27 December 2015

जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट तरी.....??

संतश्रेष्ठ तुकोबांच्या हयातीत मंबाजी भट-ब्राह्मण आणि त्यांचे सर्व साथीदार यांनी तुकोबांचा खुप कडाडून विरोध केला. त्यांचे अभंग नदीत बुडविले. गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली आणि तुका सदेह वैकुंठाला गेला अशी आवई मात्र जोरात उठवली. नदीत बुडवूनदेखील तुकोबांचे अभंग लोकांत राहिलेच. ते तेच म्हणू लागले आणि जेंव्हा अभंग बुडवूनसुद्धा आणि तुकोबांना संपवूनही तुकोबा संपत नाही असं दिसून आलं तेंव्हा मंबाजीचे सर्व प्रकारचे सर्व वारसदार तुकोबांचे कौतुक करू लागले. त्यांच्या अभंगात आपले फ़ुसके अभंग घुसडू लागले [त्यांचेच वंशज आजही आहेतच]. त्यांच्या अभंगावर कथा-किर्तने करू लागले.पण हे सगळे करताना एक करू लागले की तुकोबांनी अंधश्रद्धेवर व अन्यायावर जे कोरडे ओढले होते ते लोकांपर्यंत पोहचणार नाहीत अशी दक्षता घेऊ लागले.
असेच काही फ़ुसके क्षेपक अभंग तुकोबांच्या गाथेत आढळतात त्यातील एक प्रचलित म्हणजे "जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी ॥ [३०४०].तुकोबांची ब्राह्मणांविषयी ही आस्था आधिक ताणून "जरी  ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ असे भ्रष्ट ब्राह्मणांविषयी उदारतेचे उद्गार काढणारे तुकोबाराय" सर्वप्रथम श्री  अनंतदास रामदासींनी उभे केले; आणि ’तुका म्हणे तुम्ही देवा द्विज वंद्य’ [शा.२८८४] आदि अभंग पाहून "रुढ मुल्यांवर निष्ठुरपणे प्रहार करणारे तुकोबा शांत मन:स्थितीत पुन: रुढीपुढे नम्र होतात."हे मात्र सत्य नाही.जरी तो ब्राह्मण झाला कर्मभ्रष्ट । तुका म्हणे श्रेष्ठ तिन्ही लोकी.[३०४०] हे तुकोबांचे म्हणणे केवळ औपरोधित किंवा अर्थवादात्मक आहे"(सा.सं.तु.प्रुष्ठ:१४०) वस्तुश: असली दोनचार वचणे हे गाथेच्या अंगावरील आगंतुक कोडच म्हंटले पाहिजे. असल्या भोंगळ वचनांच्या विरोधात तुकोबांची शेकडो युक्तियुक्त वचणे बाह्या ठोकून उभी आहेत.
यथार्तवाद सांडून उपचार बोलती ते अघोर भोगतील ! "तुका म्हणे आम्ही येथील पारखी । छंदावी सारिखी नव्हो ऐसी" माझ्या जातीचे वजनास बोल कोण ठेवू शके ? "सत्या नाही पाठीपोट" व "लटकियाची न करू स्तुती हिशेब आले ते घ्यावे" हीच तुकोबांची खरी कणखर भुमिका ! "गुण-अवगूण निवाडा " करणारा व "अवगुणी दंडण गुणी पुजा" हे न्याय्य ब्रिद सांभाळणारा तुकोबांचा ’निवाड्याचा ठाव’ असली बुद्धिभेद करणारी वचणे उच्चारूच शकत नव्हता,हे उघड आहे.[९६२, ११३७, १३६७, २३७६,२३७८,२७३५,३४८५,३५१८,(पं.५२४९),५३४७].
"पंडिता: समदर्शिन:" व "य.क्रियावान स पंडित:" यापैकी एकही गुण अंगी नसलेल्या पण अंगी ज्ञानपणाची मस्ती ठेवून इतरांना हिन,तुच्छ समजणार्या ब्राह्मणांना तुकोबा स्पष्टपणे सुनावतात की, "मर्यादा ते जाण अरे अभागिया । देवाच्या ऐसिया सकळ मुर्ती ॥","करी अनेकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण । तया देता दान । नरका जाती उभयता ॥".असे रोखठोक बाण्याचे तुकोबा; "ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो" म्हणणार्या शिवरायांच्या प्रणालीचेच होते. म्हणूनच तुकोबांनी ’भेदवाही’ व ’खळवादी वेव्हार’ करणार्या ब्राह्मणांना ’भ्रष्ट सुतकिया खेळ..विटाळ पातकी..न्यानगंडे ढोरे’ इ. शेलक्या शिव्या हासडल्या आहेत व नरकगामी म्हंटलेले आहे.(११२९, १३४५, २३३६, ३६७८, ४५०५)."महाराचा स्पर्ष झाल्यामुळे ज्या ब्राह्मण म्हणविणार्यास क्रोध येतो, तो खरा ब्राह्मणच नव्हे. " या दोषद्रुष्टीमुळे त्याच्या हातून जे पातक घडाले गेले, त्या पातकाला देहान्त प्रायचित्ताशिवाय अन्य प्रायश्चित नाही" हा रोखठोक निर्णय तुकोबा सुनावतात; किंबहुना तया प्रायश्चित काही देहत्याग करता नाही. असे त्यापुढेही एक पाऊल टाकतात. "यातिकुळ येथे असे अप्रमाण । गुणाचे कारण असे अंगी ॥" असे वारंवार झडझडून सांगणार्या तुकोबांनी कोणत्याही कर्मभ्रष्टाला श्रेष्ठत्व देणे शक्यच नाही. हे अभंग बळीच घुसडलेले आहेत.मग हे असले अभंग एखाद्या "सालो-मालो" चे असोत की "श्री समर्थप्रतापामधील एखाद्या हेळवाकीच्या अथवा बिडवीच्या रामदास्याचे असोत.
तुकोबा जर कोणा कर्मभ्रष्ट ब्राह्मणांनाही श्रेष्ठ म्हणू शकले असते तर त्यांचे साहित्य बुडविण्याचे महत्पाप कोणालाही करावेसे वाटले नसते. "सत्याचिया लोपे पापे घडती" या धारणेने तुकोबा सत्य तेच बोलायचे. शिवाय सामान्य समाज हा तत्कालीन ब्राह्मणांच्या नादी लागून आंधळ्याचे काठी लागलेल्या आंधळ्याप्रमाने देवधर्माला आचवन गर्तेत बुडत आहे हे द्रुष्य़ तुकोबांना डोळा देखेवेना. त्याकाळी ब्राह्मणांचे किती अंध:पात झाला होता याची शेकडो प्रमाणे तुकोबांच्याच नव्हे तर ब्राह्मण लेखकांच्याही साहित्यात मिळते.रामदासांचे शिष्य दिनकर गोसावी "स्वानुभव-दिनकर" ग्रंथात ब्राह्मण भांग सेवू लागल्याचे लिहिले आहे.किंबहुना "ब्राह्मण झाले दासीगमनी" असे वर्तवले आहे. समर्थबंधु "श्रेष्ठ" यांनी सुद्धा "तपसत्यविहिन द्विज परान्न प्रद्रव्य परस्त्रीलोलुप" होऊन "तीर्थव्रतादि करणारांचा उपहास" करीत, "वेदशास्त्र पुराण"च नव्हे, तर "कन्याविक्रय"करीत. "दुष्टदेवा दुष्टपरिग्रह दुराचारी दुराग्रह व मद्यमांसाशन" हेच ब्राह्मणांचे स्वरूप झाले होते असे म्हंटले आहे(भक्तिरहस्य). खुद्द रामदास स्वामी सुद्धा "ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ॥", ब्राह्मणास ग्रामणीने बुडविले, मिथ्या अभिमान गळेना मुर्खपणाचा, आदि वचणं बोलीले आहेत. संत कान्होबा म्हणतात, "उत्तम ब्रह्मकर्म सोडून अठरा यातीचे व्यापार ब्राह्मण करत."
ब्राह्मणांचा देह शुद्रकर्मासाठी नसतो असे भागवत म्हणते. वेदाखेरीज अन्य कार्य करणारा ब्राह्मण जीवंतपणीच शुद्र होतो. अशीही स्म्रुती आहे. तरीपण व्याजबट्याचा व्यवसाय ब्राह्मणांनी सर्वत्र स्विकारलेला दिसतो आणि स्म्रुतीनियमाप्रमाणे असे करणे पाप होते. साता दिवसांचा जरी झाला उपाशी । तेने किर्तनासी सोडू नये ॥ हे तुकोबांचे नि:स्प्रुह लोकशिक्षणव्रत म्हणजे ब्रह्मकर्मावर आक्रमण वा अपराध म्हणता येईल का ? ब्राह्मण वेदविद्वांस मद्यमांस, अंगीकरून भेद न देखता खुशाल गोंधळ घालायचे, केवळ पिंडाचे पाळण करण्यासाठी पुण्यविकारा करायचे किंबहुना आचार सांडून अधर्मा टेकायचे, चहाड्चोर व्हायचे. अर्थात त्याकाळी बहुतांशी ब्राह्मण वंदाया पुरते तणसाचे वाघ होऊन राहिले होते आणि आपली आब्रु वाचवण्यासाठी "ब्राह्मण जरी झाला भ्रष्ठ । तरी तो तिन्ही लोकी श्रेष्ठ" असल्या बिनबुडाच्या पाट्या रंगवाव्या लागत होत्या. मग अशांना "हिन सुकराच्या जाती" म्हणून तुकोबांनी संबोधले तर चुकले कोठे ?.
सर्वात महत्वाचे म्हणजे ब्राह्मण त्याकाळी वयक्तिक चरित्रच गमावून बसला होता असे नाही. तर स्वदेश, स्वभाषा व स्वदेशधर्म आपल्या शुद्रस्वार्थापायी कोळून पिताना दिसत होता.
सांडुनिया रामराम । ब्राह्मण म्हणती दोमदोम । 
तुका म्हणे व्रुत्ती । सांडूनी गदा मागत जाती ॥(७९३)
पोटासाठी खौसा । वंदिती म्लेच्छांच्या ॥ (३०३५)
हे निरुपायाने आपदधर्म म्हणून ते करीत होते, असेही नाही.स्वार्थ बुडविली आचरणे (३९२२) असे तुकोबा सांगतात तर रामदास म्हणतात."कित्येक दावलमलकास जाती । कितेक पिरास भजती । कितेक तुरूक होती । आपुले इच्छेने ॥" इथे आपुले इच्छेने  हे शब्द विशेष लक्षणीय आहेत.
एकूण ब्राह्मणवर्ग परधर्मिय मुसलमानांच्या सेवेत गर्क झालेला असून त्याची नीतिमत्ताही सामान्य जनांच्या पातळीवर आलेली होती. ब्राह्मण वर्गात अमुक एक गोष्ट न करणारा असा राहिला नव्हता असे त्र्यं.शं.शेजवलकर म्हणतात. वि.का.राजवाडे देखील मान्य करतात की "घाटांचे दर्गे बनले आणि राऊळाचे महल झाले, फ़ार काय सांगावे, ब्राह्मण दावलमलकादि पीरांना भजू लागले. कित्येक ब्राह्मण पीरांचे मुजावरही बनले ! ते बहुतेक मुसलमान बनन्यासारखे झाले, इतकेच की त्यांनी सुनतेची दिक्षा मात्र घेतली नाही, तीही त्यांनी घॆतली असती, परंतू त्यांच्या आड एक मोठी धॊंड आली ती धॊंड म्हणजे महाराष्ट्रातील साधूसंत होते." याच साधुसंतांचे मुख्य प्रतिनिधी शिवबालकिल्यात संतश्रेष्ठ तुकोबा हे होते आणि ते "झाडू संतांचे मारग" या प्रतिज्ञेने कटिबद्ध होऊन भक्तिच्या सुगम मार्गाने संपुर्ण बहुजन समाजाची उन्नती सारी शक्ती एकवटून करू पाहत होते.
अवघ्या दूर्बळ जगात "दुर्बळांच्या नावे डोंगारा पिटून" आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी ब्राह्मणांनी जो ’लटकियाचा वाहो’ म्हणजे असत्य रुढ्यांचा हैदोस चालवला होता, तो जनजाग्रुतीद्वारे हाणुन पाडण्यासाठी "गाडीन मी भेद । प्रमाण तो यासी वेद ॥" अशी प्रतिज्ञा तुकोबांना करावी लागली. भेद वाढवणार्या धर्मठकांची रोखठोक पणे "वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा" या आत्मविश्वासपुर्ण घोषणेने तुकोबांनी इंद्रायणीच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला.ही घटना अटकेपार झेंडा रोवण्याच्या घटनेपेक्षा कमी नव्हेच, उलट आधिक गौरवाची आहे.
म्हणुनच "वर्ण-अभिमाने कोण झाले पावन । ऐसे द्या सांगूण  मजपाशी ॥
अत्यंजादि योनी तरल्या हरीभजणे । तयांची पुराणे भाट झाली ॥
            असे ठणकावून वर्णव्यवस्थेची रेवडी उडवून टाकणारे तुकोबा कोणत्याही कर्म-भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाला सर्वश्रेष्ठत्वाचे प्रमाण दिले असेल असे ज्यांना वाटेल त्यांना वाटो पण हा अभंग निश्चितच क्षेपक आहे.
संदर्भ : 
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,श्री पडवळ संपादित]
श्री.शिवछत्रपती(प्रुष्ठ क्र.३४) [त्र्यं.शं.शेजवलकर].
छ.शिवाजी महाराजांची पत्रे(प्रुष्ठ क्र.१६७)- [प्र.न.देशपांडे].
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? [साहित्यरत्न सुदाम सावरकर].
गीता (अ. ६-श्लो. १८) [व्यास].
महाभारत (शां.२६५-९) [वाल्मिकी].
भागवत (११-१७-४२).
स्वानुभव-दिनकर (९-२-७७)[दिनकर गोसावी].
भक्तिरहस्य (२-३९,४०.७३-४६,४८).
पहिला सुमनहार (प्रुष्ठ क्र.१२७) [श्री अनंतदास रामदासी].
दासबोध (१४-७-३१ते ३९)[समर्थ रामदास].
संत आणि समाज(प्रुष्ठ क्र.१२०) [श्री कारखाणीस].

20 April 2014

महाराष्ट्राचे हृदयसम्राट : ज्ञानराज

               संत ज्ञानेश्वरांचा जन्म इ.स. १२७५ मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत व आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते. विठ्ठलपंतचे मूळ घराणे पैठणजवळील आपेगावचे; पण पुढे ते आळंदी येथे स्थायिक झाले. ज्ञानेश्वर जन्मले ते सनातनी समाजाचा शाप घेवूनच. ‘संन्याशाचा मुलगा’ हा शिक्का त्यांच्या कपाळावर समाजाने मारला होता. त्यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी काही काळ संन्यास घेतला आणि नंतर गुरूच्या आज्ञेवरून परत ते संसारात आले. त्यानंतर त्यांना निर्वृतीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई अशी चार मुले  जन्माला आली. कर्मठ व नतद्रष्ट समाजाला ते पाहवले नाही. त्याने या कुटुंबाला बहिष्कृत करून कुटुंबाचे स्वास्थ हिरावून घेतले. तरीपण निष्ठुर समाजाने त्या चार अनाथ लेकारांनाही छळले.
आपेगाव हे औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले छोटे गाव आहे. विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत श्री क्षेत्र आळंदी मुक्कामी येऊन स्थायिक झाले. आळंदी हे सिद्धपीठ होते. त्या काळी संन्यासाची मुले म्हणून सर्व समाज या चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे. परित्यक्त ब्राह्मण म्हणून त्यांना काळ कंठावा लागला. श्रीज्ञानेश्र्वरांच्या आई-वडिलांनी देहांत प्रायश्र्चित घेतले.
ज्ञानराज माऊली..
        संत ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्राचे एक अनमोल रत्न ! महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील, परमार्थाच्या क्षेत्रातील ‘न भूतो न  भविष्यति’ असे अजोड व्यक्तिमत्त्व व अलौकिक चरित्र म्हणजे संत ज्ञानेश्वर! गेली सुमारे ७४० वर्षे महाराष्ट्रातील सर्व पिढ्यांतील, सर्व स्तरांतील समाजाने जे व्यक्तिमत्त्व आपल्या मनोमंदिरात एक अढळ श्रद्धास्थान म्हणून जपले आहे आणि जे श्रद्धास्थान पुढील असंख्य पिढ्यांतही कायमच अढळ व उच्चस्थानी राहणार आहे; असे एकमेवाद्वितीय व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर!
          अलौकिक काव्य प्रतिभा लाभलेला रससिद्ध महाकवी, महान तत्त्वज्ञ, श्रेष्ठ संत, सकल विश्र्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त, पूर्ण ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक, श्रीविठ्ठलाचा प्राणसखा - अशा शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते. परंतु त्यांचे परिपूर्ण वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडल्याचेही जाणवते. संत चोखामेळा पुढील शब्दांत त्यांना वंदन करतात.
‘कर जोडोनिया दोन्ही। चोखा जातो लोटांगणी।।
महाविष्णूचा अवतार। प्राणसखा ज्ञानेश्वर।।’ 
             प्राणसखा' हा अतिशय वेगळा, सुंदर व समर्पक शब्द चोखोबांनी संत ज्ञानेश्वरांबद्दल वापरला आहे.
संत ज्ञानेश्वरांविषयी तुकोबा म्हणतात...
ज्ञानियांचा गुरु राजा महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें ॥१॥
मज पामरा हे काय थोरपण । पायींची वाहान पायीं बरी ॥२॥
ब्राह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें । इतर तुळणे काय पुढं ॥३॥
तुका म्हणे नेणें युक्तीची ते खोली । म्हणोनी ठेवीली पायीं डोई ॥४॥
तर नामदेव महाराज ज्ञानेश्वरांबद्दल उद्गारतात...
ज्ञानराज माझी योगियांची माऊली । जेणे निगम वल्ली प्रगट केली ॥१॥
गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥२॥
अध्यात्म विद्येचे दाविलेसे रुप । चैतंन्याचा दिप उजळला ॥३॥
नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनूभवावी ॥४॥
ज्ञानराज म्हणजे माय मराठीचे हृदय !
          श्री निवृत्तीनाथ हेच संत ज्ञानेश्र्वरांचे सदगुरू होते. ज्ञानेश्वरांनी भगवद् गीतेवर  प्रख्यात टीका लिहिली.या ग्रंथास ‘ज्ञानेश्वरी’ किंवा ‘भावार्थदीपिका’ असे म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ‘ज्ञान’, श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले.
माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। 
               असे म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. सर्व स्तरांतील लोकांना ही ‘ज्ञानेश्वरी’ भुरळ घालते. मराठी भाषेतील हा अद्वितीय ग्रंथ आहे. विचार, भावना, आशयाची खोली, अलंकाराचे श्रेष्ठत्व, अद्वैतानुभूती, भक्तीचा ओलावा, रससंपन्नता या सर्वच बाबतीत ज्ञानेश्वरीने उंची गाठलेली आहे. ‘पसायदान’ ही विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या वैश्विक सद्भावनेचा, तसेच प्रतिभेचा परमोच्च साक्षात्कार आहे. कर्मयोग, ज्ञानयोग व भक्तियोग सांगणार्‍या ग्रंथराज ज्ञानेश्वरीत सुमारे ९००० ओव्या आहेत. हा ग्रंथ इ.स. १२९० मध्ये लिहिला गेल्याचे मानले जाते.
पुर्वी गीता ही संस्क्रुत भाषेमध्ये होती. ही संस्क्रुत भाषा सर्वसामान्य मराठी माणसाला समजत नव्हती. म्हणूनच ज्ञानेश्वरीच्या रुपाने हीच गीता ज्ञानेश्वरांनी प्रथम मराठीमध्ये आणली. इ.स.१२७५ मध्ये जन्मलेल्या संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेले पसायदान आजही भारतात म्हंटलं जातं.ज्ञानेश्वर  केवळ गीतेचे भाष्यकारच नव्हते तर लेखक आणि कवीही होते.भागवत धर्माला त्यांनी तात्विक अधिष्ठान दिले.संस्क्रुत भाषेच्या वर्चस्वाच्या काळात सामान्य माणसाला मराठीतून आध्यात्मज्ञान उपलब्ध करून मराठी भाषेला प्राधान्य मिळवुन दिले.
           त्यांचा दुसरा ग्रंथ ‘अनुभवामृत’ किंवा ‘अमृतानुभव’ होय. हा विशुद्ध तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. सुमारे ८०० ओव्या या ग्रंथात आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे. वाङमयीन सौंदर्य व गुणविशेषांबरोबरच मराठीचा अभिमान, संयम, उदात्तता, नम्रता, त्यांचे निर्मळ चारित्र्य, सर्वसमावेशकता, वात्सल्य, भक्तिपरता आणि कालातीतता - असे अनेक गुणविशेष त्यांच्या साहित्यातून आपल्याला अनुभवण्यास मिळतात. ज्ञानदेवांसह सर्व भावंडांवर तत्कालीन समाजाने प्रचंड अन्याय केला, पण त्या अन्यायाबद्दलची पुसटशी प्रतिक्रियादेखील त्यांच्या साहित्यात आढळत नाही, हे त्यांच्या मनाचे मोठेपणच.!
        ‘जो जे वांछिल, तो ते लाहो’ असे म्हणत अखिल विश्वाची जणू काळजी वाहणार्‍या संत ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायासह सर्वच भक्त प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. त्यांनी धर्मातील क्लिष्ट अवडंबरे काढून धर्माला कर्तव्याचा वेगळा अर्थ दिला. वाङ्मय निर्मितीबरोबरच त्यांनी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज रोवण्याचा यशस्वी प्रयत्न चंद्रभागेच्या वाळवंटात केला. भागवत धर्माचा तथा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याचे अभूतपूर्व कार्य त्यांनी केले. संत नामदेव, संत गोरोबा कुंभार, संत सावतामाळी, संत नरहरी सोनार, संत चोखामेळा या समकालीन संत प्रभावळीचे अनौपचारीक नेतृत्व करत, संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्टातील वारकरी संप्रदायची प्रतिष्ठापणा ज्ञानेश्वरांनी केली. त्यांनी समाजातल्या सर्व लोकांना भागवत पंथाच्या झेंड्याखाली एकत्र आणले. ज्ञानेश्वरांच्या काळात  नाम शिंपी, नरहरी सोनार, सावता माळी, कान्होपात्रा असे कित्येक भागवत भक्त अभंगरचना करत होते. हे वारकरी कोणालाही श्रेष्ठ-कनिष्ठ मानत नव्हते. ज्ञानदेवांनी लोकांना भक्तीचा सोपा मार्ग दाखवला. परमेश्वरला तुमच्याकडून काही नको असते. देव भक्त भावाचा भुकेला असतो तुम्ही मनापासून भक्ती करा. त्यासाठी पुजा व अर्चेचे अवडबर  माजवण्याची  गरज नाही. केवळ नामस्मरण करा, देव तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्ञानेदेव जरी मोठे तत्त्वज्ञ होते तरी ते रुक्ष स्वभावाचे नव्हते. उलट त्यांच्या वागणुकीत सर्वांना आईचे वात्सल्य दिसायचे. म्हणूनच सर्वच भक्त ज्ञानेश्वरांना प्रेमाने ‘माउली’ म्हणतात. 
        ‘अमृतानुभव’ या ग्रंथाच्या लेखनानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली. संत नामदेव महाराजांच्या ‘तीर्थावली’ मध्ये या तीर्थयात्रेचा उल्लेख आढळतो. या यात्रेनंतर माउलींनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला. संत नामदेवांच्या ‘समाधीच्या अभंगां’मध्ये तत्कालीन संदर्भ सापडतात. अन्य संतांची मानसिक स्थिती, त्यांच्यासह समाजाला झालेले दु:ख, खुद्द नामदेव महाराजांच्या वेदना, ज्ञानेश्वरांचा संयम आणि निग्रह या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब समाधीच्या अभंगांत आढळते.
        ज्ञानेश्वरांनी केवळ मराठी साहित्यालाच नाही तर संपुर्ण जनमाणसाला दिलेली अम्रुतवाणी लोकांच्या चिरकाल स्मरणात राहिल. ते सांगत असलेले तत्वज्ञान सनातनी लोकांना समजत नव्हते, की त्यांचा विरोध होता की कोनते कारण होते. त्यांच्या समाधीपणात ते अल्प काळात समाधिस्त झाले. त्यांचे समाधी घेणे म्हनजे न उलघडलेलं कोडंच आहे. आज श्री ज्ञानराजांचे समाधीजीवन असे या महापुरुषाचे लोकोत्तरत्व दर्शविणारे वेगळे कार्य सदभक्तांद्वारे अहमहमिकतेने प्रचारिले जाते. त्याब बाबत कोणी शब्द काढला तरी तो द्वेषी वा तिरस्कारणीय नास्तिक ठरतो.पण मराठीजन म्हणून एवढं मात्र नक्की वाटते की ज्ञानराज जर अजुन काही दिवस जिवंत राहिले असते तर मराठी भाषेला अजुन मोठ्या दर्जाची सम्रुद्धी प्राप्त झाली असती यात काही एक दुमत नाही. असा हा महान ज्ञानसुर्य इ.स.१२९६ ला आळंदी इथे समाधिस्त झाला.
संदर्भ :
मराठी संतांचा परमार्थमार्ग [गुरुदेव रानडे].
संत आणि समाज [पद्मश्री का.कारखानीस ].
संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगाचा गाथा [शासकीय].
आंतरजालावरील काही संकेतस्थळे.
दैनिक देशोन्नती [आत्मोन्नती गुरुवार,दि.२० नोव्हेंबर २००८].

17 April 2014

"अब्राह्मणी" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील

दिनेश पाटील
संपर्क : ९६२३८५८१०४
        स्वातंत्र्य समता आणि मित्रता ही त्रयी फ़्रेंच समाजक्रांतीने प्रथम प्रवर्तित केली नसून नितींच्या वैराजाने केलेली आहे. तिची समतावादी परंपरा "अब्राह्मणी" परंपरा म्हणून वैदिक काळापासून ओळखली जाऊ लागली. असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून भारतीय इतिहासातील "अब्राह्मणी" इतिहास आणि ज्ञानपरंपरेची सशक्त पुराव्यानिशी पुनर्मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. म्हणूनच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला "इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुरस्कार" त्यांना जाहीर झाला, ही महत्वाची घटना आहे. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखणाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखणात विकसीत केला. त्यामुळेच इतिहासाची नव्याने मांडणी करणार्या संशोधकास हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला ॲकॅडेमिक मान्यता मिळत आहे.
            गेली ४० वर्ष एक "जीवनदायी कार्यकर्ता" म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणार्या शरद पाटील यांना अवहेलना, द्वेष आणि मनहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक "जैविक विचारवंत" ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.
इतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी मांडलेली भुमिका, लावलेला इतिहासाचा अन्वयार्थ याबाबत नेहमीच अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. भविष्यातही ते निर्माण होतील. परंतू इतिहासाच्या अभ्यासाची त्यांची अन्वेषण पद्धत, त्यांचे सिद्धांत समग्र समाजाचा इतिहास समजून घॆऊ इच्छिणार्यांना सतत प्रेरक शक्ती देणारे आहेत. भुतकाळाच्या घनदाट अरण्यात दडलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे नवी द्रुष्टी आणि आत्मविश्वास देतात.
          राम आणि क्रुष्ण यांची भारताच्या इतिहासातील भुमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्याचे ऐतिहासिक महत्व असे अनेक मुलभुत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इ.स.१९८२ मध्ये रणजित गुहा यांच्या नेत्रुत्वाखाली "वंचितांचे" भारताच्या इतिहासातील योगदान मांडणारा "सबर्ल्टन प्रकल्प" सुरु झाला. त्याअगोदर शरद पाटील यांनी वंचित / हीन मानल्या गेलेल्या जात समुह तसेच स्त्रियांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करनार्या अब्राह्मणी परंपरेची सैद्धांतिक मांडणी सुरु केली होती हे महत्वाचे.
         इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फ़ुले आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुदा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. तर फ़ुले आणि आंबेडकर हे दार्शनिक होते हे त्यांनीच सिद्ध केले. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षाचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. "दासशुद्रांची गुलामगिरी", जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती व प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मात्रुसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी या चार ग्रंथामधून त्यांनी हा महाप्रकल्प साकार केला.
           शिवराय-संभाजींची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतू या चिकित्सेतून शिवराय-संभाजींच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. शरद पाटील यांनी त्यांच्या "शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रु कोण-महंमदी की ब्राह्मणी ?" या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषन पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले. या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असनार्या शिवरायांच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या अनेक शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. हे पुस्तक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाला असणारे अद्वितीय योगदान आहे. याबरोबरच "अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र" या ग्रंथाने संस्क्रुतीतील  सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्क्रुतीच्या संदर्भात अधोरेखित केले.
         मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत दलित अदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला.संस्क्रुत, प्राच्यविद्या  आणि तत्वज्ञान या तिन्ही शाखांचा आणि सर्वाहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशॊधकाची द्रुष्टी आधिक व्यापक, मुलगामी झाली आहे. त्यांची ही द्रुष्टी निखळ भुमिकेतून स्वीकारल्यास इतिहासाच्या आकलनाच्या प्रस्थापित मर्यादा आणि सांस्क्रुतीक राजकारणाचे दबाव झुगारून संशोधन करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि मनोधैर्य अभ्यासकांना मिळेल. ज्याची उद्याच्या काळात अनिवार्य गरज आहे.
         शरद पाटील यांच्या संशोधनाची तुलना "अल्जेरीअन मनोविश्लेषक" आणि "काळ्यांच्या" आत्मसन्मानाच्या लढ्यातील जीवनदायी कार्यकर्ता फ़्रांन्झ फ़ॅननशी करता येईल. त्यांच्या "वसाहतवादाचे मानसशास्त्र" मांडनार्या "द रेचेड ऑफ़ द अर्थ" या १९६३ मधील महान साहित्य क्रुतीने तुलनात्मक वाचन केल्यास शरद पाटील यांच्या योगदानाचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी वर्गजातीस्त्रीदास्यातांच्या लढ्यांना अग्रकमाने समजावून घेत माफ़ुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकुणच भारतीय इतिहास याकडे पारंपारिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी द्रुष्टीने पाहिले. याचे कारण असे की फ़क्त मार्क्सवाद, फ़ुलेवाद किंवा आंबेडकरावाद हे द्रुष्टीकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे  समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फ़ुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही "मार्क्सवाद - फ़ुले - आंबेडकरवाद" ही अब्राह्मणी अन्वेषणपद्धती आधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता शरद पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषणपद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात.हा कोटीक्रम जातीवाचक नसून ज्ञानपरंपरावाचक आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा : 
            कॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग १ व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग , जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १ तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग २  जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड  तर खंड ४  मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा? नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.

13 April 2014

इतिहासावरील विषाणू दाखवणारा लेखक

             आपल्या देशाचा इतिहास म्हणजे गुलामगिरीचा इतिहास होय. हिंदुस्तान आणि महाराष्ट्राचा विचार केला तर बाहेरून आलेल्या आर्यांच्या टोळ्यांनी इथल्या मुळ रहिवाशी महारट्ठ यांना जिंकुन इथला मुळ इतिहास मिटवण्याचे काम या टोळ्यांनी केले. राजमाता जिजाऊ, विश्ववंद्य शिवराय यांनी गुलामगिरीचा इतिहास बदलला आणि स्वराज्याची स्थापना केली.नंतर फ़ुले, शाहू, आंबेडकरांनी [यामध्ये केळुस्कर गुरुजी आणि जवळकर यांचेही मोलाचे योगदान आहे.] आपल्या इतिहासात घुसखोरी करणार्या विषाणूंना नष्ट केले व स्वत: इतिहास समोर आणला. परंतू [अजुनही] आपल्या इतिहासात विषाणू लपून बसले आहेत हे विषाणू दाखविण्याचे काम डॉ.बालाजी जाधव हे करीत आहेत.
डॉ.बालाजी जाधव समिक्षक, विचारवंत आणि नव्या पिढीचे लेखक आहे. मराठा सेवा संघाची मराठवाडा विभागाची त्यांच्याकडे जबाबदारी आहे. महाराष्ट्रभर त्यांचे व्याख्यानाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे कार्यक्षेत्र मोठे आहे. शिवाय ते उच्चशिक्षित बी. एच. एम. एस डॉक्टर आहेत. सध्या एम. डी. चेही शिक्षण चालू आहे. तरूण वयात अल्पावधीतच त्यांनी हे यश प्राप्त केलं आहे. समाजसेवेचे व्रुत्त घॆऊन ते काम करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी मराठ्यांना संघटीत होण्याचे आवाहन केले आहे. त्यांची घेतलेली ही मुलाखत.
खंरत्नाकर डागळे : आपण लेखक म्हणून परिचीत आहात त्याच बरोबर मराठा सेवा संघाचे कार्य ही चालू आहे. या विचाराकडे आपण कसे वळलात ?
डॉ.जाधव साहेब : तसा मी कट्टर शिवसैनिक होतो. घरातही हिंदुत्ववादी वातावरण. माझ्या घरात बाळासाहेब ठाकरे यांचे फ़ोटो असायचे. सामना या दैनिकातील कात्रणं मी काढून ठेवत. ते आजही माझ्याकडे आहेत.मी कट्टर हिंदुत्ववादी होतो.आज अगदी या विरोधी आहे.
रत्नाकर खंडागळे : मग परिवर्तनवादी विचाराकडे कसे ?
डॉ.जाधव साहेब : मी प्रथम कट्टर हिंदुत्ववादी होतो. मी कुणाचेही काही ऐकत नव्हतो. माझ्या भावांनी मला एकदा प्रश्न केला की, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध का झाला ? या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. त्यांनी दुसरा प्रश्न केला की, तुकाराम महाराज वैकुंठी गेले की त्यांच्या खून झाला ? याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मात्र भावाने असे प्रश्न केल्याने मी मात्र भावावर खवळलोच तेंव्हा भावाने मला आ.ह.साळूंके यांचे विद्रोही तुकाराम, मा.म.देशमुख यांचे रामदास पेशवाई आणि गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचण्यास सांगितले. दुसरा प्रसंग असा घडला की, मी लातुरला १२ वी इंटरशीपला असतांना माझा मित्र भोसले मला मा.म.देशमुख यांच्या केडर कॅंपला घेऊन गेला होता. तेंव्हा मला त्यांचे विचार आवडले आणि डोळ्यावरची हिंदुत्ववादाची झाडप गळून पडली. आपणही समाजासाठी काहीतरी करावं असं ठरवलं. त्यावेळेस मा.म.देशमुख यांची भेट घेतली. त्यांनी शिक्षण विचारलं, मी १२ वी इंटरशिपला असल्यामुळे त्यांनी नंतर या तुमचं समाजासाठी काम करण्याचं वय नाही असे सांगितले. ही आपलेपणाची भावना मला पटली कारण असे कोणीही सांगत नाही तेंव्हा पासून मी या चळवळीत कार्य करायचं ठरवलं व त्याप्रमाणे मी कार्य करत आहे.
रत्नाकर खंडागळे : आपण लिखानाकडे कसे वळलात ? 
डॉ.जाधव साहेब : मराठा सेवा संघाचे किर्तन ऐकले व जेम्स लेन हे प्रकरण झालं तेंव्हा अक्षरशा मी रडलो. यावेळेस मी या विषयावर अनेक पुस्तकं वाचली यावरच मी माझ्या शैलीत एक प्रकरण लिहिले या प्रकारे मी लेखनाकडे वळलो. एक द्रुष्टी मिळाली ओळीचा मतिअर्थ समजला.
रत्नाकर खंडागळे : आपले पहिले पुस्तक कोणते ? काही अडचणी आल्या का ?
डॉ.जाधव साहेब : रामदासी पेशवे शिवाजी महाराजांवर शिंतौडे उडवत होते. तेंव्हा मराठा हा झोपलेलाच होता त्यांना जागे करण्यासाठी मराठ्यांनो षंड झालात काय ? हे पहिले पुस्तक लिहिले.अडचण म्हणजे हे पुस्तक छापायला कोणी प्रकाशक तयार नव्हता. मुद्रकही छापायला तयार नव्हता. तेंव्हा नाव न टाकण्याच्या अटीवर एक मुद्रक तयार झाला व मी ही आईच्या नावाने पंचफ़ुला प्रकाशन मार्फ़त पहिले पुस्तक छापले. ह्या पुस्तकाची दोन वर्षात १५००० प्रति विकल्या गेल्या. काही पुस्तके तर आमच्या बौद्ध बांधवांनी स्वत: वाटली.७ हजार पुस्तके जिजाऊ स्रुष्टीवर दोन तासात विकल्या गेली या पुस्तकाच्या सात आव्रुत्या आहेत.
रत्नाकर खंडागळे : आगामी कुठलं पुस्तक येतय ? किती पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत.
डॉ.जाधव साहेब : सध्या खेडेकर साहेबांच्या जिजाऊ कहे शिवबासे या पुस्तकाचे अनुवाद चालू आहेत. त्याच वाघ्या कुत्र्यावर ही पुस्तक येतय. माझी पाच पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये मराठ्यांनो षंड झालात काय ?, नाठाळांच्या काठी हानू माथा,ब्राह्मणांना का झोडपू नये, जेम्स लेन पुस्तकातील ब्रह्मराक्षस हे पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
रत्नाकर खंडागळे : शिवधर्माबद्दल थोडं सांगा.
डॉ.जाधव साहेब : शिवधर्म म्हणजे एक जाती अंताची चळवळ आहे. इथला बहुजन समाज अठरा पगड जातीत विभागला आहे.त्यांना स्वत:ची ओळख नाही. त्यांना ओळख देण्याचे काम आम्ही करतो. बौद्ध धर्म आणि शिवधर्माच्या माध्यमातून आम्ही जाती अंताचा लढा लढतोय.
रत्नाकर खंडागळे : मराठा आरक्षणा बाबत काय मत आहे ?
डॉ.जाधव साहेब : मराठा समाज हा शिक्षणापासून दुर आहे.आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर आणि भाऊसाहेब देशमुख यांनी दिले आहे. सामाजिक,शैक्षणिक आणि मागासलेपण दुर करण्यासाठी दिले आहे. परंतू कुणबी आणि मराठा असा भेद करून ते नाकारले गेले आहे. त्यासाठी आम्ही लढत आहोत. ओबीसी ला आमचा विरोध नाही ते आमचे बंधुच आहेत.वैदिक विरुद्ध अवैदिक असा हा लढा आहे.
रत्नाकर खंडागळे : तरुणांना काय संदेश द्याल ?
डॉ.जाधव साहेब : मराठा तरुणांमध्ये एक दुर्गुण आहे ते एकमेकांच्या जवळ येत नाहीत. जेम्स लेन प्रकरणात ब्राह्मण समाज एक झाला परंतू आमचा मराठा समाज एक होत नाही. त्यांच्या अहंमपणाची भावना आहे.
ही भावना टाकून आज तरुणांनी संघटित व्हावे. आज विचार, देवान-घॆवान करणं महत्वाचं आहे. मोठा भाऊ म्हणून काम करावं तेंव्हा इतिहास सांगण्याचा व शिकवण्याचा अधिकार राहिल.
मुलाखत : रत्नाकर खंडागळे

9 April 2014

आपल्या सर्वांचे शिवराय !!

          आमचं शिवरायांवरचे प्रेम वयाच्या नवव्या वर्षी, चौथीच्या पुस्तकातील अफ़झल खानाच्या चित्रावर पेनाने गिचमिड कालवा करून सुरु झालं. त्याचवेळी चौथीत पहिल्यांदाच कळलं कि वर्गातला नौशाद् शेख आपल्यातला नाही. हे म्हणजे अफाटच होतं, आजपर्यंत आमच्या घोळक्यात तुमच्या-आमच्यासारखाच­ असणारा, मिसळणारा आणि आरेला कारे करणारा नौशाद एकदमच परका झाला होता. आम्ही काही गोष्टी फक्त तो नसतानाच बोलायला लागलो. त्याच्या समोर शिवाजी महाराजा विषयी प्रेम व्यक्त करायला कचरू लागलो. हे त्याने पण लगेच समजून घेतले असावे. कारण त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप बदल झाला होता. जरा मोठे झालो कि कळते कि आपला धर्म आणि जात आपल्या रक्तातच आहे, लहानपणी ते रक्त वेगळे असते का कुणास ठावूक ? पण मोठेपणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या रक्ताचा, रक्तात भिनलेल्या संस्कृतीचा, आपल्या रक्ताशी मिळतेजुळते रक्त असणाऱ्या (जातभाई ) नेत्यालाच आदर्श मानायला चालू करतो. आणि ह्याच वेळी चालू होते दुसर्या जाती - धर्माच्या नेत्यांचा त्या-त्या लोकांच्या समोर अतोनात आदर करणे. मग अश्या तर्हेने परतफेड चालू होते, कुणी आंबेडकरांचे गोडवे गातो, कुणी शिवाजी महाराजांचे, कुणी मौलाना आझाद, टिपू सुलतान किंवा भगवानबाबा. दहावी पर्यंत येस्तोवर कळले कि आपण समाजात असताना सर्वधर्म समभाव असतो आणि सजातीय लोकामध्ये असताना आपली जात आणि धर्म संकटात आलेला असतो. बहुतेक लोक हे अश्या तर्हेचे सोंग घेवून समाजात वावरत असतात आणि वरून मी जातीभेद धर्मभेद मानत नाही असे सांगताना "त्या" लोकानी एवढे माजल्यावणी करायला नाही पाहिजे असे सल्ले पण देत असतो.
हळू हळू दहावी पर्यंत नौशादचा ग्रुप वेगळा झाला व आमचा वेगळा. तरी पण क्रिकेट खेळायला, गणपतीची वर्गणी मागायला तो आमच्यात असायचाच. पण आमच्या लक्ष्यात येवू लागले कि प्रत्येक वेळी याला आपण देशाशी कसे इमानदार आहोत, हिंदू धर्माचे शत्रू नाही आहोत हे सिद्ध करावे लागत आहे किंवा तोच स्वता:हून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सईद अन्वरला आमच्या पेक्ष्या एक शिवी तो जास्तच द्यायचा. डोक्याला नेमाटी वोढून शिवजयंतीची वर्गणी मागताना शिवाजी महाराजा बद्दलचा त्याचा आदर आम्हाला नेहमी जास्तच वाटायचा. चुकून आम्ही कधी "शिवाजी" बोललो तरी तो फक्त "महाराजाच" म्हणायचा. अर्थात त्याच्या आदराविषयी अजिबात शंका नाही पण आमच्या इतर मित्रापेक्षा त्याचे योगदान नेहमीच जास्त असायला पाहिजे असा त्याचाच दंडक होता. असा दंडक त्याने का करून घेतला असेल याचे उत्तर आजच्या अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक ह्या दोन सज्ञे मध्ये आढळेल. त्यांनी इथे राहावे पण आम्ही सांगेन तसेच दुय्यम नागरिकत्व पत्करून राहावे हि आपली सुप्त पण कधी कधी उतू येणारी भावना. एकुणातच हे राज्य आमचे आहे हि भावना जणतेमध्ये निर्माण करणे हे म्हणजे धोरणात्मक रित्या शिवाजी महाराजांच्या विचारणा मूठमाती देण्यासारखे आहे.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे बघताना सर्वसामान्य मराठी माणूस हा अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह, आणि भवानी तलवार ह्या पुढे जाताना दिसत नाही तर अमराठी माणूस हा मराठ्यांचे राज्य, लुटारूंचे राज्य अश्या कुत्सित नजरेनेच बघताना दिसतो. ह्याला मूळता आपली शिक्षण पद्धती आणि राजकारणच कारणीभूत असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे स्वतंत्ररित्या पाहता येवू शकणार नाही. हिंदुस्थानमध्ये दक्षिण उत्तर आणि पशिच्म पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारा, हे राज्य राजाचे नाही तर रयतेचे आहे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा तो एकमेव राजा होवून गेला. शिवाजी महाराजांनी स्वता:साठी फक्त कार्यकर्ते नाहीत तर आपल्या पाठीमागे राज्य सांभाळतील असे नेते तयार करून एक स्वराज्याचा विचार दिला होता म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीत तयार झालेले ह्या छोट्याश्या स्वराज्याने पुढे जावून आपली सीमा उत्तरेकडे अफघानिस्तान पर्यंत तर दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत पोहचवली.
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीनंतर नंतर जवळ जवळ पावणे चारशे वर्षांनी जर आजच्या समाजाकडे आणि राज्यव्यवस्थेकडे पाहिले तर ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो कि आपण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या, समानतेच्या, न्यायाच्या, कायद्याच्या राज्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेला तिलांजली दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागणारे महाराजांचा नेमका कोणता विचार रुजवू पाहत आहेत हेच कळत नाही. आजचा काळ मला शिवपूर्व काळाची आठवण करुण देत आहे. मुघलांनी आणि इतर दक्षिणेतल्या शाह्यांनी जसे सरंजामशाहीला प्रोत्साहन देवून हिन्दुस्थानवरचि आपली पकड मजबूत केली होती तशीच पकड लोकशाही मार्गाने दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी खानदानी सरंजाम निर्माण करून आपले राज्य चिरायू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वतणासाठी झालेल्या लढाया आपण कधी कधी पाहतो पण त्यामुळे वरच्या सल्तनतीला काहीच फरक पडत नाही.
प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजी महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचे माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.
आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगलीसाठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील आणि नौशाद पुढे त्याच्या मित्रांना महाराजा विषयी बोलताना अडखळण्याची गरज पडणार नाही किंवा किंवा नौशादाला त्याची इमानदारी सिद्ध करण्यासाठी सईद अन्वरला एक शिवी मुद्दामहून जास्त द्यावी लागणार नाही.

संदर्भ- http://vikasgodage.blogspot.in.
लेखक - विकास गोडगे सर.

28 March 2014

संतश्रेष्ठ तुकोबा : वैकुंठगमन की खुन ? [भाग तीन]

तुकोबांचे वैकुंठगमन आणि जिजा-कान्होबा.
आपण हे क्षणभर धरून चाललो की "संतात कीर्ति केली । तनु सायुज्यी नेली ॥"असे हे सदेह वैकुंठगमनाचे अदभुत व अपुर्व भाग्य एकट्या तुकोबांच्याच वाट्याला आले होते.तेंव्हा अशा या भाग्यशाली परिवाराकडे देहुच्याच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांनीदेखील केवढ्या आदराने, किती आत्मियतेने पाहिले असते. तुकोबांच्या पुण्यपावन कुटुंबियांना कसे डोक्यावर घेऊन नाचवले असते. तळहाताच्या फ़ोडाप्रमाणे वागवले असते. त्यांच्यावर प्रेमाचा व सुखांचा वर्षाव केला असता. तुकोबांचे एखादे भव्य स्मारक उभारून तेथे नित्यमहोत्सवाचा कसा जल्लोष उडवून दिला असता आणि तुकोबांची अम्रुतवाणी मिळेल तेथून संग्रहीत करुन तो प्रचंड गाथा कसा अगदी सुरक्षीत करून ठेवला असता. त्या पुण्यस्थळाची माती मस्तकी  लावण्यासाठी व अभंग उतरून नेण्यासाठी दर्शकांची कशी रीघ लागली असती. अगदी स्वाभाविकपणेच हे सारे घडणे अनिवार्य होते. परंतू असे काही घडले आहे का ? ऐतिहासिक आधार काय सांगतात ? आपणास आश्चर्य वाटेल की इतिहास याबाबतीत स्पष्टपणे विरुद्ध साक्ष देत आहे.
           इतिहास स्वच्छ सांगतो की संतश्रेष्ठ तुकोबांच्या निर्वणानंतर महिना-दोन महिन्यातच तुकोबांच्या संपुर्ण परिवाराला देहू गाव सोडून जाणे भाग पडले. संपुर्ण कुटुंबाला देहुतून परागंदा व्हावे लागले. तुकोबांच्या निर्वाणानंतर जिजाबाई आपल्या लहान मुलास घेऊन खेडला जाऊन राहिल्या.कान्होबा सुदुंबरे येथे जाऊन राहिले.त्यामुळे विठ्ठलटिके पडिक राहिले (तु.संतसांगाती-मंबाजी). मंबाजीकडे नुसत्या देवाच्या पुजेऐवजी देऊळवाड्याची वगैरे सर्वच व्यवस्था आली होती. अशा व्यवस्थेत ती मंडळी देहुत राहणे शक्य नव्हते.’ (तु.सं.सां.-बहिना) कचेश्वर ब्रम्हे यांना, निर्वाणानंतर एक-दिड तपाने देहूस १०-५ अभंगाखेरीज तुकोबांची अम्रुतवाणीही मिळू शकली नाही. (तु.सं.सां.-कचेश्वर). तुकोबांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या निर्वाणानंतर तडकाफ़डकी गाव का सोडले, याचा संकेत कान्होबांच्या तत्कालीन अभंगातच मिळतो. आपल्या शोकमय अभंगात ते त्यावेळचे नि:सहाय व भयास्पद वातावरण सुचित करतात की-
आक्रंदती बाळे करूणावचनी । त्या शोके मेदिनी फ़ुटो पाहे ॥(२९८८)
असो आता काई करोनिया ग्लांती ? कोणा काकुलती येईल येथे ?
करिता रोदना बापुडे म्हणती । परि नये अंती कामा कोणी ॥ (२९९०)
माझे बुडविले घर । लेकरेबाळे दारोदार ।
लाविली काहार । तारातीर करोनि ॥(३००६)
काही विपत्ती अपत्या । आता आमुचिया होता ।
काय होईल अनंता ? पाहा,बोलों कासया ? ॥(३०११)
              अर्थात आपली मुलेबाळे सुद्धा निराधार झाली, दारोदार लागली व त्यांचेवर कोणत्या क्षणी काय विपत्ती कोसळेल याचा नेम उरला नाही, या भयग्रस्त भावनेनेच प्रिय पुत्रबंधुंनी आपली जीवाभावाची भुमी ताबडतोब सोडली हे स्पष्ट दिसून येते.
         त्यातही विचार करण्यासारखी गोष्ट ही की,तुकोबांच्या परिवारापैकी एकाही व्यक्तीने पुढील वीस-एकवीस वर्षात देहूच्या भुमीवर पाऊल सुद्धा टाकले नाही. आपल्या महान पित्रुदेवताच्या वार्षिक निर्वाणमहोत्सवाला देखील नाही ! आणि हा उत्सव तरी होत होता कोठे ? जिजाईच्या म्रुत्यु नंतर एकवीस वर्षाचा नारायणबुवा बंधुसह देहुस आला. तो देखील कचेश्वर यांच्या सत्पुरुषाने त्यांना प्रेरित केल्यानंतर. तुकोबांच्या मुलांनी पुन्हा देहुस ठांण दिल्यानंतर तिकोबांबद्दल जाग्रुती निर्माण झाली. विशेषत: तुकोबांचे व्रुंदावन नारायणबाबाने इ.स.१७०४ मध्ये बांधून पुण्यतिथी साजरी करावयास लागल्यानंतर तुकोबांचा किर्तीमहिमा वाढण्यास आधिकाधिक भर पडू लागली. (सं.तु.प्रास्ताविक प्रु.८) त्यापुर्वी महादेव, नारायण आदि तुकोबांच्या सुपुत्रांनी नुसती देहुच सोडली होती असे नव्हे तर विठठल देव देखील सोडला होता. त्यांनी मधल्या काळात विठोबाच्या पुजेअर्चेकडे लक्षच दिले नाही कारण विठोबा मुळेच त्यांच्या घराण्याची धुळधान उडाली अशी त्यावेळी त्यांची समजुत झाली होती. (सं.तु.प्रु.११२). श्री.वा.सी. बेंद्रे यांचे सारे संशोधन बरोबर असेल तर, तुकोबांच्या निर्वाणानंतर त्यांच्या परिवाराची झालेली वाताहत, ही दुरवस्था व विचित्र मनोरचना एकच गोष्ट ओरडून सांगत आहे असे म्हणावे लागेल की तुकोबांचे सदेह वैकुंठगमन झालेले नाही शंका नाही.
मंबाजी उवाच
      नुकतीच चाळीशी ओलांडलेल्या तुकोबांचे घातपाती निर्वाण झाले. त्यावेळी जिजाईंच्या उदरी असणारे नारायणबुवा हे वीस-एकवीस वर्षाच्या वयात जेंव्हा देहूस आले, त्यावेळचा एक प्रसंग तुकोबांचे पणतू गोपाळबुवा यांनी "नारायणबाबाचे चरित्राख्यान" यात दिलेला आहे.
एके दिवशी नारायण । इंद्रायणीचे करूनी स्नान ।
करावया श्रीमुर्तीचे पुजन । मार्गे आपण जात असता ॥
तव भेटला ब्राह्मण । तुकयाचा द्वेष्टा पुर्ण ।
मंबाजी ज्याचे नामाभिमान । तो दुष्टवचन बोलिला ॥
म्हणे रे तुझा पिता कोठे गेला ? नेणो भुताखेतांनी ओढूनि नेला ।
किंवा विदेशासि जाऊन मेला । घटस्पोट केला नसता पै ।...
            यावेळी पित्याची उत्तरर्क्रिया न केल्या कारणाने मंबाजीने नारायणाला मुर्तीला स्पर्ष सुद्धा करू दिला नाही. अखेर मंबाजीच्या उर्मटपणामुळे त्याला तिघा भावांनी ठोकून ’दिल्हा ग्रामांतरी लावुनिया ॥’ असे म्हंटलेले आहे. वरील प्रसंग हा गोपाळबुवांना अधिक्रुत परंपरेद्वारे अवगत होणे हे जितके स्वाभाविक आहे तितकेच "विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांनी (३१६०)" अशा मंबाजीने हा डंख मारणे देखील नैसर्गिक आहे, यात शंकेला जागा नाही. तुकोबासंबंधी मंबाजीने हा केलेला विषारी उपहास पाषाणह्रुदयी मंबाजीच्या स्वभावाची यथातथ्य कल्पना आणून देतो. सदेह वैकुंठगमनाचे ताशे कोणी कितीही बडवले असले तरी आतली खरी बात मंबाजीलाच माहीत असल्यामुळे तो वीस एकवीस वर्षनंतर सुद्धा दुष्टवचन बोलून नारायणाला सुतकी समजून मुर्तीस हातही लावून देत नाही.हे खचितच विचार करण्याजोगे नव्हे का ? 
हत्येला जात जबाबदार ?
           तुकोबांचे हे खुनी म्हणजे मंबाजीसारखे एका विशिष्ट जातीचे असेच म्हणता येईल का ? छे:! तुकोबांच्या या खुनाला विशिष्ट जात जबाबदार आहे असे समजून जे कोणी जातीय तेढ अथवा जातीद्वेष वाढवू पाहतात त्यांना तुकोबा मुळिच कललेले नाहीत असे म्हणजे भाग आहे. गुणकर्मवादी तुकोबा जन्माने ठरलेल्या कोणत्याही जातीला अथवा वर्गजमातीला एकाच काठीने हाकायला तयार नाहीत. ते म्हणतात,"नाही यातीकुळ फ़ासे ओढी तयासी" अर्थात गळेकापू ठगाला जातकुळी कसली ?. जो दुर्जन असेल तो कुळाने मांग असो वा ब्राह्मण त्यांची जात एकच त्यामुळे तुकोबांचा खुन करणारी ती एक विशिष्ट मनोव्रुत्ती आहे. मंबाजी वगैरे केवळ तिचे प्रतिक, केवळ प्रतिनिधी! नुसत्या जन्मजातीवरून अथवा पंथादिकावरून उच्चनिचतेचा टेंबा मिरवून मोठेपणाची मिरासदारी वा त्याद्वारे स्वार्थसाधनाची मक्तेदारी कायम ठेवु पाहणारी आणि त्यासाठी हवे ते करू शकणारी दुष्ट मनोव्रुत्ती हीच तुकोबांच्या खुनाला जबाबदार आहे. शुद्र समाजनेते व्हायला लागले तर आम्हाला कोण विचारणार ? या द्वेषमुलक शुद्रस्वार्थी व वर्णांहंकारी कूविचाराचा खदखदता लाव्हारस कर्मठ समाजात आतल्या आत तीव्रतेने धुमसत आला. त्याचा मंबाजी आदिंच्या माध्यमातून झालेला परिस्फ़ोट म्हणजेच मानवतावादी वैष्णवाग्रणी तुकोबांचा अमानुष खुन. श्री नरहर चव्हान यांचे म्हणजे अक्षरश: सत्य आहे की "तुकारामाला बिना पेट्रोल च्या विमानात बसवुन सदेह वैकुंठाला पाठवण्याची पोपटपंची पुन्हा पुन्हा कथन करणे म्हणजे हा तुकारामावर अन्याय केल्यासारखे होईल". हा माणुस सामाजिक विषमता, वर्णवाद्यांची मिरासदारी व बडव्यांचे उपद्व्याप दूर करण्याच्या प्रयत्नात त्या काळात स्वत:च्या बलिदानाने हुतात्मा झाला, असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल!. तसेच कुठलाही वर्णद्वेष न वाढविता जन्माधिष्ठित उच्चनिचतेचे समाजातून समुळ उच्चाटन करून "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ" ही विचारप्रणाली जीवनात सर्वत्र प्रतिष्ठित करणे हीच तुकोबांविषयीची खरीखुरी भक्ती म्हणता येईल.
संदर्भ ग्रंथ :
संतश्रेष्ठ श्री तुकोबांच्या अभंगगाथा [शासकीय,पंढरीप्रत,पडवळांची गाथा,साहित्यलंकार रा.गो.पाटील यांनी संपादलेली]
संतश्रेष्ठ तुकाराम : वैकुंठगमन की खून ? (मुळ ग्रंथ)[साहित्यरत्न सुदाम सावरकर]
स्वप्न आणि सत्य [श्री साने गुरुजी]
प्रसाद[फ़ेब्रुवारी १९६७  श्री.न.र.फ़ाटक]
महाराष्ट्र सारस्वत [श्री.वि.ल.भावे]
संतकवि तुकाराम आणि त्यावरील आक्षेप [श्री दयानंद पोतदार ]
नारायणबाबा चरित्राख्यान [श्री गोपाळबुवा]
व्रुत्तपत्रे [लोकमत दि.६ फ़ेब्रुवारी १९७७]