10 October 2013

विश्ववंद्य छ.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण

          कुळवाडीभूषण विश्ववंद्यछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा कधी हिंदू धर्मरक्षक, कधी महाराष्ट्र रक्षक,कधी मराठी भाषा रक्षक,कधी सांस्क्रुतीक रक्षक तर कधी मुस्लिम विरोधक अशा प्रकारे उभी करण्यात आली.पण शिवरायांच्या चरित्रासंबंधी ऐतिहासिक तथ्यांचा अभ्यास केला असता शिवरायांच्या वरील प्रतिमा अनैतिहासिक आणि शिवरायांना संकुचित ठरविणार्या आहेत,हे स्पष्ट होते.
शिवरायांना संस्क्रुतीचा जरूर अभिमान होता. पण कोणत्या संस्क्रुतीचा ? तर सिंधु संस्क्रुतीचा,परंपरेचा म्हणून महात्मा फ़ुले त्यांचे वर्णन "कुळवाडीभूषण" शिवराय असे करतात.कुळवाडीभूषण म्हणजे अठरापगड बारा बलुतेदार यांचा राजा,शेतकर्यांचा,रयतेचा राजा.सांस्क्रुतीक धोरणांमध्ये महत्वाचा भाग म्हणजे भाषा! शिवरायांना मराठीचा अभिमान होता याबाबत कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.पण मराठीबद्द्ल आंधळा अभिमान त्यांच्याकडे नव्हता.मराठीच्या अभिमानापोटी इतर भाषांचा अनादर महाराजांची कधीच केला नाही.याउलट शिवरायांच्या पत्रात अरबी,पार्सी भाषेचा (शब्दांचा) त्यांनी मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे.याबाबत डॉ.प्र.न.देशपांडे त्यांच्या "शिवरायांची पत्रे" या ग्रंथातील प्रस्तावनेत लिहितात-शिवाजी महाराजांच्या कचेरीपत्रामध्ये प्रामुख्याने पुढील मायना आढळतो.अजरख्त खाने राजर्षी शिवाजीराजे दामदैलत हूं आणि पुढील अर्ध्या भागात बजानीखा कारखुनांनी हाल व इस्तकथाल देशमुखांनी अशा आशयाचा मजकूर येतो.अजरख्त खाने याचा अर्थ कचेरीपासुन असा असून ’दामदौलत हू” याचा अर्थ त्याचे राज्य चिरायु होवो,असा होतो.तर बजानीबु याचा अर्थ ’कडे’ असा असून "हाल" म्हणजे हल्लीचे आणि "इस्तकबाल" म्हणजे पुढे होणारे भावी असा आहे.(प्रुष्ठ क्र.१४) वरील अनेक शब्द पार्सी,अरबी आहेत.याचा अर्थ शिवरायांनी केवळ संस्क्रुत,मराठी याच भाषांचा कैवार घेतला आणि इतर भाषांचा द्वेष केला असे सिद्ध होत नाही.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण हे भाषावादाचे नव्हते,तर जगाच्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अनेक भाषा अवगत असल्या पाहिजेत अशाच स्वरूपाचे होते.शिवरायांचे पुत्र संभाजीराजेंनी तर एक संस्क्रुत आणि तीन हिंदी असे चार ग्रंथ लिहिले.म्हणजे शिवकाळात भाषावाद अस्तित्वात नव्हता.आजच्या राजकारण्यांनी राजकीय लाभासाठी भाषावाद उभा केलेला असून मराठी भाषेच्या अस्मितेचे प्रतिक म्हणून शिवरायांची प्रतिमा उभी केली जाते.शिवरायांचे सांस्क्रुतीक धोरण पाहता ही बाब अत्यंत खोटारडी आहे.
शिवाजी राजांचा पोषाख व राहणीमान पाहता सुफ़ी संतांच्या भारतातील वास्तव्याने बहुजन-मुस्लिम धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्क्रुतीक देवाण-घेवाण झाली.याबाबत इतिहासतज्ञ चंद्रशेखर शिखरे त्यांच्या प्रतिइतिहास या अभ्यासपुर्ण ग्रंथात लिहितात मुस्लिम स्त्रियांनी सौभाग्य अलंकार म्हणून पुरुषांचा झब्बे आणि तंग तुमानी हा पोषाख वापरणे या गोष्टी शिवरायांच्या पुर्वीपासून घडत आलेल्या होत्या.शिवाजी महाराजांचा पोषाख व राहणीमान यातूनही हा सांस्क्रुतीक प्रभाव जाणवतो याचा अर्थ कोणी धर्म बदलला असा होत नाही(प्रथमाव्रुती प्रुष्ठ क्र.५६). कुळवाडीभूषण शिवाजी महाराजांना आपल्या धार्मिक अस्मितेचा अभिमान होता.भवानी माता,महादेव,खंडोबा यांच्याबद्दल शिवाजी महाराजांना नितांत आदर होता.ते देव म्हणून नव्हे तर भवानीमाता, महादेव, खंडोबा हे सर्व श्रद्धास्थाने आहेत.त्यांच्याबद्दल शिवरायांना आदर होता पण यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते.केवळ नामस्मरण आणि देवपुजा केल्याने आपणाला यश मिळणार नाही असे समजण्याइतके महाराज प्रगल्भ विचारसरणीचे होते.
शिवाजी राजे बुद्धिप्रामाण्यवादी होते.वैदिक धर्मग्रंथात अनेक अतार्किक बाबी आहेत.त्यांचे अनुकरण महाराजांनी कधीही केले नाही.शिवरायांनी आरमारदलाची उभारणी केली.सिंधुदुर्गसारखे सागरी किल्ले बांधले.बेदनुरवर समुद्रामार्गे स्वारी करून शिवरायांनी सिंधू बंदी तोडली.समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे लिहुन ठेवनार्या वैदिक ग्रंथाचे काही ठिकाणी प्रामाण्य नाकारले.शिवरायांनी शुद्रातिशुद्र  बांधवांना हक्क-अधिकार दिले. म्हणजे महाराजांनी विषमता नाकारली.राज्यात समता निर्माण केली.समतावादी स्वराज्य हे शिवरायांच्या सांस्क्रुतीक धोरणाचे महत्वाचे अंग होते.
शिवराय महाराजांचे बरेचसे आयुष्य लढाया राजकीय संघर्ष स्वराज्याची निर्मीती प्रवास यामध्ये गेलेले आहे.त्यांना जर दीर्घायुष्य लाभले असते तर त्यांनी दुसर्या राज्याभिषेकानंतर निश्वितच अब्राह्मणी धार्मिक संहिता निर्माण केली असती.तरी देखील त्यांच्या पत्रावरून,जीवनातील काही प्रसंगावरून त्यांचा मानवतावाद,प्रेमळपणा,धार्मिक.सांस्क्रुतीक धोरणे प्रकर्षाने जाणवते.त्यांनी २३ ऑक्टोंबर १६६२ रोजी सर्जेराव जेधे यांना पत्र पाठवले आहे.त्या पत्रात ते लिहितात की मोघल स्वराज्यावर चाल करून येत आहेत तरी रयतेला सुरक्षीत ठिकाणी हलवावे.मोघलाकडून रयतेला त्रास झाला तर "त्याचे पाप तुमच्या माथी बैसेल".यावरून परोपकार हे पुण्य आणि परपीडा हे पाप आहे हे महाराजांचे सांस्क्रुतीक धोरण होते.
शिवाजी महाराजांची हिंदू धर्मरक्षक आणि मुस्लिमांचा कर्दनकाळ अशी प्रतिमा झाली किंवा तशी केली गेली.शिवाजी महाराजांचे अदिलशहा, मोघल यांच्याबरोबर राजकीय संघर्ष होता,धार्मिक नव्हे.शिवरायांनी अफ़जलखानाला ठार मारले,शाईस्तेखानावर वार केला ते मुस्लिम होते म्हणून नव्हे तर स्वराज्याचे शत्रू होते म्हणून.शिवाजी महाराजांनी जसा अफ़जलखानाला ठार मारला तसाच खानाचा निष्ठावंत वकील क्रुष्णा कुलकर्णी यालाही उभा कापला.शिवरायांच्या सैन्यात अनेक मुस्लिम अधिकारी होते.शिवरायांच्या सैन्यात ज्याप्रमाणे अनेक मुस्लिम अधिकारी होते त्याचप्रमाणे मोघल. अदिलशहाच्या सैन्यात देखील मराठा , रजपुत, ब्राह्मण अधिकारी होते.याचाच अर्थ संघर्ष हा धार्मिक नसून राजकीय होता.शिवरायांचे धोरण कोणत्या धर्माला विरोध किंवा कोणत्या धर्माचा अनुनय करण्याचे नव्हते. याउलट औरंगजेबाला १६५७ साली लिहिलेल्या पत्रावरून शिवरायांचा मानवतावाद प्रकर्षाने जाणवतो.
बहुजनप्रतिपालक विश्ववंद्य छ.शिवाजी महाराजांच्या धार्मिक आणि सांस्क्रुतीक धोरणावरून हे स्पष्ट होते की शिवरायांना जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, लिंग, वंश, राष्ट्र भेदाच्या पलीकडे जाऊन मानवाचे आनंददायी प्रसन्न भेदा-भेदरहित असे स्वराज्य अपेक्षीत होते.त्याची प्रत्येक्ष कार्यवाही त्यांनी आपल्या स्वराज्यात केली.शिवरायांचे खरे सांस्क्रुतीक आणि धार्मिक धोरण जगाला समजेल तेंव्हा जगात शांतता आणि विकास झपाट्याने वाढेल.शिवाजी हे केवळ मराठी, महाराष्ट्र, भारताचे राजे नाहीत तर संपुर्ण जगातील आदर्श व्यक्तिमत्वांचे आदर्श आहेत.
अशा कुळवाडीभूषण समतेचे पुरस्कर्ते हिंदवी स्वराज्य संस्थापक विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांना कोटी कोटी विनम्र अभिवादन !
जय जिजाऊ ॥ जय शिवराय ॥ जय महाराष्ट्र.

