2 June 2012

सुर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच ! [पान २]

पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते.
             आवळसकर सांगतात की, याबाबत पुर्व इतिहासकारांचे लेखन अत्यंत भ्रामक स्वरुपाचे आहे. मराठ्यांनी शर्थ केली,पण शेवटी रायगड सुर्याजी पिसाळांच्या फ़ितूरीमुळे मोंगलांच्या हाती गेला तसे नाही.शिवसून येसूबाईंनी रायगड मजबुत आहे, हे जाणले होते.’छत्रपती राजाराम व त्यांच्या पत्नींनी गडावरून निघावे’.राजाराम सहकुटूंब प्रतापगडाकडे ५ एप्रिल १६८९ ला बाहेर पडल.वेढा आरंभी अगदीच शिथील होता.
          संपुर्ण रायगडला वेढा  देणे, तेथील आजची ही भौगोलिक स्थिती पाहाता अशक्य होते.राजारामांच्या बरोबर खंडो बल्लाळ, रामचंद्र आमात्य, प्रल्हाद निराजी, शंकराजी नारायण इ. नामवंत माणसे वेढ्यातून निसटली. एकही मोंघलांच्या हाती लागला नाही.रायगडच्या खोर्यात श्रावण, भाद्रपद व आश्विन महिन्यात पाऊस इतका कोसळतो की ’पक्षांच्या पंखावर शेवाळ उगवते’ व वारा इतका सुटतो की, त्यावेळी वेढा घालणार्या सैनिकांना नुसते उभे राहाणेदेखील अशक्य ! ’वेढा नाममात्र. गड अजिंक्यच ! मोठी मंडळी बाहेर पडल्याने शत्रु त्यांचे अंगावर जाईल, गडावरील ताण कमी होईल.
          राजारामांच्या दोन्ही भार्या रांगणा,विशाळगड, गगनगडकडे सुरक्षित गेल्या.छत्रपती राजाराम पुढे जिंजीस जाताना कोल्हापूर प्रांतातील शिवगड (दाजीपूर) गगनगड-काळम्मावाडी खोर्यातूनच गेले, त्यासमयी भागातील राणे, जाधव, खोपडे, पाटील, कुलकर्णी या मराठ्यांनीच त्यांना सर्व बाबतीत सहय्य केले आहे.
मोठी लढाई नाही, ठिसूळ पुरावा
            म्हणजे परीसरात अशी लढाई झाली नसावी. तसे पुरावे नाहीत.शर्थीची झुंज दिली असती तर शेकडो मुसलमान सैनिक मरण पावले व त्यांची एखादी कबर तरी रायगड परिसरात सापडली. एकही नाही ! मराठ्यांनी नष्ट केली म्हणावे तर त्यांचा तो स्वभाव नाही.रायगडावरच्या फ़ितूरांचा गवगवा,गाजावाजा हा कालविपर्यासाचा प्रकार आहे.सुर्याजी वाई प्रांतातील ओझर्डे देशमुख.तो दुरवरच्या रायगडावर कशाला जानार ? तो सरदार वा किल्लेदारही त्यावेळी नव्हता.
          ’फ़ितुरी’स भक्कम पुरावा नाही.इतिहासकारांचे भ्रामक,रंजित लिखानच काय तो ठिसुळ पुरावा.तो ग्राह्य धरता येणार नाही.पण गडावरुन सुटलेल्या राजारामांचे तरुण साथीदार संताजी व धनाजींनी बादशाही फ़ौजेस ’दे माय धरणी ठाय’ करुन सोडले.बादशहाच्या तंबूचे सोन्याचे कळसही कापले.पाण्यात त्यांना ही जोडगोळी दिसायची म्हणे.खरे की वाडःमयीन रंजितपणा ? मग त्यांनी फ़ितुर सूर्याजीचा खातमा का केला नाही ? तसे काही नव्हतेच.                                      
