6 January 2016

शिवरायांचे प्रेरक : रामदास स्वामी की तुकाराम महाराज ?

         विश्ववंद्य छत्रपती शिवरायांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन मराठा स्वराज्य स्थापन केले. मराठा स्वराज्य म्हणजे सर्व जाती धर्मातील रयतेच्या आशा आकांक्षा पुर्ण करणारे लोकल्याणकारी राज्य. आजपर्यंतच्या इतिहासात पाहिले तर बर्याच अंशी इतिहासाचा विपर्यास केला गेला आहे. त्यामधील सर्वाच चर्चेचे ठरलेले प्रकरण म्हणजे स्वराज्याचे प्रेरणास्थान. आजपर्यंतचा इतिहास बघितला तर शिवरायांचे प्रेरणास्थान रामदास होते असा गवगवा केला गेला त्याचबरोबर पुरोगामी संघटनांचे म्हणने आहे शिवरायांचे प्रेरणास्थान तुकोबा होते. यातुनच "शिवरायांचे प्रेरक कोण रामदास स्वामी की तुकाराम महाराज" या वादाला परिमाण प्राप्त झाले आहे. वास्तविक इतिहास बघता शिवरायांचे गुरु किंवा प्रेरणास्थान म्हणून रामदासांचा किंवा तुकाराम महाराजांचा एकही उल्लेख सापडत नाही. पण मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर साहेब ज्याप्रमाणे म्हणतात "जेंव्हा जेंव्हा आपल्याकडे कागदोपत्री काही पुरावे उपलब्ध नसतात त्या वेळेस आपल्या  मेंदूचा तार्किक पद्धतीने वापर केला पाहिजे." त्याप्रमाणे चिकित्सा केली पाहिजे.
         क्षत्रियकुलावतंस श्री शिवाजी महाराज भोसले यांच्या पराक्रमास इ.स. १६४० चे सुमारास प्रारंभ झाला असे श्री वि.ल.भावे म्हणतात तर प्रत्यक्ष राज्य स्थापनेला सुरुवात इ.स. १६४५ साली झाली. त्यांची मुद्रा असणारे पहिले पत्र इ.स. १६४६ चे असे नरहर कुरुंदकर म्हणतात आणि ते सभासदाची बखर आणि शिवभारत इत्यादिंशी सुसंगत आहे. यावेळेपर्यंत रामदासस्वामी हे शिवरायांच्या प्रदेशात आलेही नव्हते. वर्णवर्चस्ववादी वि.का.राजवाडे यांनी "राष्ट्रगुरू रामदास" या लेखात छत्रपती शिवरायांच्या एकंदर व्यक्तिमत्वाच्या तसेच स्वराज्याच्या उभारणीत रामदासांचा कसा वाटा आहे हे ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ऐतिहासिक पुराव्यांच्या नावाखाली उत्तरकालीन खोट्या रामदासी बखरींचा संसर्भ देण्यात आला होता. उत्तरकालीन बखरी ह्या सर्वात अविश्वसनीय मानल्या जातात. कारण त्या सर्व पेशवेकालीन आहेत.
       रामदास स्वामी महाराष्ट्रात पहिल्यांदा आले ते इ.स. १६४४ मध्ये. यावेळी महाराष्ट्राच्या ज्या भागात रामदास स्वामींनी वास्तव्य केले तो भाग म्हणजे महाबळेश्वर. त्यावेळी महाबळेश्वर, जावळी वगैरे ठिकाणे ही शिवरायांच्या शत्रुकडे होती. त्यामुळे तिकडे शिवरायांच्या भेटीचा प्रश्नच उद्भवत नव्हता. रामदासी संप्रदायाचा विश्वकोश "दासविश्रामधाम" या ग्रंथाप्रमाणे रामदास पिशाचलिला करत होते. यामुळे त्या काळात ते "पिसाट रामदास" म्हणूनच ते चहुकडे ओळखले जायचे. याच काळात त्यांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली. याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या. दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले. याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले. यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे, शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.
     अर्थात सत्य काय आहे, "शिवरायांच्या स्वराज्य ऊभारणीस ९ वर्षे झाली तोवर रामदासांचे पाऊल शिवरायांच्या प्रदेशातही नव्हते. ते होते शत्रुंच्या प्रदेशात". ज्यावेळी रामदास महाराष्ट्रात आले त्यांच्या आगमनापुर्वी पाच - सहा वर्षापासून तुकाराम महाराजांची किर्ती व वाणी  मात्र सर्वत्र दुमदुमत होती हे बहिनाबाईंचे आत्मचरित्र सांगते. तेंव्हा मावळखोर्यातील लोकांची मनोरचना स्वराज्य उभे करण्याची पुर्व तयारी रामदासांना करता येणे शक्य नसून ते कार्य तुकोबांनीच केले होते हेच निष्पन्न होते. शिवकालीन महाराष्ट्रात झालेल्या क्रांतीचा विचार करणे म्हणजे शिवाजी महाराजांच्या केवळ भौतिक साधनांचा विचार करून चालणार नाही तर त्याकाळी लोकांचा आत्मा कोणत्या स्वरुपाचा होता याचा विचार करणे आवश्यक आहे असे महाराष्ट्रधर्मकार भा.वा.भट म्हणतात. महाराष्ट्रातील साधुसंत यांनी समतेची शिकवण दिली, भजनी मेळावे भरवले, त्यामुळे समाजात चैतन्य निर्माण झाले आणि शिवाजी महाराजांना स्वराज्य संघटना करण्यासाठी जाग्रुत जनतेची बैठक मिळाली. श्री. त्र्यं. शेजवलकर यांनी राज्याची सप्तांगे सांगुण म्हंटले आहे, "शिवाजीने प्रथम शेवटचे अंग जे मित्र ते जोडून घेतले ही गोष्ट कधी साध्य झाली याचा इतिहास अज्ञात आहे. पण त्याने हाती घेतलेल्या कार्यात वाटेल ते परिश्रम करणारे, प्रसंगी जीवावर उदक सोडणारे मित्र त्याला मिळाले हे सर्वात आधी लक्षात घेतले पाहिजे. समाजाची उंची वाढवण्यास शिवाजीला राजकारणापुढे केंव्हाच उसंत मिळाली नाही" मग हे कार्य शिवरायांच्या उदयकाळी कोणी केले ?