30 September 2013

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ : ज्ञानज्योती सावित्रीबाई फ़ुले

            काटेरी अंथरुणावर जन्माला येवून या अंथरूणाची ज्यांना सवय होते ते सामान्य म्हणून जगतात पण बोचणार्या काट्यांची ज्यांना जाणीव होते आणि हक्क मिळवण्यासाठी ज्यांच्यात जिद्द असते ते असामान्य होतात.भारत देशातील पुरुषप्रधान व्यवस्थेला तोंड देत प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला ज्ञानाम्रुताचा आनंद देणार्या सावित्रीबाई फ़ुले या अशाच असामान्य व्यक्ती नव्हे तर ज्ञानाची देवता आहेत.त्यांच्यामुळेच आज,"अगं सोनू,अरे पिल्या,अरे बाळा लवकर उठ,शाळेला जायचं ना ! तयारी करावयाची आहे.लवकर उठ."अशाप्रकारचे संवाद आज भारतातील घराघरात ऐकायला मिळतात.
शिक्षणाची ज्ञानगंगा प्रत्येकाच्या घराघरात पोहवविणार्या पहिल्या महिला जन्मदात्या म्हणून अजरामर असणार्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फ़ुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव येथे झाला.नायगाव येथील खंडूजी नेवसे पाटील यांची एकुलती एक लाडकी, हुशार मुलगी होती.तत्कालीन परिस्थितीत भारतीय समाजात बालविवाहाची पद्धत असल्यामुळे सावित्रीबाईंचं लग्न वयाच्या नवव्या वर्षी जोतिबा फ़ुले यांच्याबरोबर झाले.त्यावेळी फ़ुलेंचे वय १३ वर्ष होते.१८४० मध्ये विवाह झाल्याबरोबर परंपरागत चातुर्वर्ण्याधिष्ठीत समाज व्यवस्थेरूपी हिरव्यागार विषव्रुक्षाला घनदाट जंगलातील एका-एका विषव्रुक्षाला मुळासकट उपटून फ़ेकून देण्याचे धाडस,बाणेदारपणा आणि जॊखिम आपल्या पतीबरोबर सावित्रीबाईंनी तना-मनाने स्विकारले होते.
सावित्रीबाईंनी त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर स्वतंत्र स्त्री म्हणून विचार केला.फ़क्त विचार करून थांबल्या नाहीत तर प्रत्यक्ष त्याप्रमाणे वाटचाल केली.ही वाटचाल सनातन काळात अत्यंत खडतर होती म्हणूनच त्यांनी घडवून आणलेल्या शैक्षणिक क्रांतीचे मोल अनमोल होते हे निश्चितपणे समाजाने स्वीकारले आहे.ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे असे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव नेहमी म्हणत त्यामुळे "विद्या हेच बळ,ज्ञान हीच शक्ती" ही म.जोतिराव फ़ुलेंची मुलगामी क्रांतिकारी वचने सावित्रीबाईंनी आत्मसात केली होती.शिक्षणाशिवाय समता नाही आणि समतेशिवाय मानवता नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी "चुल आणि मुल" यात गुंतुन न पडता घराचा उंबरठा ओलांडून त्यांनी सामाजिक कार्यात भाग घेतला.महात्मा जोतिराव फ़ुलेंनी स्वत: सावित्रीबाईंनी शिकविण्यास सुरुवात केली.त्यासाठी शेतातील काळी जमीन सावित्रीबाईंची पाटी होती.त्या पाटीवर सावित्रीबाई एका छोट्याशा काडीने अक्षरे गिरवायला शिकल्या पुढे त्यांनी अहमदनगर येथे फ़रारबाईंच्या व पुण्यात मिचेलाबाईंच्या मॉर्मन स्कुलमध्ये अध्यापनाचे शिक्षण घॆऊन आद्य भारतीय शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाल्या हिच भारतीयांच्या इतिहासात अजरामर संस्मरणीय घटना घडली.
स्त्रियांच्या आणि शुद्रांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून ज्ञानाचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले करण्याचा महात्मा जोतिराव फ़ुलेंचा मानस होता."जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाची उद्धारी." या सत्याचा त्यांना प्रत्यय आल्यामुळे विचाराअंती त्यांनी मुलींच्यासाठी शाळा काढण्याचे ठरवून १ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींच्या शिक्षणासाठी पहिली शाळा सुरु केली आणि त्या शाळेत सावित्रीबाई विनावेतन शिक्षिकेचे काम करू लागल्या.आपल्या या कार्याचा एकखांबी तंबू होऊ नये म्हणून त्यांनी कार्यकारी मंडळाची स्थापना केली.
१ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरु करण्यात आली होती. ती भारतातील पहिली शाळा म्हणून भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा लागेल.जेव्हा ब्राह्मण समाजाला समजले की ही शाळा एका शुद्र जोडप्यांनी सुरु केली आहे.तेंव्हा त्यांनी संताप व्यक्त केला.सावित्रीबाई शाळेत जात असताना त्यांच्यावर शेण टाकणे,चिखल फ़ेकणे,अचकट-विचकट भाषेचा वापर करणे,निंदानालस्ती करणे असे अनेक प्रकार सुरु होते.परंतू सावित्रीबाई फ़ुले या स्वभावाने बंडखोर स्वभावाच्या होत्या.अशा अनेक अडचणी आणि संकटांना त्यांनी भीक घातली नाही.कारण जे कार्य त्यांनी हाती घेतले ते भारतातील महिलांसाठी उज्वल भविष्या निर्माण करणारे होते.त्यांनी अस्प्रुश्यांसाठी शाळा काढल्या.त्याकाळी स्त्रीयांना अजिबातच स्वातंत्र नव्हते.स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे पाप आहे असे समजले जात असे.परंतू हे धाडसी काम फ़ुले दांपत्यांनी सुरु केले.
सावित्रीबाई प्रतिभावंत कवयत्री देखील होत्या.त्यांनी ५० वर्षे जोतिराव फ़ुलेंच्या ध्येय प्रणाली, चळवळीमध्ये झोकून दिले होते.सावित्रीबाईंचा पहिला काव्यसंग्रह १८५४ साली प्रकाशीत झाला.त्यामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या बहुजन बांधवांना काव्य अर्पण केले.उदा.तयास म्हणावे मानव काय,शिकण्यासाठी जागे व्हा,शुद्र शब्दाचा अर्थ श्रेष्ठ धन इत्यादी काव्य रचनेमधून त्यांनी शिक्षणाचे महत्व पटवून दिले.एका काव्यामध्ये सावित्रीबाई फ़ुले म्हणतात- नसानसात इर्षा खेळवू विद्या मी घेईन,शुद्रत्वाचा डाग हो माझा निपटून मी काढीन.सावित्रीबाई म्हणतात-तुमच्या रोमारोमात अशी इर्षा जाणवू द्या की,आम्ही शुद्र आहोत याचा डाग आम्ही पुसुन टाकणार आहोत आणि त्यासाठी आम्हाला शिक्षण घेणे आवश्यक आहे.अशा प्रकारे काव्य रचना करून बहुजनांना शिक्षणासाठी प्रेरित,चैतन्यमय केले आहे.विद्येचे महत्व पटवून दिले.खालील ओळीमध्ये त्यांनी सांगितले आहे की "विद्याधन आहे रे श्रेष्ठ सार्या धनाहून,तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानवी जन".पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो परंतू स्त्री शिकली तर संपुर्ण कुटूंब शिक्षित होते.पर्यायाने समाज शिकतो आणि राष्ट्राच्या प्रगतीला हातभार लागू शकतो.ही शिकवण सावित्रीबाईंनी समाजाला दिली.कारण त्या काळात अखंड भारतामध्ये स्त्री ही एका रानात चुकलेल्या पाडसासारखी वावरत होती.ती घाबरलेली,बावरलेली,मनाने दबलेली होती.कोणीतरी ब्रुचे धिंडवडे काढील या मनस्थितीत वावरत होती.तिला शिक्षणापासून वंचित केले जात होते.पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि स्त्रियांना दासी लेखणारी पुरुषी मानसिकतेने महिलांवर अनेक बंधने लादली होती.त्याठिकाणी सावित्रीबाईंनी अंधार्या कोठडीत चाचपडणार्या स्त्रीला तिच्या आस्तित्वाची जाणीव करून दिली.सनातनी लोकांचा रोष पत्करून तिला पुरुषांच्या बरोबरीत वागायला शिकवले.असे हे शिक्षण क्षेत्रातील महान कार्या बघून ब्रिटीश सरकारने त्यांचा पुणे येथील विश्रामवाड्यात १६ नोव्हेंबर १८५२ मध्ये तत्कालीन पुना संस्क्रुत कॉलेज चे प्राचार्य मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली फ़ुले दांपत्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला.
आज एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करायला स्त्रीला कोणी मार्ग दाखविला असेल तर तो सावित्रीबाई फ़ुलेंनीच.त्यांनी जर हा रस्ता दाखवला नसता तर कोठेतरी सह्याद्रीच्या रांगामध्ये,कोणत्यातरी दाट जंगलात,कोणत्यातरी गुहेत काट्यांतून प्रवास करायला लागला असता.सह्याद्रीच्या शिखरावर पोहचण्याऐवजी सह्याद्रीच्या खोल दरीत व दु:खाच्या गर्तेत हिंडावे लागले असते.पण सावित्रीबाई फ़ुलेंनी राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्या बरोबरीने स्त्रियांसाठी जी नवीन दालने उभी केली त्याला तोड नाही.त्याकाळी मुठीमध्ये मापेल एवढ्या मनुवादी लोकांची शिक्षणावर मक्तेदारी होती.ही मक्तेदारी स्वत: अक्षर गिरवून या गिरवण्यातून पुर्ण भारतातील स्त्रियांना भवितव्याचा मार्ग दाखविला.
या प्रेमळ माऊलीचे १० मार्च १८९७ ला महानिर्वाण झाले.म्हणून म्हंटले जाते की,"युगायुगातून एखादीच अशी सावित्री जन्माला येते म्हणूनच ती युगसावित्री होते." राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फ़ुलेंसारख्या क्रांतीसुर्याबरोबर सहवास आणि मार्गक्रमण करीत असणारी ती एक क्रांतीज्योती होती.म्हणूनच अशा तपस्वी,न्यायमुर्ती,तेजस्विनी महामायेला कोटी कोटी विनम्र प्रणाम.