शुभविवाह
           विशेष गोष्ट अशी की, छत्रपती राजारामांची दासीपुत्री व सूर्याजी पिसाळांचा दासीपुत्र यांचा विवाह होऊन ते व्याही झाले.हा विवाह इ.स.१६८९ नंतर व १७०० चे पुर्वी दासीपुत्री अनौरस..तिचा विवाह कोनाशीही झाला तरी चालेल असे अशी समाजनिती इतिहासकालात नव्हती.उलट समसमासंयोग साधण्याची प्रव्रुत्ती असे. त्या कालात अशी संतती शिष्टसंमत होती.छत्रपती राजाराम सूर्याजीशी नाते जोडतात, याचा स्पष्ट अर्थ असा की सूर्याजी इ.स.१७०० पर्यंत तरी फ़ितुर नव्हते.रायगड समेटामुळे पडला ती तारीख ३ नोव्हेंबर १६८९ आहे.झुल्फ़िकारखानाच्या मर्दमुखीमुळे नव्हे, तर राणी येसूबाईंच्या मुत्सदीपणामुळे गड ताब्यात दिला गेला.
            फ़ितुर्यांच्या, खंजीर खुपसणार्यांच्या मुलास, स्वातंत्र्याची किंमत जाणणारा, जाणत्या शिवरायांचा मुलगा राजाराम आपली मुलगी,दासीपुत्री असो , देईलच कसा ? इति सूर्याजी पिसाळ रायगडप्रकरणी पुर्णपणे निर्दोष आहेत. माझे तसे स्पष्ट मत आहे.
इतिहासकार सरदेसाई
          इतिहासकार सरदेसाई म्हणतात, फ़ितूरीपुढे हद्द आहे... वाईच्या सूर्याजी पिसाळास देशमुखी हवी होती.तिच्या लोभाने किल्ल्याचा दरवाजा खानास सताड उघडा झाला असे एके ठिकाणी लिहितात, तर दुसरीकडे ’ आठ महीने झाले तरी इतिकादखानाचे (झुल्फ़िकारखान) पाऊल य:त्किंचितही पुढे पडेना.... कपटविद्या, हुशार सूर्याजी पिसाळास वाईच्या देशमुखीचे आमिष .... त्याने मोंघलांचा आत प्रवेश करुन दिला.राणी येसूबाईंच्या अवस्थेची त्यांना काळजी पडते ! आणि त्या खानाकडुन शपथ घेववुन मुलामंडळीसह    खानाच्या स्वाधिन होतात.असे सांगतात.कुलाबा ग्याझिटियरने तीच री ओढली आहे. पण प्रथम सूर्याजी हे वाईचे नव्हे,ओझर्ड्याचे. तसेच ते किल्लेदार नव्हते की रायगडावरही त्यांचे आस्तित्व १६८९ मध्ये नव्हते.ही दुसरी गोष्ट लक्षात घेतली तर फ़ितूर ठरविणारे सारे खोटे पडतात.
               शिवाय पुणे जहागीर व आसपासचे पहीले तीन देशमुख शिवाजीराजेंना मिळाले ते जेधे,पिसाळ व मरळ हे होत.ते प्रथमपासून विश्वासातील होते, असे सध्याचे त्यांचे वंशज ओझर्डेचे नरसिंगराव पिसाळ, देशमुख ठासून सांगतात.सूर्याजी हे मुळ पुरुष हरनाकपासून सातव्या पिढीतील.
इतिहासकार राजवाडे
         इतिहासकार राजवाडे तर सांगतात की, छत्रपती राजाराम कर्नाटकात गेले.रायगड व इतर किल्ले गनिमाने घेतले.त्यावेळी जेधे-देशमुख गनिमास सामील झाले ! पण पुढे या पत्रास राजवाडे टिप देतात की, पत्र विश्वसनीय दिसत नाही ! मोठ्या प्रमाणावर फ़ितुरी होणे  असंभव. शिवचरित्र साहित्य खंड १० मधील लेखांक २४ च्या उतार्यांन्वये राजाराम छत्रपतींनी चंदीहुन (जिंजी) नरसोजी गायकवाड रायगडावर असता इतिकादखानास गडावरील हावपालत सांगितली म्हणून त्याचा मुलगा संभाजी गायकवाड देशमुख तपे(तालुका) बिरवाडी याची देशमुखी जप्त केली.गुन्हा तसा गंभीर,पण पुढे ५०० पातशाही होन खंड घेऊन देशमुखी दुमाला केली आहे.
