षाही कमी असेल तर पुढची नेमणूक ह्या वर्गातील व्यक्तीची करावी. असा जाहीरणामा मागासलेल्यांना सन्मानाने प्रशासनात आणून त्यांच्या गुणांना योग्य वाव देणारा आहे, असे कोणाला का वाटत नाही ? जर छत्रपती शाहू राजे मागासवर्गीयांना हल्ली कळले असते तर त्यांनी किमान शाहूंच्या विचारांचे अनुकरण तरी केले असते. पण हाच तो बहुजन समाज ज्यांच्यासाठी छत्रपती शाहू महाराज राज्य सोडायला तयार होते तोच समाज आपमतलबी बनताना पाहून कीव करावीसी वाटते. विचारांचे अनुकरण करायचे लांबच पण यांना राजे शाहूंचे नाव घ्यायची पण अडचण वाटू लागलीये ! 
          बहुजनांसाठी मुलांसाठी उभारलेली वसतीग्रुहे १८ एप्रिल १९०१ मध्ये शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील शेकडो वर्षापासून अज्ञानात पिचत पडलेल्या बहुजन मुलांसाठी छत्रपती शाहूंनी वसतीग्रुहाची स्थापना "व्हिक्टोरिया मराठा बोर्डींग" च्या नावे कोल्हापूरात प्रथम केली. वसतीग्रुहाला मराठा नाव असलं किंवा संस्थानही मराठ्यांचं समजलं जात असलं तरी फ़क्त मराठाच असा त्याचा अर्थ नाही. छत्रपती शाहूंच्या वसतीग्रुहात मुस्लिम, शिंपी, कोळी, माळी, गवळी असा बहुजन विद्यार्थ्यांचा भरणा होता. सोबतच १९०१ मध्ये जैन, लिंगायत, मुस्लिम, अस्प्रुश्य, सोनार, शिंपी, पांचाळ, गौड, सारस्वत, इंडियन ख्रिश्चन, वैश्य, ढोर, चांभार,सुतार, नाभिज, सोमवंशीय, आर्य, क्षत्रिय, कोष्टी अशी विविध जातीधर्माची वसतीग्रुहे छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन करून देखील बहुजनांच्या जातीतील किती टक्के बहुजन छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतात याचे चिंतन होणे गरजेचे आहे.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
        शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सार्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे, त्यांच्या हातचे पाणी पीत असत. शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले. ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले. महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे. म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते. राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले, त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे, कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा, त्यांच्या वेदना जाणणारा, त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
छत्रपती शाहू आणि मुस्लिम समाज
         शाहू महाराज यांचे मुस्लिम प्रेम कदाचित मुस्लिम समाजात येवू दिले नाही वा मुस्लिम समाजासही समजले नाही. निदान मुस्लिम समाजाने यावर लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे. छत्रपती शिवरायांचा सर्वधर्मसमभाव हा छत्रपती शाहू महाराजांनी जोपासला.जगाच्या इतिहासात मुस्लिम समाजासाठीही प्रेम करणार्या लोकराजाने १९०६ मध्ये स्वत:च्या पुढाकाराने प्रमुख मुस्लिम मंडळांची सभा बोलावून मोहोमेडन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना करून मुस्लिम बोर्डींग सुरु केले. संस्थानातील दर्गे, मशिदी इ.धार्मिक स्थळांच्या खर्चातून उरलेला पैसा मुस्लिम समाजासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च केला. या सोसायटीचे छत्रपती शाहू महाराज खुद्द पदसिद्ध अध्यक्ष होते. इतिहासात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणारे छत्रपती शाहू महाराज कदाचित पहिलेच असू शकतील. मुस्लिमांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शाहू महाराजांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र मुस्लिम समाजाने या संधीचा फ़ायदा घेतला नाही. शिक्षण क्षेत्रात मुस्लिम समाज थंड राहिल्यावरही छत्रपती शाहू राजे मात्र थंड न बसता या समाजातील शिक्षणाची आवड असणार्या विद्यार्थ्यांना आपल्या व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग मध्ये प्रवेश देऊन मुस्लिम शिक्षणास चालना दिली.
