2 April 2013

कुळवाडीभूषण छ.शिवाजी महाराज

           आजपर्यंतच्या जागतिक इतिहास तज्ञांच्या मते कोणालाही राजा होण्यासाठी त्यांच्या अलौकिक राजगुणांची आवश्यकता असली पाहिजे.हे अलौकिक राजगुण कोणते ? याबाबत इटालियन जागतिक किर्तिचे तज्ञ "मॅकिल व्हॅली" यांनी अलौकिक राजगुणांची काही तत्वे आजपर्यंत कोणात्याही इतिहासकाराने आक्षेपार्ह मानली नाहीत ती सर्व मान्य ठरतात.
         मॅकिल व्हॅली यांनी ही राजगुणांची तत्वे दोन विभागात मांडली असून ती पुढीलप्रमाणे :
१) न्याय नीती व चारित्र्य : - राजा हा दिसण्यास सर्वसाधारणपणे सुंदर असावा.तो निरोगी व आरोग्य संपन्न असावा.तो हुशार आणि बुद्धिमान असावा.त्यांची नैतिक पातळी उच्च दर्जाची असावी. तो आध्यात्मिक आणि तात्विक ज्ञान संपन्न असावा.तो कर्तव्यदक्ष, नि:स्वार्थी आणि संयमी तसेच जनतेसाठी झटणारा असावा.स्त्रीदाक्षिण्य हा गुणही त्याच्या असावा.
२)इतर गुण :- राजा हा सिंहाप्रमाणे शुर असावा.नीती व अनीतीचा वेळप्रसंगी विचार करणारा असावा.त्याला द्रव्याची अभिलाषा नसावी.तो इतर कोणाच्या धर्मात हस्तक्षेप करणारा नसावा.न्याय व नीती ही तत्वे मुख्य अंग असले पाहिजे.
वरीलप्रमाणे असणार्या राजगुणांचा विचार करता जगातील अत्यंत पराक्रमी ज्येते म्हणजे नेपोलियन,सिकंदर,ज्युलियस,हॉलिबूड रॉबर्ट वगैरे अनेक देशी - विदेशी राजांचा व छत्रपती शिवाजी राजांचा तुलनात्मकद्रुष्ट्या अभ्यास करता शिवाजी राजांच्या नैतिकतेशी हे पराक्रमी राजे बरोबरी करू शकत नाहीत कारण 
* २७ वर्षे घोड्यावरील मांड कधी काढली नाही व आपली तलवार कधी म्यान केली नाही
* मद्याच्या थेंबालाही कधी स्पर्श केला नाही.
* स्त्रियांना मातेसमान मानले,एवढेच नाही तर शत्रुपक्षातील स्त्रियांना साडी चोळी देऊन सत्कार केला व त्यांचे रक्षण केले. 
* शिवरायांनी कधी मद्याची अभिलाषा केली नाही.
* शिवरायांनी इतर धर्मियांना सहिष्णूतेची वागणूक दिली.
* विशेष म्हणजे छ.शिवरायांनी न्याय व नीतीचा योग्य वापर करून रयतेसाठी राज्य निर्माण केले होते.
वरीलप्रमाणे जागतिक इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचे अलौकिकत्व मान्य करून हा राजा सर्वात श्रेष्ठ आहे असा निष्कर्ष काढला.
             जागतिक इतिहास तज्ञांचे निष्कर्ष लक्षात घेता हे सिद्ध होते की मध्ययुगीन कालखंडात असा एक राजा होऊन गेला की,असा राजा आजतागायत झाला नाही आणि तेथुन पुढेही होणार नाही.असा राजा म्हणजे कुळवाडी भूषण बहुजनप्रतिपालक छ.शिवाजी महाराज.
           छत्रपती शिवरायांच्या सैन्याचे शिवरायांवर एवढे प्रेम होते की महाराज ज्या ठिकाणी पाय ठेवू पाहात तेथे हे मावळे ह्या राजासाठी स्वत:चे बलीदान देण्यास तयार होत असत.याउलट छ.शिवाजी महाराजांना आपला प्रत्येक मावळा म्हणजे लाख मोलाचा हिरा वाटायचा म्हणुन ते म्हणत, मी माझा लाख मोलाचा हिरा असा तसा गमावणार नाही.म्हणून जेंव्हा अफ़जलखान, शाहिस्तेखान,मिर्जा राजा जयसिंग हे प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर चालून आले त्यावेळी महाराजांनी त्यांच्याशी युद्ध करून आपल्या सैन्याची जीवित हानी होण्यापेक्षा  ते स्वत:चा जीव धोक्यात घालून स्वत: शत्रुवर चालून गेले व त्यांचा पराभव केला.यात अफ़जल खानाला तर ठार केलेच. व मिर्जा राजा जयसिंगाबरोबर तहाची बोलणी करून स्वराज्यासाठी स्वत:चा त्याचबरोबर स्वत:च्या कोवळ्य़ा शंभु राजपुत्राचा जीव धोक्यात घालून तह मंजुर करून घॆण्यासाठी ते आग्रा येथे औरंगजेबाकडे गेले.