24 September 2013

जिजाऊ चरित्रातून काय शिकावे

           अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणार्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे!. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे.
राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण जिजाऊ चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्राविण्य मिळवले पाहिजे.आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य,न्युनगंड किंवा असुरक्षतेची भावना प्रामुख्याने जाणवते.जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला.
आजची श्री चुल आणि मुल या परिघाबाहेर पडायला तयार नाही किंबहुना तिने त्यातच सौख्य मानावे अशी समाज व्यवस्था आजदेखील आहे.पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्यसंकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे.शहाजीराजे-जिजाऊमाता यांनी मोठ्या उदात्त आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला.केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भुमिका शहाजीराजे-जिजाऊमातांची होती.
शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊमाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. अदिलशहा, निजाम,मुघल असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भिडपणे जिजाऊमाता शहाजीमहाराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या.आजची स्त्री माझी मुले माझे घर माझे सगेसोयरे आणि कौटूंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही.जिजाऊमातेनं स्वत:च्या जाधव-भोसले कुटूंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला.त्यामुळे तानाजी,येसाजी,कान्होजी,शिवाजी,बाजी पालसकर,मुरारबाजी,बहिर्जी,कावजी,नेताजी इ.सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले.म्हणजे जिजाऊमातेनं आपले मात्रुप्रेम शिवरायांप्रमाणेच सर्व मावळ्यांवर केले.त्यामुळे जिजाऊ ही स्वराज्यमाता आहेत.
स्वराज्यावर अनेक संकट आली,अफ़जलखान,दिलेरखान,शाईस्तेखान,सिद्धी जौहर या प्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या.संकटसमयी जिजाऊ लढणार्या होत्या,रडणार्या नव्हत्या. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास  निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले.शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते.कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासून तलवार घ्या,घोड्यावर बसा,गडकोट-किल्ले पायदळी घाला,शत्रुचा नि:पात करा,तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे,मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले.आजची आई मुलांना तू कोणाच्या भानगडीत पडू नकोस,आपल्याला काय करायचेय, असे सांगते.आजची आई आत्मकेंद्री बनत चालली आहे.जिजाऊंनी मात्र उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला.आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी,मानवतावादी नेते उदयाला येतील पण त्याअगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे.
राजमाता जिजाऊ संकटसमयी डगमगल्या नाहीत,शिवरायांना यश मिळावे यासाठी यज्ञ,तप,शांती,उपवास करीत बसल्या नाहीत.यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते,चातुर्य पणाला लावावे लागते,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते.यावर जिजाऊंचा द्रुढ विश्वास होता.जिजाऊ प्रयत्नवादी होत्या.शिवरायांवर चालून आलेल्या शत्रुचा नायनाट करण्यासाठी जिजाऊंनी मार्गदर्शन केले.प्रसंगी जिजाऊ जपमाळ ओढत नामस्मरण करत बसल्या नाहीत.जिजाऊ दैववादी नव्हे तर प्रयत्नवादी होत्या.त्यामुळे संकटसमयी त्या हताश-निराश झाल्या नाहीत.आजची स्त्री मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा,नोकरी मिळावी,पदोन्नती मिळावी,निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ,होमहवन,तीर्थयात्रा,नारायण-नागबळी, उपवास, नामस्मरण करताना दिसते.जिजाऊंचा प्रयत्नवाद स्रियांनी आत्मसात केला पाहिजे.
जिजाऊमाता पन्हाळ्याच्या दिशेने निघाल्या त्यावेळेस नेताजी पालकरांनी जिजाऊंना साकडे घातले. आम्ही जीवंत असेपर्यंत आपण तसदी न घ्यावी,म्हणजे जिजाऊमाता वेळप्रसंगी हाती तलवार घेऊन लढणार्या होत्या. आज स्त्रियांवर अनेक ठिकाणी अत्याचार होतात त्याप्रसंगी  स्त्री  स्वत:चे संरक्षण  करू  शकत नाही. इतका न्युनगंड स्त्रियांमध्ये  असणार्या  धैर्याचे-शौर्याचे अनुकरण स्त्रियांनी करावे.
जिजाऊमातांनी संभाजीराजेंना राजनीती,युद्धकलेचे शिक्षण दिले.पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे.शिवाजीराजे-संभाजीराजे मावळे यांच्या मध्ये असणारी  उच्चकोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.विखुरलेला मराठा समाज एक करावा म्हणून शहाजी राजे-जिजाऊंनी शिवरायांचे आठ विवाह केले.त्या आठही महाराण्यांचा जिजाऊंनी सन्मान केला.सासू-सुन हे नातं संघर्षाचे नव्हे तर अत्यंत जिव्हाळ्याचं,विकासाचं,प्रेमाचं नातं आहे हे जिजाऊंनी दाखवून दिले.जिजाऊंचा हा आदर्श आजच्या महिलांनी अंगिकारावा.
शिवाजी महाराज ज्यावेळेस आग्राकैदेत होते,तेंव्हा महाराष्ट्रातील इंचभर भूमी देखील मिर्जाराजा जयसिंगला जिंकता आली नाही.कारण त्यावेळेस स्वराज्याची सुत्रे जिजाऊमातांच्या हाती होती.म्हणजे जिजाऊंमातांची जरब कशाप्रकारे होती हे यावरून स्पष्ट होते.शहाजीराजांचा म्रुत्यू झाला त्याप्रसंगी जिजाऊ सती गेल्या नाहीत,म्हणजे जाधव-भोसले घराण्यात सतीप्रथा तर नव्हतीच पण जिजाऊमाता देखील सतीप्रथेच्या विरोधात होत्या.आज २१ व्या शतकात जिजाऊमातेच्या पुरोगामी विचारांची गरज आहे.शिवरायांना न्यायनिवाडा करण्याचे धडे जिजाऊमातेने दिले.गावागावांईल तंटे-बखेडे जिजाऊंनी मिटवले.
शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला तेंव्हा ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला.या प्रसंगी जिजाऊंची भुमिका अत्यंत महत्वाची आहे.जिजाऊ - शिवराय जर ग्रंथप्रामाण्य मानणारे असते तर त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला नसता.जिजाऊमाता बुद्धिप्रामाण्यवादी होत्या त्यामुळेच त्यांनी वैदिकांचा विरोध झुगारून राज्याभिषेक करण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला.आज अनेक कठीण प्रसंग येतात त्याप्रसंगी स्त्री-पुरुष हतबल होतात.असे प्रसंग जिजाऊंच्या जीवनात देखील आले होते पण जिजाऊ हतबल,निराश झाल्या नाहीत त्यांनी मोठ्या हिंमतीने संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले.जिजाऊंची हिम्मत आजच्या महिलांमध्ये यावी,हिच जिजाऊ चरणी प्रार्थना...
शिवश्री श्रीमंत कोकाटे,इतिहासतज्ञ 
संपर्क : ९४२३३३६४२८