       बहुजन समाजास जागरुकतेचा संदेश देऊन समता, बंधुभाव इत्यादी राष्ट्रीय सदगुणांची ओळख करून देण्यास श्री तुकाराम महाराजांची अभंगवाणी कारण ठरली असे किर्तनसम्राट श्री नित्यानंद मोहिते म्हणतात. सर्व संतांमध्ये श्री तुकाराम महाराज यांची कामगिरी विषेश नजरेत भरण्यासारखी आहे. त्यांनी आपल्या भक्तीपुर्ण, रसाळ, सोप्या अर्थपुर्ण अभंगातून जनतेमध्ये जाग्रुती निर्माण केली व म्रुतवत पडलेल्या महाराष्ट्राला अभंगरुपी संजिवनी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. श्री बाळशास्त्री हरदास म्हणतात, "श्री तुकाराम महाराजांमुळेच पंडीत - अपंडीत, शुद्र-अतिशुद्र, यच्चयावत बहुजन समाज देवनिष्ठेच्या आणि धर्मनिष्ठेच्या सुत्रात उपनिबद्ध होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या केंद्राभोवती एकात्म भुमिकेवर आला. श्री तुकारामांच्या ठिकाणी स्वतंत्र संप्रदाय प्रवर्तकाचे सामर्थ्य होते". तर ह. श्री. शेणोलीकर म्हणतात, "धर्माभिमान, स्वामीनिष्ठा, शरीरसुखापेक्षा धर्मनितीचे श्रेष्ठ्त्व, धर्मकर्मापेक्षा चित्तशुद्धीचे व सदाचाराचे महत्व इ. उच्चतर जीवनमुल्यांनी ओळख तुकारामांनी सामान्य जनतेला करून दिली. त्यांच्या या विधायक कार्याने शिवकार्याला उपयोगी असा ध्येयनिष्ठ, सुसंघटित व कार्यक्षम मराठा समाज तयार झाला. त्यात मराठा मावळ्यांच्या बळावर स्वराज्यसंपादनाच्या कार्यात शिवरायांना यशस्वी होता आले".
    मावळ्यांना धर्मवाड:मय कोणतेही माहीत असेलच तर तुकोबांचे अभंगच होय. मावळ्यांना धर्मनीतीव्यवहाराचे मोठे शिक्षण तुकोबांच्या किर्तनातून मिळाले होते हे अमान्य करणे शक्य नाही. समाज हा विराट पुरुष आहे व विराट झालेल्या महात्म्यावाचून त्याला गदगद हालवायला कोणीही समर्थ होत नाही. असे पांगारकरांचे विचार सार्थच आहेत. म्हणूनच श्री ना.ग.जोशी म्हणतात, "महाराष्ट्राची उंची व गौरव वाढविण्याचे ,या राष्ट्रगत व्यक्तित्वाच्या आविष्काराचे कार्य संतश्रेष्ट तुकारामांनी जे केले ते अपुर्व आहे". "एखादा संत म्हणजे नुसता मऊ मेंगुळवाणा माणुस अशी जी समजुत वारकरी संतांबाबत रुढ झाली तिला संपुर्णपणे निरुत्तर करणारा जबाब या विभुतीने केला". कळीकाळालाही पायाशी नमवण्याची अमोघ शक्ती ज्यांच्याजवळ आहे. त्यांच्या मनाची थोरवी केवढी असेल. अशा या विठठलाच्या गाढ्या विरांमध्ये तुकारामांचे स्थान अत्युच्यपदी आहे हे स्वाभाविकच आहे. तुकारामांची उन्नत व्यक्तिरेखा मोठी उठावदार दिसते आणि युगपुरुष त्याला मिळालेले महत्व सार्थ ठरते.
          तुकोबा खरे युगपुरुष होते.समकालीन संत बहिनाबाईंनी त्यांना सर्वद्रष्टा, सर्वांतरसाक्षी, विश्ववंद्य इत्यादी विशेषणे लावली असून रामेश्वरांनी विश्वसखा, सच्चिदानंदमुर्ति इत्यादी पदव्यांनी गौरवले आहे. एवढेच नाही तर त्यांनी तुकोबांचा गौरव करताना म्हंटले आहे, "तुकाराम तुकाराम । नाम घॆता कापे यम ॥ धन्य तुकोबा समर्थ । जेणे केला पुरुषार्थ ॥". अर्थात तुकोबा हेच स्वराज्योदयकाळी वस्तुत: समर्थ म्हणुन सर्वत्र गाजत होते असे रामेश्वरांच्या उद्गारावरून दिसते. या राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत. म्हणजे आपल्या  कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली. अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती ? आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी ? गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता ?
         एक विषेश बाब अशी की, "शिवाजी महाराज नेहमी फ़िरत असून वेळोवेळा तुकारामांचे किर्तन ऐकावयाची संधी साधीत असत. असा इतरत्र स्पष्ट उल्लेख आहे मग अशा वेळी त्यांस दर्शन होत नसे का ?" असे केळुसकर गुरुजी म्हणतात त्यावेळी श्री रा.ग.हर्षे म्हणतात की, "शिवाजी अनेक बार तुकोबांच्या किर्तनाला येत पण एकमेकांच्या प्रत्येक्ष भेटीचा असा प्रसंग कधी आला नव्हता." पण हे म्हणने किती असंभाव्य ठरते ?. बाबा  याकुत सारख्या फ़किराकडे श्रद्धेने जाणारे शिवाजी पुण्यानिकटच्या देहूच्या महाराष्ट्रसिद्ध तुकोबांना विसरतील आणि दिल्लीपर्यंत ख्यात असणार्या शिवयुवकाचे नाव शेजारच्या तुकोबांना ठाऊक नसेल हा सामान्यज्ञानविरोधा कुतर्क कोण मानणार ?
देहू पुणे अन आसपासच्या गावागावात । अहा वसविली श्री तुकयाने भक्तीची पेठ ॥
कीर्ती सकळही शिवरायांच्या श्रवणावर आली । श्रद्धा या सत्पुरुषावर शिवरायाची जडली ॥
हे अगदी स्वाभाविकच आहे.