सरदेसाई व राजवाडे दोन्ही खरोखरच मातब्बर इतिहासकार पण त्यांच्याकडून काहीच चुकणार  नाही असे कसे म्हणायचे.
सर जदुनाथ सरकार
               बंगालचे जागतिक कीर्तीचे इतिहासतद्न्य सर जदुनाथ सरकार १९३१ च्या दरम्यान ओझार्डे येथे आले होते.त्यांनी आत्ताच्या पिसाळ मंडळींची भेट घेतली होती.त्यांच्या चर्चेत सूर्याजी पिसाळांवरचा आरोप खोटा आहे, असे प्रतिपादिले गेले.(इति नरसिंगराव पिसाळ) हिस्ट्री ओफ़ औरंगजेब भाग ४ या त्यांच्या इतिहासग्रंथात सरकारांनी आपले विचार मांडले आहेत.१६८८ डिसेंबरमध्येच आसदखानपुत्र इतिकादखान रायगडकडे निघाला होता.१९ ओक्टोंबर १६८९ मध्ये रायगड घेऊन शिवाजी,संभाजी व राजाराम यांचे परिवारास कैद केले.
               चिटणीसांची बखर व इश्वरदास यांचे संयुक्तीक म्हणने असे की, येसूबाई आणि तिचे सल्लागार यांनी बहुदा असे ठरविले असावे की,संभाजींचा म्रुत्यू व राजारामांचे  महाराष्ट्राबाहेर जाणे या गोष्टी ध्यानी घेता व महत्वाची बरीच मातब्बर माणसे महाराष्ट्राबाहेर गेली आहेत.अशावेळी रायगडावर असलेल्या सामान्य बिनलढाऊ माणसांचा प्रतिकाराचा यत्न फ़ुकट आह. शांतपणे शरण जाण्यातच शाहू व सर्वांचे कल्याण आहे.फ़ुका मरण व नुकसान यापेक्षा तह समेट योग्य.  

सूर्याजी पिसाळ - फ़ितूर नव्हेच !

मूळ लेखक : प्रिं.अमरसिंह राणे
संदर्भ : दैनिक पुढारी (बहार ) , रविवार, दि.२८ नोव्हेंबर १९९९ .
लेखन : अभिजीत पाटील 
"कूणीही फ़ितुर झालं की त्याला महाराष्ट्रात ताबडतोब ’सूर्याजी पिसाळ’ हे विशेषण जाते.जणू काही फ़ितुरांना दिला जाणारा किताबच.निवडनुकीच्या काळात ’सूर्याजी पिसाळ’ हे नाव शिवी म्हणुन मुक्तकंठाने वापरले जाते.....पण मराठेशाहीतील लढवय्या सुर्याजी पिसाळ हा योद्धा हा साहसी लढवय्या कधिही फ़ितुर झाला नव्हता.हा स्वराज्यनिष्ठ देशमुख आजतागायत फ़ितुरीची खोल जखम कपाळी घेऊन वावरत आहे..... पण आता त्याची खोल जखम भरुन निघायलाच हवी... कारण तो खरोखरच स्वराज्याचा प्रामाणिक पाईक होता."

