29 October 2012

समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज

           संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत. त्यांचं कर्त्रुत्व महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उत्तर- वायव्य भारतापर्यंत आपला ठसा उमटवून गेले."नाचू किर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी ॥" यांसारख्या शब्दांनी समाजात समतेच्या मार्गाने ज्ञानदीप लावण्याचा ध्यास घेतलेल्या संर नामदेव महाराजांनी भाषा,प्रांत,धर्म, जातपात या पलीकडे जाऊन समाज जीवणाचा विचार केला.त्यामुळे संत नामदेव महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता पंजाबमधील शिखांनाही तितकेच पुज्य ठरतात.प्रतिकुल ,राजकीय, सामाजिक अन धार्मिक आतावरणात मराठी आणि अन्य प्रादेशिक लोकजीवनाला नवे वळण लावण्याचे कार्य ज्या काही थोर संतांनी केले त्यांचे अग्रणी संत नामदेव महाराज होते.
                 मध्ययुगीन समाज जीवन प्रामुख्याने धर्मप्रधान होते.पण कर्मकांड आणि विधिनिषेद यांचे स्तोम फ़ार माजलेले होते. वर्णाश्रमाच्या धोरणामुळे उच्चवर्णीय समाजामध्ये अराजकता निर्माण झाली होती.धार्मिक संस्कार तेच करायचे ज्ञान , अध्ययन, अध्यापन, धनसंचय, शस्त्र धारण करण्याचा अधिकार त्यांनाच होता.तसेच मंदिर प्रवेश ,सार्वजनिक पाणवठे इत्यादी ठिकाणी पाणी भरण्याचा अधिकार अस्प्रुष्यांना नव्हता.हळूहळू या रुढींनाच धर्माचे महात्म्य प्राप्त होत गेले आणी समाजात भयानक अज्ञान आणि अंधश्रद्धाचे स्तोम माजले होते.
           या पार्श्वभुमीवर २६ ऑक्टोंबर १२७० रोजी नामदेव महाराजांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झाला.संत नामदेव केवळ भक्तिभावाची (काव्य) गाणी लिहिणारे नव्हते तर समाजात समता प्रस्थापित करण्यात आणि समाज प्रबोधन करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.भेदाभेदांनी विदीर्ण (भग्र) झालेल्या भारतीय समाजात संत नामदेवांनी लोकनिंदेचा विचार न करता समतेची बीज रोवून विषमतेवर प्रहार केला.विसोबा खेचरांना गुरु मानणार्या  संत नामदेवांनी जेंव्हा संत चोखोबांच्या परिवारावर आपत्ती आली तेंव्हा ते मंगळवेढ्याला गेले आणि त्यांच्या (चोखोबांच्या) अस्थी स्वत: आणून सनातन्यांच्याच नगरीत खुद्द पंढरपुरच्या विठ्ठ्लाच्या पायरीशी संत नामदेवांनी चोखोबांच्या स्म्रुतीमंदिरांची निर्मीती केली.
           संत नामदेवांनी नेहमी जातीनिरपेक्ष धार्मिक लोकशाहीचा पुरस्कार केला ते एक प्रतिभासंपन्न कवी व संगीताचे चांगले जाणकार होते आणि कीर्तन कलेवर त्यांचे प्रभुत्व होते.संत नामदेवांनी त्रिप्रकरणात्मक, चरित्र, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आख्यानक रचना,प्रवास वर्णन, काव्य, कुटरचना,लोक कविता, भाव आणि भक्तीपर कविता,सश्यूकुडी वाणीतील हिंदी रचना अशी त्यांनी वैविध्यपुर्ण वाड:मय संपदा लिहिली.
           संत नामदेव महाराजांनी संपुर्ण भारतभर ५४ वर्ष फ़िरून समाजात समता प्रस्थापित करण्याचा अथक प्रयत्न केला.८० वर्षाचे वय झाल्यावर त्यांनी इहलोकाचा निरोप घॆण्याचे ठरविले आणि ३ जुलै १३५० रोजी पंढरपुर इथे विठ्ठ्ल मंदिराच्या महाद्वारात संत चोखोबांच्या समाधी शेजारी समाधी घॆऊन समाजासमोर समतेचा महान आदर्श ठेवला.अशा या महान संत शिरोमणींची २६ ऑक्टॊंबर रोजी जयंती.अशा या समता प्रिय संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांना कोटी - कोटी विनम्र वंदन....

23 प्रतिक्रिया :

  1. छान लेख आहे संत शिरोमणी संत नामदेव यांना प्रणाम !

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !

      Delete
  2. apratim lekh aahe aapalya marathi kattyaavar dhanyawad
    asech prabodhana karat raha ek divas nakkich jagruti hoil
    jay bhim

    ReplyDelete
  3. आपल्या मराठी कट्ट्यावरील सर्व लेख छान आहेत.आज पर्यंत कितीतरी लेख मी वाचलेत आपल्या ब्लोग वरील सगळे वैचारीक आणि अभ्यासपुर्ण आहेत.आपल्यामुळे सर्व वाचकांना चांगले लेख वाचायला मिळतात.खरच आपले काम उत्तम आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद ! आपल्या सारख्या वाचकांमुळेच आम्हाला लिहायला प्रेरणा मिळते

      Delete
  4. नाद खुळा पाटील .आपले काम अगदी चोख आहे बघा असेच लिहित चला आम्ही आपल्याबरोबर आहे.आता हीच वेळ अहे जन जाग्रुतीची आणी संभाजी ब्रिगेड पण आहे आता आपल्या सारख्यांना मदत करायलातेंव्हा आपले कार्य असेच चालू ठेवा.इतिहास लिहिला जाईल तेंव्हा आपल्या सारख्या लेखकांचे नाव नक्की घ्यावे लागेल.

    ReplyDelete
    Replies
    1. राजेश साहेब प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ब्लोग वाचत रहा आणी प्रसार करत रहा.

      Delete
  5. नाद खुळा पाटील
    खरच मस्त लिवलाय लेख .
    आपल्या संत शिरोमणी संत नामदेव यांना कोटी कोटी प्रणाम आणी अभिवादन !!!
    राम - क्रुष्ण- हरी

    ReplyDelete
  6. खुप सुंदर लेख लिहिलात पाटील
    आपल्या ब्लोग आल्यापसून बर्याच गोष्टी समजल्या आणी बर्याच थोर पुरुषांची माहीती ही समजली
    त्याबद्दल आभार...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !
      अहो ते आमचं कामचं आहे अजुन बर्याच गोष्टी समोर यायच्या आहेत.

      Delete
  7. चांगला लेख आहे
    महाराष्ट्राच्या संस्क्रुतीत भर घालण्याचे काम हे संतांचे होते त्यांच्यामुळे महाराष्ट्राची संस्क्रुती सातासमुद्रापलीकडे गेली
    अभिनंदन... अभि..

    ReplyDelete
    Replies
    1. बरोबर बोललात नेहाजी
      डिसेंबर पर्यंत ब्लोग चा व्यवस्थापक मी असेन अभि पाटील यांची परिक्षा चालू आहे.

      Delete
  8. अतिशय उत्कृष्ठ लेख. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे कार्य विश्व दिपवून टाकणारे आहे. आठशे वर्षापूर्वीच ज्ञानाचे महत्व ओळखून 'ज्ञानदीप लावू जगी' असे म्हणत त्यांनी खरोखर भारतभर प्रबोधन केले. तरी एक खंत जाणवत राहते ती म्हणजे नामदेव महाराजांची उपेक्षा होतेय हे नक्की. बाकी आपला प्रयत्न स्तुत्य आहे. अभी पाटील, संदीप पाटील आणि आपले सर्व सहकारी यांना माझ्या शुभेच्छा...

    ReplyDelete
  9. जरा चालू घडामोडीवर काही ब्लोग लिहा.कारण वर्तमानच पुढे इतिहास ठरत असतो.आता चाललेले बामणी षडयंत्र हाणून पडणे गरजेचे आहे.इतिहासात झालेल्या चुका परत घडू नये यासाठी वर्तमनावर लक्ष द्यावे लागेल.कॉंग्रेस.बीजेपी मिळून किती भयंकर षडयंत्र आखत आहेत.याचे भयंकर दुष्परिणाम होणार आहेत.त्यासाठी आताच लक्ष द्यावे लागेल.यांच्या षड्यंत्रात आमचे अनेक भडवे राजकारणी सामील झालेले आहेत.यांनासुद्धा धडा शिकविणे आवश्यक आहे.घटना घडून गेल्यानंतर पश्याताप करण्यापेक्षा ति घटना घडूच न देणे केव्हाही योग्य ठरेल.समोरचे आपले ब्लोग निश्चितच चालू घडामोडीवर आधारित असतील हीच अपेक्षा.

    ReplyDelete
  10. नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस !!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  11. नामदेव : (२६ ऑक्टोबर १२७०–३ जुलै १३५०).
    वारकरी संप्रदायाच्या ज्ञानदेवादी श्रेष्ठ संतकवींपैकी एक. पित्याचे नाव दामाशेटी; आईचे गोणाई. नरसी-बामणी हे त्यांच्या घराण्याचे मूळ गाव म्हणून सांगितले जाते; तथापि हे गाव नेमके कोठले ह्याबद्दल अभ्यासकांत ऐकमत्य नाही. कराडजवळील नरसिंगपूर हेच ते गाव असावे, असे एक मत आहे. नरसी-बामणीचा ‘नरसी-ब्राह्मणी’ असा उल्लेख करून महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे ह्यांनी ते सोलापूरकडचे गाव असल्याचे म्हटले आहे; तथापि असे गाव सोलापूर जिल्ह्यात नाही. मराठवाड्यात नरसी आणि बामणी अशी दोन गावे आहेत. त्यांतील अंतरही फारसे नाही. नरसी ह्या गावाजवळच नामदेवांची समाधी व देऊळ आहे. ह्या गावी त्यांच्या घराची जागा दाखविली जाते. त्यांचे आजोळ कल्याणी किंवा काणणी हेही ह्याच परिसरातले. नरसी आणि बामणी ही दोन स्वतंत्र गावे असली, तरी त्यांचा उल्लेख एकत्रच केला जातो. हे लक्षात घेऊन नामदेवांची नरसी-बामणी ही ह्या दोन गावांत सामावलेली असावी, असे सामान्यतः मानले जाते. नामदेवकृत म्हणून समजले जाणारे एक ‘आत्मचरित्र’ नामदेवांच्या संकलित गाथ्यात अंतर्भूत आहे. त्यात "गोणाई दामाशेटी झाले पाणिग्रहण । संसारी असोन नरसी गावी ।।" असा निर्देश सापडतो.

    नामदेवांचा जन्म नरसी-बामणीचा, की पंढरपूरचा ह्यासंबंधीही वाद आहे. वि. ल. भावे व महाराष्ट्रकविचरित्रकार ज. र. आजगावकर ह्यांच्या मते नामदेव नरसी-बामणी येथेच जन्मले; तथापि नामदेव पंढरपुरी जन्मल्याचा निर्वाळा बहुतेक प्राचीन संतचरित्रकारांनी दिलेला आहे. एकनाथांनी लिहिलेल्या नामदेव-चरित्रावरून नामदेवांच्या आईने पुत्रप्राप्तीसाठी पंढरीच्या विठोबास नवस केला होता आणि त्यापूर्वीच नामदेवांचे आईवडील पंढरपुरात येऊन राहू लागल्याचे दिसते. नामदेवांचे बालपण पंढरपुरात गेल्याचेही ह्या चरित्रात नमूद आहे.CONTD........

    ReplyDelete
  12. नामदेवांच्या नावावर मोडणारे उपर्युक्त ‘आत्मचरित्र’ हा नामदेवांचे चरित्रविषयक तपशील जाणून घेण्याच्या दृष्टीने उपयोगात आणला जाणारा एक मुख्य आधार आहे. त्यानुसार असे दिसते, की नामदेवांच्या घरचा व्यवसाय शिंप्याचा होता. ‘शिंपियाचे कुळी जन्म मज झाला’ असे त्यात म्हटले आहे. नामदेवांच्या घरात विठ्ठलभक्तीचे वातावरण होते. नामदेवांनाही बाळपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ लागली. एकदा विठ्ठलासाठी नैवेद्य घेऊन देवळात गेलेले नामदेव देव नैवेद्य खाईना, म्हणून त्याच्या पायांवर डोके आपटून प्राण द्यावयास निघाले आणि भक्तवत्सल देवाने त्यांची ही भक्ती पाहून नैवेद्य आनंदाने खाल्ला, अशी आख्यायिका आहे. नामदेवांचा विवाह राजाई नावाच्या स्त्रीशी झालेला होता आणि तिच्यापासून त्यांना नारायण, महादेव, गोविंद आणि विठ्ठल असे चार पुत्र झाले; लिंबाई नावाची एक मुलगी झाली. विठ्ठलभक्तीमुळे नामदेव उत्तरोत्तर विरक्त होत चालले. घरातील परिवार मोठा होता. त्याची जबाबदारी नामदेवांनी घेतली पाहिजे, असे त्यांच्या मातापित्यांस वाटे. त्यामुळे नामदेवांच्या विठ्ठलवेडाला त्यांच्या घरातून विरोध होऊ लागला. नामदेव भक्तीपरमार्थाच्या मार्गावरून ढळले नाहीत; उलट हे कुटुंबच भक्तिमार्गाशी समरसले.

    सुमारे १२९१ मध्ये नामदेवांची ज्ञानदेवांशी भेट झाली असावी. आपली भक्ती गुरूपदेशावाचून अपुरीच आहे, ह्याची जाणीव ह्या भेटीनंतर त्यांना झाली आणि त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला; त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. अशी आख्यायिका आहे, की नामदेव विसोबांना भेटावयास गेले असता, विसोबा शंकराच्या देवळात पिंडीवर पाय ठेवून निजले होते. ते दृश्य पाहून नामदेवांना चीड आली व त्यांनी विसोबांची निर्भर्त्सना केली; परंतु विसोबांनी देव नसेल तेथे माझे पाय उचलून ठेव, असे म्हटल्यावर ‘देवाविण ठाव हे बोलणेचि वाव’ हा विचार नामदेवांच्या मनाला भिडला. गुरूपदेशामुळे त्यांचा अहंकार नष्ट झाला. विशुद्ध भक्तीला अद्वैतबोधाचे अधिष्ठान प्राप्त झाले.
    CONTD.........

    ReplyDelete
  13. पुढे श्रीज्ञानदेव पंढरपूर येथे आले आणि ‘भूतळीची तीर्थे पहावी नयनी’ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. ‘सर्व सुख आहे मज पांडुरंगी’ अशीच नामदेवांची धारणा असल्यामुळे तीर्थयात्रा करण्याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती; परंतु अखेरीस ते ज्ञानदेवांबरोबर निघाले. महाराष्ट्रातील अनेक संत ह्या तीर्थयात्रेत सामील झालेले होते. भारतातील अनेक तीर्थे त्यांनी पाहिली. ह्या तीर्थयात्रेहून परतल्यानंतर ज्ञानदेवांनी लवकरच समाधी घेतली (१२९६). तो प्रसंग नामदेवांनी पाहिला. नामदेव त्या वेळी अवघे सव्वीस वर्षांचे होते आणि त्यानंतर आपल्या आयुष्याची उर्वरित ५४ वर्षे त्यांनी भागवत धर्माच्या प्रचारासाठी वेचिली. ‘नाचू कीर्तनाचे रंगी । ज्ञानदीप लावू जगी’ ही त्यांची भूमिका होती. नामदेवांच्या चरित्राचे आणि कार्याचे एक अभ्यासक ग. वि. कविटकर ह्यांनी असे मत मांडले आहे, की ह्या दीर्घ कालखंडात नामदेवांनी भारतभर अनेक पदयात्रा केल्या; दक्षिणेतील श्राशैलशिखर, अरुणाचल, चिदंबरम्, विष्णुकांची, रामेश्वर आदी ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या होत्या; त्यांच्या प्रभावामुळे दक्षिणेतील दर्जी ही जात स्वतःला नामदेव म्हणवून घेऊ लागली, तर भूसागर आणि मल्ला ह्या जातींनी ‘नामदेव’ हे आपल्या जातीचे एक पर्यायी नाव म्हणून स्वीकारले; गुजरात, सौराष्ट्र, सिंधुप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश येथेही नामदेवांचे वास्तव्य झाले होते. लोकजागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी विविध प्रदेशांतील भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या, असेही कविटकर ह्यांचे प्रतिपादन आहे.

    नामदेव उत्तर भारतात गेले असल्याची प्रमाणे अनेक प्रकारे मिळतात. विशेषतः पंजाबातील त्यांच्या वास्तव्याची व कार्याची जाणीव आजही ठळकपणे मिळते. ‘नामदेवजीकी मुखबानी’ म्हणून प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील ६१ पदे शिखांच्या ग्रंथसाहिबात अंतर्भूत आहेत. त्यांतील ३ विवक्षित पदे अन्य कवींची आहेत, असे एक मत आहे. नामदेवांच्या हिंदीवर मराठीची छाप तर आहेच; परंतु व्रज, अवधी, राजस्थानी अशा भाषांचेही संस्कार आहेत. व्रजादी भाषा बोलणाऱ्या प्रदेशांत त्यांचे वास्तव्य झाल्याचे आणि त्यांनी ह्या भाषा निदान काही प्रमाणात आत्मसात केल्याचे हे द्योतक आहे. नामदेवांची सु. सव्वाशे हिंदी पदेही आता उपलब्ध झालेली आहेत. विष्णुस्वामी, बहोरदास किंवा बोहरदास, जाल्लो, लब्धा, केसो कलंधर किंवा कलधारी ह्यांसारखे अनेक शिष्य नामदेवांना पंजाबात मिळाले. त्यांपैकी जाल्लो किंवा जाल्हण सुतारासारखे काही शिष्य नामदेवांसोबत पंढरपूरला आले. केसो कलधारी ह्याने भावलपूर संस्थानात भागवत धर्माची ध्वजा फडकविली. तेथे ‘कलधारिकी गद्दी’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेला त्याचा आश्रम तसेच त्याची समाधीही आहे. नामदेवांची अनेक मंदिरे आज पंजाबात पहावयास मिळतात. पंजाबातील गुरदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान गावी असलेले मंदिर (गुरुद्वारा बाबा नामदेवजी) प्रसिद्ध आहे. नामदेवांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारले, असे म्हणतात. प्रतिवर्षी माघ शुद्ध द्वितीयेस येथे मोठी यात्रा भरते. राजस्थानात आणि उत्तर प्रदेशातही नामदेवमंदिरे आहेत. उत्तर भारतातील रैदास (रविदास किंवा रोहिदास), धना, रज्जब, तुलसीदास, पीपा, रामानंद, कबीर आदींनी नामदेवांचा उल्लेख केलेला आहे. गुजरातमधील विख्यात संत नरसी मेहतांनीही आपल्या काव्यातून नामदेवांचा निर्देश अनेकदा केलेला आहे. देवाने नामदेवांच्या घराचे छप्पर शाकारले, असे राजस्थानातील संत मिराबाईंनी आपल्या एका कवनात म्हटले आहे. उत्तर भारतात प्रसिद्धी पावलेले नामदेव हे दुसरेच कुणी नामदेव असावेत, ही शंका विविध अभ्यासकांनी साधार खोडून काढलेली आहे. ग्रंथसाहिबातील पदांवरील मराठीची छाप, त्यांत येणारा ‘बीठलु’ हा विठ्ठलवाचक शब्द, नामदेवांच्या रूढ चरित्राशी मिळतेजुळते असे ह्या पदांतून येणारे काही उल्लेख पाहता पंजाबात गेलेले नामदेव कुणी वेगळे नव्हते, ही बाब स्पष्ट होते.
    CONTD........

    ReplyDelete
  14. ऐंशी वर्षांचे वय झाल्यानंतर इहलोक सोडून जाण्याचे त्यांनी ठरविले. आषाढ शुद्ध एकादशी, शके १२७२ रोजी विठ्ठलापुढे जाऊन ‘आज्ञा द्यावी’ अशी विनंती केली. त्यानंतर आषाढ वद्य त्रयोदशी, शके १२७२ ह्या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलमंदिराच्या महाद्वारात समाधी घेतली. विठ्ठलदर्शनासाठी येणाऱ्या सर्व संतसज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी, ही त्यांची इच्छा असल्यामुळे महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच हे समाधिस्थान तयार करण्यात आले होते.

    नामदेवांच्या कुटुंबीयांनीही जनाबाईसह ह्याच दिवशी समाधी घेतली, असे म्हटले जाते. नामदेवांची सून लाडाई हिचे नाव शेवटी गुंफलेला एक अभंग मिळतो. त्यातून मिळणाऱ्या वृत्तांतानुसार लाडाई ही ह्या प्रसंगी कल्याणी येथे प्रसूतीसाठी गेलेली होती; त्यामुळे तिला मात्र ह्या भाग्याला वंचित व्हावे लागले. ‘ऐकिला वृत्तांत सर्व जाले गुप्त । माझेंचि संचित खोटे कैसें ।।’ असे उद्गार ह्या अभंगात आढळतात. ‘सर्व जाले गुप्त’ ह्या शब्दांचा आधार उपर्युक्त वदंतेस आहे; तथापि नामदेवांच्या वर्तुळातील एक संत परिसा भागवत ह्यांनी मात्र ह्या प्रसंगाचे वर्णन करीत असताना एकट्या नामदेवांच्या समाधीचाच उल्लेख केलेला आहे. शिवाय ह्या समाधीनंतर नामदेवांचा पुत्र विठा किंवा विठ्ठल ह्याने लिहिलेले काही अभंग आहेत. ‘तळहाताची सावली करून तुमची वंशावळी पोशीन असे वचन, हे पांडुरंगा, तू दिल्याचे आमचे वडील आम्हाला सांगत असत; पण ते तू विसरलास’ अशा आशयाची तक्रार विठाने पांडुरंगाला उद्देशून रचिलेल्या एका अभंगात केल्याचे दिसते. त्यामुळे साऱ्यांनीच समाधी घेतली, ह्या वदंतेत तथ्य दिसत नाही.

    नामदेवांच्या पूर्वचरित्राविषयी वाद आहेत. संत होण्यापूर्वी ते दरवडेखोर होते, असे मत महाराष्ट्रकविचरित्रकार आजगावकरांनी मांडलेले आहे. ह्या मताला नामदेवगाथेतील एका ५६ चरणी अभंगाचा आधार आहे. त्यात नामदेवाविषयी ‘प्राक्तनाचे योगे। भरलासे ओहटा। पाडितसे वाटा चोरांसंगे।। ब्राह्मण, कापडी। गरीब साबडी। केली प्राणघडी बहुतांची।।’ असे म्हटलेले आहे. तथापि हा अभंग त्यात आढळणाऱ्या काही फार्सी शब्दप्रयोगांवरून उत्तरकालीन आणि प्रक्षिप्त वाटतो. नामदेवगाथेत नामदेवांचे आत्मचरित्र म्हणून ओळखले जाणारे १६५ अभंग आहेत. नामदेवांची पत्नी राजाई हिने रुक्मिणीकडे नामदेवांसंबंधी केलेली तक्रार त्यांत आलेली आहे. त्यात राजाई सांगते, की सुई आणि कातर हीच शिंप्याची शस्त्रे असता ‘हा बाण आणि सुरी वागवीतसे’. तथापि उपर्युक्त १६५ अभंगांना नामदेवांचे आत्मचरित्र निःसंदेहपणे म्हणण्यासारखी परिस्थिती नाहीच, हे रा. चिं. ढेरे ह्यांनी दाखवून दिले आहे. वर उल्लेखिलेल्या ५६ चरणी अभंगातच नव्हे, तर ह्या तथाकथित आत्मचरित्रातही अन्य काही ठिकाणीही बरेच फार्सी शब्द आलेले आहेत. शिवाय त्यात एके ठिकाणी नामदेवांच्या तोंडून कबीर आणि रोहिदास ह्या उत्तरकालीन संतांची स्तुती वदविली आहे. त्यामुळे नामदेवांनंतर काही शतकांनी कुणी तरी हे अभंग लिहिले असावेत, असे मत ढेरे ह्यांनी मांडलेले आहे.
    CONTD........

    ReplyDelete
  15. नामदेवांनी शतकोटी अभंग रचण्याची प्रतिज्ञा केली होती, असे म्हटले जाते; तथापि ती त्यांना पूर्ण करता आली, असे दिसत नाही. नामदेवांचे म्हणता येतील असे सु. पाच-सहाशे अभंगच आज उपलब्ध होतात. नामदेवगाथांमध्ये अंतर्भूत असलेले पुष्कळसे अभंग नामदेवांचे वाटत नाहीत. ⇨विष्णुदास नामा नावाचा एक संत सोळाव्या शतकात होऊन गेला. त्याचे पुष्कळसे अभंग नामदेवांचे म्हणून समजण्याची चूक घडत आलेली आहे. नामदेवगाथांत ह्या विष्णुदास नाम्याचे, तसेच ‘नामदेव’ आणि ‘नामा यशंवत’ ह्या दोन अन्य नामदेवांचे अभंगही अंतर्भूत आहेत. आजही खरीखुरी नामदेवगाथा निर्णायकपणे निश्चित करणे अभ्यासकांना शक्य झालेले नाही. अशा ह्या गाथांतून जे अभंग सामान्यतः नामदेवांचे मानले जातात त्यांत ‘आदि’, ‘तीर्थावळी’ आणि ‘समाधी’ अशा तीन प्रकरणांत सांगितलेले ज्ञानेश्वरचरित्र आहे. त्या आधारे ते ज्ञानेश्वरांचे आद्य चरित्रकार समजले जातात; परंतु हे चरित्रसुद्धा खरोखरच नामदेवकृत आहे किंवा काय, ह्याबद्दलही ढेरे ह्यांच्यासारख्या साक्षेपी अभ्यासकांनी शंका व्यक्त केलेली आहे. त्या चरित्राची निवेदनशैली पौराणिक आहे. नामदेवांसारखा समकालीन करणार नाही अशा चुकाही त्यात आहेत. साधी पण भावोत्कट अभिव्यक्ती हे नामदेवांच्या म्हणून मानल्या गेलेल्या बहुतेक रचनांचे वैशिष्ट्य आहे. शब्दकळेचे प्राचीनत्वही ह्या रचनांतून लक्षणीयपणे प्रत्ययास येते. नामदेवांच्या उत्कट ईश्वरभक्तीचा अत्यंत विलोभनीय असा आविष्कार त्यांत आढळतो. पहाटेच्या वेळी चारा आणावयास जाणाऱ्या पक्षिणीची वाट तिचे उपाशी पिलू पाहात राहते; तशीच ईश्वरचरणांची आस आपणास रात्रंदिवस लागली असल्याचे त्यांनी एका अभंगात म्हटले आहे. ‘भेटीलागे माझा फुटतसे प्राण’, असा आवेग व्यक्तविणारे नामदेव प्रसंगी देवावर रुसून ‘पतितपावन नाम ऐकूनी आलो मी द्वारा । पतितपावन नव्हेसी म्हणूनी जातो माघारा’ असे बोलही त्याला ऐकवितात; परंतु देवावरचा त्यांचा रुसवाही भक्तीचे एक निरागस रूप म्हणून पुढे येतो, कारण विठ्ठलाशी त्यांनी जोडलेले नाते मूलमाऊलीचे आहे. ‘तू माझी माऊली मी तुझे वासरू । नको पान्हा चोरू पांडुरंगे।’ असा त्यांचा आर्तोद्गार ह्याच नात्यातून सहजपणे उमटतो. ‘विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन।’ विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ।।’ व ‘विठ्ठलचि पाही सर्वांभूती ’ ह्या शब्दांत त्यांनी आपल्या जीवनाचा आशय सांगून टाकलेला आहे. विठ्ठलाचे हे सर्वांभूती असणे ग्रंथसाहिबात अंतर्भूत असलेल्या आपल्या पदांतूनही नामदेव आवर्जून सांगतात (जत्र जाऊ तत बिठलू भैला). एका पदात आपल्या व्यवसायावर एक रूपक करून त्यातून आपले अंतःकरण हरीशी शिवले गेले असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे (सुईने की सुई रूपे का धागा । नामे का चितु हरि सउ लागा ।।). नामदेवांचे म्हणून सांगितले जाणारे एक चित्र लॉरेन्स बिनयन आणि आर्नोल्ड ह्यांच्या द कोर्ट पेंटर्स ऑफ द ग्रँड मुघल्स ह्या पुस्तकात दिलेले आढळते. धाबळी पांघरलेले आणि गळ्यात तुळशीमाळ घातलेले नामदेव विविध हिंदू-मुसलमान साधूंसमवेत त्यात दाखविलेले आहेत. नामदेवांच्या चित्रावर त्यांचे नावही अरबी लिपीत आहे. मात्र हे चित्र समकालीन नसून सतराव्या शतकातले आहे.