          आता रामदासांच्या कारकिर्दीकडे वळुया, पुर्वोक्त रामदास हे स्वराज्याचा यत्न केला तेंव्हा महाराष्ट्रातही आले नव्हते. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "शिवाजीच्या स्वराज्य उद्योगाला सुरुवात इ.स.१६४५ ला आणि मुद्रा असणारे पत्र इ.स.१६४६ चे व रामदासी पंथाची स्थापना इ.स.१६४९ ची हा कालानुक्रम समजून घ्यावा. रामदासी पंथ हा आदिलशाहीत स्थापिला गेला व चाफ़ळ देवस्थानचे पहिले विश्वस्त शिवाजीचे शत्रु आहेत. स्वराज्यनिर्मितीची प्रेरणा समर्थांची नव्हे हाच याचा अर्थ." ह.वी राजमाने म्हणतात, "शिवाजीमहाराजांच्या यश-किर्तीचा प्रताप महिमा मध्यान्हीच्या सुर्यापासून तळपत असताना समर्थ पाहत होते. पण त्यांना भेटण्यास जाण्याचे रामदासांनी मनावर घेतलेले दिसत नाही. रामदास ज्या भागात वावरत होते,तो भाग महाराजांच्या शत्रुच्या ताब्यात होता. त्यामुळे शहाणा माणुस तरी विनाकारण विस्तवावर पाय ठेवण्याचे टाळणारच"
रामदास स्वामी आणि शिवरायांची पहिली भेट राज्याभिषेकापुर्वी झाली नव्हती यावर सर्वांचेच एकमत आहे. पण त्यानंतर केंव्हा झाली याबाबतही अस्सल पुरावा उपलब्ध नाही. दि.२२ जुलै १६७२ रोजी दत्ताजी पंत व गणेश गोजदाऊ यांना जी आज्ञा दिली आहे त्यावरून असे दिसते की तोपर्यंत तरी महाराजांचे रामदासांशी जवळकीचे नाते प्रस्थापित झाले नव्हते. शिवसमर्थांच्या जीवनकालातली व नंतरची कागदपत्रे तर शके १५९४ (इ.स.१६७२) नंतर केंव्हातरी भेट झाली असली पाहिजे असे दर्शवणारी आहेत असे प्रा. फ़ाटक म्हणतात. ती भेट झालीच असेल तर पुढे केंव्हाही होवो पण इ.स.१६७२ पर्यंत मात्र झालेली नव्हती हेच इतिहास सांगतो. श्री नरहर कुरुंदकर म्हणतात, "रामदास-शिवाजी भेट झालीच असेल तर ती इ.स. १६७२  साली झाली, हे एक साधे सत्य आहे. पण समजा ही भेट इ.स.१६४५ साली झाली असती तरी त्यामुळे रामदास हा शिवाजीचा राजकीय गुरु व प्रेरक ठरत नाही.
शेवटी येथे चंद्रशेखर शिखरे यांच्या "शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही" या पुस्तकातील उतारा देत आहे.
       "शहाजीराजांचे असामान्य धैर्य, त्यांची स्वतंत्र राज्यकारभार करण्याची व्रुत्ती, त्यांनी मोघलांना दिलेला एक हाती लढा यापासुनच शिवरायांना प्राथमिक प्रेरणा मिळाली. शिवाजीराजांची राजमुद्रा व ध्वज ही शहाजीराजांची देणगी आहे. शिवाजीराजांचे पालनपोषन, संगोपण, त्यांना उत्क्रुष्ठ शिक्षण देण्याची व्यवस्था जिजाऊंनी केली. त्यांनी शिवरायांवर अत्युच्च प्रतिचे संस्कार केले, त्यांच्या मनात स्वतंत्र राज्याचे बीजारोपन केले. हे स्वराज्य अस्तित्वात येण्यासाठी शिवरायांना मार्गदर्शन करून त्यांची खंबीरपणे पाठराखन केली. त्यामुळे जिजाऊ ह्याच शिवाजीराजाच्या प्रेरणास्त्रोत असल्याचे स्पष्ट होते. वारकरी चळवळीच्या व विशेषत: संत तुकारामांच्या प्रबोधन कार्यामुळे शिवाजीराजांच्या स्वराज्यस्थापनेत मदत झाली. त्यांच्या अभंगामुळे समाजजाग्रुती झाली व हजारो मावळे शिवकार्यात सहभागी झाले. या सर्वांचे शिवकार्यात निश्चितच महत्वाचे स्थान आहे. दादोजी किंवा रामदास स्वामी यांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी दुरान्वयानेही संबंध नाही हे सुर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. त्यांनी स्वत:ही असे श्रेय घेतलेले नाही. त्यांच्या जात्यभिमानी अनुयायींनी ओढूनतानून रचलेला हा बनाव आहे. यामध्ये रामदास आणि दादोजी यांच्याच इभ्रतीचे धिंडवडे निघाले आहेत."
   यामुळे या तथाकथित इतिहासचार्यांसाठी रामदासांचा एक सल्ला खुप महत्वाचा आहे किमान रामदासभक्तांनीतर मानलाच पाहिजे.
"अक्षरे गाळून वाची । कां ते घाली पदरची ॥
निगा न करी पुस्तकांची । तो येक मुर्ख ॥"
संदर्भ :
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी (पृष्ट क्र.११) [श्री बाळशास्त्री हरदास],प्राचिन मराठी वाड:मयाचे स्वरुप (पृष्ट क्र.११५) [श्री शेणोलीकर],श्री तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.४१६) [श्री पांगारकर],शिवरायांचे प्रेरणास्त्रोत आणि खरे स्वराज्यद्रोही.(पृष्ट क्र.४४) [चंद्रशेखर शिखरे],श्री दासबोध (२-२-७०) [समर्थ रामदास स्वामी],श्रीमान योगी, प्रस्तावना [श्री नरहर कुरुंदकर],समर्थांचे गुरु छत्रपती,प्रथमाव्रुत्ती(पृष्ट क्र.४५,४६) [ह.वि.राजमाने],छत्रपती शिवरायांची पत्रे (पहिली आव्रुत्ती,पृष्ट क्र.१४९) [श्री प्र.न.देशपांडे],वारसा (पृष्ट क्र.९२) [वि.ल.भावे],श्री समर्थावतार (पृष्ट क्र. १९५) [श्री देव],समर्थ चरित्र (पृष्ट क्र. २९,पृष्ट क्र.१७०) [ज.स.करंदीकर,प्रा.न.र.फ़ाटक],श्री सांप्रदायिक विविध विषय (पृष्ट क्र. ५८)[श्री देव,राजवाडे],श्री सांप्रदायिक वृत्त व चर्चा (पृष्ट क्र. १६)[श्री भा.वा.भट],अस्मिता महाराष्ट्राची (पृष्ट क्र. ६४) [श्री पा.वा.गाडगीळ],श्री शिवछत्रपती (पृष्ट क्र. ८८,९५) [श्री त्र्यं.श.शेजवलकर], श्री संत तुकारामांची राष्ट्रगाथा (पृष्ट क्र.११) [श्री नित्यानंद मोहिते],छ.शिवाजी महाराज (पृष्ट क्र.५३५) [श्री क्रुष्णाराव अर्जुन केळुसकर],सांप्रदायिक विवेचन (पृष्ट क्र.१२१ ते १२३) [श्री ना.ग.जोशी],शिवायन महाकाव्य (पृष्ट क्र.१०७) [श्री ना.रा.मोरे],तुकाराम चरित्र (पृष्ट क्र.९६) [श्री रा.ग.हर्षे].

30 प्रतिक्रिया :

  1. शिवचरित्रात रामदास म्हणजे एक प्रकारचे ब्राह्मणी कारस्थान आहे.रामदास आणि शिवराय यांच्यामध्ये गुरु शिष्य संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासाची महत्वपुर्ण आणि विश्वसनीय साधने म्हणून मान्यताप्राप्त असलेले ग्रंथ परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली,राधामाधवविलासचंपू हे आहेत व सर्वात विश्वसनीय बखर सभासदाची आहे.हे सर्व ग्रंथ शिवकालीण असल्यामुळे प्रमाणग्रंथ माणले जातात.यापैकी कोणत्याही ग्रंथात रामदास किंवा दादोजी कोंडदेव यांचा साधा उल्लेखदेखील नाही.तसेच रामदासी सांप्रदायाचे रामदासकाळात किंवा त्यानंतर लगेच लिहिलेले ग्रंथ म्हणजे दिनकरस्वामींचे "स्वानुभव दिनकर" व "मेरुस्वामीचा रामसोहळा" हे होते.यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख देखील नाही.त्यामुळे गुरुशिष्य संबंध चुकीचा आहे हे सिद्ध होते

    ReplyDelete
  2. समर्थ रामदासांना किंवा दादोजी कोंडदेव यांचे गुरुत्व लुबाडून तुम्ही महापाप करत आहात.इतिहास बदलता येत नाही आपल्याला पाहिजे तसा.ब्राह्मणद्वेष सोडून द्या आणि समाजासाठी काहीतरी करा.शिवरायांनीच रामदासांना गुरुचा दर्जा दिलेला आहे त्या पत्रामध्ये. जय शिवाजी जय भवानी

    ReplyDelete
    Replies
    1. आदेश अंतुलेThursday, 07 January, 2016

      सत्य सांगितले की ब्राह्मणद्वेष का ? शिवरायांनीच रामदासांना गुरुचा दर्जा दिलेला आहे त्या पत्रामध्ये. = हे पत्र बनावट आहे हे अजुन तुला कळाले नाही याचेच आश्चर्य वाटते मला.

      Delete
  3. रामदास स्वामींविषयी आम्हाला अभिमान आहे.ते शिवरायांचे गुरु नसतीलही पण त्यांचे कार्य नाकारता येत नाही.ते भलेहीगुरु नसतील पण शत्रुही नव्हते तुम्ही अभ्यासु आहात सत्य मांडा.

    ReplyDelete
    Replies
    1. आम्ही तेच तर म्हणतोय रामदास शिवरायांचे गुरु नव्हते पण शत्रु होते असे कोण म्हंटलेले आहे इथे ?

      Delete
    2. रामदासांना शिवछत्रपतींचे गुरु व स्वराज्याचे प्रेरक म्हणून दाखवणे ही आणखी एक मोठी लबाडी. या दादोजी व रामदास यांच्या कारस्थानात फक्त पुरंदरेच नाहीत तर अनेक ब्राह्मण इतिहासकार सामील आहेत. रामदासांचे उदात्तीकरण करण्याच्या नादात पुन्हा एकदा धादांत खोटा इतिहास शिवप्रेमींच्या गळ्यात मारण्यात आला.एका पत्रकार परिषदेत स्वत: बाबासाहेब पुरंदरे यांनी स्वत: कबुली दिली आहे की .. “ होय रामदास शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते.” यावर उपस्थित पत्रकारांनी त्यांना विचारले की “ अनेक इतिहासकार तस सिद्ध करत आहेत मग तुम्ही स्पष्ट सांगत का नाहीत हे “ यावर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले. “ ते म्हणतात ते खोट नाही. ते इतिहास जरा ताणतायत. मी रामदासांना संशयाचा फायदा देतोय.” असे चक्क हास्यास्पद उत्तर त्यांनी पत्रकार परिषदेत दिले.हरी नरके याविषयी म्हणतात पहिल्यांदा राजवाडे, ह ना आपटे, बाल टिळक, शक्र श्रीधर देव ,ल रा पांगारकर, अनंत दास रामदासी, न्या रानडे सदाशीव खंडो आळपेकर आदी अनेक मंडळींनी यावर सुपारी घेऊन १८७० ते २००४ अशी तब्बल १३४ वर्षे काम केले. धन्य ती जात निष्ठा ..धन्य तो वर्चस्ववाद.