22 September 2013

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी डोक्यात घ्या

महापुरुषांना डोक्यावर घेण्याऐवजी महापुरुषांचे कार्य विचार डोक्यात घ्या त्यानेच खरी प्रगती होईल.
                                         - शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब
                                                         (मराठा सेवा संघ संस्थापक)
            संपूर्ण बहुजन समाजाच्या मनात ज्या शिवरायांबद्दल आदर आणि अभिमान आहे त्यांना खरा इतिहास सर्वप्रथम महात्मा फ़ुलेंनीच समोर आणला.महात्मा फ़ुले यांची शिवरायांवर अतोनात श्रद्धा होती.त्यांनीच रायगडावरील शिवरायांची समाधी शोधून काढून पहिली शिवजयंती साजरी केली.शिवरायांचे खरे चरित्र प्रथम महात्मा फ़ुले यांनी लिहिले.शिवरायांचा पोवाडा लिहुन खरे शिवराय गो-ब्राह्मण प्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभुषण होते हे सत्य सर्वप्रथम मांडले.महात्मा फ़ुलेंनी शिवरायांवर जे लिखाण केले ते त्या काळात जे पुरावे उपलब्ध होते त्यानुसार.शिवरायांना ते कमी लेखत नव्हते.किंबहुना शिवरायांचे श्रेष्ठ्त्व त्यांच्या साहित्यातून दिसून येतेच.शिवराय हे निरक्षर नव्हते.आज याचे पुरावे उपलब्ध आहेत.त्यामुळे महात्मा फ़ुलेंना कोणताही दोष लागत नाही.आज महात्मा फ़ुले हयात नाहीत.ते हयात असताना जर असे पुरावे उपलब्ध झाले असते तर त्यांनी आपल्या भुमिकेत निश्चित बदल केला असता.किंबहुना त्यांना या गोष्टींचा खुप आनंदच झाला असता.महात्मा फ़ुले हे खरे सत्यशोधक छ्त्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे अनुयायी होते.
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना गुरु मानत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा जोतिबा फ़ुले यांना गुरु मानत होते.महात्मा जोतिबा फ़ुले हे शिवरायांना गुरु मानत होते.छ.शिवाजी महाराज गुरु मानत होते संतशिरोमणी तुकोबारायांना आणि तुकोबारायांच्या गाथे वर तथागत बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता.महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जाऊन शिवरायांच्या समाधीचे दर्शन घॆतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्यांनी जय शिवराय ,छ.शिवाजी महाराजांचा विजय, छ.शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.अशा रीतीने बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाची शिवरायांचे दर्शन घॆऊन केली.बेळगांव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.महाराष्ट्र शासनाने ही पत्रे प्रकाशित केलेली आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर लहान असताना "क्रुष्णराव अर्जुन केळूस्कर" गुरुजींनी त्यांना बुद्ध चरित्र भेट दिले होते.या चरित्रामुळे बाबासाहेबांना धर्मांतराची प्रेरणा मिळाली.केळूस्कर गुरुजी हे एक बहुजन विद्वान होते.छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेब आंबेडकर "बॅरिस्टर" झाल्यावर त्यांची कोल्हापूर शहारात रथातून मिरवणूक काढून फ़ुले उधळली होती.राजा सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना परदेशात शिक्षणासाठी सहाय्य केले होते.सयाजीराव गायकवाड हे इ.स. १८७५ ते इ.स.१९३९ सालादरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते.बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.
मराठा स्वराज्याचा सक्रिय स्वाभिमान उरी बाळगणार्या महाराजांनी आपल्या पराक्रमाने मराठी मुलुखाची शान भारत खंडात वाढवून भगवा झेंडा मोठ्या अभिमानाने फ़डकत ठेवला;पण त्यांची पायरी कधीच बदलली नाही.परंतू आपला इतिहास न समजलेला बहुजन आजही आपण कोण आहोत हे विसरत आहेत.त्यामुळे आता आपणच ठरवावे की,आपण कोण आहोत ? कारण जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधी इतिहास घडवू शकत नाही असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत.सध्याचा आंबेडकरी भक्त हे फ़क्त आंबेडकरांना डोक्यावर घेऊन जय भिम करून नाचतात पण सच्चा आंबेडकरी अनुयायी हे आंबेडकरी विचार डोक्यात घेऊन समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन समाजप्रबोधन करतात.असेच सर्वच बहुजन महापुरुषांच्या बाबतीत झाले आहे.त्यामुळे बहुजन महापुरुषांचे भक्त सच्चे अनुयायी कधी होतील ? हाच खरा प्रश्न आहे.

