17 April 2014

"अब्राह्मणी" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील

दिनेश पाटील
संपर्क : ९६२३८५८१०४
        स्वातंत्र्य समता आणि मित्रता ही त्रयी फ़्रेंच समाजक्रांतीने प्रथम प्रवर्तित केली नसून नितींच्या वैराजाने केलेली आहे. तिची समतावादी परंपरा "अब्राह्मणी" परंपरा म्हणून वैदिक काळापासून ओळखली जाऊ लागली. असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून भारतीय इतिहासातील "अब्राह्मणी" इतिहास आणि ज्ञानपरंपरेची सशक्त पुराव्यानिशी पुनर्मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. म्हणूनच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला "इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुरस्कार" त्यांना जाहीर झाला, ही महत्वाची घटना आहे. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखणाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखणात विकसीत केला. त्यामुळेच इतिहासाची नव्याने मांडणी करणार्या संशोधकास हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला ॲकॅडेमिक मान्यता मिळत आहे.
            गेली ४० वर्ष एक "जीवनदायी कार्यकर्ता" म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणार्या शरद पाटील यांना अवहेलना, द्वेष आणि मनहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक "जैविक विचारवंत" ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.
इतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी मांडलेली भुमिका, लावलेला इतिहासाचा अन्वयार्थ याबाबत नेहमीच अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. भविष्यातही ते निर्माण होतील. परंतू इतिहासाच्या अभ्यासाची त्यांची अन्वेषण पद्धत, त्यांचे सिद्धांत समग्र समाजाचा इतिहास समजून घॆऊ इच्छिणार्यांना सतत प्रेरक शक्ती देणारे आहेत. भुतकाळाच्या घनदाट अरण्यात दडलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे नवी द्रुष्टी आणि आत्मविश्वास देतात.
          राम आणि क्रुष्ण यांची भारताच्या इतिहासातील भुमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्याचे ऐतिहासिक महत्व असे अनेक मुलभुत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इ.स.१९८२ मध्ये रणजित गुहा यांच्या नेत्रुत्वाखाली "वंचितांचे" भारताच्या इतिहासातील योगदान मांडणारा "सबर्ल्टन प्रकल्प" सुरु झाला. त्याअगोदर शरद पाटील यांनी वंचित / हीन मानल्या गेलेल्या जात समुह तसेच स्त्रियांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करनार्या अब्राह्मणी परंपरेची सैद्धांतिक मांडणी सुरु केली होती हे महत्वाचे.
         इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फ़ुले आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुदा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. तर फ़ुले आणि आंबेडकर हे दार्शनिक होते हे त्यांनीच सिद्ध केले. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षाचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. "दासशुद्रांची गुलामगिरी", जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती व प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मात्रुसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी या चार ग्रंथामधून त्यांनी हा महाप्रकल्प साकार केला.
           शिवराय-संभाजींची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतू या चिकित्सेतून शिवराय-संभाजींच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. शरद पाटील यांनी त्यांच्या "शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रु कोण-महंमदी की ब्राह्मणी ?" या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषन पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले. या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असनार्या शिवरायांच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या अनेक शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. हे पुस्तक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाला असणारे अद्वितीय योगदान आहे. याबरोबरच "अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र" या ग्रंथाने संस्क्रुतीतील  सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्क्रुतीच्या संदर्भात अधोरेखित केले.
         मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत दलित अदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला.संस्क्रुत, प्राच्यविद्या  आणि तत्वज्ञान या तिन्ही शाखांचा आणि सर्वाहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशॊधकाची द्रुष्टी आधिक व्यापक, मुलगामी झाली आहे. त्यांची ही द्रुष्टी निखळ भुमिकेतून स्वीकारल्यास इतिहासाच्या आकलनाच्या प्रस्थापित मर्यादा आणि सांस्क्रुतीक राजकारणाचे दबाव झुगारून संशोधन करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि मनोधैर्य अभ्यासकांना मिळेल. ज्याची उद्याच्या काळात अनिवार्य गरज आहे.
         शरद पाटील यांच्या संशोधनाची तुलना "अल्जेरीअन मनोविश्लेषक" आणि "काळ्यांच्या" आत्मसन्मानाच्या लढ्यातील जीवनदायी कार्यकर्ता फ़्रांन्झ फ़ॅननशी करता येईल. त्यांच्या "वसाहतवादाचे मानसशास्त्र" मांडनार्या "द रेचेड ऑफ़ द अर्थ" या १९६३ मधील महान साहित्य क्रुतीने तुलनात्मक वाचन केल्यास शरद पाटील यांच्या योगदानाचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी वर्गजातीस्त्रीदास्यातांच्या लढ्यांना अग्रकमाने समजावून घेत माफ़ुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकुणच भारतीय इतिहास याकडे पारंपारिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी द्रुष्टीने पाहिले. याचे कारण असे की फ़क्त मार्क्सवाद, फ़ुलेवाद किंवा आंबेडकरावाद हे द्रुष्टीकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे  समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फ़ुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही "मार्क्सवाद - फ़ुले - आंबेडकरवाद" ही अब्राह्मणी अन्वेषणपद्धती आधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता शरद पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषणपद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात.हा कोटीक्रम जातीवाचक नसून ज्ञानपरंपरावाचक आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा : 
            कॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग १ व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग , जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १ तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग २  जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड  तर खंड ४  मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा? नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.