         मुस्लिम बोर्डिंग साठी चौफ़ाळाच्या माळावर पंचवीस हजार चौरस फ़ुटाची मोकळी जागा व इमारत बांधणीस ५५०० रु.ची भरगोस देणगी दिली व संस्थानच्या जंगलातून मोफ़त सागवान लाकूड दिले. मुस्लिम समाजातील मुलांनी शिकावे यासाठी भरभरून दान छत्रपती शाहू महाराजांनी दिले. मुस्लिम समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा सन्मान करणे प्रत्येक मुस्लिमांचे कर्तव्य नव्हे काय ? उर्दू शाळांमधून छत्रपती शाहू महाराजांचे कार्य जिवंत ठेवण्यास मुस्लिम समाजाने छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून हे कार्य जोमाने पुढे नेणे आता आवश्यक बनले आहे.
छत्रपती शाहूं विषयी खोटे प्रेम
           छत्रपती शाहूंचा गौरव करताना यशवंतराव मोहिते म्हणतात की "राजर्षी शाहू महाराजांना जातिभेदाच्या चौकटीत सर्व जातींना सहिष्णुतेने सामावून घ्यावयाचे नव्हते, तर ती जातिभेदाची चौकटच मोडावयाची होती. म्हणुन शाहू महाराज महाराष्ट्राचे गौतम बुद्ध होत."
         हल्ली आमच्या महापुरुषांचा वापर फ़क्त सत्तेसाठी आणि राजकीय समारंभापुरताच केला जातो. जसा हिंदुत्ववाद्यांनी शिवरायांच्या नावाचं भांडवल केलं. हिंदुत्ववाद्यांची दुकानदारी शिवाजी या एका नावाच्या पलीकडे जात नाही. संपुर्ण भारतात कोणतेही आंदोलन करताना श्री रामा चे नाव घेतात पण महाराष्ट्रात शिवरायांच्या नावाशिवाय काहीही चालत नाही हे या मंडळींना चांगलंच ठाऊक आहे. हे शाहूंच्या बाबतीत आहे. पण छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फ़क्त खोटा आदर करणारे फ़ुले-आंबेडकरांचा तरी वारसा काय चालवणार ? डॉ. बाबासाहेबांच्या जीवनातील एक सच्चा मित्र म्हणजे राजर्षी शाहू महाराज. म्हणून तर बाबासाहेब म्हणतात "छत्रपती शाहू महाराजांसारखा सखा आम्हाला पुर्वी लाभला नव्हता व पुढे लाभेल की नाही याबद्दल मला शंका आहे."
           मुकनायक व्रुत्तपत्रामागे अर्थसहाय्य उभे करणे, माणगांव परिषदेत बाबासाहेबांना भारताचे पुढारी म्हणून गौरव करणे, सोनतळी कॅंम्पवर   बाबासाहेबांच्या  जेवणाचे  निमंत्रण  स्विकारून  कोल्हापूरी जरीपटक्याचा  भावपुर्ण  आहेर करणे, २६ जून १९२० ला बाबासाहेबांनी "मुकनायक" चा विशेषांक  काढून छत्रपती शाहू महाराजांबद्दल क्रुतज्ञता व्यक्त करणे ह्या सगळ्या ठळक घटनेवरून आपण लक्षात घ्यावे की महात्मा फ़ुलें मुळे शाहू महाराज तर शाहू महाराजांमुळेच डॉ.बाबासाहेब!या त्रिमुर्तींचा वसा आणि वारसा एकच होता.
          सामाजिक चळवळीत कार्य करणार्या बहुजनवाद्यांनी ही गोष्ट कायमस्वरुपी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी तसेच टिळक कंपुतील मंडळी शाहू द्वेष्टी आहेत. यांना शाहू राजांच्या कार्याचे किंवा जयंतीचे काही देणे घेणे नाही. छत्रपती शाहूंना सुद्धा टिळक कंपुच्या प्रवाहाशी सोयरसुतक नव्हते. शाहू महाराज लढले ते ब्राह्मणेत्तर समाजाच्या उत्कर्षासाठी, बहुजन समाजासाठी! निदान बहुजनवाद्यांनी तरी शाहूंशी बेइमानी करू नये, अन्यथा याचे पातक भोगावे लागेल."शाहू महाराजांचा जन्मदिवस बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा असे ठासून सांगणार्या बाबासाहेबांचा तरी आदर करावा". राजर्षी शाहू महाराज हे फ़ुले आणि आंबेडकर यांना जोडणारा दुवा आहे शाहू महाराजांशिवाय फ़ुले-शाहू-आंबेडकर चळवळ पुर्णत्वास येणार नाही हे तरी लक्षात घ्यावे.