8 September 2013

मराठा स्वराज्याची निशाणी : भगवा

           इतिहासामध्ये रामदासांचे  महत्व वाढविण्यासाठी त्यांच्या शिष्यांनी व अभिमान्यांनी अनेक भाकडकथा त्यांच्या चरित्रात घुसडून ठेवल्या आहेत.एखाद्या क्षेत्राचे महत्व वाढवण्याचे झाले तर लगेच त्या क्षेत्राचे "महात्म्य" प्रसिद्ध केले जाते,त्याचप्रमाणे पुर्वीच्या थोर पुरुषांच्या चरित्रातील अनेक गोष्टी जशाच्या तशाच फ़ारतर थोडा फ़ेरफ़ार करून रामदासाच्या चरित्रातही घुसडलेल्या आहेत.गुरुचरित्रात नरसिंह सरस्वतीच्या म्हणुन ज्या चमत्कारांच्या कथा दिलेल्या आहेत.त्यापैकी बर्याचशा रामदासाच्या चरित्रात आलेल्या आहेत.या रामदासी कथांबद्दल लिहिताना "न.र.फ़ाटक" यांनी आपल्या "रामदास व शिवाजी" या लेखात लिहिले आहे की "रामदासी चमत्काराच्या ज्या दुसर्या कथा आहेत, त्या पुर्वीच्या व नंतरच्या साधु संतांच्या चमत्काराशी जुळणार्या आहेत, इतकेच नव्हे तर काही कथा इतर साधू संतांच्या चरित्रातून घेऊन रामदासाच्या चरित्रात भरल्या आहेत की काय असा संशय येतो.आपल्या गुरु च्या जीवनकथेत कसलीही उणीव राहू नये व दुसरा कोणताही संत कोणत्याही बाजूने आपल्या गुरुपेक्षा श्रेष्ठ दिसू नये, असा संकल्प करून सांप्रदायिक लोक रामदासाची चरित्रे लिहावयास बसल्यानंतर चमत्काराचा तुटवडा कसा उत्पन्न होणार ? उदा.सरस्वती गंगाधरचे गुरुचरित्र आणि रामदासाचे चरित्र ही एकमेकांशी ताडून पाहिल्यास वरील विधानाची सत्यता अंतरंगात ठसेल.",न.र.फ़ाटक यांनी यापुढे अनेक उदाहरणे देऊन हे विधान स्पष्ट केले आहे.
 छत्रपती शिवाजी महाराजांनी विरक्त होऊन एकदा आपल्या तथाकथित गुरुच्या म्हणजे रामदासाच्या झोळीत आपले राज्य अर्पण केल्याचा  कागद टाकून दिला आणी रामदासाने तो कागद शिवरायांना परत देऊन मला गोसाव्याला राज्य काय करावयाचे आहे.तुज राज्य चालव फ़क्त माझ्या स्वामित्वाची खूण म्हणून आपल्या राज्याचे निशाण भगवे कर म्हणजे झाले असे सांगितले.अशी कथा जी सांगितली जाते ती वरील मसाल्याचीच आहे.या कथेलाही ऐतिहासिक आधार नाही.न.र. फ़ाटक लिहितात की,"शत्रुला जिंकून राज्य अर्पण करण्याची कल्पना अतिशय प्राचिन काळापासून हिंदू वाड्मयात प्रचलित आहे.युधिष्ठिरने कौरवांच्या पराभवानंतर राज्य ब्राह्मणाला समर्पिल्याचे वर्णन महाभारतात आहे.वसिष्ठ ला रामचंद्रांनी राज्य दिल्याची कथा आहे.रजपुतांच्या इतिहासात" अशी उदाहरणे सापडतात.गोपीचंदाचा राज्यत्याग हा या कथापरंपरेतीलच एक दुवा आहे." शिवाय थोडीशी मिळालेली जहागीर ज्याला सोडून देता आली नाही,त्याने मिळालेले राज्य परत केले असे म्हणजे हा निव्वळ ढोंग आहे.
छत्रपती शिवरायांचे भगवे निशाण पाहून रामदासाच्या झोळीत राज्यार्पण करण्याची इच्छा रामदासाच्या भक्तांना झालेली दिसते.रामदास साधूपुरुष होते तेंव्हा सन्याश्याच्या भगव्या वस्त्राची जोड शिवरायांच्या भगव्या निशाणाशी घालून दिली की ठिक जमेल असे समजून ही कथा रामदासाच्या चरित्रात घुसडलेली दिसते.पण या चरित्रकारांनी जात विचार केलेला दिसत नाही.कारण रामदास हे संन्याशी नसल्याने ते इतर सन्यांश्यांसारखे भगवे वस्त्र न वापरता विटकरी रंगाचे वस्त्र वापरत होते जिथे स्वत:चे वस्त्रच भगवे नव्हते तिथे शिवरायांच्या झेंड्याला भगवे वस्त्र कोठून देणार ?.
बर्याच इतिहासकारांनी भेगवा झेंडा या विषयावर प्रकाश टाकलेला आहे.भगवा झेंडा शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून असून तो शहाजीराजांनी सुरु केलेला आहे.हे मत कोणत्याही भटोबाला किंवा रामदासी भक्ताला खोडता आलेले नाही."रामदास आणि शिवरायांची भेट झालीच नाही असे बर्याच इतिहासकारांचे म्हणने आहे.तरीही थोडा वेळ मानले की शिवराय आणि रामदासांची भेट झाली तर ती १६७६ मध्येच.त्यावेळी शिवराज्याभिषेक होऊन दोन वर्षे झाली होती व त्याआधीच भगवा सर्वत्र फ़डकत होता.यावरून भगव्या झेंड्याचा संबंध रामदास स्वामींशी लावण्यात अडचण येत आहे." बरे रामदासांच्या सांगण्यावरून भगवा झेंडा शिवरायांनी घेतला असे मानल्यास पुर्वी राज्य कमविताना निशाण कोणते होते याचाही उल्लेख कोठे आढळत नाही, हे ध्यानात ठेवण्यासारखे आहे.
"छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे पराक्रमी होते.पाच पातशाहीत त्यांनी सन्मानामे नोकरी केली.मोठमोठ्या लढाया मारल्या.कर्नाटकात फ़ार मोठा मुलुख जिंकला व तंजावरचा पाया घातला.आपला अंमल जाहीर करण्याला व सैन्याच्या हालचालीला निशाणीची म्हणजे झेंड्याची गरज असते.त्यासाठी शहाजीराजांनी आपले निशाण भगवे केले."शेडगांवकरांच्या बखरीच्या छापिल पुस्तकात १३ व्या पानावर पुढील मजकूर आहे.दुसरी लढाई जाधवराव वजीर व राजे यांची जाहली नंतर शहाजीराजे हे कोथळा पर्वत चढोन शिखरावर फ़ौजेसुदा राजघाटाने चढून गेले,त्या दिवसापासून राजघाट असे अद्याप म्हणत आहेत.श्रीशंभु महादेव यांचे दर्शन करून शंभुचे भगवे वस्त्र प्रासादिक ते आम्हांस वंद्य हे जाणुन शहाजीराजे यांना त्याचक्षणी आपली लष्कराची ढाल भगवी व हत्तीवरील निशाण व घोड्यावरील डंका निशाण भगवे." त्याच दिवसापासुन तीच चाल आजपावेतो चालत आहे.परंतू पुर्वीचे मुळ ठिकाण उदेपुरास निशाण पाच रंगाचे तिकडे आहे हे सुर्यवंशी राणाजी म्हणोन तेच निशाण पुर्वीचे आहे.शहाजीराजे यांनी शंभुचे ठिकाणी तळीचे ठिकाणी तळ्याचे चिरेबंदी ताल बांधावयाचे काम सुरु केले.नंतर तेथुनच कुच दरकुच करून विजापुरास लढाई करीत करीत गेले.शके १५४८ क्षयनाम सवतसरे फ़सली सन १०३६ या साली तेथे जाऊन सुलतान महमदशहा पातशहा याची व शहाजीराजे या उभयतांचे भेटीचा समारंभ जाहला."
"शेडगांवकरांच्या बखरीतील काही गोष्टी चुकीच्या ठरतील.कालाची संगती त्यात कोठे कोठे बरोबर रहिलेली नाही.बखर लिहिणार्यास गोष्टी जशाजशा आठवल्या तसतशा त्याने त्या लिहिल्या आहेत.तथापि शेडगांवकरांचा राजघराण्याशी निकट संबंध होता. व निशाण बदलण्याची गोष्ट सर्व घराण्यांत घडून आल्याने तिची माहीती कर्णोपकर्णी सर्व भोसल्यांना असलीच पाहिजे.आपले निशाण पुर्वी कसले होते आणि ते पुढे काय कारणाने केंव्हा बदलले ही माहीती बापापासून मुलाला व आजापासून नातवाला मिळणे साहजीकच आहे.मुळचे निशाण उदेपुरचे पाचरंगी होते.पण शंभुप्रसादानंतर ते भगव्या रंगाचे शहाजीने केले असेही ही बखर सांगते."
शहाजी राजांना शंभु महादेवाची भक्ती विशेष होती असे दिसते.म्हणूनच त्यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव शंभु ठेविले.यापुर्वी या घराण्यात शंभु हे नाव आढळत नाही.दुसरा पुत्र शिवाजी यांचेही नाव शिव हे शंभुमहादेवाचेच आहे. नामदार भास्करराव जाधव यांनी शहाजीराजांनी हे भगवे निशाण स्वीकारले तो प्रसंग किती आणीबाणीचा होता ते वर्णन करून संकटकाली कुलस्वामीचा प्रसाद म्हणूनच भगव्या निशाणाची उत्पत्ती झाली असे लिहिले आहे.पुढे ते लिहितात की "विजापुरच्या अदिलशहाची भेट सन १६२६ मध्ये झाली असे का.स.प.या. पान.४१०  यावरून उघड होते. यापुर्वी थोडेच दिवस भगवे निशाण शहाजी राजांनी सुरु केले होते.म्हणून शहाजींच्या पुणे व सुपे जहागिरीत हे निशाण शिवजन्माच्या अगोदरच फ़डकू लागले होते.शिवाजी राजांस बालपणापासूनच भगव्याचा अभिमान वाटत होता व त्याच निशाणाखाली लढून त्यांनी व त्यांच्या सरदारांनी हिंदुपदपातशाही स्थापना केली."
"राज्याभिषेक करूण घेतांना छत्र,चामर,सुर्यपान,सिंहासन वगैरे राजचिन्हे धारण करावी लागली.त्यावेळी छत्रपतींच्या उच्च दर्जास साजेल असा जरीपटकाही स्वीकारला.पण भगवे निशाण हे आपल्या कुलस्वामींच्या स्मरणार्थ आहे व तय त्या कुलस्वामींच्या प्रसादाच्या दिवसापासून आपल्या घराण्याचा खरा उदय झाला ही गोष्ट स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांनी भगवा झेंडाही चालू ठेवला.सध्या मोठया समारंभाच्या वेळी जरीपटका भगव्या झेंड्याबरोबरच मिरवण्यात येतो.कायम सतत फ़डकणारे निशाण भगवा झेंडाच आहे."
"तंजावरसही मुळापासून भगवा झेंडाच फ़डकतो ही गोष्ट विशेष विचार करण्यासारखीच आहे.भगवा रामदासांच्या आज्ञेने शिवछत्रपतींनी सुरु केला असता तर तो तंजावत मध्ये फ़डकणे संभवनीय नाही.तंजावर शिवरायांच्या अंमलात केंव्हाही नव्हते, व व्यंकोजीराजे हे आपल्या वडील भावाचा नेहमीच मत्सर करीत.म्हणून त्यांचे निशाण तंजावरास टिकणे शक्य नाही.यावरून भगवे निशाण शिवछत्रपतींनी सुरु केले नसले पाहिजे.बखरीत वर्णिल्याप्रमाणे शहाजी राजांनी आपले निशाण भगवे ठरविले.याच कारणाने त्यांच्या महाराष्ट्रातील व कर्नाटकातील मुलुखात तेच सर्वत्र प्रचारात आले.शिवाजी व व्यंकोजी या शहाजीराजांच्या मुलांनी त्याचा अभिमान धरून तेच पुढे चालविले.यासाठी हा भगवा झेंडा मराठेशाहीचे निशाण म्हणून शहाजीराजांच्या वेळेपासून सर्वत्र दिसून येत आहे."
यावरून शिवरायांच्या राज्यार्पणाची कथा आणि भगवा झेंडा यांच्या संबंधात रामदासांची किंमत काय आहे हे लगेच दिसून येते.
जय जिजाऊ || जय शिवराय