17 प्रतिक्रिया :

  1. विजय बेंद्रेThursday, 17 April, 2014

    तर्कशुद्ध युक्तिवादशास्त्र ( Diloctical Logic ) गौतम बुध्दांनंतर प्रथमच मांडणारे जागतिक दर्जाचे विचारवंत - कॉम्रेड शरद पाटील

    ReplyDelete
  2. पांडुरंग कांबळेThursday, 17 April, 2014

    जागतिक इतिहास संशोधक काँ. शरद पाटील यांच्या विचारांना & कार्याला विनम्र अभिवादन.

    ReplyDelete
  3. शेखर काळेThursday, 17 April, 2014

    प्रस्थापित ब्राह्मणांनी लिहीलेल्या इतिहासाला धक्के देत सत्य इतिहासाची नव्याने मांडणी करण्याचे क्रांतिकारक कार्य करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक

    ReplyDelete
  4. टिनपाट बामण मेल्यावर भाडखाऊ मिडिया देश्यावर शोककळा पसरली पाहिजे आश्या पद्धतीने बातम्या दाखवतात. त्याचं सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यासाठी नेत्यांवर प्रशासनावर "मिडिया दहशतवाद" दाखवून दबाव टाकतात हाच न्याय संपूर्ण जगाने मान्य केलेल्या बहुजन समाजातील लोकांना का लावला जात नाही ??? ना त्यांना भरभरून प्रसिद्धी दिली जाते ना त्यांचा सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केला जातो न त्यांना कुठला मोठा पुरस्कार दिला जातो !!
    विचार करा ??? आसं का ???
    जागतिक इतिहास संशोधक ' काँ. शरद पाटील ' यांचे दुःखद निधन.
    त्यांच्या विचारांना & कार्याला विनम्र अभिवादन.
    महान प्राच्यविद्या पडित, मार्क्सवाद-फुले-आंबेडकर वादाचे प्रणेते, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉमरेड शरद पाटिल'. Dilactical Logic ' ही संकल्पना बुद्धांनंतर पहिल्यांदाच मांडणारे डॉ. शरद पाटील यांचा गौरव रशिया व चीन ने केला.
    धुळे शहराने अखिल मानवजातीला दिलेला एक अनमोल हिरा ..!!
    भावपूर्ण आदरांजली !!
    - संभाजी ब्रिगेड

    ReplyDelete
    Replies
    1. नकुल भाटSaturday, 19 April, 2014

      वास्तविक याची गरज नव्हती.विनम्र अभिवादन द्यायचे तर तुमचं नको तिथे जातीयवाद.
      कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...आणि श्रद्धांजली..

      Delete
  5. महाराष्ट्राच्या अनमोल इतिहास संशोधकांपैकी एक कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...!