            जगामध्ये शिवरायांनंतर जे-जे राजे अथवा जगज्जेते होऊन गेले ते स्वत:साठी, संपत्तीसाठी, स्वत:च्या धर्मासाठी व जातीसाठी लढले.शिवरायांचे युद्ध हे मुस्लिम किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध किंबहुना जातीविरुद्ध नव्हते तर ते परकिय सत्ताधिशांच्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध होते.म्हणूनच अदिलशहाचे पठाणी सैनिक व घोडदळाच्या तुकड्या शिवरायांना मिळाल्या आणी मोघल सत्तेविरोधात लढल्या तसेच छ.शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैन्य होते.ते एकनिष्ठपणाने लढले.अठरापगड जातीचे मावळे शिवरायांच्या जीवाला जीव देणारे सैन्य सर्वशक्तिनिशी यश संपादन करत होते.त्यामुळे शिवरायांचा विजय हा ठरलेलाच असायचा.
           छ.शिवरायांनी शेतकर्यांच्या हितासाठी अनमोल असे कार्य केले त्यांच्या काळामध्ये एकाही शेतकर्याने आत्महत्या केल्याचे दिसून येत नाही.मात्र आज शेतकर्यांचे म्हणुन जे स्वत:ला समजतात त्यांच्या राज्यामध्ये इतकेच नसून देशामध्ये लाखॊ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या.खरेच या नेत्यांना छ.शिवाजी महाराजांच्या कार्यकर्त्रुत्वाची जाणीव असती तर जगाचा पोशिंदा असणार्या शेतकर्यांनी कधीच आत्महत्या केल्या नसत्या.पण हेच नेते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन देशात,शासन व्यवस्था चालवित आहेत.
इतिहासाचा अभ्यास केला असता छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक राजगुणांची ठळक वैशिष्ठे पुढील प्रमाणे दिसून येतात.
१) स्वधर्माभिमानी परंतू इतर धर्मीयांशी सहिष्णुतेने वागणारा राजा..
२) संत सज्जनांचा उपासक परंतू दुष्टांचा संहार करणारा राजा..
३) भारतीय सैन्याबरोबर मुस्लिम सैन्य बाळगणारे व त्यांच्या शौर्याची कदर करणारा राजा..
४) वैदिक धर्माच्या देव-देवळांबरोबर मुस्लिमांच्या मशिदी व मकबरे यांचे पण रक्षण करणारा राजा..
५) युद्धाच्या वेळी कुराणाची प्रत सापडल्यास ती आदरपुर्वक मुल्ला - मौल्लवीकडे परत करा,स्त्रियांच्या आब्रुचे,लहान मुलांचे,म्हातार्या माणसांचे रक्षण करा,शरण आलेल्यांना ठार मारू नका अशी सैन्यास ताकिद देणारा राजा..
६) स्वराज्याच्या व रयतेच्या रक्षणासाठी गडकोट व आरमाराची निर्मिती करून त्याद्वारे रयतेला रोजगार निर्मिती करून देणारा राजा..
७) शेतकरी सुखी तर प्रजा सुखी,प्रजा सुखी तर राजा सुखी ही त्रिसुत्री जाणुन शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करून शेती सुधारणा करणारा व शेतकर्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका अशी सैन्याला सक्त ताकीद देणारा राजा..
८) अठरापगड जातीचे सैन्य पदरी बाळगणारा,बहुजन समाजातील सैन्यांच्या हाती शस्त्र देऊन त्यांच्या क्षत्रिय बनवणारा म्हणजेच जातीयता व भेदभाव नष्ट करणारा राजा..
९) स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण कराणारा राजा
१०) धर्मातरितांना स्वधर्मात घेऊन धर्म वाढविणारा  राजा...
११) मराठी भाषेचा पुरस्कार करणारा राजा..
१२) शत्रु सैन्याच्या गोटात निशस्त्र जाऊन आपल्या गगनभेदी सिंहगर्जनेने शत्रुची दानादान उडविणारा राजा...
१३) बलाढ्य व शुर अशा मुस्लिम शत्रुला ठार केल्यानंतर सन्मानाने त्याची कबर बांधणारा राजा.
१४) आजपर्यंत जवळ जवळ ६०० राजे होऊन गेलेत असा इतिहास सांगतो पण शत्रुचीही कबर बांधुन म्रुत्युनंतर वैर संपते हा संदेश देणारा राजा..
१५)राज्याभिषेक शककर्ता राजा...
१६) परकीय राम्राज्यशाहीविरुद्ध बंड पुकारून जगात स्वराज्याची पहिली मुहुर्तमेढ रोवून रयतेसाठी राज्य निर्माण करणारा राजा........
             म्हणजेच जगदवंदनीय जगाचा महामानव ठरलेला राजा म्हणजेच विश्ववंद्य छ.शिवाजी महाराज होय आणि म्हणुनच जागतिक इतिहास तज्ञ "अनॉर्ड टायरबन" म्हणतात- " छत्रपती शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांच्या पराक्रमाचा आणी स्म्रुती चा अक्षय ठेवा आम्ही आमच्या डोक्यावर घेऊन आनंदाने नाचलो असतो " 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जय महाराष्ट्र