      Delete
  4. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवराय यांचा गुरुशिष्य संबंध मानणे हा अत्यंत गंभीर गैरसमज होय. तरीदेखील हा संबंध प्रस्थापित करण्यासाठी काही लेखकांचा सतत आटापिटा चाललेला आहे. समर्थ रामदासांनी खरोखरच शिवरायांना व त्यांच्या स्वराज्यास मदत केली असेल तर शिवभक्तांना रामदासाबद्दल आदरच वाटेल. परंतु रामदासांचे कार्य अगदी उलट असेल तर? तरीही रामदास शिवरायांचे गुरु मानायचे का? रामदास हे ब्राम्हणाना सुधारण्याचे प्रयत्न करत हे कोणीही मान्य करील. आणि ते त्यांच्या दासबोधा मधूनच स्पष्ट होते. त्यांनी इतरांना सुधारण्याचे प्रयत्न केले असते तर फार बरे झाले असते. परंतु रामदासाचे बहुतेक शिष्य ब्राम्हण होते. कारण ब्राम्हण सोडून बाकीचे 'शुद्र'. ब्राम्हण सोडून बाकीच्या जातीत असलेला रामदासाचा एखादा तरी शिष्य दाखवता येईल काय? मग फक्त छत्रपती शिवराय एकटेच कसे शिष्य? महाराष्ट्रातील पंडितांनी शिवरायांना शुद्र ठरवून राज्याभिषेकास विरोध केला तेंव्हा रामदासांनी प्रतिगामी पंडितांची कान उघडणी करून शिवरायांची बाजू का घेतली नाही? रामदास जेथे राहिला ते चाफळ हे गाव शिवरायांच्या राजकीय क्षत्रू बाजी घोरपडे यांचे त्याने शिवरायांच्या या तथाकथित गुरूला जिवंत कसे सोडले? गुरु-शिष्य संबंध स्पष्ट करायला गुरु शिष्याची भेट व्हावी लागते परंतु शिवराय व रामदास यांची उभ्या आयुष्यात कधीही भेट झालेली नाही. किंवा तसा कोणताही पुरावा आज उपलब्ध नाही. हे पुढील भास्कर गोसावी यांनी दिनकर गोसावी यास लिहिलेल्या पत्रात स्पष्ट होते. चे उछःहा होनु पन्नास भिक्षेस मिळाले ते मानाजी गोसावी बराबर पाठवली पावतील. शिवाजीराजे यांचे कडे भिक्षेस गेलो त्यांनी विचारले तुम्ही कोठील? कोण? कोणा ठिकाणी असता? त्यावरून आम्ही बोललो आम्ही रामदासी समर्थांचे शिष्य चाफळास हो. मग ते बोलिले ते कोठे राहतात? व मूळ गाव कोण? त्याजवरून मी सांगितले कि, जांबचे राहणी प्रस्तुत चाफळास मठ करून श्रीदेवाची स्थापना करून उत्सव महोत्सव चालू करून उत्साह करत जावा सांगितल्यावरून आम्ही हिंडत आहो. असे बोलता राजेश्रीनि दत्ताजीपंत वाकेनिवीस यास प्रतिवर्षी श्री उत्साहासाठी दोनशे होनु देत जाणे म्हणून पत्र पाठविले. ते होयास येतील हि विनंती. भास्कर गोसावी आणि दिनकर गोसावी दोघेही रामदासी शिष्यच. त्यात दिनकर गोसावी पट्टशिष्य. भास्कर गोसावींनी दिनकर गोसावीस आपल्या भटकंतीचा अहवाल देण्यासाठीच वरील पत्र लिहिलेले दिसून येते. कारण रामदासांच्या सांगण्यावरून भास्कर गोसावी भिक्षा मिळवण्याच्या हेतूने भटकन्तीस निघाला होता. ह्या भटकंती दरम्यान शिवरायासारख्या राज्याने दिलेल्या भिक्षुकेचा अहवाल आपल्या शिष्यगणातील प्रमुखास कळविणे हे साहजिकच आहे. ज्याने करून हि बातमी रामदासांपर्यंत पोहचावी. हे पत्र १६ फेब्रुवारी १६५८ चे आहे.(फाल्गुन शु.२ शके १५८०) त्या पत्रावरून असा निष्कर्ष निघतो. कि, शिवरायांनी भास्कर स्वामीस विचारले कि, तुम्ही कोण? हे रामदास कुठे राहतात? मूळ गाव कोणते? त्यावर भास्कर स्वामी म्हणाला आम्ही रामदासी शिष्य ते जांब गावचे चाफळास श्री मूर्तीचे मठ स्थापन करून त्यांनीच आम्हाला भिक्षा करून उत्सव करा असे सांगितले. म्हणजे १६५८ पर्यंत खुद्द शिवरायांना रामदास कुठे राहतात व त्यांचे मूळ गाव माहित नव्हते. १६४९ ला जर शिवरायांनी रामदासांचा अनुग्रह घेतला असता तर हे शक्य नव्हते. शिष्याला गुरु संबंधी ओळख नसणे शक्य नव्हते. ह्या वरून शिवरायांनी १६४९ ला रामदासांचा अनुग्रह घेतला नव्हता हे सिद्ध होते. अजून एक बाब म्हणजे १६५८ पर्यंत शिवरायांना रामदास माहित नव्हते. मग वाकेनिविसाने शिवरायांच्या १६४९ च्या अनुग्रहाबद्दल लिहिणे आणि त्याला खरे मानणे मूर्खपणाचे ठरते.