    ReplyDelete
  6. कॉम्रेड शरद पाटील यांनी महाराष्ट्र आणि भारताच्या विचारविश्‍वाला कलाटणी देणारी अतुलनीय अशी विचारसंपदा निर्माण केली. मार्क्‍सवाद- फुले-आंबेडकरवाद आणि "दासशुद्रांची गुलामगिरी' अशा ग्रंथांतून आणि "सत्यशोधक मार्क्‍सवादी' या मासिकातून त्यांनी जातिव्यवस्थेचा प्रश्‍न चर्चेच्या आघाडीवर आणला. जातिव्यवस्था अंताच्या प्रश्‍नाला भारतीय राजकीय विचारधारेच्या केंद्रस्थानी आणण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. भारतातील जवळपास बहुतेक सर्व नामवंत विद्यापीठांत वेगवेगळे शिबिर आणि सभांद्वारे त्यांनी प्रबोधन केले.(साभार : सकाळ)

    ReplyDelete
  7. कम्युनिस्ट पक्षाचा वर्गविरोधी दृष्टिकोन आणि सत्यशोधक चळवळीचा जातिविरोधी दृष्टिकोन यांचा समन्वय असलेल्या 'माफुआं'चा अब्राह्मणी दृष्टिकोन पाटील यांनी 'सत्यशोधक मार्क्सवादी' मासिकाद्वारे ठसविला. पारंपरिक मार्क्सवादाच्या मर्यादा दाखवतानाच त्यांनी पारंपरिक आंबेडकरवादाच्या मर्यादा दाखविल्या. जातीच्या प्रश्नावर त्यांनी मूलगामी लेखन केले. अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राची मांडणी करून त्यांनी दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्याची नाळ प्राचीन अब्राह्मणी परंपरेशी जोडली. स्त्रीप्रश्नांबाबतही त्यांनी मौलिक चिंतन केले आहे. स्त्री दास्याच्या प्रश्नाचे सैद्धान्तिकरण करताना ही समस्या वर्णजातिव्यवस्थांपासून असल्याची भूमिका मांडली होती. 'हिंदू स्त्री मजूर म्हणून भांडवलदार-जमीनदारवर्गांची गुलाम, स्त्री म्हणून पुरुषांची गुलाम, हरिजन व आदिवासी म्हणून उच्च मध्यमवर्गीयांची गुलाम, बिगर हिंदू स्त्रिया दुहेरी, तर हिंदू स्त्रिया तिहेरी गुलाम,' अशी त्यांची भूमिका होती.
    (संदर्भ : परिवर्तनाचा वाटसरू, १६ ते ३१ जुलै २०१३)

    ReplyDelete
  8. शरद पाटील यांनी शेतमजूर आणि आदिवासी यांच्यासाठी लढे उभारले होते. मुंबईतील जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधील शिक्षण सोडून ते कम्युनिस्ट चळवळीत सहभागी झाले होते. त्यानंतर १९७८ मध्ये त्यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केली होती. चळवळींबरोबरच त्यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेत विपुल लिखान केले होते.

    ReplyDelete
  9. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात यावे याकरिता सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षातर्फे लॉंग मार्च काढून आदिवासींना नामांतर चळवळीचा भाग बनविले. महाराष्ट्रातील साहित्य संमेलन चळवळींच्या सहभागातून संयुक्‍त साहित्य सभेची चळवळ धुळे जिल्ह्यातून उभी करण्याचे श्रेयदेखील कॉ. शरद पाटील यांनाच जाते. साक्री येथे पहिले संयुक्‍त साहित्य संमेलन यशस्वी करून साहित्य संमेलन चळवळीला नव्या वळणबिंदूवर आणण्याचे कार्य कॉ. पाटील आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी केली.

    ReplyDelete
  10. भाऊसाहेब केसरकरFriday, 18 April, 2014

    कृषी संस्कृती, बुद्धविचार व अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र यांची ज्येष्ठ विचारवंत कॉ. शरद पाटील यांनी नव्याने वैचारिक मांडणी केली. धुळे जिल्ह्यातील कापडणे तालुक्यात 17 सप्टेंबर 1925 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्या काळी मॅट्रिक झाल्यावर त्यांनी बडोद्याच्या कलाभवन येथे चित्रकला शिक्षणक्रमास प्रवेश घेतला. त्यानंतर ते मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्‌मध्ये दाखल झाले. 1945 साली झालेल्या पहिल्या युद्धोत्तर विद्यार्थी संपात शिक्षण सोडून ते सहभागी झाले आणि जीवनदानी कम्युनिस्ट म्हणून कार्यरत झाले. 1974 मध्ये हिंदी कम्युनिस्ट पक्ष दुभंगल्यानंतर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. माकपच्या माध्यमातून सलग 14 वर्ष त्यांनी वेगवेगळे विषय व प्रश्नांवर काम केले. पुढे जातिव्यवस्थेविरोधात लढ्यात सहभागी होण्यास माकपने नकार दिल्यामुळे त्यांनी या पक्षाचा राजीनामा दिला. 1978 मध्ये कॉ. पाटील यांनी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. "सत्यशोधक मार्क्सवादी' या मासिकाचे बारा वर्ष त्यांनी संपादन केले. कॉ. पाटील यांनी जातिव्यवस्थेच्या अंतासाठी लढा उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू यांच्या विचारांचे ते खरे पाईक होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ
    नामांतर चळवळीतही भाग घेतला. या चळवळीत त्यांनी आदिवासींनाही सहभागी करून घेतले. त्यांच्या अतुलनीय कार्यासाठी वाई येथील रा. ना. चव्हाण प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकतेच(10 एप्रिल रोजी) महर्षी रामजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कॉ. पाटील हे त्यावेळी आजारी असल्याने त्यांच्यावतीने त्यांच्या कन्येने हा पुरस्कार स्वीकारला होता.

