Showing posts with label हिंदुत्ववाद. Show all posts
Showing posts with label हिंदुत्ववाद. Show all posts

24 December 2016

मनुस्मृति : समाजशास्त्रीय समालोचन

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर,  १९२७ रोजी "मनुस्मृति" या ग्रंथाचे जनसमुदयाच्या समक्ष जाहिररित्या दहन केले. दलित समाजाला मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी त्यांच्यामध्ये गुलामीच्या विरोधात संघर्षाची जिद्द निर्माण केली. त्यासाठी त्यांनी २० मार्च १९२७ रोजी चवदार तळयाचा सत्याग्रह केला. हा सत्याग्रह चवदार तळ्यातील पाणी पिण्यासाठी नव्हता, ज्या तलावात कुत्री-मांजरी, जनावारे पाणी पित होती. त्यांना पाणी पिण्याची बंदी नव्हती, परंतु माणसाला पाणी पिण्याची बंदी होती. म्हणूनच मानवी हक्काची प्रतिष्ठा स्थापन करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. दलित समाजाला अशा अनेक धार्मिक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. असे आंबेडारांचे मत झाले होते. त्यामुळेच आंबेडकरांनी मनुस्मृति ग्रंथ जाळण्याचे ठरवले तत्पुर्वी आधीच्या शतकात राष्ट्रपिता जोतिराव फ़ुलेंनी "जाळून टाकावा  । मनुग्रंथ ॥ असे म्हंटले होते. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली (१९२७) त्याला पुढच्या वर्षी ९० वष्रे पूर्ण होतील,  त्यामुळे मनुस्मृति विषयी जाणुन घेणं महत्वाचे आहे. 
             भुतांत प्राणी श्रेष्ठ, प्राण्यात बुद्धीजीवी, बुद्धीवंतांत मनुष्य़ श्रेष्ठ आणि मनुष्यात ब्राह्मण श्रेष्ठ, शुद्रास मति (ज्ञान) देऊ नये, कोणताही धर्मोदेश देऊ नये, कोणतेही व्रत सांगु नये. जो धर्म सांगतो तो नरकात बुडतो. (मनुस्मृति अ.१०/१२३), असे अनेक (१०/२५, १/९१, १०/२६, ९/१८) श्लोक आहे ज्यामध्ये शुद्रांनी फ़क्त ब्राह्मणांची सेवा करावी. लिहु, वाचू नये अन्यथा ते नरकात जातात. शुद्रांनी फ़क्त उष्टे अन्न खावे, उपास-तपास करू नये, स्त्री-शुद्रांना धर्माधिकार नाहीत, शुद्रांनी विनातक्रार तीन्ही वर्णाची सेवा करावी. मनुस्मृतिमुळे ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व वाढले. स्त्री-शुद्रादी नगण्य झाले. या सर्व कारणामुळेच २५ डिसेंबर १९२७ रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जनसमुदायासमोर भाषण करून त्यांच्या मते अस्पृष्यता आणि विषमतेचे समर्थन करणारा, ब्राह्मणवर्ग सांगेल तोच कायदा व नियम माननारा आणि शुद्र आणि स्त्रीयांचे सर्व अधिकार हिरावून घॆणारा ग्रंथ मनुस्मृति जाळून टाकला. आंबेडकरांनी मनुस्मृति जाळली ही जाती-वर्ण द्वेषातून नाही. ज्या ग्रंथामुळे माझ्या समाजाला जनावारा पेक्षा वाईट वागणूक मिळते, या वागणूकीला प्रेरणा मनुस्मृतितून मिळत आहे असा समज आंबेडकरांचा झाला होता. पण आज त्यांचे अनुयायी केवळ हिंदु तथा ब्राह्मण द्वेषातून मनुस्मृतिला विरोध करताना दिसत आहेत.
            सध्या मनुस्मृति जाळल्याचा दिवस "मनुस्मृति दहन दिन" म्हणून साजरा केला जातो यावेळी दलित-आंबेडकरवादी लोक मनुस्मृति जाळल्याचा आनंद व्यक्त करतात. पण या सर्वांमध्ये एक वास्तव मान्य करावंच लागेल की मनुस्मृति दहन दिन साजरा करणार्यांना (किंवा तसा उल्लेख करणार्याला) मनुस्मृति विषयी किती ज्ञान आहे हे सांगणे कठीन आहे हीच अवस्था मनुस्मृतिच्या समर्थकांची आहे. आपण हिंदु आहोत आणि म्हणून मनुस्मृति आपल्याला पुज्य आहे तसेच आपण दलित आहोत आणि बाबासाहेबांनी जाळली म्हणजे नक्कीच ती वाईट आहे. असे दोन्ही पक्षाचे तर्क असतात. यावर समर्थक आणि विरोधक यांच्यापैकी किती लोकांनी मनुस्मृति वाचलेली आहे हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.
मनुस्मृति तथा हिंदु धर्मग्रंथ आणि समाजमन
              आजच्या काळामध्ये हिंदु धर्मग्रंथावर टिका करणे हे पुरोगामीत्वाचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. तुम्ही कितीही समता-बंधुतेचा जागर करा, तुम्ही कितीही निर्लपबुद्धी आणि निपक्षपाती जीवन जगा पण त्याला पुरोगामीत्वामध्ये कवडीची किंमत नाही जोपर्यंत तुम्ही किमान एका हिंदु धर्मग्रंथा विरोधात एकतरी शब्द उच्चारत नाही. या तथाकथित पुरोगामी लोकांना अशी संधीही हिंदु धर्मातील ठेकेदार आणि धर्मरक्षकांमुळेच मिळते. जगात कोणत्याही धर्माचे नाहीत एवढे ग्रंथ हिंदु धर्माचे आहेत. पण हिंदु धर्मरक्षकांनी धर्माचे तत्वज्ञान केवळ ग्रंथापुरतेच मर्यादित राहू दिले. कारण यांना जास्त रस टिकाकारांचे खंडण तथा ग्रंथांचा प्रसार करण्यापेक्षा त्यांना केवळ विरोध करण्यातच असतो. "वेदां"पासून ते "श्रीमद्भगवतगीता" आणि "ज्ञानेश्वरी" पासून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या "ग्रामगीता" पर्यंत या सर्व ग्रंथाविषयी धर्मरक्षकांच्या काय भावना तथा आस्था आहेत हे अजुनही स्पष्ट झालेले नाही कारण धर्मग्रंथांपेक्षा केवळ धर्म (हा शब्दच) च परमपवित्र वाटतो. धर्माचा प्रसार हा धर्मातील वैश्विक आणि शास्वत तत्वाज्ञानामुळे होत असतो त्यामुळे धर्माबरोबरच धर्मग्रंथांचे तत्वज्ञान आणि विचार लोकांपर्यंत येणे अत्यावश्यक आहे.
        आज सर्व धर्मग्रंथापैकी समाजावर प्रभाव पाडणारे दोनच ग्रंथ अहेत, श्रीमद्भगवतगीता आणि मनुस्मृति. मनुस्मृति अप्रत्यक्षात का असेना पण जिवंत आहे. अजाणतेपणाने त्याचे पालन सर्वांकडूनच होते. हिंदुंच्या अनेक परंपरा तथा चालीरिती ह्यांचे मुळ मनुस्मृतित आहे. मनुने ब्रह्मचर्य, ग्रुहस्थाश्रम, संन्यासाश्रम, राजधर्म, चित्तशुद्धी करण्याबाबत विषय सुचविले आहेत. पण काही श्लोकांमध्ये गीतेत नसणारी विसंगति मनुच्या स्म्रुतीमध्ये दिसून येते. संपुर्ण मनुस्मृति वाचल्यानंतर समजुन येईल की मनुने काही आक्षेपार्ह (अनेक लेखकांच्या मते क्षेपक) श्लोक वगळले तर जिवनाचे किती व्यापक स्वरुप मांडले आहे. व्यक्तिगत चित्तशुद्धीपासून ते संपुर्ण समाज-व्यवस्थेपर्यंतचे बोध सुचिले आहेत.
        धर्मग्रंथामध्ये दोन प्रकार असतात सांप्रदायिक आणि वैश्विक. मनुस्मृति म्हणजे सांप्रदायिकच आहे. मनुस्मृतिची रचना इ.पू. २०० ते इ.पू. २०० या काळात झाली असे अभ्यासक मानतात तर डॉ.आंबेडकरांच्या मते इ.पू.१७० ते इ.पू.१५० या काळात मनुस्मृतिची रचना झाली. अर्थातच हे अंतिम सत्य नाही. मनुस्मृतिमध्ये घेण्यालायक आहे तसेच सोडण्यासारख्याही गोष्टीही आहेत. आज बहुतांशी हिंदुंनी त्यातील बहुतांश भाग सोडून दिलेला आहे. मनुस्मृतीमधील घेण्यासारखे आहे त्याकडे दुर्लक्ष करून चुकीचे वचणे दाखवणे हे बरोबर नाही. मनुने कसे चुकीचे वचणे लिहिली आहेत हे दाखवण्यात आपण जास्त वेळ घालवतो आणि चांगल्या विचारांना मुकतो. मनुचे सर्वच विचार मान्य करण्यासारखे नसतील किंवा जे मान्य करण्यासारखे असतील त्यातही विसंगती असेल. हिंदु धर्माचे (म्हणजे हिंदुंनी आपले मानलेले) पुष्कळ ग्रंथ आहेत त्या सर्वच ग्रंथामध्ये एकवाक्यता असेल असे सांगता येत नाही भिन्न वचणे वाचायला मिळण्याची शक्यता असू शकते. आपल्याला इथे मनुस्मृती विषयीच्या एकंदरीत तर्क - वितर्काकडे बघायचे आहे. मनुस्मृति का चांगली किंवा का वाइट किंवा अमुक श्लोकात काय म्हंटले आणि तमूक  श्लोकात काय ? याचा अभ्यास तुम्ही वयक्तिकरित्या करू शकता.
मनुस्मृति आणि वर्णव्यवस्था
             महर्षी मनु महाराज कोण होते ?, कोणत्या वर्णाचे होते ?, एकून मनु किती होते ?, किंवा मनुस्मृतिची रचना नेमकी कोणत्या काळी झाली ? हे थोडं बाजुला ठेऊ. मनुस्मृतिमध्ये साधारण २६८५ श्लोक आहेत. संपुर्ण मनुस्मृतिमध्ये ब्राह्मण आणि क्षुद्र या वर्णाविषयी जास्त लेखन मिळते. मनुस्मृति म्हणजे केवळ वर्णव्यवस्थावादी आहे. मनुस्मृति गुणकर्मावर आधारीत वर्णव्यवस्था मानते. त्यामुळे जन्माधिष्ठीत जातीव्यवस्थेला डोक्यावर घेऊन जातीचे फ़ायदे घेणार्या अर्धवटांनी गुणकर्मप्रमाणित वर्णव्यवस्थेविरोधात बोलताना विचार करणे आवश्यक आहे.