           इतिहास हा व्यक्तिंभोवती फ़िरतो. व्यक्तिपरत्वे गुणदोष आलेच.इतिहास लेखणाची पुनर्छाननी व मुल्य तपासले जावे.त्यातील बारकावे आणि तपशील देताना शास्त्रशुद्ध, ओघवते विवेचन दिसले पाहीजे सत्याचा अपलाप न करता काल्पनिक,पुर्णत: कादंबरीमय घटना आणि व्यक्तीचित्रणे असता कामा नयेत. तटस्थ व्रुतीने आणि निष्पक्षपणे लेखण व्हावे लागते.मराठ्यांच्या इतिहासात अनेक समज,गैरसमज आणि अपसमज आढळुन येतात. इतिहासलेखण देखील व्यक्तीच करतात.छत्रपती संभाजी,सुर्याजी पिसाळ, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, दुसरा बाजीराव,आनंदीबाई, सोयराबाई शिर्के, टिळक, छ.शाहु आदी; एवढेच काय छत्रपती शिवरायांच्या बाबतही आपल्या काही लेखकांनी अवास्तव, अवाजवी गोष्टी लिहुन ठेवल्या आहेत.विशेषत: बखरकारांना गोंधळ व भडक, रंजक चित्रणे तर विचारायलाच नको.त्यातले सत्य शोधणे/ घेणे आवश्यक.

वाडःमयाची घुसखोरी 
           वास्तवाशी फ़ारकत घेतली आणि काल्पनिकतेस प्राधान्य दिले की इतिहासाची प्रासादिक कादंबरी होते.तसे पाहता ऐतिहासिक कादंबरीनेही इतिहासाशी प्रामाणिकपणा राखला पाहीजे आणि म्हणूनच श्रीमान योगी, छावा, राजेश्री आदी ग्रंथ, ऐतिहासिक कादंबरी न राहता कादंबरीमय इतिहास किंवा इतिहासमय कादंबर्या झाल्या आहेत.ग्रंथाच्या तिनीही  नामवंत लेखकांनी सत्य, ऐतिहासिक घटना अनेकवेळा पाठीमागे ठेवून स्वत:च्या प्रासादिक फ़ुलोर्यास अतिमहत्व दिले आहे.परंतु सर्वसामान्य वाचक  आणि प्रेक्षक त्या प्रसंगांना सहजपणे सत्य मानतो.त्यावरील चित्रपटात तेच दाखवले जाते.म्हणून अशा कादंबर्या, चित्रपट आणि नाटके ऐनैतिहासिक ठरतात. मग लेखनपरत्वे अनेक ऐतिहासिक व्यक्तिंच्यावर अन्याय होतो.समजापसमजास वाव मिळ्तो आणि तेच सत्य म्हणून समाजात वर्षानुवर्षे, शतकानुशतके प्रचलित होत राहते.हा एक दैवदुर्विलासच.याच द्रुष्टिकोनातुन "सुर्याजी पिसाळ" या इतिहासकालीन देशमुखावर अन्याय झालेला आहे.
सुर्याजी पिसाळ आणि राजकारण
          ’सुर्याजी पिसाळ’ म्हणजे ’फ़ितूर’ हे समीकरण जे झाले आहे, ते निखालस खोटे.इतिहासात आणि  राजकारणातले फ़ितूर व गद्दार हे शब्द अगदीच सापेक्ष असतात.आजचा फ़ितूर हा उद्याचा जीवस्चकंठस्च मित्र होऊ शकतो.मतभेदांपायी कोणी दुर गेला तर गद्दार होतो.मग गद्दाराचा विजय झाला तर त्याला तसे म्हणणारा करंटा होऊ शकतो.कुटील नीती अथवा राजनीतीचा तो अपरिहार्य  भाग असतो. नाही तरी राजकारण हे बदमाशांचे शेवटचे आश्रयस्थान असे कोणी आंग्ल  लेखकाने गमतीने खरेच लिहून ठेवले आहे.त्या उक्तिचा उपयोग देखील आपण एक ठाम सत्य म्हणुन सरसकट वापरात आणतोच.तसे पाहीले तर रामायनकालीन रावन हा एक सोन्याच्या लंकेचा चांगला राजा होता.त्याचा पराभव झाल्यावर लेखकांनी त्यास दहा तोंडे चिकटवली.तो क्रुर, दुसर्याची पत्नी पळवणारा,घाणेरडा रावण झाला.जेत्यांनी त्याच्या प्रतिमा करवून तिचे वार्षिक अग्निदहन, हेटाळणी सुरु केली.आजही चालु आहे.