    ReplyDelete
  11. अभिनव शिंदेFriday, 18 April, 2014

    कॉम्रेडा शरद पाटील यांनी पुरोगामीत्वाचा पुरस्कार केला. त्यांनी भारतीय इतिहासाची नव्याने मांडणी करून नवे संदर्भ निर्माण केले होते. अलीकडेच त्यांना इतिहास संशोधन परिषदेच्या महान इतिहासकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच सातारा जिलतील वाई येथे १८ एप्रिल रोजी त्यांना महर्षी शिंदे पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.

    ReplyDelete
  12. "अब्राह्मणी" इतिहासकार कॉम्रेड शरद पाटील यांना अभिवादन
    कॉम्रेड शरद पाटील "अब्राह्मणी" इतिहासकार आणि धाकलं पाटील "अब्राह्मणी" ब्लॉग्गर...

    ReplyDelete
  13. भाऊसाहेब केसरकरSaturday, 19 April, 2014

    कॉम्रेड शरद पाटील यांना विनम्र अभिवादन...!

    ReplyDelete
  14. विदा.विरोधीSunday, 20 April, 2014

    मार्क्सच्या चष्म्यातून भारतीय समाजाकडे आणि इतिहासाकडे पाहता येणार नाही, हे लक्षात आल्यावर पाटील यांनी वैदिक वाङ्मय मुळातून वाचण्याचे ठरविले. स्थानबद्धतेतून सुटल्यावर ते संस्कृत शिकू लागले. पंडित विद्याभास्कर उपाध्याय यांच्याकडे त्यांनी वर्षभर पाणिनीच्या संस्कृत व्याकरणाचे अध्ययन केले. अध्ययन संपल्यानंतर त्यांनी आदिवासी भागांत कार्य सुरू केले. बेघर शेतमजूरांचा लढा उभारला. धुळ्यातील साक्री आणि नवापूर या तालुक्यांत आदिवासी भूमीहीनांची चळवळ सुरू केली. दुसरीकडे त्यांचा अभ्यास चालू होताच. कोणत्याही प्रकारची शिष्यवृत्ती नसताना, संस्थात्मक पाठबळ नसताना त्यांनी संशोधन पुढे नेले. समाजपरिवर्तनाबाबतचा 'दास शुद्रांची गुलामगिरी' हा ग्रंथ त्यांनी १९७२मध्ये सिद्ध केला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास झाला. जातिव्यवस्थेबाबत आपले विचार आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्यातील मतभेद टोकाला गेल्यावर १९७८ मध्ये त्यांनी मार्क्सवाद, फुले आणि आंबेडकरवाद (माफुआं) यांवर आधारित सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. याद्वारे त्यांनी जातीवर आधारलेल्या शोषणातून मुक्त होण्याचा विषय अतिशय जोरकसपणे केंद्रस्थानी आणला. आदिवासींचा लढा, जातिव्यवस्थेविरोधी लढा, शेतकरी आणि स्त्री यांचा संघर्ष या सर्वांच लढा एक होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला.

    ReplyDelete
  15. Ravikumar BansodeSunday, 20 April, 2014

    शरद पाटील यांच्या निधनाने एक क्रांतिकारी विचारवंत कार्यकर्ता काळाआड गेला आहे. भारताच्या इतिहासाचे भौतिकवादी द्वंद्वात्मक आकलन करून सर्व जात, स्त्रीदास्यअंताचा त्यांनी मांडलेला विचार मोलाचा आहे.

    ReplyDelete
  16. भाऊसाहेब केसरकरSunday, 20 April, 2014

    सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांना लाल सलाम.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.