            मनुस्मृतिबद्दल अजुनही स्पष्टता नाही कारण अभ्यासकांचे म्हणणे आहे की १७९४ साली विल्यम जोन्स यांने मनुस्मृति अनुवादित केली त्यानंतर त्यामध्ये इतर वर्णाविषयी आक्षेपार्ह नोंदी केल्या. मनुस्मृतिबाबत बोलताना दोन मुख्य आरोप केले जातात. ते म्हणजे स्त्रीयांचा अपमान आणि अस्प्रुष्यतेचे समर्थन. प्रथमता स्त्रीयांबाबत मनुस्मृतिचे मत जाणुन घेऊ, कोणतेही प्रतिक्रिया देताना आजच्या काळाची आणि मनुच्या काळाची तुलना करणे गरजेचे आहे. आजच्या काळातही स्त्रीयांचे जीवन इतके स्वतंत्र नाही. आजही स्त्रीला दुय्यम स्थान आहे परिस्थिती काहीशी निवळली असली तरी फ़ारशी नाही. मग मनुचा काळ तर हजार वर्षापुर्वीचा त्यावेळी काय अवस्था असेल ? निश्चितच स्त्रीयांविषयी मनुस्मृतिमध्ये आक्षेपार्ह वक्तव्ये केली गेलेली आहेत ती निषेदार्ह आहेतच. पण सर्वच लेखन स्त्रीविरोधी आहे का ? तर नाही. तर स्त्रीयांची बाजु मांडलेले ही लिखान आपल्याला आढळेल. मुळात एक गोष्ट समजून घॆतली पाहिजे ती म्हणजे स्त्रीयांवर जे आरोप केले गेलेले आहेत ते म्हणजे स्त्रीया आजन्म अशा असतात असे नाही तर त्यांचा स्थायी गुणधर्म सांगितला आहे. आजच्या काळात त्याचे समर्थन होऊ शकत नाही पण मनुने स्त्रीयांचा मुळ स्वभाव सांगितला आहे. चांगल्या कुळीन संस्काराने स्त्रीयांमध्ये सुधारणा होऊ शकते हेच त्यामागचे सत्य. त्याचवेळी स्त्रीयांच्या हक्काधिकाराविषयी सुद्धा मनुनी लिहिले आहे. आता विषेश म्हणजे सवर्ण समाजातील स्तीयांविषयी अश्लाघ्य टिका करणे, त्यांच्या स्त्रीयांविषयी पुस्तकातून घाणेरडे लिखान करणे असे भिमपराक्रम करनार्यांनी मनुने स्त्रीयांचा अपमान केला म्हनून मनुस्मृतिला विरोध करणे केवळ दुटप्पीपणाचे तथा मुर्खपणाचे आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये कुटुंब नियोजनाला विरोध आहे. मुस्लिम धर्मामध्ये आजही स्त्रीयांची काय परिस्थिती आहे हे तथाकथित पुरोगामी लोकांना माहीत आहे का ? नक्कीच माहीत आहे पण त्यांच्या विरोधात बोलाव तर मिळत तर काहीच नाही पण हातच्या पुरोगामित्वाच्या प्रमाणपत्राची वैधता संपण्याची भिती.
           अस्प्रुष्यता : मनुस्मृतिवरील आणखी एक आरोप म्हणजे अस्प्रुष्यतेचे समर्थन. मुळात आपण एक गॊष्ट लक्षात घेतली पाहिजे की मनुची व्यवस्था ही कर्मप्रमाणित व्यवस्था होती त्यामूळे अमुक जात बहिष्क्रुत करा असं कूठं आढळणार नाही. पण आज आपल्याला पुरोगामी बनायचं असेल तर मनुस्मृतितील अस्प्रुष्यतेवर घाणाघाती टिका करावीच लागते त्याशिवाय पुरोगामित्वाचे प्रमाणपत्र मिळत नाही. वर्णव्यवस्था आणि अस्प्रुष्यता आजही आस्तित्वात आहे आणि राहील. कालांतराने अस्प्रुष्यता नाहीशी जरी झाली तरी वर्णव्यवस्था शाश्वत आहे आणि राहिल. फ़रक एवढाच की ती जातीनिधिष्ठ न राहता श्रीमद्भगवतगीतेत सांगितल्याप्रमाणे गुणकर्मावर आधारीत राहील हेच सत्य आहे. मी वयक्तिकरित्या अस्प्रुष्यतेला विरोध करत नाही जर ती जातीनिधिष्ठ नसेल तर. अशी अस्प्रुष्यता आजही अस्तित्वात आहे. आज पुरोगामित्वासाठी अस्प्रुष्यता विरोधात ढोल बडवावा लागत आहे, तसे नसते तर यांनी परिणामावर ओरडण्यापेक्षा कारण शोधले असते. अस्प्रुष्यतेला मुळ कारणीभुत होते ते संस्काराचा अभाव आणि घाणेरडे राहणीमान यामुळे त्यांच्यावर अस्प्रुष्यतेचा शिक्का बसला कालांतराने हिच त्यांची ओळख बनून गेली आणि ती जातीवर लादली गेली,  यामध्ये अस्प्रुष्यांचा दोष नसेलही किंवा सर्व वर्णाना गुरुप्रमाणे संस्कार करणे ब्राह्मणांचे काम होते ते त्यांनी प्रामाणिकपणे केले नाही हे खरे असले तरी अस्प्रुष्यता मानणारे दोषी होतेच असे म्हणता येणार नाही कारण हे त्यांच्या अडाणीपणातून होत असे. आजच्या काळातसुद्धा दुर्गंधी - अस्वच्छ असनार्या लोकांना इतर लोक जवळ करत नाहीत ही स्वाभाविक प्रतिक्रिया आहेत. मग हजार वर्षापुर्वी काय अवस्था असेल याची कल्पना केल्यास परिस्थिती उजेडात येईल.
         ज्या काळात माणुस जगत असतो तो त्याच प्रमाणे लिखान करत असतो हा नियमच आहे. सध्याच्या वातावरणानुसार माणुस जी कल्पना करू शकतो त्याच्यातूनच तो जग पाहत असतो.आजच्या काळात कोणीही काही लिहिल ते आजच्या काळात योग्य ठरेल पण इथून पुढे शेकडॊ - हजारो वर्षांनी कालबाह्य होईल हा परिवर्तनाचा नियम आहे. मनुस्मृतिच्या काळात जे काही लिहिलं गेलं ते सध्या सर्वच समर्थनीय आहे असं नाही. काही निश्चितच आक्षेपार्ह गोष्टी आहेत मनुस्मृतिमध्ये पण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचे अनुकरण का करू नये ? की केवळ चुका दाखवण्यातच धन्यता मानायची ?. कायदा, सुव्यवस्था आणि न्यायव्यवस्था यासाठी लिहिलेला ग्रंथ. राजाचं आचरण कसं असावं, प्रजेचं रक्षण कसं करावं, अत्यंत सुंदर माहीती त्यामध्ये दिलेली आहे. त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे तो फ़क्त हिंदु धर्मापुरता मर्यादित नाही. म्यानमार, इंडोनेशिया सारख्या देशामध्ये मनुस्मृति हा महत्वाचा ग्रंथ मानला जातो. फ़िलीफ़ाईन्स म्हणजे महर्षी मनूं पुतळा उभा केला गेला आहे. मग त्यांनी हे सगळं मनुस्मृति न वाचताच केलं का ? मग लक्षात घ्या जातीभेद आणि द्वेष नेमका कुठे आहे.
             वैदिक-हिंदु विचार-प्रणाली आणि मान्यता  ह्या काळानुसार बदलत राहतात. त्यामुळेच हजार वर्षापासून चालत आलेल्या रुढी-परंपरा आज बदललेल्या तर काही बंद झालेल्या दिसतील तसं इतर धर्मात होत नाही म्हणून धर्म अभ्यासक हिंदु हा धर्म मानण्यापेक्षा एक मान्यता-संस्क्रुती तथा विचार प्रणाली मानतात. मनुस्मृतिमध्ये ज्या श्लोकांवर आक्षेप आहे किंवा जी वचणे विषमतावादी आहेत ती काढून टाकली तरी मनुला फ़ारसा फ़रक पडणार नाही.कारण मनुस्मृति समाजशास्त्र आहे.ती निव्वळ अध्यात्मिक बोधच देत नाही तर सामान्य नितीबोध, सांसरीक कार्यासाठी मार्गदर्शन, राजा तसेच व्यापारी आदींची कार्य - कर्तव्ये याविषयी मनुने मार्गदर्शन केले आहे.यामुळे लक्षात येईल की मनुचा मुख्य उद्देश समाजाला मुख्य व्यवहारीक मार्गदर्शन देण्याचा आहे. म्हणून विनोबा म्हणतात "मनु समाजशास्त्रज्ञ आहे तो नेहमीच बदलत असतो. मनु जर आज असता तर त्याला आपली मनुस्मृति बाजुला सारून वेगळीच मनुस्मृति लिहावी लागली असती. याचा अर्थ पहिल्यामध्ये घेण्यासारखं काही नाही असे नाही. मनुस्मृति सारखे ग्रंथ समाज-व्यवस्था कायम रहावी या उद्देशाने लिहिली गेलेली आहेत".

17 April 2014

"अब्राह्मणी" इतिहासकार : कॉम्रेड शरद पाटील

दिनेश पाटील
संपर्क : ९६२३८५८१०४
        स्वातंत्र्य समता आणि मित्रता ही त्रयी फ़्रेंच समाजक्रांतीने प्रथम प्रवर्तित केली नसून नितींच्या वैराजाने केलेली आहे. तिची समतावादी परंपरा "अब्राह्मणी" परंपरा म्हणून वैदिक काळापासून ओळखली जाऊ लागली. असा क्रांतिकारक सिद्धांत मांडून भारतीय इतिहासातील "अब्राह्मणी" इतिहास आणि ज्ञानपरंपरेची सशक्त पुराव्यानिशी पुनर्मांडणी कॉम्रेड शरद पाटील यांनी केली. म्हणूनच अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचा पहिला "इतिहासकार वा.सी.बेंद्रे पुरस्कार" त्यांना जाहीर झाला, ही महत्वाची घटना आहे. इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रेंनी अब्राह्मणी इतिहास लेखणाचा प्रवाह मराठ्यांच्या इतिहास लेखणात विकसीत केला. त्यामुळेच इतिहासाची नव्याने मांडणी करणार्या संशोधकास हा पुरस्कार दिला गेला. या पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या संशोधनाला ॲकॅडेमिक मान्यता मिळत आहे.
            गेली ४० वर्ष एक "जीवनदायी कार्यकर्ता" म्हणून संशोधन आणि चळवळ या दोन्ही क्षेत्रात अखंडपणे कार्यरत असणार्या शरद पाटील यांना अवहेलना, द्वेष आणि मनहानी सहन करत अत्यंत एकाकी प्रवास करावा लागला. हा प्रवास कोणत्याही वैचारिक तडजोडीशिवाय झाला असल्याने एक "जैविक विचारवंत" ही त्यांची ओळख कोणालाही पुसता येणार नाही.
इतिहासाची पुनर्मांडणी करताना त्यांनी मांडलेली भुमिका, लावलेला इतिहासाचा अन्वयार्थ याबाबत नेहमीच अभ्यासकांमध्ये मतभेद आढळतात. भविष्यातही ते निर्माण होतील. परंतू इतिहासाच्या अभ्यासाची त्यांची अन्वेषण पद्धत, त्यांचे सिद्धांत समग्र समाजाचा इतिहास समजून घॆऊ इच्छिणार्यांना सतत प्रेरक शक्ती देणारे आहेत. भुतकाळाच्या घनदाट अरण्यात दडलेल्या अनेक प्रश्नांची त्यांनी दिलेली उत्तरे नवी द्रुष्टी आणि आत्मविश्वास देतात.
          राम आणि क्रुष्ण यांची भारताच्या इतिहासातील भुमिका, भारतातील आद्य स्त्रीसत्ताक गणराज्याचे ऐतिहासिक महत्व असे अनेक मुलभुत विषय त्यांनी सैद्धांतिक मांडणीत केंद्रस्थानी आणले. इ.स.१९८२ मध्ये रणजित गुहा यांच्या नेत्रुत्वाखाली "वंचितांचे" भारताच्या इतिहासातील योगदान मांडणारा "सबर्ल्टन प्रकल्प" सुरु झाला. त्याअगोदर शरद पाटील यांनी वंचित / हीन मानल्या गेलेल्या जात समुह तसेच स्त्रियांच्या योगदानाचे महत्व अधोरेखित करनार्या अब्राह्मणी परंपरेची सैद्धांतिक मांडणी सुरु केली होती हे महत्वाचे.
         इतिहासाला बुद्ध, दिग्नाग, धर्मकीर्ती ते फ़ुले आंबेडकरांचे असणारे योगदान सैद्धांतिक पातळीवर मांडण्याचा बहुदा पहिला यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. तर फ़ुले आणि आंबेडकर हे दार्शनिक होते हे त्यांनीच सिद्ध केले. भारतीय इतिहासातील अब्राह्मणी ज्ञानशाखेची असणारी भक्कम परंपरा हजारो वर्षाचा भारताचा इतिहास नव्या परिप्रेक्ष्यात मांडून त्यांनी पुढे आणली. "दासशुद्रांची गुलामगिरी", जातिव्यवस्थाक सामंती सेवकत्व, जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी पुर्ती व प्रिमिटिव्ह कम्युनिझम, मात्रुसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवादी या चार ग्रंथामधून त्यांनी हा महाप्रकल्प साकार केला.
           शिवराय-संभाजींची सर्वाधिक चिकित्सा धर्मकेंद्री झाली आहे. ती तशी का झाली हे नव्याने सांगण्याची गरज नाही; परंतू या चिकित्सेतून शिवराय-संभाजींच्या ऐतिहासिक योगदानाला योग्य न्याय मिळाला नाही. शरद पाटील यांनी त्यांच्या "शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रु कोण-महंमदी की ब्राह्मणी ?" या बहुचर्चित मौलिक ग्रंथात जातकेंद्री अन्वेषन पद्धतीद्वारे या दोघांचे समतावादी समाज उभारणीतील मौलिक योगदान पुढे आणले. या पुस्तकाने अनेक प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील प्रस्थापित इतिहास लेखनासमोर कडवे आव्हान उभे केले. महाराष्ट्राची अस्मिता असनार्या शिवरायांच्या वस्तुनिष्ठ आकलनाच्या अनेक शक्यता त्यातून स्पष्ट झाल्या. हे पुस्तक म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचे महाराष्ट्राच्या इतिहासाला असणारे अद्वितीय योगदान आहे. याबरोबरच "अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र" या ग्रंथाने संस्क्रुतीतील  सौंदर्यशास्त्राचे स्थान मराठी साहित्य आणि संस्क्रुतीच्या संदर्भात अधोरेखित केले.
         मराठी साहित्याला स्वत:चे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र नाही. म्हणूनच हे सौंदर्यशास्त्र दिग्नाग आणि धर्मकीर्ती यांसारख्या बौद्ध दार्शनिकांच्या सौंदर्यशास्त्रीय योगदानाशी नाते जोडत दलित अदिवासी साहित्यातील समन्वयातून उभारण्याचा आग्रह त्यांनी धरला.संस्क्रुत, प्राच्यविद्या  आणि तत्वज्ञान या तिन्ही शाखांचा आणि सर्वाहारांच्या चळवळीतील रस्त्यावरचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी घेतलेला अनुभव यामुळे त्यांच्यातील इतिहास संशॊधकाची द्रुष्टी आधिक व्यापक, मुलगामी झाली आहे. त्यांची ही द्रुष्टी निखळ भुमिकेतून स्वीकारल्यास इतिहासाच्या आकलनाच्या प्रस्थापित मर्यादा आणि सांस्क्रुतीक राजकारणाचे दबाव झुगारून संशोधन करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास आणि मनोधैर्य अभ्यासकांना मिळेल. ज्याची उद्याच्या काळात अनिवार्य गरज आहे.
         शरद पाटील यांच्या संशोधनाची तुलना "अल्जेरीअन मनोविश्लेषक" आणि "काळ्यांच्या" आत्मसन्मानाच्या लढ्यातील जीवनदायी कार्यकर्ता फ़्रांन्झ फ़ॅननशी करता येईल. त्यांच्या "वसाहतवादाचे मानसशास्त्र" मांडनार्या "द रेचेड ऑफ़ द अर्थ" या १९६३ मधील महान साहित्य क्रुतीने तुलनात्मक वाचन केल्यास शरद पाटील यांच्या योगदानाचे महत्व अधिक प्रकर्षाने जाणवते. त्यांनी वर्गजातीस्त्रीदास्यातांच्या लढ्यांना अग्रकमाने समजावून घेत माफ़ुआ अन्वेषण पद्धतीने वासाहतिक काळ आणि एकुणच भारतीय इतिहास याकडे पारंपारिक मार्क्सवादी अभ्यासकापेक्षा वेगळ्या आणि बहुपर्यायी द्रुष्टीने पाहिले. याचे कारण असे की फ़क्त मार्क्सवाद, फ़ुलेवाद किंवा आंबेडकरावाद हे द्रुष्टीकोन स्वतंत्रपणे वापरल्यामुळे  समाजाच्या आकलनावर मर्यादा येतात. त्याऐवजी मार्क्स, फ़ुले आणि आंबेडकरांचा समन्वय साधणारी बहुप्रवाही "मार्क्सवाद - फ़ुले - आंबेडकरवाद" ही अब्राह्मणी अन्वेषणपद्धती आधिक व्यापक आणि सर्वस्पर्शी असल्याने या पद्धतीची अनिवार्यता शरद पाटील सातत्याने मांडत आले आहेत. या अन्वेषणपद्धतीमध्ये ते ब्राह्मणी/अब्राह्मणी या कोटीक्रमांचा वापर करतात.हा कोटीक्रम जातीवाचक नसून ज्ञानपरंपरावाचक आहे.
कॉम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा : 
            कॉ. शरद पाटील यांनी दास - शुद्रांची गुलामगिरी, खंड एक भाग १ व दोन इंग्रजी व मराठी तसेच रामायण-महाभारतातील वर्ण संघर्ष खंड १ भाग , जाती व्यवस्थापक सामंती सेवकतत्त्व हे इंग्रजी व मराठी खंड २ भाग १ तसेच शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याचे खरे शत्रू कोण, खंड भाग २  जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती व तिची समाजवादी कृती, मराठी व हिंदी, खंड  तर खंड ४  मध्ये प्रिमिटिव्ह कम्युनिझम मातृसत्ता-स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद असे चार खंड लिहिले आहेत. इतर पुस्तकांमध्ये अब्राह्मणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, मार्क्‍सवाद-फुले- आंबेडकरवाद, भारतीय तत्त्वज्ञान व नास्तिक मत बुध्द-भारतीय इतिहासातील लोकशाही, स्वातंत्र्य व समतेचा अग्निस्रोत, पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका, स्त्री शूद्रांच्या स्वराज्याचा राजा, शोध, मूलनिवासींचा की शूद्र वर्णाचा जात्यंतक समतेचा? नामांतर-औरंगाबाद आणि पुण्याचे, बुध्द, भिक्खू, आनंद, धम्म-आनंद-वधू विशाखा यांचा समावेश आहे.

9 April 2014

आपल्या सर्वांचे शिवराय !!

          आमचं शिवरायांवरचे प्रेम वयाच्या नवव्या वर्षी, चौथीच्या पुस्तकातील अफ़झल खानाच्या चित्रावर पेनाने गिचमिड कालवा करून सुरु झालं. त्याचवेळी चौथीत पहिल्यांदाच कळलं कि वर्गातला नौशाद् शेख आपल्यातला नाही. हे म्हणजे अफाटच होतं, आजपर्यंत आमच्या घोळक्यात तुमच्या-आमच्यासारखाच­ असणारा, मिसळणारा आणि आरेला कारे करणारा नौशाद एकदमच परका झाला होता. आम्ही काही गोष्टी फक्त तो नसतानाच बोलायला लागलो. त्याच्या समोर शिवाजी महाराजा विषयी प्रेम व्यक्त करायला कचरू लागलो. हे त्याने पण लगेच समजून घेतले असावे. कारण त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप बदल झाला होता. जरा मोठे झालो कि कळते कि आपला धर्म आणि जात आपल्या रक्तातच आहे, लहानपणी ते रक्त वेगळे असते का कुणास ठावूक ? पण मोठेपणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या रक्ताचा, रक्तात भिनलेल्या संस्कृतीचा, आपल्या रक्ताशी मिळतेजुळते रक्त असणाऱ्या (जातभाई ) नेत्यालाच आदर्श मानायला चालू करतो. आणि ह्याच वेळी चालू होते दुसर्या जाती - धर्माच्या नेत्यांचा त्या-त्या लोकांच्या समोर अतोनात आदर करणे. मग अश्या तर्हेने परतफेड चालू होते, कुणी आंबेडकरांचे गोडवे गातो, कुणी शिवाजी महाराजांचे, कुणी मौलाना आझाद, टिपू सुलतान किंवा भगवानबाबा. दहावी पर्यंत येस्तोवर कळले कि आपण समाजात असताना सर्वधर्म समभाव असतो आणि सजातीय लोकामध्ये असताना आपली जात आणि धर्म संकटात आलेला असतो. बहुतेक लोक हे अश्या तर्हेचे सोंग घेवून समाजात वावरत असतात आणि वरून मी जातीभेद धर्मभेद मानत नाही असे सांगताना "त्या" लोकानी एवढे माजल्यावणी करायला नाही पाहिजे असे सल्ले पण देत असतो.
हळू हळू दहावी पर्यंत नौशादचा ग्रुप वेगळा झाला व आमचा वेगळा. तरी पण क्रिकेट खेळायला, गणपतीची वर्गणी मागायला तो आमच्यात असायचाच. पण आमच्या लक्ष्यात येवू लागले कि प्रत्येक वेळी याला आपण देशाशी कसे इमानदार आहोत, हिंदू धर्माचे शत्रू नाही आहोत हे सिद्ध करावे लागत आहे किंवा तोच स्वता:हून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सईद अन्वरला आमच्या पेक्ष्या एक शिवी तो जास्तच द्यायचा. डोक्याला नेमाटी वोढून शिवजयंतीची वर्गणी मागताना शिवाजी महाराजा बद्दलचा त्याचा आदर आम्हाला नेहमी जास्तच वाटायचा. चुकून आम्ही कधी "शिवाजी" बोललो तरी तो फक्त "महाराजाच" म्हणायचा. अर्थात त्याच्या आदराविषयी अजिबात शंका नाही पण आमच्या इतर मित्रापेक्षा त्याचे योगदान नेहमीच जास्त असायला पाहिजे असा त्याचाच दंडक होता. असा दंडक त्याने का करून घेतला असेल याचे उत्तर आजच्या अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक ह्या दोन सज्ञे मध्ये आढळेल. त्यांनी इथे राहावे पण आम्ही सांगेन तसेच दुय्यम नागरिकत्व पत्करून राहावे हि आपली सुप्त पण कधी कधी उतू येणारी भावना. एकुणातच हे राज्य आमचे आहे हि भावना जणतेमध्ये निर्माण करणे हे म्हणजे धोरणात्मक रित्या शिवाजी महाराजांच्या विचारणा मूठमाती देण्यासारखे आहे.
शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे बघताना सर्वसामान्य मराठी माणूस हा अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह, आणि भवानी तलवार ह्या पुढे जाताना दिसत नाही तर अमराठी माणूस हा मराठ्यांचे राज्य, लुटारूंचे राज्य अश्या कुत्सित नजरेनेच बघताना दिसतो. ह्याला मूळता आपली शिक्षण पद्धती आणि राजकारणच कारणीभूत असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे स्वतंत्ररित्या पाहता येवू शकणार नाही. हिंदुस्थानमध्ये दक्षिण उत्तर आणि पशिच्म पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारा, हे राज्य राजाचे नाही तर रयतेचे आहे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा तो एकमेव राजा होवून गेला. शिवाजी महाराजांनी स्वता:साठी फक्त कार्यकर्ते नाहीत तर आपल्या पाठीमागे राज्य सांभाळतील असे नेते तयार करून एक स्वराज्याचा विचार दिला होता म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीत तयार झालेले ह्या छोट्याश्या स्वराज्याने पुढे जावून आपली सीमा उत्तरेकडे अफघानिस्तान पर्यंत तर दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत पोहचवली.
शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीनंतर नंतर जवळ जवळ पावणे चारशे वर्षांनी जर आजच्या समाजाकडे आणि राज्यव्यवस्थेकडे पाहिले तर ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो कि आपण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या, समानतेच्या, न्यायाच्या, कायद्याच्या राज्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेला तिलांजली दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागणारे महाराजांचा नेमका कोणता विचार रुजवू पाहत आहेत हेच कळत नाही. आजचा काळ मला शिवपूर्व काळाची आठवण करुण देत आहे. मुघलांनी आणि इतर दक्षिणेतल्या शाह्यांनी जसे सरंजामशाहीला प्रोत्साहन देवून हिन्दुस्थानवरचि आपली पकड मजबूत केली होती तशीच पकड लोकशाही मार्गाने दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी खानदानी सरंजाम निर्माण करून आपले राज्य चिरायू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वतणासाठी झालेल्या लढाया आपण कधी कधी पाहतो पण त्यामुळे वरच्या सल्तनतीला काहीच फरक पडत नाही.
प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजी महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचे माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.
आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगलीसाठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील आणि नौशाद पुढे त्याच्या मित्रांना महाराजा विषयी बोलताना अडखळण्याची गरज पडणार नाही किंवा किंवा नौशादाला त्याची इमानदारी सिद्ध करण्यासाठी सईद अन्वरला एक शिवी मुद्दामहून जास्त द्यावी लागणार नाही.

संदर्भ- http://vikasgodage.blogspot.in.
लेखक - विकास गोडगे सर.

14 February 2014

शिवजन्मोत्सव : १९ फ़ेब्रुवारी

        शिवरायांची आठवण तर उठता बसता, चालता फिरता, कायमस्वरुपी यायला हवी. पण जर एकाच दिवशी महान शिवजन्मोत्सव  करायचा असेल तर तो तारखेप्रमाणे केला पाहिजे. १९ फ़ेब्रुवारी ही तारीख अवघ्या जगभरात मान्य केली असताना हिंदुत्व वाद्यांच्या काही सडक्या कल्पनेने नासलेले काही लोक मात्र तिथी चा आग्रह धरतात. मुळात देशातला कोणताच व्यवहार हा तिथी प्रमाणे न होत तारखे प्रमाणे होतो. शाळा, कोलेज, न्यायालये, बाजारपेठा, संसद हे सगळे तारखेप्रमाणे चालतात आणि तारीख ही जगभरात इथुन-तिथुन एकच असते. म्हणजे तारखेप्रमाणे (१९ फ़ेब्रुवारी) जर शिवजयंती साजरी केली तर ती जगभरात साजरी होईल आणि सर्व मराठे एकत्र जमतील ही भीती सड्क्या डोक्याच्या उपटसुंभांना आहे म्हणुन त्यांनी तथाकथित हिंदूह्र्दयसम्राटांना  हाताशी  धरून  मराठ्यांत  फ़ुट  पाडण्यासाठी  आणि  शिवजयंती फ़क्त महाराष्ट्रापुरती मर्यादित करण्यासाठी तिथी चा आग्रह धरतात.कुठल्याही व्यक्तीला शिवजयंतीची तारीख विचारली तर तो १९ फ़ेब्रुवारी ही तारीख पटकन सांगू शकेल. पण तिथी कोण सांगु शकेल काय ? 
         छत्रपती शिवरायांच्या जन्मदिनाबाबतचा वाद गेली शंभर वर्ष आहे, शिवचरित्राच्या अनेक साधनांमधून साधारणत: दोन जन्मतिथी येतात.वैशख शके १५४९ म्हणजे एप्रिल१६२७ आणि फ़ाल्गुन शके १५५१म्हणजे फ़ेब्रुवारी १६३०. सर्वप्रथम १९०० मध्ये वि.का.राजवाडे यांनी बखरीच्या आधारे शके १५४९(१६२७) हा शक निश्चित केला.नंतर "जेधे शकावली"मिळाल्यावर शके १५५१शुक्ल संवत्सर, फ़ाल्गून वद्य त्रुतीया(१६३०) ही नवी तिथी उजेडात आली. जेधे शकावली हे मराठ्यांच्या इतिहासातील एक अस्सल साधन व अव्वल प्रतिचा ऐतिहासिक कागद मानल्याने या जन्मतिथीबद्दल विद्वानांत एकमत होऊ लागले.
              इ.स. १६२७(शके १५४९) ही जन्म तारीख पुढील साधनांच्या आधारे मानली गेली होती. [१]९१ कलमी बखर [२] मल्हार रामराव चिटणीस बखर [३] मराठी साम्राज्याची छोटी बखर [४] शिवदिग्विजय [५] श्री शिवप्रताप [६] पंत प्रतिनिधीची बखर इ.इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी की, या बखरी व इतर साधने पेशवाई व उत्तर पेशवाईतील आहेत.