रावणराजा
            क्षणभर कल्पना करा, रावणराजाचा विजय झाला असता तर राम भले एकपत्नी,एकवचनी, एकबानी खरोखर असुनही रामायनाच्या ऐवजी जे महारावणायण लिहिले गेले असते, त्यात राम-लक्ष्मण कसे दाखवले असते ? त्यांना क्रुर,गद्दार, फ़ितूर, खंजीर खुपसणारे ही विशेषणे ग्रंथकर्त्यांनी प्रासादिकरीत्या चपखलपणे बसविली असतीच नाही का ? म्हणून शब्दांचा वापर,प्रसंगानुरुप जित-जेत्यांच्या संदर्भातही तपासुन पाहिला पाहिजे. हजारो  वर्षे रामराजांची परीक्षा होऊन ते आज देवत्वाला पोहोचले आहेत ते नि:संशय. एरव्ही बिभीषणाने रावणाच्या पाठीत खंजीर खुपसलाच.रामाचा विजय झाला म्हणून तो सुटला.
आलमगीर
            आलमगीर (औरंगजेब) जितका आपणास वाईट, जिझिया कर बसविणारा,हिंदूद्वेष्टा वाटतो, तितका तो इतर सर्व बाबतीत होता का ? तो स्वधर्मपरायण होता.दिवसातून पाच वेळा नमाज पढे, तो ऐषआरामी नव्हता, चटईवर झोपे वगैरे. आमच्या एका इतिहासाच्या प्राध्यापकांनी ’आलमगीर’ या विषयावर पंचवीस वर्षापुर्वी मिरजेत जोरकस व्याख्यान देऊन औरंगजेब काही गोष्टीत कसा चांगला होता, हे पटवून द्यायचा सोदाहरण प्रयत्न केला.
        ’रायगडची जीवनकथा’ या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्क्रुती मंडळाने १९६२ साली प्रसिद्ध केलेल्या ले.शां.वि. आवळसकरांच्या रु.४ किमतीच्या पुस्तकात त्यांनी रायगड प्रकरणी सुर्याजी पिसाळ (१९८९) आणि रा.य.नाईक (१८१८) हे दोघेही मोघलांस व इंग्रजांस फ़ितूर झाले या गोष्टी संशयातीत आहेत, दोघेही निर्दोष आहेत,असे सांगितले आहे. त्यांचे व अस्मादिकांचे तसे पक्के मत झाले आहे.
घटनाक्रम असा-
संभाजीराजे गिरफ़्तार 
राजारामांचे मंचकारोहण
१ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी छ संभाजी संगमेश्वराजवळ अलकनंदा व वरुणा या  नद्यांचे संगमावरील नावडी येथे होते.मोंघल सरदार शेख निजाम तथा मुकबर्रखानने चकमकीनंतर त्यांना पकडले.संताजी घोरपडे यांचे वडील आणि शिवकालिन सरदार मालोजी घोरपडे त्यावेळी  ठार झाले.रायगडावर ९ फ़ेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम अटकेत असताना ही वार्ता कळाली.त्याची सुटका होऊन राजारामांनी ’ मंचकारोहण’ केले.
          रायगडचा किल्लेदार चांगोजी काटकरने कैदेतील मानाजी मोरे इ. ना सोडले तर यसजी व सिदोजी फ़र्जंद यांचा कडेलोट केला.म्हणजे रायगडावर सुर्याजी पिसाळ त्यावेळी किल्लेदार नव्हते.राजप्रतिनीधी म्हणुन राजाराम राज्यकारभार १२ फ़ेब्रुवारी १६८९ पासुन शाहू लागले.कारण शिवाजी द्वितीय (शाहू) केवळ सात वर्षाचे होते.हा दुरदर्शीपणा येसूबाईंचा.मराठ्यांची राजधानी व नविन राजा यांना ताब्यात घेण्यास आसदखानपुत्र इतिकादखानने रायगडला २५ मार्चला वेढा घातला.