    ReplyDelete
  5. इतिहासकार न.र.फ़ाटक यांनी "विविध-ज्ञान विस्तार" या मासिकात जुलै १९२९ च्या अंकात "रामदास आणि शिवाजी" हा प्रदिर्घ लेख लिहिला,या लेखात ते म्हणतात,"शिवाजी महाराजांच्या सभासदी बखरीचा कर्ता क्रुष्णाजी अनंत याने शिवाजी महाराजांच्या कार्यात प्रत्येक्ष भाग घेतला होता.अर्थात तो समकालीन होता परंतू त्याच्या बखरीत रामदासाचा मुळीच उल्लेख नाही.९१ कलमी बखरीत रामदासाचा निर्देश नाही.स्वानुभाव दिनकर या ग्रंथाचे कर्ते दिनकर स्वामी हे रामदासांच्या शिष्यांपैकी त्यांनी ग्रंथाच्या शेवटी आपल्या गुरुचे जे चरित्र जोडले आहे त्यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही.इतर पुरावे बघितले तरी अशीच परिस्थिती दिसते"

    ReplyDelete
  6. आदेश अंतुलेFriday, 08 January, 2016

    सभासदाला आपल्या बखरीत रामदासाचे नाव कूठेच आणावेसे वाटले नव्हते याचाच अर्थ रामदासांच्या कार्याची विषेश छाप पडली नव्हती.रामदासाला डोक्यावर घेऊन उदो उदो करणे आणि मराठ्यांचे रामदासीकरण करने हे वि.का.राजवाडेने सुरु केले.राजवाडे हा कट्टर रामदासी होता

    ReplyDelete
    Replies
    1. खरं आहे राजवाडे हे वर्णवर्चस्ववादी होते आणि स्वजातीचे अभिमानी होते.स्वत:ला ते रामदासच समजतत होते बहुतेक.त्यांनी वारकरी आणि रामदासींमध्ये दुफ़ळी माजवली.राजवाडे हे कट्टर वर्णश्रेष्ठत्ववादी होते.संत ज्ञानेश्वर आणि तुकोबा तर त्यांना पाण्यात दिसायचे

      Delete
  7. आकाश माळीFriday, 08 January, 2016

    छत्रपती शाहू महाराजांच्या वरील आज्ञापात्रातून स्पष्ट पणे राजश्रींनाही त्या काळी रामदास आणि दादोजींचे गुरु पद म्हणजे ब्राह्मणांची क्लृप्ती वाटत होती असे दिसून येते.. त्या बरोबरच त्यांनी रामदास आणि दादोजी ह्यांच्या गुरुपदाचे संदर्भ मिळत नाहीत असेही वर्णिलेले आहे..व त्या बरोबरच शिवाजी महाराजांचे खरे गुरु हे मौनी महाराज हे होते असेही नमूद केलेले आहे...मौनी महाराजांच्या संदर्भातील अनेक पुरावे ९१ कलमी बखरीत मिळतात

    ReplyDelete
  8. विजापूर दरबारात छत्रपति शहाजीराजांना अफजलखाना मार्फत कैद करणार्या मुरार जगदेव व बाजी घोरपडे यांच्याकडे हा रामदास आश्रयास असे.याच मुरार जगदेवाने पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता.त्यावर पुन्हा बाल शिवरायांनी जिजाऊ,शहाजीराजे व तुकोबारायांच्या साक्षीने सोन्याचा फाळ असलेला नांगर फिरवून पुणे(पुनवडी) पुन्हा वसवले.हा सत्य इतिहास आहे.रामदास,मुरार जगदेव व बाजी घोरपडेचाच नव्हे तर अफजलखानाचा सुद्धा 'गुरु' होता.तर आदिलशहाचाच नव्हे तर, रामदासी इतिहास लिहिला ! मराठ्यांचा अपमान केला !! परडीच्या गडा,ब्रम्हवादी कंडा,सैतानाचा हंडा मोंगलाचा हेर होता साला !! (संदर्भ:-Exposition of cosmic truth,लेखक-वीर उत्तमराव मोहिते.पान.नं.६१)

    ReplyDelete
    Replies
    1. रामदासांनी अदिलशहाच्या मुलुखातील चाफ़ळ येथे श्रीरामाच्या मुर्तीची स्थापना इ.स.१६४८ मध्ये केली.याचवेळी विजापुरच्या सरदारांकडून इनाम जमिनीही मिळवल्या.दियानतराव व बाजी घोरपडे यांनी रामदासांना जमीनी इनाम देऊ करून त्यांचे शिष्यही बनले.याच वेळेस बाजी घोरपड्याने शहाजीराजांना कपटाने पकडून दिले.यावरून स्पष्टच आहे की तेंव्हा शहाजीराजे,शिवाजी महाराज किंवा स्वराज्याशी रामदासांचा यावेळेपर्यंत तरी कुठलाही संबंध नव्हता हेच सिद्ध होते.

      Delete
  9. शिवचरित्रात रामदास म्हणजे एक प्रकारचे ब्राह्मणी कारस्थान आहे.रामदास आणि शिवराय यांच्यामध्ये गुरु शिष्य संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही.शिवकालीन इतिहासाच्या अभ्यासाची महत्वपुर्ण आणि विश्वसनीय साधने म्हणून मान्यताप्राप्त असलेले ग्रंथ परमानंदाचे शिवभारत, जेधे शकावली,राधामाधवविलासचंपू हे आहेत व सर्वात विश्वसनीय बखर सभासदाची आहे.हे सर्व ग्रंथ शिवकालीण असल्यामुळे प्रमाणग्रंथ माणले जातात.यापैकी कोणत्याही ग्रंथात रामदास किंवा दादोजी कोंडदेव यांचा साधा उल्लेखदेखील नाही.तसेच रामदासी सांप्रदायाचे रामदासकाळात किंवा त्यानंतर लगेच लिहिलेले ग्रंथ म्हणजे दिनकरस्वामींचे "स्वानुभव दिनकर" व "मेरुस्वामीचा रामसोहळा" हे होते.यामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख देखील नाही.त्यामुळे गुरुशिष्य संबंध चुकीचा आहे हे सिद्ध होते