                इ.स.१६३०(शके १५५१) या तिथीचा आधार मुखत्वे जेधे शकावली, शिवभारत व शिवराम ज्योतिषी हा आहे.जेधे शकावली ही छत्रपतींच्या म्रुत्युनंतर १०-१५ वर्षांत लिहिण्यात आली आहे. शिवभारत हा काव्यग्रंथ छत्रपती शिवरायांच्या पदरी असणार्या परमानंद कवीने लिहिला आहे. तर शिवराम ज्योतिषी हा छत्रपती शिवरायांचा समकालीन होता.
             वरील सर्व मतमतांतरातून शिवजन्माची तिथी निश्चितीसाठी महाराष्ट्र राज्यशासनाने दत्तो वामन पोतदार, प्रा.न.र.फ़ाटक, डॉ.आप्पासाहेब पवार, ग.ह.खरे,बा.सी.बेंद्रे, बाबासाहेब पुरंदरे यांची "निर्णय समिती" १९६६ मध्ये नेमली. परंतू त्यातून तिथीनिश्चिती न झाल्याने इ.स.१६२७ ही तिथी चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. हा वाद २००१ पर्यंत चालला.शासनाने २००१मध्ये अध्यादेश काढून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही जन्मतारीख निश्चित केली. या तारखेनंतर एक नवा वाद काही ब्राह्मणवादी मंडळींनी सुरु केला. त्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे, "कालनिर्णय" वाले जयंत साळगावकर, निनाद बेडेकर आदींचा समावेश आहे. या मंडळींच्या मते शिवजयंती ही इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी न करता मराठी तिथीप्रमाणे करावी.तिथीप्रमाणे शिवजयंतीची तारीख सतत बदलत राहते. म्हणजे २००० साली शिवजयंती २३ मार्च ला होती तर २००१ ला १२ मार्च,२००२ ला ३१ मार्च, २००३ ला २० मार्च, २००४ ला ०९ मार्च आणि २००५ ला २८ मार्च रोजी.
             आता इथे एक प्रश्न तयार होतो तो असा की ,बाळ गंगाधर टिळक,हिंदुत्ववाद्यांचे प्रेरणास्थान विनायक सावरकर, गांधी, नेहरू अशा अनेकांची जयंती सर्वत्र  इंग्रजी तारखेप्रमाणे साजरी होते मग विश्ववंद्य छत्रपती शिवरायांची जयंती तिथीप्रमाणे का ?
              हिंदुंच्या  कालगणनेनुसार शिवजयंती व्हावी असा आग्रह हे लोक धरतात. परंतु  हिंदूंची  कालगणना  एक  नाही. भारतात  विक्रम संवत व शालीवाहन शक अशा दोन  कालगणना  हिंदुंच्या आहेत. यातही बोंब अशी की   या   कालगणनेमध्ये   भारतातच  अनेक  बदल  आहेत  .उदा. विक्रम संवतच्या  वर्षाची सुरुवात बंगाल व इतर प्रांतात चैत्र शुक्ल प्रतिपदा आहे. तर  गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात आषाढ शुद्ध प्रतिपदा आहे. तर शाहीवाहन शक महाराष्ट्रापेक्षा तामीळनाडूत एक वर्षाने  पुढे आहे. म्हणजे तामिळनाडूत  ३०० वी  शिवजयंती असेल  तर महाराष्ट्रात २९९ वी शिवजयंती असते.
                याचा अर्थ इतकाच की हिंदूंची म्हणून खात्रीपुर्वक सांगता येईल अशी सर्वमान्य कालगणना वापरात नाही. व्यवहारात सर्व सामान्य माणसे हिंदूंची कालगणना वापरत नाहीत तर इंग्रजी कालगणना वापरतात.जर तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करायची म्हंटले तर मागील वर्षी किती तारखेला जयंती झाली किंवा पुढील वर्षी  किती तारखेला जयंती येईल हे साळगांवकर सारख्या भटांच्या पंचांगाचा आधार घेतल्याशिवाय सांगता येणार नाही.
         आज शिवजयंती महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरदेखील साजरी होत आहे. त्यामुळे शिवजयंती ही प्रतिवर्षी एकाच तारखेला शिस्तबद्धपणे साजरी होणे महत्वाचे आहे. काही ब्राह्मणवाद्यांना मात्र शिवजयंतीच्या माधमातून स्वत:चे स्वार्थी राजकारण राबवायचे आहे म्हणून ते इंग्रजी तारखेला विरोध करत असतात. तिथीच्या आग्रहामुळे शिवजयंती उत्सवात एकवाक्यता राहत नाही. ही गोष्ट छत्रपती शिवरायांच्या व्यक्तिमत्वास हानीकारक आहे. म्हणून १९ फ़ेब्रुवारी १६३० ही तारीख बरोबर आहे हे सत्य स्विकारून मोठ्या प्रमाणात शिवजयंती १९ फ़ेब्रुवारी रोजीच धुमधडाक्यात साजरी केली पाहिजे. शेवटी शिवभक्तांचा निर्णय हा अंतिम आहे. पुन्हा एकदा शिवभक्तांना विनंती कि छत्रपती शिवराय यांच्या दोन जयंत्या करुन राजांची थट्टा थांबवावी. छत्रपतींचा जन्मोत्सव जर जागतिक दर्जाचा बनवायचा असेल तर आपणास जगमान्य असलेल्या कॅलेंडर नुसार तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करावी लागेल. सर्व शिवभक्तांना पुन्हा एकदा आवाहन शिवजयंती हि तारखे प्रमाणेच करावी. 
जय जिजाऊ । जय शिवराय । जयोस्तु मराठा । जयोस्तु शिवराष्ट्र ॥