    संदर्भ : १. आजगावकर, ज. र. श्री नामदेवमहाराज आणि त्यांचे समकालीन संत, मुंबई, १९२७.
    २. ढेरे, रा. चिं. संपा. संतांच्या आत्मकथा, पुणे, १९६७.
    ३. ढेरे, रा. चिं. संपा. संतांच्या चरित्रकथा, पुणे, १९६७.
    ४. तुळपुळे, शं. गो. पांच संतकवी, पुणे, १९४८.
    ५. भावे, वि. ल. महाराष्ट्र-सारस्वत (शं. गो. तुळपुळे ह्यांच्या पुरवणीसह), मुंबई, १९६३.
    ६. महाराष्ट्र शासन, श्री नामदेव चरित्र, काव्य आणि कार्य, मुंबई, १९७०.
    ७. मुळे, मा. आ. श्री नामदेव चरित्र, पुणे, १८९२, पुनर्मुद्रण १९५२.
    END.

    ReplyDelete
    Replies
    1. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
      आपण माझ्यापेक्षैः चांगला लिहिलात
      काही लेख लिहायचे असतील तर नाक्कींच लिहू शकता मराठी कट्ट्यावर
      येथे मेल करा
      marathikatta.guestpost@blogger.com

      Delete

प्रतिक्रिया देताना सभ्य भाषेचा वापर करावा तसेच मराठी भाषेत लिहिण्याचा जास्तित जास्त प्रयत्न करावा. प्रतिक्रिया देताना कोणत्याही जात, धर्म, पंथ, वर्ण तथा कोणत्याही समुहाच्या श्रद्धास्थानांविषयी बोलताना सभ्यता बाळगणे आवश्यक.