    ReplyDelete
  10. रामदासाने शिवरायांच्या कार्याला चालना दिली असे म्हणण्यापेक्षा तुकाराम महाराजांनी वाट तयार करून ठेवली असे म्हणने वस्तुस्थितीला धरून होईल

    ReplyDelete
  11. धीरज खराडेSaturday, 09 January, 2016

    एकोनिसाव्या शत्काच्या आरंभी चिटनिसाने आपल्या बखरित रामदासला आणिले ब्राम्हनाभिमानी सनातन पक्षाने राम दासा ला पुढे केले,नको असलेल्या लोकांचे नको असलेले मत जनते समोर येवूच नये.अशी योजना कर न्यात ब्राम्हण आजतागायत यशस्वी झाले आहेत,पन हे किती दिवस चालायचे ?रामदास हा शिवरायांचा गुरु तर नव्हताच उलट तो आदिलशहाचा हेर होता. रामदासाने आदिलशहास अर्जी केली होती की शिवरायाँच्या राज्याची धुलधान व्हावी

    ReplyDelete
  12. पाटील तुम्हचा समर्थांवर काय राग आहे समजत नाही राव.मुळात हा विषय सगळ्यात जातीयवादींना पाहिजे आहे मग ते भ्रष्ट ब्राह्मण असो वा धर्मद्रोही ब्रिगेडी.पण तुम्ही अभ्यासक आहे ब्राह्मणविरोधी काही लेख आहेत पण ब्रिगेडच्या पातळीवर नाही.समर्थ थोर संत होते यात शंका नाही पण अशा आरोपांनी त्यांना बदनाम करणे कितपत योग्या आहे ? हा वाद अजुन किती दिवस चालणार आहे ? आज देशाची आणी शेतकर्यांची काय परिस्थिती आहे सर्वच जाणुन आहेत पण कोणाला पडलीये इथे ? जो तो आपापल्या फ़ायद्यात रमलाय. एकत्र येऊ काहीतरी तोडगा काढू या सर्व समस्येवर.

    ReplyDelete
    Replies
    1. राग असण्याचं काहीच कारण नाही.मी समर्थांचे साहित्य वाचले आहे.दासबोध वाचला अहे काही निवडक ब्राह्मणीवर्चस्ववादी श्लोक सोडले तर खुप छान आहे साहित्य.रामदास स्वामी संत होते किंवा नाही याने शिवरायांच्या गुरुत्वाचा प्रश्न सुटत नाही.आम्ही एवढंच म्हणतो की रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते.बाकी त्यांच्या वयक्तिक जीवनाशी आम्हाला काही देणं घॆणं नाही.

      Delete
    2. आदेश अंतुलेSunday, 10 January, 2016

      रामदास आणि शिवरायांमधील गुरुशिष्य संबंध म्हणजे कल्पोकल्पित आहेत.एकाही विश्वसनीय साहित्यात याचा उल्लेख नाही.पण रामदास्यांनी हे गुरुशिष्य नाते दाखवण्यासाठी भारुडे रचली आहेत.

      Delete
  13. केशव राव ठाकरे म्हणतात - शिवाजीला गोब्राह्मण प्रतिपालक ठरविण्याचा बूट ब्राह्मणांनी रचला. शिवाजीच्या पत्रव्यवहारात गाई आणि ब्राह्मण यांना स्थान न्हवते.

    ReplyDelete
  14. रामदासी बखरीत बरेच विकृत लेखन शिवाजी महाराजान बद्दल आलेले आहे....त्या बद्दल नरहर कुरुंदकर ह्यांचे मत बघुयात.....
    एका रामदासी बखरीत म्हटले आहे कि, शिवाजीची आपणावर निष्ठा किती , हे पाहण्यासाठी स्वामींनी एकदा राजाची पत्नीच शृंगारून पाठविण्यास सांगितले. राजेही असे स्वामीभक्त कि, त्यांनी तत्काळ पत्नी शृंगारून पाठविली. समर्थांनी आशिर्वाद्पूर्वकराजपत्नीची परत पाठवणी केली व राजाच्या निष्ठेची प्रशंसा केली. हि कहाणी का नको? अशी आख्यायिका सांगणारे एकमुर्ख व त्या ग्रंथबद्ध करून ठेवणारे शतमूर्ख. ह्या दंत कथा दोन्ही महापुरुषांची बदनामीच करतात, इतकेही त्यांना कळले नाही

    ReplyDelete
  15. अफजलखानाच्या वधापुर्वीचे म्हणजे १८ फेब्रुवारी १६५९ चे भास्कर गोसाव्याचे. दिवाकर गोसाव्यास आलेले पत्र उपलब्ध आहे. ते पुढीलप्रमाणे - मी शिवाजी राजेस भेटीस गेलो होतो. त्यांनी विचारले. 'तुम्ही कोणकोणत्या ठिकाणी असता?' आम्ही रामदासी श्री समर्थांचे शिष्य - चाफलास राहतो' .....ते कोठे राहतात?' .......याचा सरळ अर्थ या वेळेपर्यंत शिवाजींना रामदास हे कोण माहित न्हवते.,. पुढे केव्हा तरी रामदास महाराजांची भेट घ्यायला आले असतांना रामदास शिवाजींना खालील वाक्ये टोचून बोलले, 'तुमचे देशी वास्तव्य केले पण वर्तमान नाही घेतले' हे स्वतः रामदासाच म्हणतात. असे असतांनाराज्यारोहानाआधी रामदासाची गाठ कादंबरीत लिहून त्यात घालणे किती कृतघ्नपणा!!...

    ReplyDelete
  16. सध्या फेसबुकवर ब्रिगेडी लोक शिवा तुझे नांव ठेविले पवित्र /छत्रपती सूत्र विश्वाचे हा अभंग संत तुकारामांनी शिवाजी महाराजांसाठी रचलेला आहे असे सांगून,शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी संत तुकारामांनी दिली असे सांगत आहेत.मी सम्पूर्ण गाथेत शोध घेतला.तुकाराम गाथेत शिवाजी महाराजांचे नांव असलेला एकही अभंग नाही

    ReplyDelete
    Replies
    1. आदेश अंतुलेSaturday, 09 January, 2016


      तुकाराम महाराज१६४९ साली गेले.त्यांनी शिवरायांना एक उपदेश केला "राया छत्रपती ऎकावे वचन । रामदासी मन लावी वेगी ॥ १ ॥" १६४९ पर्यंत रामदास स्वामी स्वराज्यात नव्हते.याचा अर्थ छत्रपती ही पदवी तुकोबांनी दिली आणि जर रामदासांनी जर ही पदवी दिली असेल तर हा उपेश काल्पनिक आहे.

      Delete
    2. राष्ट्रपुरुषाच्या महत्कार्याचा गौरव त्यांचे काळीच सतजन करीत.म्हणजे आपल्या कार्याची फ़लश्रुती तुकोबांना आपल्या चाळीसीतच पाहायला मिळाली.अशा परिस्थितीत शिवरायांना कोणाकडेही पाठवण्याची तुकोबांना काय आवश्यकता उरली होती ? आणि कोणत्या विषेश प्राप्तव्यासाठी ? गेली कित्येक वर्ष शुन्यातून स्रुष्टी उभी करणार्या शिवबांना खास कोणता मंत्र मिळवायचा राहिला होता ?
      असे लिहिण्यामगे माझा हाच उद्देश होता.तुकोबांचा हा अभंग खरा असेल तर छत्रपती पद त्यांनीच उल्लेखले असे म्हणावे लागेल नाहीतर अभंग खोटा आहे हे मान्य करावे लागेल.असा कोणताही उपदेश तुकोबांनी शिवरायांना दिलेला नव्हता हेच सत्य आहे.

      Delete
    3. प्रस्तुत अभंग क्षेपक आहे. म्हणजे तो गाथेमध्ये नाही. असे कितीतरी अभंग गाथेमध्ये नाहीत. अजुन हजारो अभंग गाथेत समाविष्ट नाहीत

      Delete
  17. "तुकारामाने शिवाजीस रामदासांचा उपदेश घेण्याविषयी सांगितले. हीही थापच. रामदासी संप्रदाय १६४९ ला कायम झाला. चाफळच्या पंचक्रोशीबाहेर तुकारामांच्या हयातीत रामदासांचे नाव गेले न्हवते." - नरहर कुरुंदकर...
    रियासतकार सरदेसाई यांनी दिलेली माहिती,- 'रामदासाची व महाराजांची राज्यारोहानापुर्वी गाठही पडली न्हवती व ओळखही न्हवती, हे पुराव्यानिशी सिद्ध होते - १६५९ नोव्हेंबरला अफजलखानाचा वाद झाला.

    ReplyDelete
  18. रणजीत पाटीलSunday, 10 January, 2016

    गोविंद चिमणाजी भाटे म्हणतात, '- शिवाजी महाराजांनी रामदासाची गाठ पडण्यापूर्वीच स्वराज्याची स्थापना केली होती. तोपर्यंत शिवाजी महाराजांनी ज्या संघटना बांधल्या, छापे घातले, लढाया केल्या, किल्ले हस्तगत केले. जगाला थक्क करणारी रणनीती व राजकीय मुत्सदेगिरी दाखविली, तिचा व रामदासांचा काडीचाही संबंध न्हवता.'
    * प्रा. न.रा. फाटक म्हणतात,'शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रेरणा कोणाकडूनही घेतली न्हवती,. परिस्थितीनेच त्यांना प्रेरणा दिली..
    * डॉ . आंबेडकर चरित्र, कीर, पान १४४ - ' रामदासाची सामाजिक भूमिका माणसाची मूल्य ओळखणारी नसून ती ब्राह्मणांची वर्ण वर्चस्वाची नि ब्राह्मण जातीची महती गाणारी होती. रामदासी पंथांचे लोक तर पहिल्यापासूनच जातीदुराभिमानी व कडवे म्हणून प्रसिद्ध आहेत'.
    * आचार्य भागवत म्हणतात,'- शिवाजीच्या कर्तुत्वाचा उगम रामदासांकडे आहे, असे म्हणणे निराधार आहे. शिवाजीचे कर्तुत्व पाहूनच रामदासला राजकीय विचार सुचले, ऐरवी सुचले नसते.
    * डॉ . पवार, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ म्हणतात,'-शिवाजी महाराजांना रामदासांची शिकवण होती, हि गोष्ट संपूर्ण निराधार आहे. ज्यांना शिवाजी महाराजांचे मोठेपण खपत नाही व ज्या वर्गाने त्यांच्या हयातीत त्यांना त्रास दिला , तोच वर्ग अद्याप हा उपहासाच करीत आहे. रामदासांची शिकवण शिवाजीने घेतली असती तर महाराष्ट्राने ऐक्य त्यांना केव्हाच साधता आले नसते.

    ReplyDelete
  19. संदिप गायकवाडSunday, 10 January, 2016

    एकोनिसाव्या शत्काच्या आरंभी चिटनिसाने आपल्या बखरित रामदासला आणिले ब्राम्हनाभिमानी सनातन पक्षाने राम दासा ला पुढे केले,नको असलेल्या लोकांचे नको असलेले मत जनते समोर येवूच नये.अशी योजना कर न्यात ब्राम्हण आजतागायत यशस्वी झाले आहेत,पन हे किती दिवस चालायचे ?रामदास हा शिवरायांचा गुरु तर नव्हताच उलट तो आदिलशहाचा हेर होता. रामदासाने आदिलशहास अर्जी केली होती की शिवरायाँच्या राज्याची धुलधान व्हावी,

    ReplyDelete
  20. माझ्या मते त्या काळातील ब्राम्हण/रामदासी लोकांनी रामदासांचा खरा चेहरा म्हणजेच आदिलशाही सोबत असलेले संबंध लोकांसमोर येऊ नये म्हणून रामदास छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याचे दाखवले असेल

    पण खरा इतिहास कधीही लपणार नाही याचे भान मात्र हे रामदासी लोक विसरून गेले.

    ReplyDelete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.