26 July 2013

॥ फ़ुले-शाहू-आंबेडकर ॥

सामाजिक क्रांतीचे वादळ महात्मा फ़ुले :-
राष्ट्रपिता महात्मा फ़ुले हे जसे अभ्यासक होते तसेच ते प्रबोधनकारही होते.ते भारतीय सामाजिक सुधारणेचे आंदोलन छेडणारे पहिले क्रांतीकारक होते.त्यांचे आंदोलन खर्या अर्थाने मानव मुक्तीचे आंदोलन होते. सामाजिक परीवर्तनासाठी प्रबोधनाची गरज ओळखून त्यांनी आपले लिखाण केले सामान्य जनास सहज समजेल अशा सोप्या व सरळ भाषेत केले म्हणुन महात्मा फ़ुले सामाजिक क्रांतीचे जनक मानले जातात.
धर्मग्रंथातील रुढी,सामाजिम अन्याय,अंधश्रद्धा आणि उच्चनिचतेच्या भेदभावांनी शुद्रातिशुद्रांना व स्त्रियांना गुलाम बनविले म्हणून महात्मा फ़ुलेंनी लेखणीचा आसूड बनवून धर्मग्रंथ आणि चातुर्वण्य व्यवस्थेवर प्रखर प्रहार केले आणि सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
क्रांतीकारी राजपुरुषाचा उदय :-
जोतिराव फ़ुलेंच्या लेखणीच्या फ़टकार्यांनी निर्माण केलेलं वादळ अजुन शमले नाही.कारण दि.२१-११-१८९० रोजी क्रांतीसुर्य मावळल्यानंतर उदयास आलेले करवीर रियासतीचे राजे छत्रपती शाहू महाराजांनी महात्मा फ़ुलेंनी सुरु केलेली "सत्य शोधक समाज" ही क्रांतीकारी चळवळ पुढे चालू ठेवली.राजर्षी शाहू महाराज हे छत्रपती घराण्याचे वंशज होते.ते एक सुंदर  आणि वैभवशाली संस्थानाचे राजे होते.त्यांच्याजवळ सत्तासंपत्ती होती.त्यांना ऐशारामात जीवन जगता आले असते.तरीसुद्धा ते एक क्रांतीकारक कसे बनले ? हे जाणुन घेणे गरजेचे आहे.राष्ट्रपिता महात्मा फ़ुले यांच्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे समाजातील जातीव्यवस्था,अस्प्रुष्यता,उच्चनिचता,शुद्रादिशुद्र आणि स्त्रीयांवर लादलेली गुलामगिरी नाकारणारे क्रांतीकारी राज पुरुष होते.त्यांनी आपले सारे आयुष्य प्रजेच्या हितरक्षणासाठी व्यथीत केले.
अस्प्रुष्याच्या पंगतीत बसून जेवणारे शाहू :-
शाहू महाराज हे केवळ मराठाच नव्हे तर सात्या बहुजन समाजात मिळून मिसळून राहत असे. अस्प्रुष्याच्या पंगतीत बसूण जेवन घॆत.त्यांच्या घरचे ,त्यांच्या हातचे पाणी पीत असत.शाहू महाराजांनी त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करून नोकर्यांमध्ये आरक्षण दिले.ते एवढ्यावरही थांबले नाहीत तर महाराजांनी दुर्गम डोंगराळ भागात राहणार्या आदिवासी लोकांची सक्षम गाठीभेटी घॆतल्या व त्यांच्या अडीअडणींचे निवारणही केले.
महारोग्यांची काळजी घेणारे शाहू :-
        महारोग्यांची परिस्थिती पाहून राजांना दुख: होत असे.म्हणुन त्यांनी महारोग्यांसाठी दवाखाना सुरु केला. ते महारोग्याच्या जवळ बसून त्यांच्या प्रक्रुतीची, त्यांना मिळत असलेल्या औषदाची चौकशी करत असत. एवढेच नव्हे तर रोगमुक्त होणार्या रोग्यांना पोटापाण्याची व्यवस्था देखील करीत होते.
राजर्षी शाहू महाराज लोकराजा या नावाने प्रसिद्ध झाले,त्यांना आपल्या रयतेची विशेष करून अस्प्रुष्य समाजाची जास्त काळजी वाटत असे,कारण अस्प्रुष्य समाजात त्यांची काळजी घॆणारा,त्यांच्या वेदना जाणणारा,त्यांना बरोबर घेऊन जाणारा कोणी दमदार पुढारी दिसून येत नसे.
शाहू-आंबेडकर प्रथम भेट :-
एके दिवशी मुंबईमध्ये शाहू महाराजांनी वर्तमान पत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वाचुन मन प्रसन्न झाले. महाराजांनी तात्काळ डॉ.बाबासाहेबांच्या निवास्थानी सौहार्दपुर्ण भेट दिली.करवीर संस्थानाचे राजे यांच्याशी अचानक भेट झाल्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे उर आनंदाने भरून आले.
शाहू महाराजांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या निवास्थानी जाऊन त्यांची भेट घॆऊन सांगितले की मी आता काळजीमुक्त झालो.अश्प्रुश्यांना त्यांची काळजी घेणारा पुढारी मिळाला.या भेटीला आंबेडकर चळवळीमधील मैलाचा दगड संबोधले तरी वावगे ठरू नये.
फ़ुले-शाहूंचे वारसदार भिमराव :
महात्मा फ़ुले यांनी पेटविलेली सामाजिक क्रांतीची मशाल तेवत ठेवून दि.६/५/१९२२ रोजी छत्रपती शाहूंची प्राणज्योत मावळली.शाहू छत्रपतींच्या नंतर ती क्रांतीज्योत प्रज्वलित ठेवण्याची शक्ती केवळ बाबासाहेबांमध्येच होती आणि फ़ुलेंचा आणि शाहूंचा वारसा भिमरावांनी यशस्वीरित्या पुढे चालू ठेवला.
म्रुत पावलेल्या स्वाभिमानाला जाग्रुत केले:-
डॉ.बाबासाहेब हे एक असे क्रांतीकारक होऊन गेले की ज्यांनी गुलामीच्या विरुद्ध बंड करावे म्हणून गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली.अस्प्रुश्य समाजातील म्रुत पावलेल्या स्वभिमानाला जग्रुत केले आणि वर्णवर्चस्ववादी लोकांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांच्याशी बोलण्याची शक्ती निर्माण करुन चातुर्वण्य व्यवस्थेच्या चिंढड्या चिंढड्या केल्या.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा :-
बहुजन समाजाला या देशाची शासनकर्ती जमात होण्यासाठी "शिका-संघटित व्हा-संघर्ष करा" बाबासाहेबांनी करून दिलेली ही शिकवण विसरून त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर बहुजन समाज दिशाहिन झाला.अशा परिस्थितीत बहुजन चळवळीच्या क्रुतीशील नेत्रुत्वाची जबाबदारी मा.म. देशमुख ते आ.ह.साळूंखे व इतर बहुजन संघटनांनी संभाळली.
भारत हा अनेक जाती,धर्म,भाषा आणि रीतिरिवाजांचा देश आहे.संपुर्ण बहुजन समाज संघटित करणे अशक्य आहे असेच सर्वांना वाटत असे.परंतू संभाजी ब्रिगेड सारख्या संघटनांनी मात्र हा समज चुकीचा ठरविला.त्यांनी सर्व बहुजन समाजास संघटित करून आपल्या कामाची सुरुवात केली.बहुजन समाजासाठी त्यांनी अविश्रांत काम केले.अशा संघटनांची आज गरज आहे.त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा !.